Thursday, 2 May 2019

एक मन हेलावून टाकणारी आठवण....भुकेलेला विद्यार्थी.....

           खूप दिवस झाले त्या गोष्टीला ! पण आज सहज आठवण झाली .  सर्वांना सांगावीशी वाटली. फार सांगण्या सारखी आहे असं नाहीय. पण ह्रदयाला भिडणारी आहे , म्हणून सांगावीशी वाटते आहे इतकच !
            अंदाजे १९९४ - ९५ साल असेल. मे महिन्याच्या सुट्टीत , शाळेच्या अभ्यासात मागे असलेल्या , महापालिकेच्या शाळेतील  मुलांना, वर्गा बरोबर आणण्याचे दृृृृृृृृष्टीने शिकवावं  ,असं मिरजेच्या श्री. दिलीप आपटे सरांच्या मनात आलं . त्यांनी प्रत्येक महापालिकेच्या शाळेत जाउन ,अशा अप्रगत म्हणजे अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला . पहिली ते सातवी मधील अशा अप्रगत मुलांना  १ मे रोजी, एकत्र जमवलं.
            सर्व साधारण पणे ही सर्व मुले ,अतिशय गरीब परिस्थिती मधील होती. असे म्हणता येईल की , त्यांचे पालक साधारणतः मजूर  किंवा त्या ही पेक्षा ,खालच्या गरीब परिस्थिती मधील होते.
         त्यांना शिकविण्यासाठी, ज्यांची १० वीची परिक्षा झाली आहे व जी मुले सुट्टीत कांही, विधायक काम करू इच्छितात , अशा मुलांना आवाहन करण्यात आले. ज्यांना सामाजिक जाणिव आहे ,अशी मुले आवर्जून आली. शिक्षकांनी शिकविण्या पेक्षा ,विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकविल्यास फरक पडेल ,अशी त्या मागची प्रेरणा होती. या उपक्रमात मदतनीस म्हणून, मी सहभागी झालो होतो.
           हा अप्रगत विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम ,मिरजेत  तळ्यावरील गणपती मंदिराच्या प्रांगणात चालू होता. रोज सकाळी आठ ते दहा असे हे वर्ग चालत.
          एक दिवस सर्व सुरळीत चालू आहे ना , शिकविणार्‍या विद्यार्थ्यांना कांही अडचण नाही ना , हे पहात असताना मला असे दिसले कीं , एक तिसरीतील  ९ -१०  वर्षाचा मुलगा वर्गात न जाता ,मंदिराच्या खांबाला टेकून रडत आहे . मी त्याच्या जवळ गेलो , " बाळ का रडतोस ? वर्गात का गेला नाहीस ? " असे विचारले. तो म्हणाला " सकाळी  मी घरचा केर काढला नाही म्हणून, आजीने मला कांही खायला दिले नाही ,शिवाय मला  मारले , मला फार भूक लागली आहे...."...आणि तो मुलगा मोठ्याने हुंदके देउन ,रडायला लागला.
         शेजारी एक बेकरी होती. तिथे मी  त्याला नेले व पोटभर खाउ घातले. उद्या सकाळी वर्गाला येताना ,तुझ्या आजीला मी बोलावलय म्हणून सांग, असे मी त्याला आवर्जून सांगीतले.
              दुसर्‍या दिवशी तो त्याच्या आजीला घेउन आला. गाठी मारलेले व ठिगळ लावलेले पातळ , अस्ताव्यस्त  पांढरे केस  ,गळ्यात झोळी असा त्या आजीचा पोषाख होता. मी त्या आजीला म्हटले की , काल हा तुमचा नातू तुम्ही खायला दिलं नाही , शिवाय  घरचा केर काढला नाही म्हणून तुम्ही मारल्याने , रडत होता. ती म्हणाली " घरात खायला भाकर तुकडा न्हवता , मी बी कातावून गेलो हुतो ,  त्यात ह्यानं केर बी काडला न्हाइ , मला माजाच राग आला हुता , मग मी मारलं त्येला ! तुमाला काय सांगायचं सायेब , हे लेकरू माज्या वटीत सोडून ,ह्याचे आय आनि बा परागंदा झाल्यात.  म्या सकाळच्या पारी  , झोळी घीउन ,कचरा कुंडीत  काय किडूक मिडूक मिळतय, त्ये गोळा करत्ये . ते इकून आमी कसं  बसं प्वाट जाळतो . "  ह्याचे आई वडील कुठं आहेत ? असं विचारताच ,त्या माउलीच्या डोळ्यात ,चटकन पाणी आले. हुंदके देत ती बाई सांगू लागली " ह्येचा बा , तकडं नागपूराकडं बिलडिंगीच्या शेंटरिंगच्या कामाला जातो म्हनून, जो गेलाय त्यो तिकडचाच झालाय.  ह्याची आई कुना बरूबर पळून गेलीय , काय म्हाईती बी न्हाई . ह्ये लेकरू रोज, आई बा येतील म्हनून ,डोळं लावून बसतय , पन त्ये काय येतीलसं दिसत न्हाई. मी ही अशी म्हातारी , झोळी घीउन फिरतो , कदी काय मिळतय ,कदी कायबी मिळत न्हाय. कसं बसं दिस वडतूया ह्या लेकरा साठी. काय म्हायती ह्येच्या नशिबात काय हाय ते ! " असं म्हणून ती म्हातारी ओक्साबोक्शी रडायला लागली . हे मन विदीर्ण करणारं सामाजिक वास्तव पाहून, मी पण गलबलून गेलो............

No comments:

Post a Comment