Wednesday, 14 August 2019

कै. बी. एन. पाटील....मेरीकर संशोधक...

                    फोटोत दिसत आहेत , ते म्हणजे (कै.) बी. एन. पाटील. चारच दिवसा पूर्वी, त्यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ,नाशिक मध्ये निधन झाले. त्यांच्या नावा मागे (कै.) हा शब्द लिहीताना मनाला अनंत वेदना होत आहेत.
                  (कै.) बी. एन. पाटील हे ,मेरी ,या पाटबंधारे खात्याच्या अभियांत्रिकी  संशोधन संस्थेत, वैज्ञानिक होते. सायन्सचे पदवीधर ( B.Sc.) ! पण त्यांचे ज्ञान , हुषारी आणि कामाची निष्ठा पाहून, त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी पगारी रजा देउन, पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवले. त्या पदव्युत्तर  परिक्षेत, ( M.Sc .) त्यांनी उत्तम यश संपादन केले.
                  तिथून परतल्यावर ,त्यांनी अभियांत्रिकी संशोधन कार्याला ,पुनश्च  वाहून घेतले . आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून त्यांनी, एक विशिष्ठ प्रचारचे Grout material तयार केले. त्याचा उपयोग, कोयना धरणातील गळती बंद करण्यासाठी झाला. त्यांनी  संशोधनाने तयार केलेले ते Grout material ,काळाच्या कसोटीवर सिध्द झाले. या त्यांच्या संशोधनाला मान्यता देउन, त्यांचा गौरव करण्यासाठी , त्या वेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील, खास मेरी आॅफिसमध्ये आले आणि त्यांनी (कै.) बी. एन. पाटील यांचा यथोचित गौरव केला. हा दुर्मिळ मान ,मेरी मधील वैज्ञानिकाला, प्रथमच मिळाला. पुढे मेरीच्या इतिहासात असा दुर्मिळ मान मिळाल्याचे, आमच्या कुणाच्याच ऐकीवात नाही. (कै.) बी. एन. पाटीलांनी तयार केलेले Grout material ,पुढे "MERI GROUT " या नावाने ओळखले गेले. त्याचे "पेटंट"  मेरी या संस्थेस प्राप्त झाले. एखाद्या गोष्टीचे पेटंट मिळविणे , ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची बरीच पूर्तता करावी लागते. हे पेटंट मिळविण्यासाठी, (कै.) बी. एन. पाटील यांनी घेतलेले परिश्रम, अतुलनीय असेच आहेत. ही घटना आहे सन् १९७५ सालची. माझ्या माहिती नुसार मेरीला मिळालेले हे पहिले आणि शेवटचेच पेटंट ! मेरीच्या आजपर्यंतच्या ६० वर्षांच्या इतिहासात ,सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशी ही अद्वितीय घटना आणि त्या घटनेचे शिल्पकार होते ( कै.)  बी. एन. पाटील.
                  (कै.) बी. एन. पाटील हे शांत आणि सरळ स्वभावाचे गृहस्थ होते. आपण बरे आणि आपले काम बरे , असा त्यांचा स्वभाव होता. समोरचा किती ही वाकड्यात शिरला ,तरी ते स्वतः  सरळच वागायचे . शासकीय नोकरीतले छक्केपंजे ,त्यांना कधी समजले ही नाहीत आणि त्यांनी ते समजावून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही , इतक्या सरळ मनाचे ते होते.
                     नोकरीच्या कालावधीत ,त्यांच्या कांही अनपेक्षित ठिकाणी बदल्या झाल्या. पण आपली बदली रद्द करण्यासाठी ,त्यांनी कधी कुणापुढे पदर पसरला नाही. जिथे बदली झाली तिथे ते गेले आणि स्वाभिमानाने व प्रामाणिकपणे,  त्यांनी आपली सेवा दिली.
                       त्यांचे मूळ गाव, परभणी जिल्ह्यातले सेलू हे आहे. तिथे त्यांची शेतीवाडी आहे. पण मुलांचे शिक्षण उत्तम व्हावे या साठी , त्यांनी नाशिक हीच आपली कर्मभूमी मानली व ते शेवट पर्यंत नाशिक मध्येच राहिले.
                   चार दिवसापूर्वी त्यांचे निधन झाल्याची वार्ता ,मनाला खूपच धक्का दायक होती.
                त्यांच्या मागे वहिनी आणि तीन मुले आहेत. तीन ही मुले आपल्या आपल्या जागी उच्च पदावर आहेत.
(कै.)  बी. एन. पाटील यांच्या आत्म्यास ,शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
                      ।। ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

No comments:

Post a Comment