Saturday, 28 December 2019

श्री. दिलीप आपटे ...एक निरपेक्ष समाजोध्दारक....

             आज मी तुम्हाला ,एका वेगळ्याच व्यक्तीची ओळख करून देणार आहे ! त्यांचे नाव आहे श्री. दिलीप आपटे. त्यांना कोणी आदरणीय आपटे सर , आदरणीय आपटे गुरूजी, या नावाने ही ओळखतात . मी त्यांना लहानपणा पासून ओळखतो. मिरज शहरात आम्ही एकाच गल्लीत रहात होतो. पायाने अधू असलेला पण  तल्लख बुध्दीमत्तेचा दिलीप सर्वांनाच माहिती होता. शैक्षणिक करीयर अतिशय उत्तम ! सांगली बॅंकेत उच्च पदावर नोकरी ! घरी पत्नी आणि दोन मुले ! सर्व ऐहिक सुखांचा लाभ घेत, संसार उत्तम चाललेला ! अचानक चेन्नईला बदली झाली. तिथले वातावरण आणि एकूणच, बॅंकेतल्या नोकरीचा कंटाळा आणि वीट आल्याने ,त्यांनी नोकरीचा राजिनामा दिला आणि  मिरज गाठले.
              पूर्वी संस्कृतचा व्यासंग होताच ! त्यांनी श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीमद् भागवताचा अभ्यास सुरू केला. उत्तम बुध्दीमत्ता असल्याने, त्यातील  गुह्यतम ज्ञान अगदी थोड्या कालावधीतच त्यांनी आत्मसात केले.  तसेच त्या अनुषंगाने वेद , उपनिषदे आणि इतर अध्यात्मिक ग्रंथ यातील ही ज्ञान, त्यांनी  अल्पावधीतच ग्रहण  केले . त्या नंतर ते स्वतः श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीमद् भागवतावर प्रवचन देउ लागले. त्यांच्या सुश्राव्य आणि ओघवत्या भाषेतील प्रवचनाने ,श्रोतृगण मंत्रमुग्ध होउ लागला. महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर ही, त्यांची प्रवचने होउ लागली. पण प्रकृति साथ देईना , तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या .
             त्यातच त्यांनी मिरजेत " गीता फाउंडेशनची " स्थापना केली त्या फाउंडेशन तर्फे, " प्राजक्त " हे अध्यात्मिक पाक्षिक सुरू केले. त्यात तरूणांनी, आपले कर्तव्य कर्म चोख पार पाडावे ,पण त्याच बरोबर ,आपल्या समृृृृृृृध्द भारतीय तत्वज्ञानात्मक अध्यात्माचा अभ्यास ही करावा ,अशा आशयाचे लेख  त्यांनी स्वतः लिहीले आणि आज ही लिहीत आहेत . स्वतःच्या गीता प्रवचनांचे पुस्तक , त्यांनी लिहून प्रसिध्द केले आहे. श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीसमर्थांच्या दासबोधाच्या जशा परिक्षा असतात ,तशा श्रीमद् भागवताच्या परिक्षा घेण्यासाठी त्यांनी सर्व तयारी केली , तो उपक्रम ही सध्या, गीता फाउंडेशन मार्फत हाती घेण्यात आलेला आहे.
               मध्यंतरी मिरजेतच ,महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील अप्रगत मुलांच्यासाठी ,त्यांनी वर्ग घेतले. या वर्गांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच गीता फाउंडेशन मार्फत , हुषार पण परिस्थितीने शिकू न शकणार्‍या विद्यार्थ्यांना, आर्थिक मदत दिली जाते. हा उपक्रम ही उत्तमपणे आणि अव्याहत चालू आहे. या उपक्रमा मार्फत शिक्षण घेउन ,कांही विद्यार्थी डाॅक्टर , इंजिनीयर आणि वकील ही झालेले आहेत , होत आहेत .
          विश्व शांती साठी , " विष्णूसहस्त्रनामाची " बारा कोटी आवर्तने, सामुहिक रीत्या  करण्याचा संकल्प, त्यांनी सध्या सोडला आहे. या उपक्रमात माझ्या माहिती प्रमाणे, भारतातून आणि देशविदेशातून ,किमान वीस ते पंचवीस हजार श्रध्दाळू भक्तगण, सामील आहेत. नाशिक मध्येच किमान दहा ते पंधरा मंडळे वेगवेगळ्या मंदिरात किंवा घरात " विष्णूसहस्त्रनामाची " आवर्तने करीत असतात. या उपक्रमासाठी श्री. आपटे सरांनी ,स्वतंत्र वेबसाईट डिझाईन करून घेतली आहे.
             समाजाच्या उत्थानासाठी, एक माणूस काय काय करू शकतो , याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून श्री. आपटे सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल !
             श्री. आपटे सर हे अत्यंत साधेपणाने राहतात. ते समाज उत्थानासाठी एवढी कामे करतात, पण  या कामांच्या  मुळे निर्माण होऊ शकणार्‍या ,  अभिमानाचा  किंवा अहंकाराचा लवलेश , त्यांच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला कधी ही ,दिसणार नाही.
             फोटोत दिसत आहेत ते श्री. दिलीप आपटे सर ! समाजोत्थानासाठी निरपेक्षपणे झटणार्‍या ,अशा या आदरणीय व्यक्तीमत्वाला शतशत प्रणाम !

Wednesday, 18 December 2019

डाॅ. शरद व सौ. सरोज म्हसकर....एक १००%अनुरूप जोडी....

           आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , ती अशा दांपत्याची की, ते दोघे ही उत्कृष्ठ चित्रकार आहेत , दोघे ही साहित्यिक आहेत , संगीत रसिकाग्रणी आहेत. परमेश्वर अशी जोडी, फार क्वचितच जमवतो. सर्व साधारणपणे ,जोडीतील नवरा बायको एकमेकांना पूरक असतात. पण एकमेकांची Mirror image असलेली जोडपी पहायला मिळणे ,हा भाग्य योगच म्हणायला हरकत नाही.
              मी या बाबतीत नक्कीच भाग्यवान आहे. माझ्या माहितीतील डाॅ. शरद म्हसकर आणि सौ. सरोज म्हसकर  हे जोडपे असेच " एकमेकांचे प्रतिबिंब " असलेले एक दुर्मिळ असे जोडपे आहे.
               दोघांना ही, चित्रकलेची अतोनात आवड आणि जाण आहे.  स्वतःच्या बंगल्यात त्यांच्या दोघांच्या, चित्रे काढण्याच्या दोन स्वतंत्र खोल्या आहेत. सकाळचे सगळे अन्हिक आवरले की, साधारण अकराच्या सुमारास दोघेही आपापल्या खोलीत जाउन, वेगवेगळ्या विषया वरची सुंदर रंगसंती असलेली , पाहणार्‍याला नक्कीच आनंद देतील अशी चित्रे काढून, ते स्वतः ही आनंद मिळवतात. त्यांची चित्रे त्या क्षणी स्वानंदासाठीच असतात. दोघे ही एकमेकांची चित्रे पाहून मनमुराद आनंद लुटतात. मी दोघांची ही चित्रे पाहिली आहेत. खूपच छान आणि  उत्तम चित्रांचा खजिना पाहिल्याचे समाधान ,मला निश्चितच मिळाले. त्या दोघांचे लग्न ही चित्रकलेच्या प्रेमापोटीच जमले आहे. डाॅक्टर शरद यांनी , साखरपुड्याच्या दिवशी आपल्या होणार्‍या भावी पत्नीला म्हणजे रोझा यांना ,( त्यांचे माहेरचे लाडके नाव रोझा आहे ) , सोन्याच्या अंगठी सह , एक उत्तम चित्रच भेट दिले. अशी ही आगळी वेगळी भेट ,त्यांना ही मनस्वी आवडली . हा एक वेगळा सुयोग आहे.
                  दोघांना संगीतामध्ये, जबरदस्त इंटरेस्ट आहे. जुन्या हिंदी गाण्यांचे, ते दोघे ही अक्षरशः वेडे आहेत . पूर्वी गाण्यांच्या रेकाॅड्स असत. त्याचा ही त्यांच्याकडे भरपूर साठा होता. नंतर कॅसेट्स आल्या , त्यांचा ही अमर्याद साठा त्यांनी केला , नंतर पेनड्राईव्ह्ज आले. त्यात एकावेळी हजारो गाण्यांचा संग्रह त्यांनी केला. मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळी " कारवाॅं " वर ते दोघे संगीतच ऐकत होते.
              दोघांना साहित्याची ही प्रचंड आवड आहे. नामवंत साहत्यिकांचे साहित्य ते वाचतातच , पण त्या दोघांनी स्वतःची साहित्य निर्मिती ही केलेली आहे. सौ. सरोज वहिनींचा काव्य संग्रह आणि डाॅक्टरांचा स्फूट लेखांचा संग्रह प्रसिध्द झाला आहे.
                थोडक्यात " Made for each other " असे हे जोडपे, परमेश्वराने अतिशय आनंदात असताना बनविलेले आहे. हा एक मोठा दुर्मिळ योग आहे. डाॅक्टर शरद म्हसकरांचे वय साधारण सत्त्याहत्तरच्या आसपास आहे . सौ. सरोज वहिनींचे ,त्यांच्या पेक्षा  दोन पाच  वर्षांनी कमी असेल. त्यांचा
 " अानंदवन " हा बंगला , त्या दोघांच्या रसिकतेची साक्ष देणारा आणि चांगला ऐसपैस आहे. बंगल्यात वावरताना आणि बंगल्याचे आवार पाहताना , त्या दोघांच्या रसिक मनाची साक्ष पावलो पावली दिसते. बंगल्यात डाॅक्टरांनी स्वतः बनविलेल्या  त्यांच्या आई , वडीलांच्या आणि एका नउवारी तील पुरंध्रीच्या , प्लास्टर आॅफ पॅरिसच्या निवडक मूर्ति, लक्ष वेधून घेतात.
               डाॅ. शरद व सौ. सरोज वहिनी यांना दोन मुले व एक मुलगी आहे. एक मुलगा पुण्यात व बाकीचे दोघे परदेशात असतात. नाशिकमध्ये ते दोघेच असतात, पण छान स्वानंदात रममाण झालेले दिसतात.
              डाॅ. शरद म्हसकर आणि सौ. सरोज म्हसकर यांना दोघांना " जीवेत शरदः शतम् " अशी सदिच्छा देतो व थांबतो.

Friday, 6 December 2019

अविनाश कुलकर्णी ...आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृृृृृष्टी.....

               सन १९९० , इंजिनीयरिंगच्या शेवटच्या  वर्षाला शिकणारी मुले ,एका धरणावर  ट्रिपला गेली होती. शेवटचे वर्ष पूर्ण करून, इंजिनीयरिंगची पदवी मिळाली की, कोण कुठे जाईल सांगता येत नाही. पुन्हा असे सगळे एकत्र कुठले जमायला ?  थोडक्यात एंजाॅयमेंटचा मूड होता.
                इतक्यात धरणावरून कोणी तरी ,खाली पडल्याचा आवाज आला. पडलेला मुलगा साठ फूट खोल , धरणाच्या उतारा वरून, आपटत आपटत खाली जाउन, बेशुद्ध  पडला होता. त्याला सर्वांनी कसंबसं वर आणलं आणि जवळच्या हाॅस्पिटल मध्ये नेलं. तिथे समजलं की, हा अपघात भयंकर आहे व त्याला चांगल्या मोठ्या हाॅस्पिटल मध्ये अॅडमिट करण्याची गरज आहे. तातडीने त्याला मोठ्या सुसज्ज हाॅस्पिटलमध्ये नेलं गेलं.  तिथे जवळ जवळ दोन महिने ,विविध उपचार व आॅपरेशन्स झाली , पण विधिलिखित बदललं नाही. तो मुलगा ,पाठीच्या मणक्याला झालेल्या दुखापतीने ,कायमचा अपंग झाला. व्हिलचेअर शिवाय, तो इकडून तिकडे जाउ  शकत नाही , ही आजची वस्तूस्थिती आहे.
                पण आलेल्या परिस्थितीवर, मात करून ,आपले जीवन कसे सुसह्य करून घ्यावे, याचा आदर्श वस्तूपाठ त्याने घालून दिलेला आहे. आपला फोटोग्राफीचा छंद ,त्याने आपला जीवनाधार बनविला आहे. विविध फोटो काढण्यासाठी त्याने काय काय उपद्व्याप केले, ते ऐकून तुम्ही स्तिमित व्हाल.
१५ जानेवारी २०१० रोजी भारतात,  कन्याकुमारी परिसरात ,कंकणाकृति सूर्यग्रहण दिसणार होतं. हा दुर्मिळयोग कॅमेर्‍यात टिपण्यासाठी , व्हिलचेअरसह रेल्वेनं हा पठ्ठ्या ,कन्याकुमारीला गेला आणि तो दुर्मिळ प्रसंग, त्याने आपल्या कॅमेर्‍यात कैद केला. तसेच सूर्य बिंबा  वरून जाणार्‍या ,शुक्राचा फोटो , त्याने अशीच वेगळी शक्कल लढवून ,आपल्या कॅमेर्‍यात सामावून टाकला. दोन महिन्या पूर्वी ,भारताने चांद्रयान दोन सोडले. तो प्रसंग टिपण्यासाठी हा श्रीहरिकोटाला गेला. तिथल्या परवानग्या काढल्या आणि तो प्रसंगही त्याने, आपल्या कॅमेर्‍यात पकडला. निसर्गचित्रे , विविध प्राणी आणि पक्ष्यांचे सुंदर व देखणे फोटो काढण्यासाठी, त्याने घेतलेले परिश्रम ऐकून ,तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल !
              त्याच्या अशा सुंदर सुंदर फोटोंची प्रदर्शने पुणे , सातारा , सांगली येथे झाली आहेत. भारतीय राष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत , त्याने आपल्या फोटोंची दखल घ्यायला लावली आहे.
           तुम्हाला आता उत्सुकता लागली असेल की , मी ज्याच्या विषयी बोलतोय तो आहे तरी कोण ?
           तो आहे,माझा मामेभाऊ , चि. अविनाश अनंत कुलकर्णी. B.E (इलेक्ट्राॅनिक्स ) पदवीधर  ! सध्या मुक्काम कोल्हापूर ! कोल्हापुरातल्या " हेल्पर्स आॅफ दी हॅन्डिकॅप्ड " या संस्थेच्या ,होस्टेल मध्ये तो राहतो व तिथल्या वर्कशाॅपचा इनचार्ज या नात्याने, काम पाहतो.
            खाली फोटोत आहे तो जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारा आणि आपल्याला ही पहायला शिकविणारा , चि. अविनाश अनंत कुलकर्णी !


Saturday, 16 November 2019

माझे ड्रायव्हिंग प्रेम.....

माझे ड्रायव्हिंग प्रेम......

             मी 2004 साली ,अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्याने ,शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीमुळे ,बर्‍या पैकी पैसे हातात आले आणि आपल्याला ड्रायव्हिंग आले पाहिजे ,या माझ्या सुप्त इच्छेने उचल घेतली. त्या पूर्वी ,मी स्कूटर आणि मोटार सायकल चालवत होतो. पण चार चाकी चालविण्याची माझी इच्छा, अपूर्णच होती.
             ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ,स्वतःची चार चाकी असणे आवश्यक होते. मी सेकंड हॅन्ड मारूती व्हॅन विकत घेतली आणि ड्रायव्हिंगचा क्लास लावला. थोड्या दिवसात, मला कार ड्रायव्हिंग जमू लागले आणि पक्के लायसन्स ही मिळाले. पण बाहेर गावी  व्हॅन चालवत जाण्यासाठी , आवश्यक असलेला काॅन्फिडन्स , माझ्यात नव्हता. तो मला ,माझे सर्वच बाबतीतले " गुरू ", श्री. नंदकुमार अभ्यंकर यांनी मिळवून दिला आणि मी एकोणसाठाव्या वर्षी , छान गाडी चालवायला लागलो.
            मी मिरजेत आणि मुलगा चि. आदित्य , नोकरीच्या निमित्ताने नाशिकला ,अशी परिस्थिती होती. नाशिकला जायचे म्हणजे अंदाजे, 500km अंतर होते. मी पत्नी सौ. रजनीशी बोललो , तिने मला फुल सपोर्ट दिला. श्री. अभ्यंकरांशी ही बोललो , त्यांनी ही मला ग्रीन सिग्नल दिला आणि मी नाशिकला ,स्वतःच्या मारूती व्हॅनने जायचा निर्णय घेतला. पुण्यात मुक्काम करून दुसर्‍या दिवशी नाशिकला पोचलो. मिरज ते पुणे आणि पुणे ते नाशिक असे एकूण अंतर, 485 km झाले. मला उत्साह आला. नंतर नंतर वयाच्या पासष्ठीत ,एक दिवसात कोठे ही मुक्काम न करता, मी  साधारण 10 ते 11 तास ड्रायव्हिंग करून ,नाशिकला पोचू लागलो. मी सन् 2014  मध्ये  मारूती व्हॅन विकून, नवीन मारूती वॅगन आर घेतली. नाशिक मिरज आणि परत ,असा प्रवास नंतर ही बर्‍याचदा केला.
               पण  दि. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी केलेला, मिरज ते नाशिक , हाच प्रवास कायमचा लक्षात राहील असा झाला.
मिरज हून सकाळी बरोब्बर सहा वाजता निघालो आणि तासगाव , विटा , गोंदवले , दहिवडी , नातेपुते , वालचंदनगर , भिगवण , राशिन , कर्जत , अहमदनगर ,नाशिक असा प्रवास केला. हा प्रवास 492 km चा झाला. सर्व प्रवासात लागलेल्या रस्त्या पैकी ,जवळ जवळ 75 % रस्ते खराब होते. आमच्या या प्रवासाला, तेरा तास लागले. वयाच्या 74 व्या वर्षी मी तेरा तास कसे ड्रायव्हिंग केले ,माझे मलाच ठाउक ! पण मला ड्रायव्हिंग आवडत असल्याने ,थकवा अजिबात आला नाही. माझ्या सोबत गाडीत ,माझी पत्नी सौ. रजनी होती. तिला ही त्रास झाला नाही.
             माझा हा चौर्‍याहत्तराव्या वर्षी ,सलग तेरा तास ड्रायव्हिंग करण्याचा विक्रम ,तुमच्या सर्वांशी शेअर करावा असे वाटल्याने , हा लेखन प्रपंच !

Saturday, 9 November 2019

कै. चिंतामणी गोरे , गोरे मंगल कार्यालयाचे मालक , मिरज !

              आज , मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे  की , ज्यांनी प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर ,समाजात आपले अढळस्थान निर्माण केले. आज ती व्यक्ती हयात नाही , पण त्यांनी निर्माण केलेले अढळस्थान , आज ही ध्रुव तार्‍या प्रमाणे सर्वांना मार्गदर्शक ठरते आहे.
               त्या थोर व्यक्तीचे नाव आहे कै. चिंतामणी गणेश गोरे. मिरजेच्या गोरे मंगल कार्यालयाचे मालक. त्यांचे लहानपण ,अतिशय गरीबीत गेले. त्यांनी वेदविद्या संपादन केली, पण लोकांच्या घरी जाउन पूजाअर्चा करणे व दिवस कसाबसा ढकलणे हेच ,  त्या काळी , त्यांच्या नशिबी आले. वेळ प्रसंगी त्यांनी पैसे मिळविण्यासाठी, सर्व सनदशीर प्रयत्न केले .त्याचाच एक भाग म्हणून, रस्त्यावर बसून पंचांग विक्री सुध्दा केली . अशा परिस्थितीत जगण्यासाठी, आपण जन्माला आलो नाही. आपला जन्म फक्त भिक्षुकीसाठी नाही. या विचाराने ते अस्वस्थ असत. आपण कांही तरी चाकोरी बाहेरचे भव्य दिव्य करावे ,असे त्यांच्या मनात येत असे. पण मार्ग दिसत नव्हता.
                 १९५७ सालची, म्हणजे जवळ जवळ ६२ वर्षा पूर्वीची गोष्ट. त्या वेळी मंगल कार्यालयात लग्न , मुंजी इत्यादी कार्ये करण्याची प्रथा ,सांगली मिरज भागात नव्हती. पण, ती एक सामाजिक गरज होती. ती ओळखून श्री. चिंतामणी गोरे , श्री. विष्णूपंंत आठवले आणि श्री. त्र्यंबक अभ्यंकर ( काशिकर ) यांनी मिळून ,एकत्र येउन, मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील ,कृष्णेश्वराचे मंदिरात पहिले लग्न कार्य केले .अशा प्रकारे  मिरजेतील मंगल कार्यालयांची पहिली मूहूर्तमेढ रोवली गेली. त्या नंतर ,कांही कालावधीत ,तिघांनी तीन स्वतंत्र कार्यालये सुरू केली. त्या तिघांची पुढची पिढी, त्यांची त्यांची  कार्यालये ,आज उत्तम रीतीने चालवीत आहेत.
                 श्री. चिंतामणी गोरे यांचे, एक लक्षात घेण्या सारखे  वैशिष्ठ्य म्हणजे, कार्यालयाचा व्यवसाय करीत असताना , त्यांनी मोठमोठे " यज्ञयाग " ही केले. त्यात त्र५ग्वेद संहिता स्वाहाकार , पुरूषसूक्त स्वाहाकार , अतिरूद्र महायज्ञ , शतचंडी स्वाहाकार, यांचा समावेश होता . असे एकूण १२ किंवा थोडे जास्तच ,स्वाहाकार त्यांनी आपल्या गोरे मंगल कार्यालयात केले. त्या साठी, ते काशी पासून रामेश्वरा पर्यंतच्या त्र५ग्वेद , यजुर्वेद , सामवेद आणि अथर्ववेद या चार ही वेदांच्या, ज्ञानी ब्रह्मवृदांना ,मोठ्या सन्मानाने आमंत्रित करीत. या ब्रह्मवृदांची येण्या जाण्याची , राहण्याची आणि सात सात दिवस केल्या जाणार्‍या, स्वाहाकाराची व्यवस्था, श्री. चिंतामणी गोरे ,स्वतःच्या खिशातून करीत. या स्वाहाकारांचे वेळी, भरपूर अन्नदान ही होत असे. नामांकित कीर्तनकारांची कीर्तने आणि नामांकित प्रवचनकारांची प्रवचने, या कालावधीत ,गोरे मंगल कार्यालयात होत असत. एकूणच या स्वाहाकारांचे वेळी ,मिरजेतील गोरे मंगल कार्यालयात, सणाचे वातावरण असे. मिरजकरांना ही एक मोठी दुर्लभ  पर्वणीच असे.
               हे सर्व करण्या मागचा त्यांचा हेतू , ज्ञानी ब्रह्मवृदांची सेवा करणे , तसेच मिरजेतील व अाजूबाजूच्या परिसरातील लोकांना ,आपल्या वैदिक परंपरेची ओळख करून देणे , हाच होता. यात त्यांचा वैयक्तीक स्वार्थ, कोणता ही नसे.  केवळ आणि केवळ  निरपेक्ष बुध्दीनेच श्री. चिंतामणी गोरे ,हे सर्व आयोजन करीत असत . आपल्याला कष्टाने मिळालेल्या पैशातून ,अशा प्रकारे समाजाला  कांही परत देणे ,ही संकल्पना ,मला खूप खूप उदात्त वाटते.
                 मिरज आणि आजूबाजूच्या परिसराला भूषण असलेले वेदविद्या उपासक , श्री. चिंतामणी गोरे २००३ साली ,म्हणजे वयाच्या ८३ व्या वर्षी, स्वर्गवासी झाले. त्यांनी देह ठेवण्या पूर्वी , रोजच्या नियमा प्रमाणे रूद्र , श्रीसूक्त , पुरूषसूक्त यांची आवर्तने, हाॅस्पिटल मध्ये ही केली आणि मगच देह ठेवला. असा हा पुण्ण्यात्मा, स्वर्गात आल्या बद्दल स्वर्गस्थ देवतांनी ,नक्कीच त्यांचे अत्यादराने स्वागत केले असेल.
                कै. चिंतामणी गोरे यांच्या नंतर ,त्यांचा मुलगा श्री. विनोद गोरे यांनी ,आपल्या वडीलांची परंपरा, उत्तम रीत्या सांभाळली. आता त्यांचा मुलगा श्री. अनिरूध्द गोरे या कार्यालयाची आणि या वैदिक परंपरेची धुरा वाहण्यास, सज्ज झाला आहे , हा एक मोठा सुयोग आहे.
              श्री. अनिरूध्द गोरे व त्यांची पत्नी सौ. मृण्मयी, हे दोघे उच्च विद्या विभूषित आहेत. पण आपल्याला परंपरागत प्राप्त झालेला ,  उच्च आचार आणि विचारांचा हा दुर्मिळ  ठेवा जपण्यासाठी ,ते दोघे सज्ज झाले आहेत. त्यांना भरभरून शुभेच्छा !
                खाली फोटोत दिसत आहेत ते कै. चिंतामणी गोरे. त्यांना त्रिवार वंदन करतो आणि थांबतो !

Saturday, 26 October 2019

सौ. सुहास यशवंत जोशी....एक चिंतनशील चित्रकार !

           आज मी तुम्हाला, माझ्या  नाशिकमधील सकाळच्या  फिरायच्या ग्रुप मधील, श्री. रामभाऊ  ( यशवंत ) जोशी यांच्या पत्नी, सौ. सुहास जोशी यांची ओळख करून देणार आहे.                 त्यांचे वैशिष्ठ्य म्हणजे, त्या  अत्युत्कृष्ठ चित्रकार आहेत. घर संसार सांभाळून, त्यांनी चित्रकलेत केलेली प्रगती, ही कोणाला ही आश्चर्य वाटावे, अशीच आहे. संसार सांभाळून ,रात्री जागून अभ्यास करून, दिवसाकाठी फक्त दोन तीन तासच विश्रांती घेउन , त्यांनी चित्रकलेची परिक्षा दिली आणि त्यात ,त्या महाराष्ट्र राज्यात, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या  .तिथून त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. चित्रकलेत त्यांनी ,मुंबई विद्यापिठाची  Master's Degree  , सर्वोत्तम श्रेणी मिळवून ,प्राप्त केली आहे. या विषयात Ph. D. करण्याचे त्यांचे स्वप्न  ,सध्यातरी अपूर्ण आहे. ते स्वप्न त्या नक्कीच सत्यात उतरवतील, अशी आशा आहे. चित्रकलेत
 Ph. D. करण्याचा विचार करणे , ही सामान्य गोष्ट नक्कीच नाही.
              सर्व सामान्य माणसाला , चित्रकलेतील दोनच प्रकार माहिती असतात. एक म्हणजे निसर्गचित्रे आणि व्यक्तीचित्रे ! पण चित्रकलेत, जवळ जवळ तीस ते पस्तीस प्रकार आहेत ,हे सौ. सुहास वहिनींशी बोलताना समजले. मधुबनी , वारली , राजस्थानी , तंजावर , माडिया गोंड , श्रीलंकन मास्क , केनेडियन फिगरेटिव्ह तसेच आॅस्ट्रेलियन इत्यादी इत्यादी !  जगातील चित्रकलेच्या संदर्भातील, सर्व  प्रकारांचा, त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांनी  काढलेल्या प्रत्येक चित्रातील प्रत्येक रेषे मागे ,वापरलेल्या रंग संगतीमागे, एक सुप्त  विचार असतो , हे त्यांच्याशी बोलताना जाणवते. त्यांच्याशी  त्या बाबत चर्चा करताना ,त्यांचा सखोल अभ्यास पाहून,  मी तर अक्षरशः अवाक् झालो. चित्रकला हा विषय सखोल , चिंतनशील आणि विचारगर्भ असतो हे मला प्रथम त्या दिवशी समजले आणि मी थक्क झालो.
               " व्हिनस आर्ट अॅकॅडमी " ही चित्रशाला ,त्या चालवितात. त्यांच्या या चित्रशालेत ,लहान मुलांच्या पासून ते वयोवृध्दांच्या पर्यंतचे सर्व विद्यार्थी, शिक्षण घेउ शकतात. आपल्या चित्रशालेत खूप जणांनी यावं , या पेक्षा , येणार्‍या प्रत्येकाला खूप खूप यावं , असा त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्या चित्रशालेत ,चित्र रेखाटन चालू असताना ,मंद संगीत चालू असते . ज्याचा सकारात्मक परिणाम, चित्रे काढताना त्या मागच्या वैचारिक भूमिकेवर निश्चितच होतो , असा त्यांचा अनुभव आहे.
           सौ. सुहास वहिनींचे हस्ताक्षर, " मोत्याच्या दाण्या " प्रमाणे आहे. त्यांना पत्र लेखनाची खूप आवड आहे. त्यांनी त्यांच्या सासर्‍यांना, एकेकाळी रोज लिहीलेली पत्रे ,मुलींना लिहीलेली काव्यात्मक अशी पत्रे , ही त्या त्या नात्यांना जोडणारा, भावोत्कट असा पूलच आहे,  असे म्हणणे संयुक्तिक होईल.
              सौ. सुहास वहिनींनी आपल्या मातोश्रींच्यावर ,ओवीबध्द अशी एक छान " पोथी " तयार केलेली आहे. आई विषयी वाटणारे प्रेम, त्यात ओतप्रोत भरलेले दिसते. संसारात त्यांना त्यांच्या पतिची, म्हणजे श्री. रामभाउंची समर्थ साथ आहे.
            अशा या  अत्युत्कृष्ठ चित्रकार , प्रेमळ शिक्षक , कुटूंबवत्सल  गृहिणी असलेल्या, कवि मनाच्या  सौ. सुहास वहिनींना, परमेश्वराने निरामय आणि उदंड आयुष्य द्यावे ही प्रार्थना करतो आणि थांबतो.
      खाली फोटोत दिसत आहेत, त्या सौ. सुहास वहिनी . त्यांच्या हातात आहे  " कलाशिक्षक गौरव पुरस्कार " ! शेजारी आहे ते ,त्यांनी काढलेले एक चिंतनशील चित्र ! या चित्रातील प्रत्येक रेषेमागे , प्रत्येक बिंदू मागे , प्रत्येक रंगछटे मागे एक चिंतनशील विचार आहे.

Tuesday, 15 October 2019

श्री. अजय खरे , एक वेगळा मुलगा !

           आज काल असे दिसते की , आई आणि वडील भारतात आहेत आणि मुले नोकरीच्या निमित्ताने परदेशात !यात गैर कांहीच नाही. मुले आपल्या प्रगतीसाठी पंख पसरतात , आई वडील मुलांच्या प्रगतीच्या आड न येता ,आनंदाने त्यांना निरोप देतात. पुढे जसजसे दिवस , महिने आणि वर्षे जातात , तसतसे वय झाल्याने ,भारतात असलेल्या आई वडीलांना, एकटेपणा जाणवतो. मुलांचा आणि विशेषतः नातवंडांचा ,सहवास हवा हवासा वाटतो. पण ते अनेक दृष्टींनी शक्य नसते. वयोपरत्वे, हे दोघे तिकडे जाउ शकत नाहीत आणि मुले तिकडेच नोकरी व्यवसायात आणि आपल्या संसारात रमल्याने, इकडे येउ शकत नाहीत. अशी मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण होते  की , ज्यातून मार्ग काढणे ,दोघांना ही अशक्य होउन बसते .
                 पण माझ्या माहितीतला एक मुलगा ,असा आहे की , त्याने परदेशातील आपली नोकरी सोडून , तिकडचे सर्व  आवरून , तो केवळ आपल्या आई वडीलांच्यासाठी, भारतात परत आला आहे. परदेशात तो त्याच्या कंपनीत अत्युच्च पदावर होता. पगार ही आपल्या कल्पनेच्या पलीकडचा होता , मानमरातब होता , मोठाच्या मोठा कंपनीने दिलेला बंगला होता , पण ते सर्व सोडून ,आपली पत्नी आणि मुलासह  तो भारतात परत आलेला आहे.
               या मुलाचे नाव आहे चि. अजय मधूसुदन खरे.  आपले आई वडील ,आता वृध्द झालेले आहेत व त्यांना आपली गरज आहे, या जाणीवे पोटी , परदेशातील नोकरी सोडून येणारा, माझ्या माहितीतला हा पहिलाच मुलगा !
              अशा प्रकारे तिकडची नोकरी सोडून येणे , मानसिक आणि आर्थिक  दृष्ट्या,  किती कठीण असेल ,त्याची आपल्याला कल्पना येणार नाही. पण केवळ आई वडीलांच्या प्रेमापोटी ,तो आला आहे. त्याच्या पत्नीची आणि मुलाची त्याला संपूर्ण साथ आहे , हे पण फार महत्वाचे आहे. समजा , मुलगा म्हणून त्याला इकडे यावेसे वाटले असते , पण त्याच्या पत्नीने व मुलाने, ह्या प्रस्तावास नकार दिला असता , तर तो एकटा, एवढा मोठा निर्णय घेउच शकला नसता. पण सर्वांनी एकमताने निर्णय घेउन, ते इकडे भारतात परत आले , ही फार फार दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे , असे माझे स्पष्ट मत आहे.
                   धन्य तो मुलगा ,त्याचे कुटूंब आणि धन्य ते आई वडील , की ज्यांच्या साठी मुलगा प्रेमाने , परदेशातील सर्व ऐहिक सुखे सोडून ,भारतात परत आला.
      खाली फोटोत  दिसत आहे तो हाच, चि. अजय खरे !
        परमेश्वराने या  खरे कुटूंबियांच्या वर,  सर्व प्रकारच्या सुखाचा आणि आनंदाचा वर्षाव  सतत करावा , हीच सदिच्छा देतो आणि थांबतो.


Monday, 30 September 2019

श्री. शरदराव उत्तुरकर ....एक जिद्दी सायकल स्वार....

            फोटोत दिसत आहेत ते ,माझे मिरजेचे स्नेही श्री. शरद उत्तुरकर. वय वर्षे ८१ फक्त. उत्साह मात्र , वय वर्षे १८ चा ! रोज किमान २५ किमी सायकलींग करतात. बायकोशी जरा खटका उडाला, तर त्या दिवशी ३० किमी किंवा त्या  ही पेक्षा जास्त ! खटका किती " तीव्रतेचा " आहे, त्यावर किती सायकलींग करायचं ,ते ठरतं !
               एवढं सायकलींग करायचं म्हटलं, तर कंटाळा येउ शकतो. असा कंटाळा येउ नये म्हणून ,त्यावर उपाय काय ? श्री. शरद उत्तुरकरांनी त्यावर ,आपल्या कुणाला ही सुचणार नाही,  असा उपाय शोधलाय. तो म्हणजे पाढे पाठ करणे. या वयाला म्हणजे, ८१ व्या वर्षी सायकलींग करता करता, त्यांनी ९९ पर्यंतचे पाढे पाठ केले आहेत. फार पूर्वी शाळेत शिकवले जाणारे पावकी , निमकी , पाउणकी , सवायकी , दिडकी आणि अडीचकी हे पाढे ,त्यांना आज ही मुखोदगत आहेतच ! रोज किमान २५ किमी सायकलींग आणि त्याच बरोबर हे पाढे पाठ करण्याचे व्रत , हे अजब मिश्रण असलेले,  मिरजेचे श्री. शरद उत्तुरकर माझे स्नेही आहेत , याचा मला सार्थ अभिमान आहे.
             श्री. शरदरावांना हा सायकलींगचा  छंद ,कसा लागला त्याची कहाणी, ह्रदयद्रावक अशीच आहे. ते सांगली बॅंकेत  नोकरीला होते. वयाच्या चाळीशीच्या आसपास, त्यांचे पाय खूप दुखायला लागले. अनेक प्रकारचे उपचार झाले ,पण गूण नाही. पाय इतके दुखायचे की, त्यांना वाटायचे ,रेल्वे खाली जाउन आपले पाय तोडून घ्यावेत.  या त्रासाला कंटाळून, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. शेवटी मिरजेतल्या एका प्रसिध्द आर्थोपेडिक सर्जनने ,त्यांचे आॅपरेशन केले. पण कांहीही उपयोग झाला नाही.
              आॅपरेशन नंतर डाॅक्टरांनी त्यांना पथ्य म्हणून ,पोहणे आणि सायकलींग कधी ही करायचे नाही ,असे सांगीतले. मरणप्राय वेदनेने बेजार झालेल्या शरदरावांनी ,डाॅक्टरांनी सांगीतलेली पथ्ये मोडायची,  म्हणजे आपल्याला मरण येईल व या त्रासातून सुटका होईल, या भावनेने पोहणे आणि सायकलींग सुरू केले. .....आणि आश्चर्य म्हणजे, त्यांचे दुखणे हळूहळू कमी होत गेले .आज शरदरावांना आपले पाय कधी दुखत होते , याची आठवण ही येत नाही. ते  अतिशय आनंदी आणि निरामय आयुष्य जगत आहेत.
              कारणपरत्वे ते ,विविध विषयावर , कविता ही करतात .परवाच ते नाशिकला आमच्या घरी आले होते. त्या वेळी त्यांनी ,माझ्यावर केलेली कविता मला भेट दिली. आपल्यावर कोणी कविता करते आहे , ही संकल्पनाच मनाला आनंददायी आहे. असा भरभरून आनंद, त्यांनी अनेकांना दिलेला आहे. नुकताच त्यांचा काव्य संग्रह, त्यांच्या पत्नीने आणि मुलींनी प्रकाशित केला आहे.
              श्री. शरद उत्तुरकरांना ,त्यांच्या पत्नीची समर्थ साथ आहेच . त्यांना दोन कन्या आहेत. त्या दोघींची लग्ने झाली आहेत व त्या आपापल्या जागी आनंदात आहेत.          श्री. शरदरावांचे वास्तव्य मिरजेत असले ,तरी ते मधून मधून आपल्या मुलींच्याकडे जातात. तिथे त्यांच्या मुलींनी ,बाबांच्या साठी सायकल ठेवलेली असते. तिथे ही ते सायकलींग करतातच !
               अशा या कविमनाच्या , सदाबहार व आनंदी श्री. शरदराव उत्तुरकरांना व त्यांच्या पत्नीला ,परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे ,ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.


Sunday, 15 September 2019

श्री. विवेकराव पेंडसे....आदर्श स्नेही..

                  आज मी तुम्हाला मिरजेच्या माझ्या एका जवळच्या स्नेह्याची  ओळख करून देणार आहे. या माझ्या घनिष्ठ स्नेह्याचे नाव आहे श्री. विवेकराव पेंडसे. मी त्यांना विवेकराव असं म्हटल्यानं तुम्हाला जरा वेगळं वाटलं असेल. स्नेही आणि विवेकराव ? कांही तरी चुकतय ! मी त्यांना आदराने विवेकराव असं म्हणतो.
                मग मला आदर वाटावं असं त्यांच्याकडे काय आहे ? असं तुम्हाला वाटेल. विवेकरावांच्याकडे आदर वाटाव्या अशा अनेक गोष्टी आहेत. पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन ! विवेकराव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून ( ST  मधून) अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. ते मेकॅनिकल इंजिनियर असल्याने ST च्या तांत्रिक विभागात कार्यरत होते. ST मधील लोकांना पेन्शन नसते. विवेकरावांना सेवानिवृत्त होउन अंदाजे बारा वर्षे झाली असतील. पण त्यांचे आर्थिक नियोजन अत्यंत व्यवस्थित असल्याने , त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्वी सारखेच म्हणजे सुव्यवस्थित चालू आहेत. पैशासाठी ते कधी अडचणीत आले नाहीत. मला ही बाब फार महत्वाची वाटते.
                विवेकरावांचा स्वभाव स्पष्टवक्ता आहे. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते भिडभाड न बाळगता स्पष्टपणे सांगतात. पण मैत्री किंवा स्नेह त्याला अपवाद आहे. मैत्रीत किंवा स्नेहात सर्व माफ करण्याचा त्यांचा स्वभाव , मला महत्वाचा वाटतो. तुमची व त्यांची मैत्री किंवा स्नेह नसेल व जर तुम्ही चुकलात तर ते तुम्हाला वाजविल्या शिवाय सोडणार नाहीत. मिरजेतल्या एका उद्योगपतिच्या मुलाला , त्याचे कुत्रे विवेकरावांच्या अंगावर धावून आल्याने त्यांनी असे कांही सुनावले होते की , विवेकरावांचा तो अवतार पाहून मी पण घाबरून गेलो होतो.
                   विवेकरावांना ओरिगामीची खूप आवड आहे. कागदाचे वेगवेगळे पक्षी , प्राणी त्यांना अतिशय उत्तम प्रकारे तयार करता येतात. हे पण मला वैशिष्ठ्यपूर्णच वाटते.
                   विवेकरावांच्या मिसेस ( सौ. अरूणाताई )जाउन अंदाजे पाच वर्षे झाली असतील. विवेकरावांनी  व त्यांच्या मिसेसनी दोघांनी " देहदान " करण्याचा संकल्प सोडला होता. त्या नुसार सौ. अरूणाताईंच्या निधना नंतर त्यांनी त्यांचा देह मिरज मेडिकल काॅलेजला दान केला. ही गोष्ट पण मला खूप खूप महत्वाची वाटते. विवेकरांच्या पासून मी पण या बाबतीत प्रेरणा घेतली आहे.
                  विवेकरावांना तीन मुली. तिन्ही मुलींची लग्ने होउन त्या आपापल्या संसारात छान रममाण झालेल्या आहेत. विवेकराव कारण परत्वे मुलींच्याकडे आवर्जून जातात . पण सर्वसाधारणपणे ते मिरजेत आपल्या फ्लॅट मध्ये एकटे राहणे पसंत करतात . त्यांना सिलेक्टेड असे मित्र जोडायची कला अवगत असल्यानं , त्यांच्या घरी मित्रमंडळींचा भरपूर राबता असतो. कोणी गप्पा मारायला , कोणी पत्ते खेळायला , कोणी कांही तरी त्यांच्या कडून शिकायला असे येत असतात. " विठू माझा लेकूरवाळा " असे त्यांचे घर असते.
                 अशा या माझ्या खूप जवळच्या स्नेह्याला परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.

Sunday, 8 September 2019

शिक्षक दिना निमित्त सत्कार ... "दिशा " मोफत क्लासेस....

                  दि. ५ सप्टेंबर २०१९ . आज " शिक्षक दिना निमित्त " अखिल भारतीय मारवाडी , युवा मंच " यांचे तर्फे माझा आणि आमच्या " दिशा " या मोफत चालणार्‍या क्लासच्या, सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. एक वेगळेच समाधान मिळाले.
                  मी मुळचा शिक्षक नाही. एका संशोधन संस्थेत मी वैज्ञानिक म्हणून काम केले.
                    आयुष्याच्या सत्तरी नंतर मी  , नाशिक मधील आनंदवल्ली परिसरातील, महापालिकेच्या  शाळेतील मुलांच्यासाठी असलेल्या , " दिशा " या मोफत क्लास मध्ये, शिकवायला सुरवात केली.  आठवीच्या मराठी माध्यमाच्या मुलांना, गणित आणि विज्ञान  हे  विषय शिकवताना , मला खूप आनंद मिळतो.
                  आमचे हे क्लासेस , एका बिल्डिंगच्या पार्कींग मध्ये व शेजारच्या बागेत चालतात. पहिली ते सातवी , हे वर्ग बागेत झाडा खाली किंवा मोकळ्या जागेत चालतात. पाउस आला की , त्यांना सुट्टी मिळते. आठवी ते दहावीचे वर्ग, एका बिल्डिंगच्या पार्कींग मध्ये चालतात. मुले जमिनीवर बसतात . शिक्षक कट्ट्यावर बसतात . शेजारी बोर्ड ठेवलेला असतो.
                 " दिशा " मोफत क्लासेस सुरू करण्याचे संपूर्ण श्रेय सौ. सुधा मेहता मॅडम , यांचे आहे. आम्ही सर्व शिक्षक आणि क्लासची मुले ,त्यांना ताई म्हणतो.
                   सन् २००७ सालची गोष्ट आहे. ताईंच्या  मैत्रिणीच्या बंगल्याच्या वाॅचमनचा मुलगा शाळेला जात नव्हता. कारण त्या शाळा आवडत नव्हती. ताईंनी त्याला शिकवायला सुरवात केली. त्याला अभ्यास आवडू लागला. त्याच्या बरोबर अभ्यासाला ,त्याचे इतर मित्र ही येउ लागले. अशा प्रकारे लावलेलं हे " दिशा " मोफत क्लासेसचं रोपटं ,आज वट वृृृृृक्षात रूपांतरीत झालं आहे.
             मी तीन वर्षा पूर्वी ,म्हणजे २०१७ साली ,या उपक्रमात सहभागी झालो. मुलांना शिकवताना सुरवातीला, मला त्रास झाला. पण आता मी त्यात पूर्ण रममाण झालेलो आहे. एखाद्या दिवशी क्लास नसला तर, मला चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. मुलांच्यात वावरताना खूप आनंद मिळतो. आज  ताईंच्या सह आम्हा शिक्षकांच्या झालेल्या , या सत्काराने ही खूप आनंद मिळाला.
                        " आनंदाचे डोही आनंद तरंग "....

Wednesday, 4 September 2019

माझा " एक " अविस्मरणीय वाढदिवस !

              माझा दर वर्षी ३१ आॅगस्टला वाढदिवस असतो. या वर्षीच्या माझ्या वाढदिवसाला मला ७३ वर्षे पूर्ण होउन ७४ वे वर्ष सुरू झाले. पण हा आताचा वाढदिवस एकदम स्पेशल होता. होता म्हणण्या पेक्षा मला तसा वाटला असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.
                ३१ आॅगस्ट रोजी मी नेहमी प्रमाणे सकाळी नाशिकच्या कृषी नगर जाॅगिंग ट्रॅकवर फिरायला गेलो. तिथे आमच्या सकाळच्या फिरायच्या " निरामय जाॅगर्स ग्रुप " ने मोठ्या जल्लोषात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या , हा जल्लोष पाहून ट्रॅकवर फिरणार्‍या अनेक अनोळखी लोकांनी मला शुभेच्छा दिल्या.
                   सकाळी साधारण दहाच्या सुमारास माझा मेरीतील स्नेही श्री. राजाभाउ वर्‍हाडे आणि सौ. वहिनी आवर्जून आमच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आले. तसेच आमच्याच बिल्डिंगमध्ये खाली राहणारे श्री. सुनिल सानप आणि सौ. वहिनी हे दोघे ही आले. त्यांच्या अनपेक्षित शुभेच्छांनी मी अगदी भारावून गेलो.
माझ्या वाढदिवसा निमित्त आमच्या सकाळच्या फिरायच्या " निरामय जाॅगर्स " या ग्रुप मधील स्नेह्यांनी त्र्यंबकेश्वर जव्हार रस्त्यावरील अंबोली धरणाच्या शेजारच्या " टायगर व्हॅली " येथे दुपारच्या भोजनाचे आयोजन केले होते. हा परिसर एकदम छान आहे. धरणाच्या बॅक वाॅटर शेजारीच " टायगर व्हॅली " अाहे. माहौल एकदम मस्त आणि चिअरफुल्ल होता. गप्पाटप्पा , हास्यविनोद यात खूप छान वेळ गेला. जेवण होउन परतायला तीन वाजले होते.
                     तीन वाजता माझा आठवीच्या वर्गाचा मोफत क्लास होता. माझ्या वाढदिवसा निमित्त क्लासचे विद्यार्थी केक आणणार असल्याची बातमी मला आधीच  मिळाली होती.  मी विद्यार्थ्यांना आई बाबांच्या कडून पैसे घेउन माझा वाढदिवस साजरा करायचा नाही , असे निक्षुन सांगीतले. तरी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी कुठून कुठून रंगीत रंगीत फुले तोडून आणून , त्याचे स्वहस्ते गुच्छ बनवून आणून मला दिलेच ! मुलांच्या या " Creativity " ने मला निश्चितच आनंद मिळाला. त्या दिवशीचा अभ्यास पूर्ण झाल्यावर मुलांनी मला मधे उभे केले आणि " Happy birthday to you वगैरे गाणी आणि अभिष्ट चिंतनपर  संस्कृत श्लोक म्हणून माझ्या भोवती फेर धरला. मुलांनी त्या दिवशी मला खूप खूप आनंद दिला.
                   रात्री घरचे सगळे आणि माझे मेरीतले मित्र , अनंत देशमुख आणि अनिल कुलकर्णी सहकुटूंब सहपरिवार यांचे सह बाहेर  हाॅटेल " Big city "  मध्ये भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो ही भोजन कार्यक्रम अतिशय आनंदात व मस्त मजेत पार पडला.
                    या नंतर दि. ३ सप्टेंबरला " त्र५षीपंचमी " होती. तिथीने माझा त्या दिवशी वाढदिवस असतो. त्या दिवशी आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुपला , सकाळचे फिरून झाल्यावर ,आमच्या नेहमीच्या गंगापूर रोड वरील आवडत्या  " कृष्णविजय " या हाॅटेलात मी चहापान आयोजित केले होते. तो ही कार्यक्रम गप्पाटप्पा आणि हास्यविनोदात मस्त पार पडला.
असे चार कार्यक्रम माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने झाल्याने , मला खूप खूप आनंद आणि भरभरून समाधान मिळाले.
                           माझ्या क्लासच्या मुलांच्या सोबत त्या दिवशी काढलेला फोटो.






Tuesday, 3 September 2019

कै. बाळासाहेब अनकाईकर...मेरीतील वैज्ञानिक संघटना अध्यक्ष.

                     सन २०१९ मध्ये , आमचे मेरी आॅफिस मधील सहकारी ,श्री. बाळासाहेब अनकईकर त्यांचे ,वृध्दापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८३ होते.
                      कै. बाळासाहेब ," मेरी " या पाटबंधारे खात्याच्या संशोधन संस्थेत ,वरिष्ठ वैज्ञानिक होते. मृद् यांत्रिकी विभागात ते कार्यरत होते. तिथे चालणार्‍या ,त्रिदिक् कृंतन चांचणी ( Triaxial shear test ) करण्यात ,ते वाकबगार होते. त्यांच्या काळात ही चांचणी संपूर्ण ज्ञानासह करणारी माणसे ,महाराष्ट्रात ,हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतील किंवा नसतील ही !
                    कै. बाळासाहेब स्पष्टवक्ते होते , त्या मुळे सहजासहजी कोणी त्यांच्या वाट्याला जात नसे. पण त्याच बरोबर ,खरोखर अडलेल्या व गरजू माणसाला ,आर्थिक मदत करायला त्यांनी कधी मागे पुढे पाहिले नाही. आर्थिक मदतीचा दुरूपयोग होतोय असे दिसताच, त्या माणसाला धडा शिकविण्याची हिंमत दाखवावी, ती फक्त आणि फक्त कै. बाळासाहेबांनीच ! कै. बाळासाहेबांच्या सत्यवादी स्पष्टवक्तेपणाला, त्यांचा अधिकारी वर्ग ही दबून असे.
                       मेरीच्या वैज्ञानिकांची  मान्यताप्राप्त संघटना होती. त्या संघटनेचे अध्यक्षपद, कै. बाळासाहेबांनी कांही वर्षे समर्थपणे सांभाळले.
                        कै. बाळासाहेब हे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या ," काळ्यारामाचे दर्शन " त्यांनी कधी ही चुकविले नाही. जाण्याचे आधी, प्रकृति अस्वास्थ्यामुळे ,त्यांना प्रत्यक्ष देवळात जाउन रामदर्शन घेणे जमेनासे झाल्यावर , काळाराम मंदिराचे दिशेने हात जोडून ,ते प्रार्थना करीत असत. रामाची त्यांच्यावर खरोखरच कृपा होती.
                         ते व्यवसायाने सोनार होते. पण त्यांनी व्यवसाय करताना, आपला प्रामाणिकपणा कधी ही नजरे आड केला नाही. शासकीय नोकरी आणि व्यवसाय, हे दोन्ही त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणेच केले. एका वेळी दोन्ही करायचे म्हणजे ,तारेवरची कसरतच होती , पण ती त्यांनी यशस्विपणे सांभाळली.
                     दर महिन्याला पायी त्र्यंबकेश्वरला जाउन ,त्र्यंबकेश्वराचे आणि निवृत्तीनाथ समाधीचे दर्शन घेणे ,हा त्यांचा परिपाठ ,अनेक वर्षे चालू होता.परमेश्वरावर त्यांची अनन्य साधारण निष्ठा होती. परमेश्वराची निष्ठा आणि रोजच्या जीवनातील व्यवहार ,यांची सांगड घालणे फार थोड्यांना जमते. कै. बाळासाहेब ,हे अशा थोर व्यक्ती पैकी एक निश्चितच होते .त्यांनी हा तोल सांभाळला आणि समृध्द ,समाधानी जीवनाचा आनंद मिळविला.
                      कै. बाळासाहेबांच्या शेवटच्या आजारपणात ,त्यांच्या पत्नीने ,  मुलाने , मुलीने , जावयाने आणि आप्तेष्टांनी त्यांची खूप काळजी घेतली. पण शेवटी एकवेळ अशी येते की , जिथे मानवी प्रयत्न संपतात आणि मानवाला अनंताच्या प्रवासाला जावेच लागते.
                        कै. बाळासाहेब अनकईकरांच्या आत्म्याला, परमेश्वराने चिरशांती द्यावी, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
                   ।। ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

Monday, 26 August 2019

अंधकवी कै. राम गोसावी..तेथे कर माझे जुळती.

                  अंधकवि श्री. राम गोसावी , यांचे गेल्या रविवारी दि. १८ आॅगस्ट २०१९ रोजी  निधन झाले. निधन समयी त्यांचे वय होते ९२ वर्षे ! ते गेले त्या दिवशी दुपारी बर्‍या पैकी जेवले. वामकुक्षी साठी झोपले ते झोपेतच गेले. एका मनस्वी कवीला मृत्यूने शांतपणे आपल्या पंखा खाली घेतले !
                   कै. राम गोसावी , आम्ही त्यांना रामभाउ म्हणत होतो , ते माझ्या मावशीचे मिस्टर ! माझ्या मावशीला मी शकु मावशी म्हणत असे ! आदर्श गृहिणींची यादी करायची ठरवल्यास त्यात शकू मावशीचा अग्रक्रमाने विचार करायलाच पाहिजे.
                    कै. रामभाउ हे  बी. ए. होते .ते सांगलीत शासकीय नोकरीत होते. सांगलीतल्या वास्तव्याच्या काळातले रामभाउ मला चांगले आठवतात. मोठे रसिक होते. कविता तर ते करायचेच पण त्या ही पलीकडे जाउन नाट्य , लोकनाट्य यांचा ही ते मुक्तपणे आस्वाद घ्यायचे ! घरात मात्र त्यांचा माझ्या मावशीवर चांगलाच दरारा असायचा ! असो.
                      त्यांच्या वयाच्या तेहत्तीस किंवा चौतिस वया पर्यंत त्यांचे डोळे चांगले होते. अचानक Detachment of retina झाल्याने त्यांना अंधत्व आले. त्या काळी त्यांनी उपचार करून घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण उपयोग झाला नाही. त्यांना अंधत्व आले ते कायमचेच !
                           ...आणि त्या नंतर माझी मावशी , शकू मावशी त्यांचे डोळे आणि काठी झाली. तिने त्यांच्यासाठी खूप खूप खूप केले. ती रोज रामभाउंना हाताला धरून सर्व ठिकाणी घेउन जायची. सभा , सम्मेलने या ठिकाणी ती त्यांना त्यांच्या सांगण्या प्रमाणे नेत असे.रामभाउंना  कवितेचे स्फुरण येताच हातातील कामे बाजूला ठेउन शकू मावशी , त्यांच्या साठी वही व पेन घेउन बसत असे. रामभाउंनी माझ्या माहिती नुसार अंदाजे हजारच्या आसपास कविता लिहील्या असतील.  दैवाचा दुर्विलास म्हणजे माझी मावशी , २००२ साली अचानक देवाघरी गेली.
                      त्या नंतर रामभाउ १७ वर्षे होते. बायको गेल्या नंतर पुरूष खचून जातो. पण रामभाउंनी आपण खचून गेलो आहोत , असे कधी ही दर्शवू दिले नाही. ते नेहमी फ्रेश असायचे. कपडे नीट नेटके , रोज दाढी केलेली असायची , केस नैसर्गिक रीत्याच काळे भोर होते. एकूण ते व्यवस्थित असायचे. त्याचे श्रेय त्यांचा मुलगा चि. मुकूंद , सून चि. सौ. मुक्ता आणि मुलगी चि. चित्रा यांना निश्चितच आहे. सर्वजण त्यांची आपापल्या परीने काळजी घ्यायचे. पण प्रत्येकाची कांही " लिमिटेशन्स " असतात ती आपण मान्य केलीच पाहिजेत.
                    एकूण रामभाउंचे आयुष्य निश्चितच चांगले गेले. काव्य हा त्यांचा विरंगुळा होता. त्यांना एका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही मिळाले होते. त्यांचे दोन तीन काव्य संग्रह प्रकाशित ही झाले आहेत.  त्यांची " डोळे " ही कविता महाराष्ट्र राज्याच्या दाहवीच्या मराठीच्या अभ्यासक्रमात ही समाविष्ट करण्यात आलेली होती. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे कांही  साहित्यिक पुरस्कार ही मिळालेले आहेत.
                       एकूण कै. रामभाउंचे जीवन समृध्द असेच होते. आता प्रत्येकाच्या जीवनात कांही चढउतार , टोकाचे मनाला क्लेष देणारे प्रसंग येतच असतात. तसे त्यांच्या ही जीवनात आले असतील. पण या सर्वावर मात करत ते सकारात्मक जीवन जगले  ! सकारात्मक जीवन कसे जगावे , याचा ते आदर्श वस्तूपाठच होते !
          अशा या चिरतरूण कविच्या  आत्म्याला शांती लाभो , ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो !
                      ॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

Wednesday, 14 August 2019

कै. बी. एन. पाटील....मेरीकर संशोधक...

                    फोटोत दिसत आहेत , ते म्हणजे (कै.) बी. एन. पाटील. चारच दिवसा पूर्वी, त्यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ,नाशिक मध्ये निधन झाले. त्यांच्या नावा मागे (कै.) हा शब्द लिहीताना मनाला अनंत वेदना होत आहेत.
                  (कै.) बी. एन. पाटील हे ,मेरी ,या पाटबंधारे खात्याच्या अभियांत्रिकी  संशोधन संस्थेत, वैज्ञानिक होते. सायन्सचे पदवीधर ( B.Sc.) ! पण त्यांचे ज्ञान , हुषारी आणि कामाची निष्ठा पाहून, त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी पगारी रजा देउन, पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवले. त्या पदव्युत्तर  परिक्षेत, ( M.Sc .) त्यांनी उत्तम यश संपादन केले.
                  तिथून परतल्यावर ,त्यांनी अभियांत्रिकी संशोधन कार्याला ,पुनश्च  वाहून घेतले . आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून त्यांनी, एक विशिष्ठ प्रचारचे Grout material तयार केले. त्याचा उपयोग, कोयना धरणातील गळती बंद करण्यासाठी झाला. त्यांनी  संशोधनाने तयार केलेले ते Grout material ,काळाच्या कसोटीवर सिध्द झाले. या त्यांच्या संशोधनाला मान्यता देउन, त्यांचा गौरव करण्यासाठी , त्या वेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील, खास मेरी आॅफिसमध्ये आले आणि त्यांनी (कै.) बी. एन. पाटील यांचा यथोचित गौरव केला. हा दुर्मिळ मान ,मेरी मधील वैज्ञानिकाला, प्रथमच मिळाला. पुढे मेरीच्या इतिहासात असा दुर्मिळ मान मिळाल्याचे, आमच्या कुणाच्याच ऐकीवात नाही. (कै.) बी. एन. पाटीलांनी तयार केलेले Grout material ,पुढे "MERI GROUT " या नावाने ओळखले गेले. त्याचे "पेटंट"  मेरी या संस्थेस प्राप्त झाले. एखाद्या गोष्टीचे पेटंट मिळविणे , ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची बरीच पूर्तता करावी लागते. हे पेटंट मिळविण्यासाठी, (कै.) बी. एन. पाटील यांनी घेतलेले परिश्रम, अतुलनीय असेच आहेत. ही घटना आहे सन् १९७५ सालची. माझ्या माहिती नुसार मेरीला मिळालेले हे पहिले आणि शेवटचेच पेटंट ! मेरीच्या आजपर्यंतच्या ६० वर्षांच्या इतिहासात ,सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशी ही अद्वितीय घटना आणि त्या घटनेचे शिल्पकार होते ( कै.)  बी. एन. पाटील.
                  (कै.) बी. एन. पाटील हे शांत आणि सरळ स्वभावाचे गृहस्थ होते. आपण बरे आणि आपले काम बरे , असा त्यांचा स्वभाव होता. समोरचा किती ही वाकड्यात शिरला ,तरी ते स्वतः  सरळच वागायचे . शासकीय नोकरीतले छक्केपंजे ,त्यांना कधी समजले ही नाहीत आणि त्यांनी ते समजावून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही , इतक्या सरळ मनाचे ते होते.
                     नोकरीच्या कालावधीत ,त्यांच्या कांही अनपेक्षित ठिकाणी बदल्या झाल्या. पण आपली बदली रद्द करण्यासाठी ,त्यांनी कधी कुणापुढे पदर पसरला नाही. जिथे बदली झाली तिथे ते गेले आणि स्वाभिमानाने व प्रामाणिकपणे,  त्यांनी आपली सेवा दिली.
                       त्यांचे मूळ गाव, परभणी जिल्ह्यातले सेलू हे आहे. तिथे त्यांची शेतीवाडी आहे. पण मुलांचे शिक्षण उत्तम व्हावे या साठी , त्यांनी नाशिक हीच आपली कर्मभूमी मानली व ते शेवट पर्यंत नाशिक मध्येच राहिले.
                   चार दिवसापूर्वी त्यांचे निधन झाल्याची वार्ता ,मनाला खूपच धक्का दायक होती.
                त्यांच्या मागे वहिनी आणि तीन मुले आहेत. तीन ही मुले आपल्या आपल्या जागी उच्च पदावर आहेत.
(कै.)  बी. एन. पाटील यांच्या आत्म्यास ,शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
                      ।। ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

Thursday, 1 August 2019

गुरूवर्य श्री. नंदकुमार अभ्यंकर.

                 सन् २०००. जानेवारी महिना. मी त्या वेळी सांगलीत, पाटबंधारे खात्याच्या, गुण नियंत्रण ( Quality Control ) शाखेत ,कार्यरत होतो. अनपेक्षित पणे  माझे वैज्ञानिक अधिकारी या पदावर ,प्रमोशन झाले .माझी  मेरीत ( M.E.R.I. , पाटबंधारे खात्याची संशोधन संस्था  ) नाशिकला बदलीची आॅर्डर आली .  प्रमोशनचा आनंद होण्या ऐवजी, मी मनाने दुःखी झालो. मिरजेत आम्ही सगळे, म्हणजे मी , पत्नी सौ. रजनी , मुलगा चि. आदित्य , माझी आई , वडील असे सगळे एकत्र होतो.आईचे  वय ७३, वडीलांचे वय ८३ होते.  मी  मिरजहून नाशिकला गेलो ,तर त्यांचे कसे होईल ?
                   या विचारातच , मी माझे स्नेही श्री. नंदकुमार अभ्यंकर यांचे घरी, सहज गेलो. माझ्या मनातील काहुर, मी त्यांना सांगीतले. त्यांनी शांतपणे माझी व्यथा समजून घेतली. क्षणभर विचार केला. नंतर ते मला म्हणाले " दीक्षित , तुमच्या मिरजेत असण्यामुळे ,तुमचे कुटूंब सुरक्षित आहे . तुमचे आई, वडील वृद्ध आहेत. तुम्ही मिरजेत त्यांच्या सोबत असल्या मुळे ,त्यांच्या तब्बेती  व्यवस्थित आहेत , असा तुमचा समज आहे. हा तुमचा गैरसमज आहे. तुम्ही नाशिकला गेलात की, लगेच त्यांच्या तब्बेती बिघडतील , असा तुमचा समज असेल , तर तो चुकीचा आहे. जो तो आपल्या नशिबाने जगत असतो . त्याचे पितृत्व अहंकाराने स्वतःकडे घेणे सर्वथैव गैर आहे , चुकीचे आहे. "
                     हे सर्व ऐकून माझ्या मनात लख्ख प्रकाश पडला . मनातील सर्व जळमटे निघून गेली व मी अतिशय आनंदाने, एकटा प्रमोशनवर, नाशिकला निघून गेलो.
                    श्री. नंदकुमार अभ्यंकरांच्या या समजावण्याचा, माझ्या मनावर खूपच परिणाम झाला . त्या दिवसा पासून ,मी त्यांना, मनोमन " गुरू " मानू लागलो. आज तागायत ते मला ,गुरूस्थानीच आहेत व पुढे ही राहतील.श्री. अभ्यंकरांचा अध्यात्माचा अभ्यास ,जबरदस्त आहे.  भगवद् गीता , ज्ञानेश्वरी , दासबोध , तुकारामाची गाथा , संत कबीर यांचे विचार वाङ्गमय आणि इतर बर्‍याच संत वाङ्गमयाचा ,साहित्याचा त्यांचा अभ्यास , त्या वरचे त्यांचे मनन आणि चिंतन , प्रचंड आहे.
                 ते सांगलीच्या गणपतराव अरवाडे हायस्कूलच्या ,ज्युनियर काॅलेजच्या तांत्रिक विभागाचे  प्रमुख होते. आता नुकतेच ,ते सेवानिवृत्त झालेले आहेत. शिक्षण क्षेत्राशी त्यांचा संबंध असल्याने , मुलांच्या मानसशास्त्राचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे. त्या मुळे ओळखीची ,तसेच ओळख नसलेली ,  मुले आणि पालक मुलांच्या शैशणिक , मानसिक अडचणी सोडविण्यासाठी ,त्यांच्याकडे आवर्जून येत असतात . त्यांचा सल्ला घेत असतात.
                 ते स्वतः अटोमोबाईल इंजिनीयर आहेत.मिरजेत त्यांचे स्वतःचे ,अटोमोबाईल वर्कशाॅप होते. खूप चांगले चालायचे. त्या व्यवसायात त्यांनी नाव कमावले होते. एक दिवस त्यांनी ते वर्कशाॅप, त्यांच्या हाताखाली बरेच वर्षे काम करणार्‍या कर्मचार्‍याला ,देउन टाकले. मी या व्यवसायात भरपूर पैसा कमवला. आता मला पैसा नको, हा त्यांचा विचार होता. माझ्या किंवा तुमच्या ही माहितीत " मला आता पैसा नको " ,असे म्हणणारा हा पहिलाच माणूस असेल. पैशाचा मोह प्रत्येकाला असतो. म्हातारपणी ही पैशाच्या मागे पळणारी माणसे ,आपण पाहिली असतील. पण तरूणपणी मला पैसा नको , असे म्हणणारे श्री. अभ्यंकर , एकमेवाव्दितीय असेच आहेत.
                      त्यांना एक मुलगा आहे. एक नातू ही नुकताच झालेला आहे. मिरजेत किल्ला भागात , त्यांचा स्वतःचा बंगला आहे. पण  आपण  नातवंडा सोबत ,आनंदात रहावे , या उद्देशाने ,श्री. आणि सौ, अभ्यंकर दोघेही सध्या पुण्यात, मुला सोबत राहतात. सौ. वहिनींची ही त्यांना समर्थ साथ आहेच !
                       तर अशा या मला आदराने ,गुरूस्थानी असलेल्या  श्री. नंदकुमार अभ्यंकर आणि सौ. वहिनी, यांना परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य द्यावे आणि त्यांचा कृपालाभ मला सतत मिळावा , हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
णे

Monday, 15 July 2019

श्री. श्रीराम वैजापूरकर...यशस्वी अभियंता स्नेही.

               " जय श्रीराम "
                  तुम्ही म्हणाल , लेखाच्या सुरवातीलाच हे काय ? मी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला ,पाहिलेले नाही. पण श्रीराम वैजापूरकर ,हे माझ्या चांगल्या परिचयाचे असल्याने ,मी त्यांच्यातच श्रीरामाला पाहतो. मला त्यांच्यात ,श्रीरामाचे सर्व गूण सामावलेले दिसतात.
                    श्रीराम वैजापूरकर हे मेरीत ,  बदलीवर आले.  स्वेच्छेने मेरीत आलेले व तिथल्या संशोधनाच्या कामात रममाण झालेल्या , कांही दुर्मिळ अभियंत्यांच्या पैकी ते एक आहेत. मेरीत " इतर आवक " कांहीही नसते. त्यामुळे बर्‍याच जणांना ,मेरी मधील नोकरीचा कालावधी,   शिक्षेचा वाटतो , मेरी म्हणजे बंदिशाळा वाटते. पण श्री. श्रीराम वैजापूरकरांचे  ,इतर गोष्टींच्या पेक्षा ,कामावर प्रेम होते .त्या मुळे "जगाच्या पाठीवर " या मराठी सिनेमातील  , " जग हे बंदीशाळा " या गाण्यात म्हटल्या नुसार , " जो आला तो रमला " या उक्ती प्रमाणे , श्रीराम वैजापूरकर मेरीत आले आणि रमले ही !
                        मध्यम उंची , गोरा पान रंग , डोक्या वरचे केस ,पांढरटपणाकडे जास्तच झुकलेले . कपडे अतिशय व्यवस्थित , चेहर्‍यावर एक प्रकारचे सात्विक हास्य  , असे त्यांचे कोणावरही छाप टाकणारे ,व्यक्तीमत्व आहे. जे काम करायचे ते सुव्यवस्थितच ! त्यांचे अक्षर ही अतिशय देखणे आहे.
              श्रीराम वैजापूरकरांनी, शासकीय सेवेतून  सेवानिवृत्त झाल्यावर ,आपले छंद फार छान जोपासलेले आहेत. त्या त्या परिस्थितीशी अनुरूप असे, तांत्रिक आणि ललित लेखन ,त्यांनी  विविध वृत्तपत्रांसाठी भरपूर केले आहे.या शिवाय पक्षी निरीक्षण, हा एक आगळा वेगळा छंद त्यांनी जोपासला आहे. त्या साठी ते सुयोग्य जागा  आणि सुयोग्य वेळ शोधून ,पक्षी अभयारण्यांना आवर्जून भेटी देत असतात.
                      महाराष्ट्र राज्यात बाल भारतीचे, पाठ्यपुस्तक निर्मिती  मंडळ आहे. तिथे पाठ्य पुस्तकांची नव्याने निर्मिती करण्यासाठी, एक तज्ज्ञ समिती नेमली जाते. हे तज्ज्ञ त्या त्या विषयाची ,वेगवेगळ्या इयत्तांची पुस्तके पाहून ,त्या तील कालबाह्य झालेला मजकूर काढून , नवीन व काल सुसंगत मजकूर ,पुस्तकात समाविष्ट करण्याचे काम करतात. अशा भूगोल विषयाच्या तज्ज्ञ समितीवर, श्रीराम वैजापूरकर काम करीत आहेत. नुकतेच आठवी आणि दहावीचे भूगोलाचे नवीन  पुस्तक ,प्रकाशित करण्यात आले. या कामात, श्रीराम वैजापूरकरांचा अघाडीचा वाटा आहे.
                   श्रीराम वैजापूरकरांना दोन मुले आहेत. दोघे ही उच्च विद्याविभूषित असून, अमेरिकेत स्थायिक आहेत. सौ. वहिनींची ही त्यांना समर्थ साथ आहेच ! मुले अमेरिकेत असल्याने ,त्यांचे तिकडे ही मधून मधून वास्तव्य असते.
                   श्रीराम वैजापूरकरांनी, मला " श्रीराम पंचायतनाची " एक छानशी मूर्ती, मोठ्या प्रेमाने भेट दिलेली आहे. ती माझ्या रोजच्या पूजेत आहे. त्या मुळे त्यांची आठवण झाली नाही ,असा दिवस जात नाही.
                     अशा या श्रीराम वैजापूरकरांना आणि सौ. वहिनींना , तसेच त्यांच्या कुटूंबियांना  सुख  समाधानाचे , उदंड  आणि समृध्द , निरामय आयुष्य  " श्रीरामाने " द्यावे , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो  !

Monday, 1 July 2019

सुधीर सराफ... संगीतकार , कवि आणि संशोधक.

                 शासकीय नोकरी म्हणजे तशी निरसच ! त्यात  संशोधनात्मक काम करावे लागणारी माणसे ,म्हणजे जास्तीत जास्त निरस असणार , असा समज होणे स्वाभावीकच आहे. पण शासकीय नोकरीत असून ,  किचकट संशोधनाचे काम करीत असताना , आपल्यातला  कलाकार जपणे ,ही गोष्ट अशक्यच वाटते ना ? पण नाही !  माझा एक जवळचा स्नेही असा आहे की , ज्याने अभियांत्रिकी संशोधन करता करता , आपला संगीताचा छंद ही जोपासला आहे. आता तुम्हाला वाटू शकते की , हा माझा स्नेही गायक असणार ! पण तुमचा अंदाज चुकला . माझा हा स्नेही ,एका वाद्यवृंदाचा जनक आहे.माझ्या या  कलाचार स्नेह्याचे नाव आहे श्री. सुधीर सराफ.
                    सुधीरचे व्यक्तीमत्व म्हणजे गोरापान रंग , उत्तम उंची , डोक्या वरचे केस थोडे विरळ झालेले , बांधा राजस , कोणी ही पाहता क्षणी त्याच्या व्यक्तीमत्वाने भारून जावे , असेच एकूण व्यक्तीमत्व !
               सुधीर , मेरीच्या महामार्ग संशोधन विभागात कार्यरत होता. त्याला कामासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा होती. त्या प्रयोगशाळेचा तो सर्वेसर्वा होता. वेगवेगळ्या  महामार्गांच्या  कामात , विमानतळांच्या धावपट्टीसाठी उत्तम डांबरी करण केलेला रस्ता किंवा धावपट्टी बांधताना, त्यात डांबराचे प्रमाण किती असावे ,तसेच त्या डांबराची गुणवत्ता कशी असावी , या विषयी तो संशोधन करीत असे. त्याचे काम तो एकाग्रतेने करीत असे. आपल्या कामात इतर कुणी ,ढवळाढवळ केलेली, त्याला चालत नसे.
                      तर अशा या रुक्ष कामात व्यग्र असलेला माझा स्नेही सुधीर , आॅफीस संपल्या नंतर मात्र ,एकदम  रसिकाच्या भूमिकेत दिसायचा. त्याने स्वतःचा वाद्यवृन्द निर्माण केला होता. स्वतः एखादे वाद्य वाजविणे आणि वाद्यमेळ तयार करणे ,यात खूपच अंतर आहे. वाद्य वाजविणार्‍याला ,आपल्या वाद्यात उत्तम गती असते. पण वाद्यवृन्द निर्माण करणार्‍याला ,सर्वच वाद्यात, तसेच गाण्यात ही गती असावी लागते. कोणते वाद्य ,कोणत्या जागी कसे वाजविले गेले पाहिजे , याची जाण असल्या शिवाय " वाद्यवृन्द " निर्मिती कठीणच !
              सुधीरच्या वाद्यवृन्दाचे नाव होते " साउंड अॅन्ड सिंफनी " . त्यात तो स्वतः पियानो अॅकाॅर्डियन वाजवायचा. सर्व वाद्यवृन्दाच्या मध्यभागी ,सुधीर उभा राहून सर्व वाद्यवृन्द नियंत्रणात ठेउन, पियाॅनो अॅकाॅर्डियन वाजवताना पाहणे ,म्हणजे स्वर्गीय आनंद असायचा ! एखाद्या " राजा " प्रमाणे ,तो त्यात शोभून दिसायचा !प्रेक्षकांची व श्रोत्यांची नस ओळखून, तो त्या प्रमाणे गाणी सादर करायचा. जेणे करून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच जायचा !
                     सुधीरने वाद्यवृन्दा बरोबरच ,वेगवेगळ्या गाण्यांचा , गाण्यात वापरल्या गेलेल्या विशिष्ठ शब्दांचा ,  वापरल्या गेलेल्या वाद्यांचा व त्यांच्या परिणामांचा, सखोल अभ्यास केलेला आहे. नाशिक आकाशवाणी साठी त्याने ,अशा प्रकारच्या सुंदर कार्यक्रमाची मालिका , स्वतः लिहून  सादर केली होती.
              या शिवाय सुधीर कवि मनाचा ही आहे. त्याच्या स्वरचित हिंदी काव्यांचे संग्रह , मन आकाश , लैला मजनूॅं , मानस मीरा , इ. प्रसिध्द झालेले आहेत. या शिवाय वंशवृृृृृध्दी ,हा मार्गदर्शक शास्त्रीय ग्रंथ ही , प्रकाशित झालेला आहे.
                     मी आणि सुधीर शासकीय नोकरीतून ,कधीचेच सेवानिवृत्त झालोय ! आता आमची भेट ही क्वचितच होते. सुधीरचा वाद्यवृन्द ,चालू आहे की नाही मला कल्पना नाही. पण अशा या कवि मनाच्या , संगीत रसिक मित्राची ओळख करून देताना, मला अतिशय आनंद होत आहे.
                       फोटोत दिसतोय तो , प्रसन्न हसणारा ,माझा स्नेही श्री. सुधीर सराफ ! त्याला भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.


Friday, 14 June 2019

श्री. देगांवकर काका......मेरीचे कॅप्टन.

                आज मी ज्यांच्या बद्दल लिहीणार आहे , त्यांनी एके काळी म्हणजे ,साधारण १९७० ते १९७६ या कालावधीत , नाशिक मधील " मेरी " या संशोधन संस्थेत कार्यरत असलेल्या , प्रत्येकाचे आयुष्य नक्कीच व्यापून टाकले होते. असे उत्साही आणि प्रसन्न व्यक्तीमत्व म्हणजे, " कॅप्टन देगांवकर " !
                 आम्ही नुकतेच नोकरीला लागलेले सर्वजण त्यांना, देगांवकर काका असे म्हणत असू. देगांवकर काका म्हणजे, एक प्रसन्न उत्साहाचा झराच होते. १९७० ते १९७६ या कालावधीत, मेरीत किंवा मेरी काॅलनीत , कोणताही कोणताही शासकीय , निमशासकीय किंवा अशासकीय कार्यक्रम असो ,त्यात देगांवकर काकांचा सक्रिय सहभाग ,हमखास असायचाच ! जिथे जातील तिथे " संपूर्ण कॅनव्हास "  व्यापून टाकणारे असे ,त्यांचे व्यक्तीमत्व होते.
                  भव्य कपाळ , चेहर्‍यावर कायम प्रसन्नतेचे स्मित हास्य , मध्यम उंची , शर्ट कायम इन केलेला , त्यावर पट्टा ,कपडे कायम टिपटाॅप , पायात बूट , वागण्यात एक प्रकारची कमांडिंग पोझीशन , असे त्यांचे लक्षात राहण्या सारखे व्यक्तीमत्व होते.
                   त्यांना  " कॅप्टन देगांवकर " असे सर्व अधिकारी संबोधायचे ! कारण देगांवकर काकांनी ,आर्मी मध्ये शाॅर्ट सर्व्हिस कमिशन घेउन ,कॅप्टन या पदावर काम केलेले होते. आर्मीची शिस्त ,त्यांच्या वागण्या बोलण्यात जाणवत असे.
                    मेरीच्या प्रत्येक गणेशोत्सवात आणि रंगपंचमीत ,काकांचा उत्साही सहभाग असायचा ! गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकी नंतर ,जेवढे लोक मिरवणूकीत सहभागी असायचे ,त्या सर्वांना आवर्जून घरी बोलावून, ते चहापानाचा कार्यक्रम करीत असत. रंगपंचमीच्या दिवशी ही त्यांच्याकडे ,सर्वांना चहापान असायचे.अधिकारी असून ही , सर्वांना बरोबर नेणारे ,  सर्वांच्यात मिळून मिसळून राहून आनंद लुटणारे ,असे काकांचे व्यक्तीमत्व होते.
                    माझ्या लग्नात ,काकांचा फार मोठा सहभाग होता. त्यांच्या त्या सहभागासाठी ,मी त्यांचा कायमचा त्र५णी आहे. काका मेरीतून ,१९७६ साली बाहेर बदलीवर गेले. ते १९९३ साली  ,अधीक्षक अभियंता या पदावरून ,सेवानिवृत्त झाले.
                  सेवानिवृत्ती पूर्वी ,त्याच्या तीन ही मुलींची  (चि. सुनिता , चि. संगीता आणि चि. सुजाता ) लग्ने झालेली होती. मुलगा चि. संजय ,याचे लग्न व्हायचे होते.
                 सेवानिवृत्ती नंतर ,काका आवर्जून आपल्या सर्व मित्रमंडळींना , सुह्रुदांना, त्यांच्या त्यांच्या गावी जाउन ,आवर्जून भेटले. त्या नंतर थोड्याच  दिवसात ,त्यांना असाध्य अशा कर्करोगाने गाठले. बरेच उपचार झाले ,पण फारसा उपयोग होत नव्हता. मधल्या काळात , मुलगा चि. संजयचे लग्न ठरले होते. पण काका आजारी असल्याने , ते कसे करायचे असा प्रश्न होता. काका औरंगाबाद मधील एका हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट होते. कशाचा कांही भरोसा नव्हता .त्या कठीण अवस्थेत , काकांनी चि. संजयचे लग्न, आपल्या समक्ष करायचा निर्णय घेतला. हे लग्न ते ज्या हाॅस्पिटल मध्ये ,ज्या खोलीत अॅडमिट  होते , त्याच खोलीत डाॅक्टरांच्या परवानगीने झाले....आणि त्याच रात्री काका "गेले"....आपली सर्व कर्तव्ये पार पाडून गेले.....ती तारीख होती २३ जानेवारी १९९५ ! काकांची जन्म तारीख २६ जून १९३५ !
             आज काका हयात असते तर, या येणार्‍या २६ जून २०२० ला त्यांना, ८५ वर्षे पूर्ण होउन त्यांनी ८६ व्या वर्षात ,पदार्पण केले असते. पण तो योग नाही.....
             " जो आवडतो सर्वांना , तोची आवडे देवाला "  ही उक्ती, काकांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते....माझ्या मते काका गेलेले नाहीतच , ते आमच्या सर्वांच्या ह्रदयात ,कायम आहेतच आणि सदैव राहतीलच !
                    फोटोत दिसत आहेत ते देगावकर काका आणि काकू ! काकू औरंगाबादला ,आपल्या मुलाकडे असतात . काका वर लिहील्या प्रमाणे आमच्या सर्वांच्या ह्रदयात कायम आहेतच !............


Friday, 31 May 2019

श्री. शामकुमार दीक्षित .....शामभैय्या

पंच्याहत्तराव्या वर्षी माणसाचे मन लहान मुला सारखे निर्मळ आहे , असे सांगीतल्यास कदाचित तुमचा विश्वास ही बसणार नाही. पण हे सत्य आहे. एक व्यक्ती अशी नक्की आहे व ती व्यक्ती माझी स्नेही आहे याचा मला अभिमान आहे.
             त्या व्यक्तीचे नाव आहे श्री. शामकुमार नरहर दीक्षित उर्फ एस्. एन्. दीक्षित म्हणजेच आमचा मेरीतील मित्रांचा " शामभैय्या " !अतिशय प्रेमळ , मनात कोणता ही आप पर भाव नाही , प्रत्येक गोष्ट चांगलीच आहे , असे सरळपणे मना पासून मानून चालणारा असा  हा आमचा शामभैय्या आहे. इतकं नितळ मन आजच्या काळात पहायला फारच क्वचित सापडेल !
              शामभैय्या जसा आहे तसाच दिसतो. मध्यम पेक्षा जरा जास्त उंची , सात्विक सावळा रंग , शरीर यष्टी राजस , हसरा व प्रसन्न चेहरा !
               शामभय्या क्रिकेट छान खेळतो. तो आॅल राउंडर आहे. मेरीत असताना मेरीच्या टीमचा तो एक आधारस्तंभ होता. काॅलेज मध्ये असताना तसेच काॅलेज संपल्यावर ही तो रोज संध्याकाळी ग्राउंडर जायचा म्हणजे जायचाच !शामभैय्याने आमच्या बरोबर नाशिकच्या मेरी आॅफिसच्या एकांकिकेत ही छान व विनोदी भूमिका केल्या होत्या आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.
                शामभैय्याच्या लग्नाच्या वेळची १९७२ सालची एक हसवणारी आठवण आत्ता झाली. त्याचे लग्न पुण्यात सारस बागे जवळच्या बहुतेक मित्रमंडळ कार्यालयात झाले. लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही आॅफिस संपल्यावर नाशिक पुणे प्रवास करून मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयात पोचलो. शामभैय्याने आमचे मना पासून स्वागत केले आणि आमची झोपण्याची व्यवस्था केली. शेजारी असलेल्या एका ग्राउंडवर नेमकी एक सर्कस उतरली होती. त्यांचा ही रात्रीचा खेळ संपला असावा. वाघ सिंहांची भुकेची वेळ झाली असावी. ते जोरजोरात सामुदायिक डरकाळ्या फोडत होते. आम्ही झोपायचा प्रयत्न करत होतो , पण त्या डरकाळ्यांच्या जुगलबंदीने  झोप येण्याच्या ऐवजी आम्ही मनसोक्त हसत होतो. आता वाघसिंहांच्या डरकाळ्या सिनेमात जरी ऐकल्या , तरी शामभैय्याच्या लग्नाची आठवण आम्हा सर्वांना येउन हसू फुटते.
                   आमचा शामभैय्या देवभोळा आहे. रोज मना पासून देवाचे ध्यान आणि साग्रसंगीत मंत्रोच्चार करून पुजा करणे त्याला मना पासून आवडते. सेवानिवृत्ती नंतर त्याने स्वरयुक्त रूद्र शिकून घेतले आहे. काशीविश्वनाथाला रूद्राभिषेक करण्यासाठी कांही ब्रह्मवृदांच्या सोबत तो आता वाराणसीला जाणार आहे.
शामभैय्या हा Instrumentation Engineer आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्या अंतर्गत असलेल्या मेरी आॅफिस मार्फत मातीच्या धरणात जे Instrumentation करण्यात येते त्याचा तो अगदी सुरवातीचा  जनक अभियंता आहे , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
                   मेरीची नोकरी सोडून नंतर तो खासगी नोकरीत गेला. मूलतः हुषार आणि प्रामाणिक असल्याने तिथे ही तो चमकला. त्या नंतर कांही वर्षे तो कुवैतला होता. आता तो सेवानिवृत्त होउन नव्या मुंबईत राहतो.
                 त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघे ही परदेशात स्थायिक झालेले आहेत. मुंबईत तो आणि सौ, वहिनी राहतात.मध्यंतरी तो खास आम्हा सर्वांना भेटण्यासाठी आवर्जून येउन गेला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप आनंद झाला.
                अशा या आमच्या शामभैय्याला आणि सौ. वहीनींना परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , ही प्रार्थना करतो आणि थांबतो !
              खाली फोटोत आहे तो आमचा " शामभैय्या "......

Tuesday, 14 May 2019

कै. टि. डब्ल्यू. शूरपाल.....अविस्मरणीय व्यक्तीमत्व..

            मेरीच्या नोकरीच्या कालावधीत, असे कांही लोक भेटले की , त्यांना विसरणे सर्वथैव अशक्यच ! त्यातील एक आहेत, कै. त्रिंबक वामन शूरपाल उर्फ टी. डब्लु. शूरपाल ! त्यांच्या बद्दल मनात आदर वसत असल्याने ,मी त्यांना कायम " शूरपाल साहेब " असेच म्हणायचो.
                  शूरपाल साहेब म्हणजे शांत व विचारी व्यक्तीमत्व ! मध्यम उंची , शांत चेहरा , अप टू डेट पोशाख ,एक प्रकारे आदर वाटावा ,असे गंभीर व्यक्तीमत्व ! शूरपाल साहेब कोणती ही गोष्ट ,घाई गडबडीत किंवा धसमुसळेपणाने, कधीच करीत नसत. जे काम करायचे ,ते शांत चित्ताने आणि व्यवस्थित नियोजन करून , १०० % प्रामाणिकपणे करीत असत.
                मी त्यांच्या हाता खाली, काम केलेले आहे. शूरपाल साहेब ,कधी ही कुणालाही रागावून किंवा दटावून बोलल्याचे, मला स्मरत नाही.
             शूरपाल साहेबांना क्रिकेटचे प्रचंड वेड होते. ते शिकत असताना ,काॅलेजच्या व युनिव्हर्सिटीच्या टीमचा एक प्रमुख भाग होते. मेरी आॅफिसची ही क्रिकेटची टीम होती. त्या टीमचे ते कॅप्टन होते.
            टीव्हीवर क्रिकेटची मॅच चालू असेल तर ते, टीव्ही पासून हाताच्या अंतरावर बसून ती पहायचे. जणू एखादा कॅच त्यांच्या दिशेने आला, तर अजिबात सुटू नये.
             शूरपाल साहेब १९९४ साली सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर ,तब्बेतीच्या कांही कांही तक्रारी सुरू झाल्या. त्यातच भरीस भर म्हणून, हार्टट्रबल ही होता. दि. २५ आॅक्टोबर २०१४ रोजी, भाउबीजेच्या दिवशी ते अचानक  " गेले ".
           त्यांच्या मागे वहीनी आणि चार मुली आहेत. सर्वजण आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत.
            शूरपाल साहेबांच्यावर,  लेख लिहीण्याची फार इच्छा असल्याने ,त्यांची खूप आठवण येत होती. त्या निमित्ताने वहीनींची भेट व्हावी, अशी तीव्र इच्छा होती. एके दिवशी रात्री आठच्या सुमारास मी आणि सौ. रजनी, आम्ही दोघे नाशिकच्या इंदिरा नगर भागात, शूरपाल साहेबांचा बंगला शोधण्यासाठी जिद्दीने झटलो. अर्धा ते पाउण तासाच्या परिश्रमा नंतर ,त्यांचा बंगला सापडला. बंगल्याच्या बाहेरील पाटीवर ," शुभंकरोती " ही अक्षरे पाहून ,मला अतिशय आनंद झाला. वहीनींची आणि त्यांची कन्या  चि. अदिती ,यांची भेट झाली. जवळ जवळ तास भर मनसोक्त गप्पा झाल्या . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
                  त्यांच्या घरात शूरपाल साहेबांना ," हार घातलेल्या फोटोत " पाहून ,मन गलबलून गेले. मी क्षणभर ,त्या फोटो समोर हात जोडून ,शांत उभा राहिलो . त्यांच्या फोटोचा फोटो घेतला आणि जड अंतःकरणाने बाहेर निघालो.
         आदरणीय शूरपाल साहेबांच्या स्मृतीला त्रिवार प्रणाम !


Thursday, 2 May 2019

" निरामय जाॅगर्स "....आमचा सकाळचा फिरायचा ग्रुप....

              नाशिक मधील ,आमचा सकाळचा फिरायचा सदाबहार ग्रुप.... " निरामय जाॅगर्स "....
             आमच्या " निरामय जाॅगर्स " ग्रुपचे वैशिष्ठ्य म्हणजे फिरताना आम्ही एकत्र नसतो . जो तो आपापल्या वेगाने फिरतो . आमच्या पैकी कांहीजण , ट्रॅकवर उपलब्ध असलेल्या साधनावर, त्यांना झेपेल असा व्यायाम करतात.  सकाळी ट्रॅकवर फिरायला ,प्रत्येकजण आपापल्या वेळी येतो. फिरून झाल्यावर, सात वाजून पाच ते दहा मिनिटांनी, सर्वजण एकत्र गप्पा मारण्यासाठी जमतो. मग थोडावेळ गप्पाटप्पा होतात. गप्पात कोणी ही आपल्या घरातील कांहीही बोलत किंवा सांगत नाही. चर्चेचे विषय जनरलच असतात.
          श्री. केसकर सर, मराठी व संस्कृत या विषयातील एखाद्या शब्दाची उकल करून ,छान माहिती देतात. श्री. गुजराथी सर, केमिस्ट्रीतील कांही अनुभव किंवा वैद्यकीय व्यवसायातील एखादी माहिती देतात. श्री. एस. डी . कुलकर्णी सर , नर्म विनोद किंवा अर्थशास्त्रातील कांही गोष्टींचे विवरण करीत असतात. श्री. रामभाउ जोशी , औषधे व त्यांचे परिणाम या विषयी सांगतात. श्री. वाटपाडे , जमिनीची किंवा प्लाॅटची मोजणी त्यात होणारे घोटाळे , या विषयीच्या गमती सांगतात. श्री. व्याही जोशी, त्यांच्या पूर्व जीवनातील अनोखे अनुभव सांगून सर्वांना चकित करतात. श्री. विलास भिंगेंना सर्वजण " शास्त्रिबुवा " म्हणतात. ते त्या विषयी बोलतात. श्री. विलास औरंगाबादकर सर ,शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव सांगुन सर्वांना गंभीर करून ,मग हसवतात.  श्री. धनसिंग ठाकूर , स्टेट बॅंकेतील त्यांच्या बदल्या व तिथे भेटलेली वेगळी वेगळी माणसे ,यांचे किस्से रंगवून रंगवून सांगतात. श्री. गुडसूरकर सर, त्याच्या प्राध्यापकीय जीवनातील किस्से सांगून हसवतात. श्री. मुकूंदराव खाडीलकर, यांचा खासगी क्षेत्रातील उच्चपदस्थ अनुभव किंवा त्यांचे वाचन भरपूर असल्याने ,आमच्या जनरल नाॅलेज मध्ये भर घालतात.
             मी व श्री. दिलीपराव कुलकर्णी, या सर्वांना वाव देण्यासाठी " उत्तम श्रवण भक्ती " करतो.
          बरोब्बर सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ,सर्वांच्या मोबाईलमध्ये, वेगवेगळ्या टोनचे गजर होतात आणि ही गप्पांची रंगलेली मैफिल संपते . त्या नंतर , एकमेकांचा निरोप घेउन, सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी मार्गस्थ होतात.

एक मन हेलावून टाकणारी आठवण....भुकेलेला विद्यार्थी.....

           खूप दिवस झाले त्या गोष्टीला ! पण आज सहज आठवण झाली .  सर्वांना सांगावीशी वाटली. फार सांगण्या सारखी आहे असं नाहीय. पण ह्रदयाला भिडणारी आहे , म्हणून सांगावीशी वाटते आहे इतकच !
            अंदाजे १९९४ - ९५ साल असेल. मे महिन्याच्या सुट्टीत , शाळेच्या अभ्यासात मागे असलेल्या , महापालिकेच्या शाळेतील  मुलांना, वर्गा बरोबर आणण्याचे दृृृृृृृृष्टीने शिकवावं  ,असं मिरजेच्या श्री. दिलीप आपटे सरांच्या मनात आलं . त्यांनी प्रत्येक महापालिकेच्या शाळेत जाउन ,अशा अप्रगत म्हणजे अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला . पहिली ते सातवी मधील अशा अप्रगत मुलांना  १ मे रोजी, एकत्र जमवलं.
            सर्व साधारण पणे ही सर्व मुले ,अतिशय गरीब परिस्थिती मधील होती. असे म्हणता येईल की , त्यांचे पालक साधारणतः मजूर  किंवा त्या ही पेक्षा ,खालच्या गरीब परिस्थिती मधील होते.
         त्यांना शिकविण्यासाठी, ज्यांची १० वीची परिक्षा झाली आहे व जी मुले सुट्टीत कांही, विधायक काम करू इच्छितात , अशा मुलांना आवाहन करण्यात आले. ज्यांना सामाजिक जाणिव आहे ,अशी मुले आवर्जून आली. शिक्षकांनी शिकविण्या पेक्षा ,विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकविल्यास फरक पडेल ,अशी त्या मागची प्रेरणा होती. या उपक्रमात मदतनीस म्हणून, मी सहभागी झालो होतो.
           हा अप्रगत विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम ,मिरजेत  तळ्यावरील गणपती मंदिराच्या प्रांगणात चालू होता. रोज सकाळी आठ ते दहा असे हे वर्ग चालत.
          एक दिवस सर्व सुरळीत चालू आहे ना , शिकविणार्‍या विद्यार्थ्यांना कांही अडचण नाही ना , हे पहात असताना मला असे दिसले कीं , एक तिसरीतील  ९ -१०  वर्षाचा मुलगा वर्गात न जाता ,मंदिराच्या खांबाला टेकून रडत आहे . मी त्याच्या जवळ गेलो , " बाळ का रडतोस ? वर्गात का गेला नाहीस ? " असे विचारले. तो म्हणाला " सकाळी  मी घरचा केर काढला नाही म्हणून, आजीने मला कांही खायला दिले नाही ,शिवाय मला  मारले , मला फार भूक लागली आहे...."...आणि तो मुलगा मोठ्याने हुंदके देउन ,रडायला लागला.
         शेजारी एक बेकरी होती. तिथे मी  त्याला नेले व पोटभर खाउ घातले. उद्या सकाळी वर्गाला येताना ,तुझ्या आजीला मी बोलावलय म्हणून सांग, असे मी त्याला आवर्जून सांगीतले.
              दुसर्‍या दिवशी तो त्याच्या आजीला घेउन आला. गाठी मारलेले व ठिगळ लावलेले पातळ , अस्ताव्यस्त  पांढरे केस  ,गळ्यात झोळी असा त्या आजीचा पोषाख होता. मी त्या आजीला म्हटले की , काल हा तुमचा नातू तुम्ही खायला दिलं नाही , शिवाय  घरचा केर काढला नाही म्हणून तुम्ही मारल्याने , रडत होता. ती म्हणाली " घरात खायला भाकर तुकडा न्हवता , मी बी कातावून गेलो हुतो ,  त्यात ह्यानं केर बी काडला न्हाइ , मला माजाच राग आला हुता , मग मी मारलं त्येला ! तुमाला काय सांगायचं सायेब , हे लेकरू माज्या वटीत सोडून ,ह्याचे आय आनि बा परागंदा झाल्यात.  म्या सकाळच्या पारी  , झोळी घीउन ,कचरा कुंडीत  काय किडूक मिडूक मिळतय, त्ये गोळा करत्ये . ते इकून आमी कसं  बसं प्वाट जाळतो . "  ह्याचे आई वडील कुठं आहेत ? असं विचारताच ,त्या माउलीच्या डोळ्यात ,चटकन पाणी आले. हुंदके देत ती बाई सांगू लागली " ह्येचा बा , तकडं नागपूराकडं बिलडिंगीच्या शेंटरिंगच्या कामाला जातो म्हनून, जो गेलाय त्यो तिकडचाच झालाय.  ह्याची आई कुना बरूबर पळून गेलीय , काय म्हाईती बी न्हाई . ह्ये लेकरू रोज, आई बा येतील म्हनून ,डोळं लावून बसतय , पन त्ये काय येतीलसं दिसत न्हाई. मी ही अशी म्हातारी , झोळी घीउन फिरतो , कदी काय मिळतय ,कदी कायबी मिळत न्हाय. कसं बसं दिस वडतूया ह्या लेकरा साठी. काय म्हायती ह्येच्या नशिबात काय हाय ते ! " असं म्हणून ती म्हातारी ओक्साबोक्शी रडायला लागली . हे मन विदीर्ण करणारं सामाजिक वास्तव पाहून, मी पण गलबलून गेलो............

पंच्याण्णव वर्षाचे तरूण डाॅ. फाटक....

           नाशिक मधील ,आमच्या सकाळच्या फिरायच्या ट्रॅकवर, एक गृहस्थ येतात. वय ९५ वर्षे . सतेज कांती. गोरापान रंग. चालण्याची ढब ही वाखाणण्या सारखी ! त्यांचे नाव आहे डाॅ. फाटक ! काल त्यांना ९५ वं वर्ष संपून ,९६ वं वर्ष लागलं. त्या निमित्त त्यांचा ट्रॅक वरील लोकांनी ,सत्कार केला. या सत्काराच्या निमित्तानं, त्यांच्या सौ. ही ट्रॅकवर आल्या होत्या. ९५व्या वर्षा पर्यंत, आयुष्याच्या जोडीदाराची साथ लाभणं , ही परमेश्वरी कृपाच !
        डाॅक्टर फाटक, त्यांच्या धीम्या स्पिडनं ट्रॅकवर फिरतात. समोरून येणार्‍याने ओळख दाखविल्यास ,त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलतात. त्यांच्या कडे विनोदांचा स्टाॅक भरपूर आहे. तसेच त्यांचा शेरोशायरीचा अभ्यास ही, खूपच चांगला आहे. समयोचित शेर  सादर करून, ते सर्वांची वाहवा मिळवतात. विनोद आणि शेरोशायरी ,त्यांच्या मनाचा ताजेपणा दर्शवतात. ९५ व्या वर्षी, ज्या वेळी मनुष्य पैलतीराकडे नजर लाउन सुटकेची वाट पहात असू शकतो ,त्या वेळी डाॅक्टर फाटक , प्रसन्न मुद्रेने ट्रॅकवर फिरत ,आपल्या अस्तित्वाने आनंदाचा  वर्षाव  इतरांवर करत , स्वतः ही आनंद लुटत असतात.
           आज त्यांचा सत्कार झाला त्या नंतर त्यांनी आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगीतले...
     १. रोज जमेल तितके चालतो. त्यात हयगय करीत नाही.
     २. घरी गेल्यावर न चुकता थोडाफार व्यायाम ही करतो.
     ३. जिभेवर नियंत्रण ठेवतो.
ते पुढे, विनोदाने म्हणाले कीं , परश्वराला जो आवडतो त्याला तो लवकर बोलावून घेतो. मी परमेश्वराला आवडत नसावा , त्या मुळे ,त्याने मला अजूनी बोलावले नाही. त्याची आॅर्डर आली की , येथे कोणी ही क्षणभर ही, थांबू शकत नाही. माझी अजूनी आॅर्डर आलेली नाही. आजच्या जमान्यात कुठली ही आॅर्डर  " कांही " दिल्या शिवाय निघत नाही आणि अशा कारणासाठी द्यायला, माझ्याकडे " कांही " शिल्लक ही नाही. बोलता बोलता त्यांनी ,एक शेर ऐकवला....
               चलनेवाले जल्दी जाते नही
               बैठनेवाले जाते है
               बैठनेवाला भी जल्दी जाता नही
               अगर वो कम खाता है
शेवटी त्यांनी गालिबचा एक छान शेर पेश केला...
                मुस्कान बनाये रख्खो
                तो दुनिया साथ देती है
                आॅंसूओंको तो
                आॅंखे भी पनाह नही देती.,..
अशा या चिरतरूण व सदाबहार ,डाॅक्टर फाटकांना परमेश्वराने उदंड व निरामय आयुष्य द्यावे अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.

शिकवताना मुलांनी विचारलेले अडचणीचे प्रश्न

            नाशिकमध्ये ,मी रोज संध्याकाळी , सहा ते सात साडे सात ,मुलांना मोफत शिकवायला जातो. आठवीच्या मराठी माध्यमाच्या मुलांना, मी इंग्रजी , गणित आणि विज्ञान हे विषय शिकवतो. ज्यांना प्रायव्हेट क्लासेस परवडत नाहीत , असे गरीब परिस्थितील विद्यार्थी ,या क्लासला येतात.
          शिकवताना ,फजितीचे आलेले दोन प्रसंग , गंमत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. दोन्ही प्रसंग, विज्ञान हा विषय शिकवताना घडलेले आहेत.
           विज्ञानात ,कीटकांच्या प्रजोत्पादनाचा विषय होता. प्रजोत्पादनाच्या दोन पद्धतींचा उल्लेख, पुस्तकात  होता. एक लैंगिक आणि दुसरी अलैंगिक ! नुसता उल्लेख होता. पण एका विद्यार्थ्याने , प्रश्न विचारला " सर , लैंगिक आणि अलैंगिक , म्हणजे काय ? " मी एकदम गांगरलोच , असा प्रश्न येईल ही अपेक्षा नसल्यानं ,मी काय उत्तर द्यायचं, याचा विचारच केला नव्हता. पण उत्तर देणं आवश्यकच होतं ! मी क्षणभर विचार केला व उत्तर दिलं. मी सांगीतलं " ज्यांना आई वडील असतात ,त्याला लैंगिक प्रजोत्पादन म्हणतात . आई वडील नसलेल्यांना, म्हणजे अमीबा प्रमाणे एकाचे दोन , दोनाचे चार , असे स्वतःचे स्वतः निर्माण होणार्‍यांना ,अलैंगिक प्रजोत्पादन म्हणतात ". मुलांना उत्तर पटलं . पुन्हा प्रश्नोत्तरे वाढली नाहीत  आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
           दुसरा एक असाच प्रसंग....कॅन्सर कुठे कुठे होतो , त्या विषयी पुस्तकात उल्लेख होता. त्यात कॅन्सर स्तनांना होउ शकतो , असे लिहीले होते. इतक्यात एका मुलीने मला थांबवले आणि " सर , स्तन म्हणजे काय ? " असा प्रश्न केला. हा ही प्रश्न ,मला अनपेक्षितच होता. मी गांगरून गेलो. आता हिला काय सांगायचं ? पण थोडा विचार केला आणि म्हणालो " आपण लहान असताना आईचे दूध पितो , ते कुठून पितो ? त्या भागाला स्तन असे म्हणतात ". त्या विद्यार्थिनीला व इतर सर्व विद्यार्थ्यांना माझं उत्तर पटलं आणि माझी सुटका झाली.

आगळी वेगळी आदर्श सून...

                 एक आगळी वेगळी सून.....
                 *****************
         मिरज मध्ये ,माझ्या माहितीचे एक सदगृहस्थ आहेत. वय आहे अंदाजे ८४ /८५ . त्यांना अलझायमर ( स्मृतिभ्रंश ) झालेला आहे. त्यांची पत्नी आधीच गेलेली आहे. घरात मुलगा , सून , नातू आहेत.
          मुलगा व्यवसायाचे निमित्ताने ,बाहेर गावी जास्त असतो. नातू काॅलेजला जातो. थोडक्यात घरात फक्त सासरा आणि सून दोघेच असतात. सासरे बुवा स्मृतिभ्रंशा मुळे ,कधी कधी मुलाला व नातवाला ही ओळखत नाहीत. पण गंमत बघा , ते सुनेला मात्र कधी ही विसरत नाहीत. मुलाने किंवा नातवाने कांही सांगीतल्यास ,ते ऐकतील याची शाश्वती नाही. सुनेनं सांगीतलेलं मात्र हमखास ऐकतातच ! सून , त्यांची आपल्या वडीलांची घ्यावी , अशी काळजी घेते.
          सून कुठे ही बाहेर निघाली की , सासर्‍यांना बरोबर घेउन जाते. एकट्याला घरात सोडून किंवा त्यांना आत बसवून, बाहेरून कडी लावून जात नाही. सून बाजारात भाजी आणायला निघाली की , सासर्‍यांना बरोबर नेते. सर्वात कळस म्हणजे, सून माहेरी निघाली तरी जाताना ,आपल्या बरोबर सासर्‍यांना घेउन जाते. ते ही जातात , तिच्या माहेरचे  सुध्दा त्यांना सांभाळून घेतात. सून परत यायच्या वेळी ,सासरे तिच्या बरोबर परत येतात.
             मी हे जे लिहीलं आहे त्यात कोणती ही अतिशयोक्ती नाही. सर्व सत्य कथनच आहे. आजच्या काळात हे खरं वाटेल, अशी शक्यता कमीच आहे. पण हे वास्तव आहे व सत्य आहे.
          अशा या आगळ्या वेगळ्या सुनेला, शतशः प्रणाम !

लग्न जुळवण्याचे नवीन निकष....

           एके काळी मुलगी देताना मुलाची व मुलीची कुंडली जमली आणि मुलाचा होकार आला की ,लग्न जमायचे. मुलीचा होकार , मुलीचे पालक गृृृृहितच धरायचे.
             नंतरच्या काळात मुलगा व मुलगी शिकलेले असल्याने ,मुलीची व मुलाची पत्रिका जमल्या नंतर ,मुलीचा त्या मुलाच्या स्थळाला होकार आहे किंवा नाही ,ही बाब ही महत्वाची मानली जाऊ लागली. मुलाचा होकार आहे , पण मुलीचा नसल्यास , ते लग्न होत नसे.
           नंतरच्या काळात, मुली ही मुलांच्या बरोबरीने , स्वतंत्रपणे अर्थार्जन ही करू लागल्या , त्या मुळे त्या स्वतःच्या मताचा आग्रह धरू लागल्या.बदलत्या काळानुसार ते योग्य मानले गेले.
           नवीन आर्थिक युगात ,लग्न जमविण्याचे जुने निकष कालबाह्य झाले आणि नवीन निकष उदयाला आले.
           मुलीचे किंवा मुलाचे आई वडील ,आता होणार्‍या सुनेची किंवा जावयाची आणि त्यांच्या कुटूंबाची ,आर्थिक पत जाणून घेत आहेत. समोरच्या पार्टीचे जे वैभव दिसत आहे ते खरे आहे की , कर्जावर उभारलेले आहे ? मुलाने किंवा मुलीने किंवा त्यांच्या पालकांनी , घरा / बंगल्यासाठी  किंवा व्यवसाया साठी , कर्ज घेतले असल्यास ते फेडण्याची , त्यांची खरीखरी आर्थिक कुवत आहे की नाही ? घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जातात की थकवले जातात , याची माहिती घेतली जाते.         
            त्या साठी त्या त्या कुटूंबांची, गुप्त रीत्या आर्थिक माहिती मिळविणार्‍या , स्वतंत्र गुप्तचर  यंत्रणा कार्यरत आहेत. थोडक्यात मुलाच्या व मुलीच्या कुटूंबाची आर्थिक कुंडली जुळते की नाही , ते पाहिले जाते आणि त्याला सध्याच्या काळात लग्न ठरविण्या पूर्वी ,महत्व ही दिले जाते.
             या संबंधीची बातमी  दिव्य मराठी या दैनिकाच्या नाशिक आवृत्ती मध्ये आलेली होती.
             आता मुलगी देताना किंवा करून घेताना ,मुलाच्या आणि मुलीच्या कुटूंबांची आर्थिक कुंडली जमणे , हे ही खूप महत्वाचे ठरणार आहे.
             नवीन काळाची नवीन दिशा व नवीन विचार प्रवाह , हा असा आहे.........

परमेश्वराचे शतशः आभार....

        सावरकर नगर , नाशिक , मधील  आमच्या नवीन घरा जवळचा एक शांत रस्ता !
          रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर, शतपावली करायला अतिशय उत्तम !या फोटोत पाठमोरी निघालेली दिसते ती ,माझी पत्नी सौ. रजनी ! तिच्या उजव्या हाताला ,पन्नास फुटावरून ,गोदावरी नदी वाहते. डाव्या बाजूला एकांत नावाचा, एक पाॅश असा रेसिडेन्शियल काॅंप्लेक्स आहे. समोर गंगाजल नर्सरीचा विस्तार आहे. सध्या आम्ही राहतो , तो भाग अतिशय शांत व छान आहे. मी घरात झोपतो ,तिथे शेजारी असलेल्या खिडकीतून ,मला गोदावरी नदीचे दर्शन होते. खूप छान वाटते.     
            मुलगा , सून , नातू यांच्या सहवासात राहण्याचा , सध्याच्या काळात सहसा दुर्मिळ असणारा आनंद, आम्हाला निश्चितच आहे. त्यात छान परिसर ! म्हणजे दुग्धशर्करा योगच !
        वयाच्या या टप्प्यावर आणखी काय पाहिजे ?                                  परमेश्वराचे शतशः धन्यवाद !