Saturday, 27 April 2019

माझ्या क्लासच्या पहिल्या बॅचचा निरोप समारंभ....

                आज आमच्या क्लासच्या पहिल्या बॅचचा ,निरोप समारंभ  होता. ज्या मुलांनी मला भरभरून प्रेम दिलं , मी शिकवताना, माझ्या शिकविण्यात रस घेउन , आपली प्रगती करून घेतली , त्यांना निरोप देताना मन भरून आलं होतं . त्यातल्या कांही मुलांच्या डोळ्यात, मला तोच भाव दिसला. शेवटी कोणाचा ही निरोप घेणं, हे क्लेशकारकच असतं .
                गेल्या वर्षीच्या (२०१७ ) जुलै महिन्यात, मी आठवीच्या मुलांना, गणित आणि विज्ञान शिकवायला सुरवात केली. अगदी मोफत . मोफत शिकविल्याने पैशाचा हिशोब , फी ची मागणी , हे कोणते ही सोपस्कार आमच्या या क्लास मध्ये नव्हते. फक्त शिकणे आणि शिकविणे , हेच एकमेव ध्येय होते.
               सुरवातीला माझ्या वर्गात, एकूण १८ मुले होती. त्यातल्या १० मुलांनी, क्लास सोडला. कांहींना परिस्थितीने नोकरी करावी लागली . कांही मुले लांब रहायला गेली . कांहींना शिकण्यात फारसा रस नव्हता . अशा अनेक कारणांनी, त्यांनी क्लास सोडला. शेवटी फक्त आठ मुले राहिली. त्यात तीन मुली व पाच मुले होती.
                   या मुलांची उच्च ध्येये होती. दोन मुलींना IPS व्हायचे आहे . एकीला डाॅक्टर व्हायचे आहे. मुलांच्या पैकी एकाला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. दोघांना अभियंता व्हायचे आहे. एकाला मिलिट्रित ब्रिगेडियर व्हायचे आहे. अशी त्यांची उच्च ध्येये आहेत. ही ध्येये साध्य करणे सोपे नाही . जाता जाता, कसाबसा अभ्यास करून, ही ध्येये साध्य होणार नसून, त्या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल , हे त्यांच्या मनावर बिंबविण्याचा ,अटोकाट प्रयत्न मी केला. नुसते  ठराविक विषय शिकविण्या पेक्षा ,मी त्यांच्या मनावर सुसंस्कार करण्याचा ,खूप प्रयत्न केला आहे.
                   रोज क्लासची उपस्थिती घेताना, मी त्यांना खालील वाक्ये, म्हणायला सांगत असे... १. माझे आई वडील मला ,कष्ट करून शिकवितात . मी भरपूर अभ्यास करीन , खूप शिकेन व आई वडीलांना सुखात ठेवीन . २, मी विद्यार्थी आहे. अभ्यास करणे, हे माझे कर्तव्य आहे , ते मी पार पाडीनच . ३. मी पैसे मिळवायला लागल्यावर ,कमित कमी २५ % रक्कम ,दर महिन्याला, शिल्लक टाकीन. ४. मी रोज  जमा खर्च ,डायरीत लिहील्या शिवाय, झोपणार नाही. ५. तोच तोच विषय ,पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास ! विषयात बदल, हीच विश्रांती .६. जो अभ्यास करेल तोच माझा मित्र ! जो अभ्यास करीत नाही, तो माझा मित्र नाही ! इत्यादी इत्यादी.
                  तसेच क्लास सुरू होण्या पूर्वी आणि संपताना ,एकमेकांना गुड इव्हिनिंग  ,  गुड नाईट इत्यादी न म्हणता , "जय हिंद " असेच म्हणायचे , अशी माझी सक्त ताकीद होती. मुलांनी हे तत्व , तंतोतंत अंगीकारले होते.
                 मुले गरीब परिस्थिती मधील होती. पण त्यांना आपला उत्कर्ष व्हावा, याची जबरदस्त इच्छा होती. त्यांचे प्रत्येकाचे ध्येय, कितपत साध्य होईल माहिती नाही. पण दिशा दर्शनाचे काम , मी निश्चितच केले ,याचे मला समाधान निश्चितच आहे. परमेश्वराने मुलांना सुयश द्यावे , हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो !




No comments:

Post a Comment