Saturday, 9 November 2019

कै. चिंतामणी गोरे , गोरे मंगल कार्यालयाचे मालक , मिरज !

              आज , मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे  की , ज्यांनी प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर ,समाजात आपले अढळस्थान निर्माण केले. आज ती व्यक्ती हयात नाही , पण त्यांनी निर्माण केलेले अढळस्थान , आज ही ध्रुव तार्‍या प्रमाणे सर्वांना मार्गदर्शक ठरते आहे.
               त्या थोर व्यक्तीचे नाव आहे कै. चिंतामणी गणेश गोरे. मिरजेच्या गोरे मंगल कार्यालयाचे मालक. त्यांचे लहानपण ,अतिशय गरीबीत गेले. त्यांनी वेदविद्या संपादन केली, पण लोकांच्या घरी जाउन पूजाअर्चा करणे व दिवस कसाबसा ढकलणे हेच ,  त्या काळी , त्यांच्या नशिबी आले. वेळ प्रसंगी त्यांनी पैसे मिळविण्यासाठी, सर्व सनदशीर प्रयत्न केले .त्याचाच एक भाग म्हणून, रस्त्यावर बसून पंचांग विक्री सुध्दा केली . अशा परिस्थितीत जगण्यासाठी, आपण जन्माला आलो नाही. आपला जन्म फक्त भिक्षुकीसाठी नाही. या विचाराने ते अस्वस्थ असत. आपण कांही तरी चाकोरी बाहेरचे भव्य दिव्य करावे ,असे त्यांच्या मनात येत असे. पण मार्ग दिसत नव्हता.
                 १९५७ सालची, म्हणजे जवळ जवळ ६२ वर्षा पूर्वीची गोष्ट. त्या वेळी मंगल कार्यालयात लग्न , मुंजी इत्यादी कार्ये करण्याची प्रथा ,सांगली मिरज भागात नव्हती. पण, ती एक सामाजिक गरज होती. ती ओळखून श्री. चिंतामणी गोरे , श्री. विष्णूपंंत आठवले आणि श्री. त्र्यंबक अभ्यंकर ( काशिकर ) यांनी मिळून ,एकत्र येउन, मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील ,कृष्णेश्वराचे मंदिरात पहिले लग्न कार्य केले .अशा प्रकारे  मिरजेतील मंगल कार्यालयांची पहिली मूहूर्तमेढ रोवली गेली. त्या नंतर ,कांही कालावधीत ,तिघांनी तीन स्वतंत्र कार्यालये सुरू केली. त्या तिघांची पुढची पिढी, त्यांची त्यांची  कार्यालये ,आज उत्तम रीतीने चालवीत आहेत.
                 श्री. चिंतामणी गोरे यांचे, एक लक्षात घेण्या सारखे  वैशिष्ठ्य म्हणजे, कार्यालयाचा व्यवसाय करीत असताना , त्यांनी मोठमोठे " यज्ञयाग " ही केले. त्यात त्र५ग्वेद संहिता स्वाहाकार , पुरूषसूक्त स्वाहाकार , अतिरूद्र महायज्ञ , शतचंडी स्वाहाकार, यांचा समावेश होता . असे एकूण १२ किंवा थोडे जास्तच ,स्वाहाकार त्यांनी आपल्या गोरे मंगल कार्यालयात केले. त्या साठी, ते काशी पासून रामेश्वरा पर्यंतच्या त्र५ग्वेद , यजुर्वेद , सामवेद आणि अथर्ववेद या चार ही वेदांच्या, ज्ञानी ब्रह्मवृदांना ,मोठ्या सन्मानाने आमंत्रित करीत. या ब्रह्मवृदांची येण्या जाण्याची , राहण्याची आणि सात सात दिवस केल्या जाणार्‍या, स्वाहाकाराची व्यवस्था, श्री. चिंतामणी गोरे ,स्वतःच्या खिशातून करीत. या स्वाहाकारांचे वेळी, भरपूर अन्नदान ही होत असे. नामांकित कीर्तनकारांची कीर्तने आणि नामांकित प्रवचनकारांची प्रवचने, या कालावधीत ,गोरे मंगल कार्यालयात होत असत. एकूणच या स्वाहाकारांचे वेळी ,मिरजेतील गोरे मंगल कार्यालयात, सणाचे वातावरण असे. मिरजकरांना ही एक मोठी दुर्लभ  पर्वणीच असे.
               हे सर्व करण्या मागचा त्यांचा हेतू , ज्ञानी ब्रह्मवृदांची सेवा करणे , तसेच मिरजेतील व अाजूबाजूच्या परिसरातील लोकांना ,आपल्या वैदिक परंपरेची ओळख करून देणे , हाच होता. यात त्यांचा वैयक्तीक स्वार्थ, कोणता ही नसे.  केवळ आणि केवळ  निरपेक्ष बुध्दीनेच श्री. चिंतामणी गोरे ,हे सर्व आयोजन करीत असत . आपल्याला कष्टाने मिळालेल्या पैशातून ,अशा प्रकारे समाजाला  कांही परत देणे ,ही संकल्पना ,मला खूप खूप उदात्त वाटते.
                 मिरज आणि आजूबाजूच्या परिसराला भूषण असलेले वेदविद्या उपासक , श्री. चिंतामणी गोरे २००३ साली ,म्हणजे वयाच्या ८३ व्या वर्षी, स्वर्गवासी झाले. त्यांनी देह ठेवण्या पूर्वी , रोजच्या नियमा प्रमाणे रूद्र , श्रीसूक्त , पुरूषसूक्त यांची आवर्तने, हाॅस्पिटल मध्ये ही केली आणि मगच देह ठेवला. असा हा पुण्ण्यात्मा, स्वर्गात आल्या बद्दल स्वर्गस्थ देवतांनी ,नक्कीच त्यांचे अत्यादराने स्वागत केले असेल.
                कै. चिंतामणी गोरे यांच्या नंतर ,त्यांचा मुलगा श्री. विनोद गोरे यांनी ,आपल्या वडीलांची परंपरा, उत्तम रीत्या सांभाळली. आता त्यांचा मुलगा श्री. अनिरूध्द गोरे या कार्यालयाची आणि या वैदिक परंपरेची धुरा वाहण्यास, सज्ज झाला आहे , हा एक मोठा सुयोग आहे.
              श्री. अनिरूध्द गोरे व त्यांची पत्नी सौ. मृण्मयी, हे दोघे उच्च विद्या विभूषित आहेत. पण आपल्याला परंपरागत प्राप्त झालेला ,  उच्च आचार आणि विचारांचा हा दुर्मिळ  ठेवा जपण्यासाठी ,ते दोघे सज्ज झाले आहेत. त्यांना भरभरून शुभेच्छा !
                खाली फोटोत दिसत आहेत ते कै. चिंतामणी गोरे. त्यांना त्रिवार वंदन करतो आणि थांबतो !

No comments:

Post a Comment