Saturday, 27 April 2019

एक मन हेलावून टाकणारी गोष्ट

                 खूप दिवस झाले त्या गोष्टीला ,पण आज आठवण झाली आणि सर्वांना सांगावीशी वाटली. फार सांगण्या सारखी आहे ,असं नाहीय. पण ह्रदयाला भिडणारी आहे , म्हणून सांगावीशी वाटते आहे ,इतकच !
               अंदाजे १९९४ - ९५ साल असेल. मे महिन्याच्या सुट्टीत, शाळेच्या अभ्यासात  अप्रगत असलेल्या  मुलांना , शिकवावं आणि त्यांची प्रगती व्हावी ,असे मिरजेच्या श्री. दिलीप आपटे सरांच्या मनात आलं .त्यांनी प्रत्येक महापालिकेच्या शाळेत जाउन ,अशा अप्रगत म्हणजे अभ्यासात मागे असलेल्या ,विद्यार्थ्यांचा शोध घेतला व १ मे रोजी, अशा सर्व मुलांना एकत्र जमवलं.
               सर्व साधारण पणे ,ही सर्व मुले, अतिशय गरीब परिस्थिती मधील होती. त्यांचे पालक साधारणतः मजूर किंवा त्या ही पेक्षा खालच्या ,गरीब परिस्थिती मधील होते. पहिली ते सातवी असे वर्ग होते.
                त्यांना शिकविण्यासाठी, ज्यांची १० वीची परिक्षा झाली आहे व जी मुले सुट्टीत कांही करू इच्छितात, अशा मुलांना आवाहन करण्यात आले. ज्यांना सामाजिक जाणिव आहे ,अशी मुले आवर्जून आली. शाळेतील शिक्षकांनी शिकविण्या पेक्षा ,विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकविल्यास ,फरक पडेल अशी त्या मागची प्रेरणा होती. या उपक्रमात मदतनीस म्हणून ,मी सहभागी झालो होतो. 
                 हा अप्रगत विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम ,मिरजेच्या तळ्यावरील गणपती मंदिराच्या प्रांगणात ,चालू होता. रोज सकाळी आठ ते दहा , या वेळात हे वर्ग चालत.
                 एक दिवस सर्व सुरळीत चालू आहे ना ? शिकविणार्‍या विद्यार्थ्यांना कांही अडचण नाही ना ? हे पहात असताना मला असे दिसले कीं , एक तिसरीतील  ९ -१०  वर्षाचा मुलगा ,वर्गात न जाता मंदिराच्या खांबाला टेकून बसून, रडत आहे . मी त्याच्या जवळ गेलो , " बाळ का रडतोस ? वर्गात का गेला नाहीस ? " असे विचारले. तो म्हणाला ," सकाळी  मी घरचा केर काढला नाही म्हणून ,आजीने मला कांही खायला दिले नाही व मारले , मला फार भूक लागली आहे...."...आणि तो मुलगा मोठ्याने हुंदके देउन ,रडायला लागला. शेजारी एक बेकरी होती. तिथे मी  त्याला नेले व पोटभर खाउ घातले. उद्या सकाळी येताना, तुझ्या आजीला मी बोलावलय म्हणून सांग, असे मी त्याला आवर्जून सांगीतले.
                  दुसर्‍या दिवशी ,तो त्याच्या आजीला घेउन आला. गाठी मारलेले व ठिगळ लावलेले पातळ , अस्ताव्यस्त  पांढरे केस  ,गळ्यात झोळी, असा त्या आजीचा पोषाख होता. मी त्या आजीला म्हटले , " काल हा तुमचा नातू ,तुम्ही खायला दिलं नाही व  घरचा केर काढला नाही म्हणून तुम्ही मारल्या ने रडत होता. ती म्हणाली " घरात खायला भाकर तुकडा न्हवता , मी बी कातावून गेलो हुतो ,  त्यात ह्यानं केर बी काडला न्हाइ , मला माजाच राग आला हुता , मग मी मारलं त्येला ! तुमाला काय सांगायचं सायेब , हे लेकरू माज्या वटीत सोडून ह्याचे आय आनि बा परागंदा झाल्यात. मी सकाळ झाली की , झोळी घीउन काय किडूक मिडूक गोळा करत्ये , ते इकून आमी कसं बरं पोट जाळतो. " ह्याचे आई वडील कुठं आहेत ? असं विचारताच त्या माउलीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. हुंदके देत ती बाई सांगू लागली " ह्येचा बा , तकडं नागपूराकडं शेंट्रिंगगच्या कामाला जातो म्हनून जो गेलाय तो तिकडचाच झालाय. आनि ह्याची आई कुना बरूबर पळून गेलीय , काय म्हाईती बी न्हाई . ह्ये लेकरू रोज आई बा येतील म्हनून डोळं लावून बसतय , पन त्ये काय येतीलसं दिसत न्हाई. मी ही अशी म्हातारी , झोळी घीउन फिरतो , कदी काय मिळतय ,कदी कायबी मिळत न्हाय. कसं बसं दिस वडतूया ह्या लेकरा साठी. काय म्हायती ह्येच्या नशिबात काय हाय ते ! " असं म्हणून ती म्हातारी ओक्साबोक्शी रडायला लागली . समाजातलं हे मन विदिर्ण करणारं वास्तव पाहून मी पण गलबलून गेलो............

No comments:

Post a Comment