Tuesday, 29 June 2021

 लेखकाचे मनोगत....

मी सुरेश दीक्षित कांही लेखक नव्हे. शाळेत माझे निबंध नावाजले जायचे असे ही नव्हते. नोकरीत मात्र भरपूर तांत्रिक अहवाल मी लिहीले. पण असे अहवाल लिहीणे म्हणजे जबाबदारीचा तो एक भाग असायचा. 

नोकरीत असताना मी नाशिकला आणि माझे आई वडील मिरजेला अशी परिस्थिती कांही वर्षे होती. त्या वेळी मात्र मी माझ्या आई वडीलांना दर आठवड्याला दोन फुल स्केप भरतील एवढे सविस्तर पत्र पाठवत असे. 

माझ्या आई मध्ये लेखनाचा गुण होता. ती कारणपरत्वे मिळेल त्या कागदावर किंवा वहीत प्रासंगिक लेख लिहीत असे. तिचा हा गुण माझ्यात आला असावा. त्या मुळे सेवानिवृत्ती नंतर जसे आम्ही मुलगा व सुने सोबत ' निवांतपणे ' रहायला लागलो तसे आपण कांही तरी लिहावे अशी प्रेरणा मला व्हायला लागली.

नाशिक मधील आमच्या सकाळच्या फिरायच्या  ' निरामय जाॅगर्स ' या ग्रुप मधील कै. प्राचार्य एस. डी. कुलकर्णी सरांचे ' आत्मवृत्त ' प्रसिध्द झाले . त्या नंतर आपण ही आपले पुस्तक प्रसिध्द करावे असे मनात येउ लागले. मी प्रथम आमच्या फिरायच्या ग्रुपमधील श्री. सुधाकर केसकर सरांच्यावर पहिला लेख लिहीला. तो फेसबुकवर पोस्ट केला. त्याला मिळालेल्या प्रतिसादाने माझा उत्साह दुणावला. मग मी नियमितपणे व्यक्तीचित्रे आणि कांही प्रासंगिक लेख फेसबुकवर लिहु लागलो. 

कै. प्राचार्य एस. डी. कुलकर्णी सर मला प्रोत्साहित करीत असत. " तुमचे पुस्तक जेंव्हा केंव्हा तुम्ही  प्रकाशित कराल तेव्हा त्या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहीणार " असे ते मला म्हणत असत. पण दैवयोग कांही वेगळाच आहे. आता माझे पुस्तक प्रकाशित होत आहे , पण ते पहायला व त्याची प्रस्तावना लिहायला ' सर ' हयात नाहीत. त्यांच्या ' स्मृती ' प्रीत्यर्थ मी या पुस्तकाला प्रस्तावना न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

माझे हे पुस्तक म्हणजे घरगुती मामला आहे. ज्यांनी माझी जीवनयात्रा ' आनंदी ' बनविली अशा कांही लोकांची मी माझ्या मनातली ' लोभस प्रतिमा ' यातील लेखा द्वारे चितारण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा वाचकांना  हा प्रयत्न माझ्या  विषयी वाटणार्‍या जिव्हाळ्या मुळे ' आवडेल ' अशी आशा आहे.

माझे हे पुस्तक प्रकाशित होण्या मागे अनेकांचे सहकार्य मला लाभले आहे. सर्व प्रथम मी कै. एस. डी. कुलकर्णी सरांचे आभार मानतो. कारण त्यांनी मला हे पुस्तक निर्माण करण्यासाठी ते हयात असताना  वेळोवेळी प्रोत्साहित केले . 

माझा मुलगा चि. आदित्य व त्याचे महिंद्रा आणि महिंद्रा मधील  वरिष्ठ श्री. संदीप कुलकर्णी यांनी मला या पुस्तका विषयी वेळोवेळी अगत्याने चौकशी करून उत्तेजना दिल्या बद्दल त्यांचा मी ऋणी आहे. 

माझ्या फेसबुक वरील लेखांचे ज्यांनी प्रेम पूर्वक स्वागत केले त्यात  मेरीतील माझा  जवळचा मित्र श्री. राजा वर्‍हाडे , मेरीतीलच माझा स्नेही श्री. प्रकाश क्षीरसागर याच्या पत्नी सौ. रेखा वहिनी , मिरजेच्या आमच्या सुह्रुद सौ. माया गोडबोले ,  तसेच माझ्या फेसबुक फ्रेंड , ज्यांना मी कधी ही भेटलो नाही अशा  ,पुण्याच्या सौ. वैजू दातार , माझे आदरणीय व ज्ञानी स्नेही श्री. सुधाकर केसकर सर , माझी मुलगी चि. सौ. संपदा कुलकर्णी यांचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे.

तसेच हे पुस्तक उत्तम व देखणे व्हावे  कामी मला ज्यांनी मना पासून सहाय्य केले त्यात श्री. मंदार गोकर्ण ,श्री. रमेश बापट , श्री. रामभाऊ जोशी , त्यांच्या पत्नी सौ. सुहास वहिनी व त्यांची कन्या  आर्किटेक्ट चि. स्नेहल यांनी दिलेल्या सहकार्याचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे. 

या पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील चित्रे चि. श्रुती कुलकर्णी हिने तिच्या चित्रकलेच्या गुरू सौ. सुहास वहिनी जोशी आणि आर्किटेक्ट चि. स्नेहल जोशी यांच्या मार्गदर्शना खाली तयार केलेली आहेत. चि. श्रुतीचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. 

हे पुस्तक छापून प्रसिध्द करण्याचे कामी ज्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन व सहाय्य केले त्या श्री. सलील दातार व त्यांचे सहकारी श्री. तुषार यांचा मी मना पासून आभारी आहे.

सर्वात शेवटी,  जिने वेळोवेळी दिलेल्या  संपूर्ण सहकार्य व प्रोत्साहना शिवाय हे पुस्तक झालेच नसते , अशी माझी पत्नी सौ. रजनी, हिला मी शतशः धन्यवाद देतो आणि थांबतो.

दि. २९ जून २०२१

नाशिक.

 अर्पण पत्रिका

हे माझे पहिले वहिले पुस्तक 

माझे वडील कै. नाना व आई कै. सोनुताई 

यांना त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ 

मनोभावे अर्पण....

Monday, 28 June 2021

 गोपाळ लक्ष्मण उर्फ सुरेश दीक्षित.

जन्म - ३१ आॅगस्ट १९४६.

शिक्षण - बी. एस्सी. 

मूळगाव - मिरज. पण सध्या  ' नाशिककर ' .

नोकरी - महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था , ( MERI ) मधून ' वैज्ञानिक अधिकारी ' या पदावरून सेवानिवृत्त.

सध्या ' दिशा '  या मोफत क्लासमध्ये आठवीच्या मुलांना गणित विज्ञान हे विषय शिकवतो आणि निरपेक्ष आनंद मिळवतो.


Saturday, 12 June 2021

संघ कार्यकर्ता...मदतीला आलेला देवदूत !


माझ्या कानावर आलेला माझ्या स्नेह्यांचा एक वेगळा अनुभव,  नक्कीच ह्रदयस्पर्शी आहे. तो त्यांच्याच शब्दात कथन करीत आहे.

         मी विविध समाज माध्यमावर कार्यरत असतो. विविध प्रकारचे लेखन करीत असतो. त्यातून माझी बर्‍याच लोकांशी आभासी ओळख होत असते. ती कायम टिकते असे नाही. कांही लोकांशी मात्र या आभासी जगतातून जिव्हाळा निर्माण होतो. त्या संदर्भातील ही गोष्ट !

          सकाळी चहा आणि ब्रेकफास्ट संपवून, मी आळसात पेपर वाचत पडलो होतो आणि माझा फोन वाजला. नंबर वरून फोन कुणाचा ते समजत नव्हते. मी फोन घेतला. पलीकडून एक बाई बोलत होत्या. 

           त्या म्हणाल्या " माझी व तुमची ओळख नाही. मी सेवानिवृत्त शिक्षिका आहे. मला नात्याचे येथे कोणीही नाही. मी एकटीच असते. माझे वय ७५ वर्षांचे आहे. माझा भाऊ ७० वर्षांचा आहे. तो पुण्यात असतो. त्याला एक मुलगी आहे. ती परदेशात असते. माझ्या भावाची बायको व माझा भाऊ यांच्यात , नवरा बायको या नात्याने प्रेम व जिव्हाळा अजिबात नाही. दोघे ही महिनोन महिने एकमेकाशी बोलत ही नाहीत. माझ्या भावाची तब्बेत बरी नाही. त्याला पुण्यात एका हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले आहे. त्याची काळजी त्याची बायको घेत नसल्याने तो अनाथ झाला आहे. मी अशी वयोवृद्ध ! पण मी भावाची सेवा करू इच्छीते ! मला भावाला आपल्या या गावी आणावे अशी इच्छा आहे. त्याला पुण्यातून इकडे आणणे मला वैयक्तीक रीत्या आणि वयोपरत्वे शक्य होणार नाही. तरी तुम्ही मला मदत करा अशी मी तुम्हाला विनंती करते. तुम्ही समाज माध्यमावर विविध विषयावर लेखन करता. मी ते वाचते. त्या वरून तुम्ही मला मदत कराल अशी आशा वाटल्याने मी तुम्हाला ही विनंती करीत आहे. "

              प्रत्यक्ष ओळख ना पाळख ! समाज माध्यमावरची आभासी ओळख ! काय करावे असा मला प्रश्नच पडला. मदत करायची इच्छा तर होती. पण मनात शंकांचे काहूर माजले होते. मदत करायला जाउन आपल्याला पश्चात्ताप तर करावा लागणार नाही ना ! मी माझ्या स्नेही मंडळींशी या विषयावर बोललो. सर्वांचे एकमत होते. ओळख ना पाळख , कोण कुठल्या बाई , त्यांचा आजारी भाऊ ! मदत करायला जाल आणि नाही त्या लफड्यात अडकाल ! पण माझे मन हा सल्ला मानायला तयार नव्हते. 

                  माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले एक स्नेही आहेत. त्यांच्याशी या विषयावर बोललो. त्यांनी सर्व परिस्थिती समजावून घेतली त्या आजारी माणसाच्या बहीणीचा नंबर माझ्या कडून घेतला व पाहू काय करता येते , असे बोलून ते निघून गेले. एखादा दिवस मी अस्वस्थ होतो. पण नंतर मी तो विषय विसरून गेलो. 

                  आठ दिवसांनी मला त्या संघ कार्यकर्त्याचा फोन आला. आम्ही त्या आजारी माणसाला पुण्याहून येथे आणले आहे. एका चांगल्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे व त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मी हाॅस्पिटलचा पत्ता घेतला व प्रत्यक्ष तिथे गेलो. तिथे त्या आजारी गृहस्थांच्या जवळ त्यांची मला फोन केलेली बहीण हजर होती. मी त्या बहीणीला आज प्रथमच पहात होतो व भेटत होतो. 

               त्यांनी मधल्या काळात काय काय घडले ते मला सांगीतले. मी त्या संघ कार्यकर्त्याला बहीणीचा फोन नंबर दिला होता. त्याने त्या बहीणीला फोन केला. सर्व परिस्थिती समजावून घेतली. मग त्याने पुण्यातील संघ कार्यकर्त्याला फोन केला व हाॅस्पिटलमध्ये जाउन प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यास सांगीतले. तो कार्यकर्ता पुण्याच्या त्या हाॅस्पिटलमध्ये गेला. तो आजारी भाऊ आपल्या बहिणीकडे येण्यास तयार होता. तिथे त्याची आबाळ होत होतीच ! मग त्या संघ कार्यकर्त्याने त्या आजारी माणसाच्या पत्नीची भेट घेतली. आपल्या नवर्‍याने त्याच्या बहीणीकडे जाण्यास तिची कोणतीच अडकाठी नव्हती. डाॅक्टरांनी ही पेशंटला परगावी नेण्यास परवानगी दिली. हाॅस्पिटलचे बिल भागविण्यात आले. एक संघ कार्यकर्ता पेशंट बरोबर परगावी येण्यास तयार झाला. अशा प्रकारे सर्व जुळणी करून अम्ब्युलन्स मधून त्या आजारी भावाला आपल्या बहीणीच्या गावी आणण्यात आले. 

                 पंधरा वीस दिवसांच्या ट्रिटमेंट नंतर तो भाउ आपल्या बहीणीच्या घरी गेला आहे. तो चालू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याची बहीण त्याची सेवा करीत आहे व तो भाऊ ही समाधानात आपल्या बहीणी बरोबर रहात आहे. 

               अडचणीच्या वेळी परमेश्वरच तुमचा पाठीराखा असतो असे म्हणतात. परमेश्वर कोणाच्या रूपाने येउन मदत करेल ते सांगता येत नाही. या सत्यकथेत संघ कार्यकर्त्यांची साखळी त्या बहीण भावाच्या पाठीशी उभी राहिली. 

               ही सर्व गोष्ट ऐकीव आहे. मी माझ्या मगदुरा प्रमाणे मी ती विदित केली आहे. तुम्हा वाचकांच्या ह्रदयाला ती नक्कीच स्पर्श करेल अशी खात्री आहे.

" उचल की आदळ "...

 उचल की आदळ !

****************

मी जी कथा सांगणार आहे ती सत्य कथा आहे. आमच्या नात्यातले एकजण मिलिट्रित होते. त्याचे नाव दादा ! दादा दिसायला एकदम उंचापुरा व गोरापान ! कुस्तीचा शौक असल्याने  शरीर कमावलेलं ! त्या मुळे दादा एकदम आकर्षक व देखणा दिसायचा . मिलिट्रित त्यांने पहेलवान म्हणून नाव कमावलेले होते. 

         असेच एकदा सुट्टीवर आलेला असताना ,दादा आपल्या खेडेगावातल्या एका मामा भेटायला गेला. बोलता बोलता विषय निघाला आणि दादांनी आपण मिलिट्रित पहेलवान म्हणून कसे नाव कमावलेले आहे, त्या विषयी आपल्या मामांना रसभरित वर्णन करून सांगीतले. मामा त्या गावचे सरपंच होते. त्यांना या आपल्या भाच्याचे मोठे कौतूक होतेच ! त्यात भाच्याने मिलिट्रित पहेलवान म्हणून नाव कमावल्याचे ऐकताच, त्यांचा उर भरून आला. आपल्या गावातल्या लोकांना आपल्या भाच्याची मर्दुमकी दिसलीच पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले आणि भाच्याला न विचारताच त्यांनी त्याच संध्याकाळी ,कुस्तीचे मैदान भरविण्याचा निर्णय जाहीर करून टाकला.

            भाचा म्हणजे दादा ही खूष झाला. आपली मर्दुमकी आपल्या मामा समोर ' मामाच्या गावाला ' दाखवायला मिळणार याचा त्याला आनंद झाला. ताबडतोबीने  गावात दवंडी पिटण्यात आली. फुकटची रंगतदार कुस्ती पहायला मिळणार म्हणून गावकरी ही खूष झाले. दादा तर हवेतच होता. आपण मिलिट्रितल्या एकापेक्षा एक तगड्या पहेलवानांना लोळवलय . या खेडेगावातल्या अशिक्षित  पैलवानाला आपण दोन मिनिटात आस्मान दाखवून ,कुस्ती चितपट करू याची त्याला खात्री होती. 

              संध्याकाळ झाली आणि कुस्तीचे मैदान गावकर्‍यांनी फुलून गेले. दादाला उत्सुकता होती आपल्या समोर  या खेड्यातला कोण पहिलवान उभारायला धजावतोय...आणि तिकडून जोर जोरात शड्डू ठोकत बाब्या आला. बाब्या म्हणजे त्या गावचा एक नंबरचा पहिलवान. बाब्याला पाहताच दादाचं अवसानाच गळालं . बाब्या म्हणजे काळा कभिन्न रोमणाच्या रोमणा गडी ! दादा पेक्षा वजनाने आणि आकाराने किमान दीडपट ! तरी पण आपण याला नक्की हरवू ,अशी उमलती आशा, दादाच्या मनात चमकून गेली. आपण मिलिट्रितल्या  किती  तरी मल्लाना आस्मान दाखवलय. आपण एकदम चपळ व कुस्तीचे विविध डाव करण्यात पटाईत आहोत. या बाब्याला आपण आज आस्मान दाखवूच ,या उमेदीने दादा आखाड्यात उतरला. 

             बाब्या समोरून आला तो एखाद्या माजलेल्या बैला सारखाच ! दोघांची नजरा नजर झाली. बाब्याचे डोळे तांबारलेले दिसत होते. पंचांनी शिट्टी मारली तसा बाब्या दादाच्या जवळ आला . दादानं ठरवलं ,आता थोडी खडाखडी करू व मग बाब्याच्या ताकदीचा अंदाज घेउन, आपला डाव टाकू आणि आस्मान दाखवू . पण कसचं काय अन् कसचं काय ....बाब्याने एका झटक्यात दादाला वर उचललं आणि दाणकन खाली आदळलं. दादा आता कुठला डाव करावा याचा विचार करतोय, तो पर्यंत  बाब्याने दादाला पुन्हा एकदा उचलून खाली आदळलं. बाब्या दादाला पाठ टेकवू देत नव्हता. पाठ टेकली की कुस्ती संपली. दादाला कांही सुचत नव्हतं. बाब्याचा एकच डाव चालू होता. दादाला उचल की आदळ. दादाची हाडं ढिली व्हायची वेळ आली. दादा हळूच बाब्याला म्हणाला " अरे मी पाठ टेकतो मला सोडव ". बाब्या ही हळूच म्हणाला " कुटली पाठ टेकतूयास ? माझा ह्यो डाव तुला पाठ टेकूच देनार न्हाय " दादाची बोबडी वळायची वेळ आली होती आणि बाब्याचा एकच डाव चालूच होता..." उचल की आदळ...उचल की आदळ " . शेवटी दादाने कांही युक्ती करून पाठ टेकवून घेतली आणि कुस्ती हरल्याने सुटकेचा निश्वास टाकला. 

            गावकर्‍यांनी बाब्याला डोक्यावर घेउन नाचायला सुरवात केली आणि दादानं मामांची नजर चुकवत घर गाठण्यासाठी धूम ठोकली.

एका जावयाची गोष्ट...

 एका जावयाची गोष्ट..

****************

गोष्ट बरीच जुनी म्हणजे साधारण १९६० ते १९६५ सालची असावी. मिरजेच्या आमच्या वाड्यात एक भाडेकरू रहायचे. आम्ही त्यांना काका व काकू म्हणत असू. त्यांच्या जावयाची ही गोष्ट आहे. 

          मी वर सांगीतलेल्या काळी सर्वसाधारण घरात पैशांची चणचणच असायची. कुठला ही प्रवास करायचा म्हटलं की तो रेल्वेच्या " थर्ड क्लासच्या डब्यातून "च असायचा ! त्या वेळी रेल्वेत थर्ड क्लास , सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास असे तीन प्रकारचे डबे असत. सर्व साधारण जनता थर्ड क्लासने प्रवास करायची. जरा बरी आर्थिक परिस्थिती असणारे सेकंड क्लास व फर्स्ट क्लास मधून प्रवास करणारे सामान्यांना माहितीच नसायचे. 

        आमच्या या काका काकूंच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले होते. जावई दिवाळसणाला येणार होते. ते अतिश्रीमंत असल्याने रेल्वेने व फर्स्ट क्लासने येणार होते. काका काकूंचा जावई रेल्वेच्या फर्स्ट क्लासने येणार असल्याची बातमी वाड्यात वार्‍या सारखी पसरली होती. वाड्यातल्या कुणी ही फर्स्ट क्लासने प्रवास केलेला माणूस पाहिला नसल्याने प्रत्येकाच्या मनात या जावया बद्दल जबरदस्त आकर्षण होते. त्या जावयाचे दर्शन म्हणजे प्रत्येकाची " अजी मी ब्रह्म पाहिले " अशी अवस्था होणार होती. काका काकूंनी आपल्या जावयाची अशी कांही तारीफ करून ठेवलेली होती कीं प्रत्येकाला हे जावई बापू  प्रत्यक्ष परमेश्वरा सारखेच म्हणजे डोक्यावर किरीट , चेहर्‍या भोवती पसरलेली अभा , चतुर्भूज , गरूडावरून येणारे भगवान विष्णू सारखे  असतील अशी कल्पना झालेली होती. 

             अखेर दिवाळी आली. पाडव्याच्या दिवशी सकाळी आमचे जावई बापू रेल्वेने फर्स्ट क्लासने सकाळी उजाडता येणार असल्याची व्दाही काका काकूंनी फिरविलेली होती. 

            दिवाळीच्या पाडव्या दिवशी अख्खा वाडा लवकर उठून अंघोळ करून दरवाज्याकडे डोळे लाउन बसला होता. रेल्वेच्या फर्स्ट क्लासने येणारे श्रीमंत जावई पाहण्याची सर्वांना फार उत्सुकता होती. घड्याळाचे काटे जसजसे पुढे सरकत होते तशी सगळ्यांची उत्सुकता ताणली जात होती.

            एवढ्यात दरवाज्या समोर टांगा थांबल्याचा आवाज आला. टांग्यातून एक उभ्या पट्ट्यापट्ट्यांची विजार आणि बनियन घातलेला इसम हातात वातीचा स्टोव्ह घेउन उतरला व काका काकूंची चौकशी करू लागला. हा कोण फाटका माणूस उपटला आता या वेळी असे सर्वांना वाटले. तेवढ्यात काका काकू पुढे झाले आणि आश्चर्याने " या या जावई बापू , तुमचे सामान कुठे आहे आणि तुम्ही या असल्या वेषात कसे ? " असे त्यांना विचारू लागले. तो माणूस त्यांना म्हणाला " ते मी नंतर सांगतो , आधी टांगेवाल्याचे भाड्याचे पैसे द्या ". काकांनी पाकीट आणून टांगेवाल्याचे पैसे दिले . अख्या वाड्याची निराशा झाली. फर्स्ट क्लासवाला जावई  असा फाटका कसा , याचे सर्वांना आश्चर्य वाटत असतानाच खरी बातमी समजली ती अशी !

           ते जावई फर्स्ट क्लासनं येत असतानाच रेल्वेत त्यांनी झोपण्यापूर्वी आपले टिपटाॅप असलेले कपडे काढून हॅंगरला लावून ठेवले. मध्यरात्री कधीतरी चोराने त्यांची बॅग व कपडे सर्व चोरून नेले. त्यावेळी वातीचा स्टोव्ह नवीन निघाला होता. तो आपल्या सासूरवाडीला भेट देण्यासाठी त्यांनी खरेदी करून आणला होता तो मात्र चोराने नेला नाही. त्या मुळे हे जावई सकाळी सकाळी अंगात बनियन व उभ्या पट्ट्यापट्ट्यांची विजार घालून हातात वातीचा स्टोव्ह हातात घेउन दिवाळसणासाठी पहिल्यांदा सासूरवाडीच्या दारात आले . त्यांचा तो अवतार पाहून वाड्यातल्या सर्वांची रेल्वेच्या  फर्स्ट क्लास मधून येणार्‍या श्रीमंत जावयाला पाहण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

               त्या नंतर काका काकूंनी आपल्या त्या जावया बद्दल कधी ही एक चकार शब्द काढला नाही. जावयाची व त्यांची दोघांची अशा प्रकारे फजिती झाली होती. आज ही वाड्यातल्या कुणाला ही , या आठवणीने जोरदार हसू फुटल्या शिवाय रहात नाही.

श्री. विलासराव भिंगे....सत्शील " शास्त्रीबुवा "...

 आपण सर्वांनी ड्रायफ्रुट्स खाल्लेली असतीलच ! पण ड्रायफ्रुट्सचा ' लाडू ' तुम्ही खाल्ला आहे का ? नाही ना ? मग तुम्हाला श्री. विलासराव भिंगे यांच्या नाशिक मधील ' भिंगे ब्रदर्स ' या सीबीएस शेजारच्या दुकानाला आवर्जून भेट द्यावीच लागेल. तिथला ड्राय फ्रुट्सचा ' लाडू ' तुम्ही एकदा खाल्लात तर आयुष्यभर त्याची चव विसरणार नाही.

             आज मी तुम्हाला या ड्रायफ्रुट्सच्या लाडूचे निर्माते आणि विक्रेते श्री. विलासराव भिंगे यांची ओळख करून देणार आहे. 

            श्री. विलासराव भिंगे मूळचे नाशिक जवळच्या वडनेर भैरव या गावचे ! तिथे त्यांची शेतीवाडी होती. त्यांच्या शेतात " कस्तुरी मधुरा " या जातीची अप्रतीम चविष्ट द्राक्षे पिकायची. पुढे काळाच्या ओघात शेतीतून बाहेर पडून त्यांनी नाशिकला सीबीएस शेजारी किराणा मालाचे दुकान सुरू केले व नंतर कारण परत्वे त्या दुकानाचे ' ड्राय फ्रुट्स ' च्या दुकानात रूपांतर करावे लागले. आज ही ते दुकान चालू आहे. वयोपरत्वे श्री. विलासराव भिंगेंनी त्यातून सेवानिवृत्ती घेतली आहे. आता ते दुकान त्यांचे पुतणे पाहतात.

               श्री. विलासरावांची व माझी ओळख कृषीनगरच्या जाॅगिंग ट्रॅकवर झाली. ती ओळख आता गाढ स्नेहात रूपांतरीत झाली आहे. 

             श्री. विलासराव भिंगे म्हणजे धार्मिकवृत्तीचा माणूस ! एके काळी ते पहाटे साडेतीनला उठून अंघोळ करून , जपजाप्य , पूजापाठ  करून मग सकाळी साडेसहाचे सुमारास ट्रॅकवर फिरायला यायचे. रोज ठराविक जप करणे , विष्णूसहस्त्रनामाची आवर्तने करणे व दुर्गा सप्तशती पाठ वाचणे हे सर्व ते अत्यंत श्रध्देने करीत असत. त्या मुळे आम्ही आमच्या ' निरामय जाॅगर्स ' या सकाळच्या ग्रुपमध्ये त्यांना ' शास्त्रीबुवा ' म्हणतो. धार्मिक बाबतीतील सर्व शंकांचे निरसन ' शास्त्रीबुवा ' बिनचूक करीत असतात. आमच्या ग्रुपची ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. 

               श्री.विलासरावांचे व्यक्तीमत्व अतिशय साधे आहे. मध्यम उंची , सात्विक सावळा रंग , पांढरटपणाकडे झुकलेले केस , पोशाख नीटनेटका , डोळ्यावर साजेलसा चष्मा  असे ते एकूणच सात्विक व्यक्तीमत्वाचे  आहेत. ते ट्रॅकवर शक्यतो एकटे फिरत नाहीत. श्री. विलासरांच्या बरोबर त्यांचे शाळे पासूनचे मित्र श्री. विलासराव औरंगाबादकर किंवा श्री. रामभाऊ जोशी असणारच ! श्री. विलासराव उगीचच कोणत्या ही वादात पडणार नाहीत. ते एकदम साधे व सरळ असे  सदगृहस्थ आहेत. 

                वयोपरत्वे श्री. विलासराव आता अगदी पहाटे न उठता , सूर्योदयापूर्वी उठतात .रोजचे ठराविक फिरणे न चुकता करतात. थोडक्यात त्यांचे जीवन शिस्तबद्ध आहे. 

                 श्री. विलासरावांना दोन कन्यका आहेत.दोघींचे विवाह झाले आहेत. एक दुबईला व दुसरी अमेरिकेत असते. दोघी आपापल्या जागी सुस्थितीत आहेत. कारण परत्वे श्री. विलासराव व सौ. वहिनी दुबईला व अमेरिकेला जात असतात. इतर वेळी ते दोघेच नाशिकमध्ये असतात. दोघे अतिशय आनंदात व समाधानात असतात. सौ. वहिनींची श्री. विलासरावांना समर्थ साथ आहे , हे पण महत्वाचे आहेच !

                 अशा धार्मिक व सात्विक वृत्तीच्या श्री. विलासराव भिंगे व सौ. भिंगे वहिनींना उत्तम निरामय , आनंदी , सुखी , समाधानी असे उर्वरित आयुष्य लाभो ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो व थांबतो.


Monday, 29 March 2021

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य भेट


 " नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य "

****************************


काल दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी मी , नाशिक मधल्या  आमच्या  सकाळच्या फिरायच्या ग्रुपसह " नांदूर मधमेश्वर " येथील पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी गेलेलो होतो. हे पक्षी अभयारण्य नाशिक पासून अंदाजे ४० किमी अंतरावर आहे. पक्षी दर्शनासाठी सर्वसाधारणपणे १५ जानेवारी ते फेब्रुवारी अखेर , हा उत्तम कालावधी असतो .आम्ही गेलो त्या वेळी आमच्या बरोबर पक्षी तज्ज्ञ श्री. आगाशे आणि श्री. शशिकांत गुडसूरकर सर असल्याने खूपच नवीन माहिती समजली. 

                महाराष्ट्रात भरपूर धरणे आहेत पण मग नांदूर मधमेश्वर धरणा जवळच पक्षी अभयारण्य का व कसे झाले ? इतर धरणांच्या जवळ कसे झाले नाही ? असा एक सहज सुलभ प्रश्न होता. त्याला श्री. आगाशे यांनी समर्पक उत्तर दिले. नाशिकच्या गंगापूर धरणातले पाणी नांदूर मधमेश्वर धरणात येते व इथून ते शेतीवाडीला दिले जाते. थोडक्यात गंगापूर धरणाचे पाणी वाटप येथून होते. त्या मुळे येथे पाणी कमी झाले की गंगापूर धरणातून सोडले जाते. पाण्याची पातळी वर्षभर कमी जास्ती , कमी जास्ती होत असल्याने नांदूर मधमेश्वर येथे दलदलीचा प्रदेश तयार झालेला आहे. या दलदलीत पक्ष्यांचे भक्ष्य असलेले किडे , कीटक इत्यादींची वाढ होते व त्या खाद्य आकर्षणाने पक्षी येथे येतात. इतर धरणात पावसाळ्यात पाणी भरते व वर्षभर हळू हळू ते कमी होते , त्या मुळे दलदलीचा प्रदेश निर्माण होत नाही , सबब तेथे पक्षी खाद्य नसल्याने पक्षी अभयारण्य निर्माण होत नाही. 

                पक्षी राजस्थान , तिबेट , हिमालयीन प्रदेश इतकेच कशाला युरोप , रशिया येथून नांदूर मधमेश्वर येथे येतात. हजारो किलोमीटरचा प्रवास ते करतात. गरजे नुसार पक्षी दिवसाला तीन हजार किलोमीटर अंतर सलग न थांबता ही प्रवास करतात. हे कसे शक्य होते ? या प्रश्नाचे उत्तर श्री. आगाशे यांनी खूप छान सांगीतले. ते म्हणाले... पक्षी इंग्रजी व्ही ( V ) या आकारात प्रवास करतात. त्या मुळे एनर्जी कमी लागते.  ( आपण लढाउ विमाने ही V आकारात जाताना पाहिली आहेत )तसेच पक्ष्यांना वार्‍याच्या प्रवाहांचा अंदाज लग्गेच येतो . वार्‍याचा स्पीड , वार्‍याची दिशा यांच्या सुसंगत पंखांची फडफड न करता केवळ पंख पसरून , पंखांना ठराविक कोन देउन , कमित कमी एनर्जी खर्च करून ते जास्तीत जास्त अंतर कापू शकतात. 

                पक्षी विश्रांती घेण्यासाठी  झोपतात कसे ? या प्रश्नाला श्री.आगाशे म्हणाले....माणसे अंग टाकून झोपतात तसे पक्ष्यांचे कधीच नसते. जमिनीवर वावरणारे कोंबडी सारखे , कांही पक्षी बसून विश्रांती घेतात पण पाणस्थळी वावरणारे पक्षी उभ्या उभ्या विश्रांती घेतात. या विश्रांतीचे वेळी एक पाय ताठ तर दुसरा किंचित दुमडलेला असतो. नंतर दुसरा पाय ताठ व पहिला किंचित दुमडलेला ,अशा प्रकारे पाया वरील ताण कमी जास्त करून , पक्षी विश्रांती घेतात. 

           कांही वेळेस असं घडतं की एखाद्या वर्षी अपेक्षे एवढे पक्षी इकडे येतच नाहीत , असं का होतं ? या प्रश्नाचे उत्तर श्री. गुडसूरकर सरांनी फार छान सांगीतलं. ते म्हणाले....सगळा पक्ष्यांचा थवा आला व इकडची परिस्थिती बरी नाही म्हणून परत गेला असे होत नाही. पक्षी थव्याने येण्या पूर्वी त्यांचे एक दोन दूत प्रथम इकडे येतात , परिस्थितीची , हवामानाची अनुकूलता पाहणी करतात. परिस्थिती अनुकूल असेल , तर परत जाउन सांगतात व मगच पक्ष्यांचा थवा तिकडून इकडे यायला निघतो. 

              पक्षी हवामानाच्या सोयी नुसार इकडून तिकडे , तिकडून आणखी दुसरीकडे , फिरत असतात. मग त्यांचे मूळ स्थान कोणते हे कसे ठरविले जाते ? या प्रश्नाचे उत्तर श्री. आगाशे यांनी छान सांगीतले. ते म्हणाले , पक्षी जिथे अंडी घालतात , तो प्रदेश त्यांचा मूळ प्रदेश मानला जातो.

               मानव जातीत , पुरूषांच्या मानाने , स्त्रिया सुंदर व आकर्षक असतात. या बाबतीत  पक्ष्यांचे वेगळेपण म्हणजे , नर पक्षी हा मादी पेक्षा तेजस्वी आणि देखणा असतो. मादी नराच्या मानाने कमी तेजस्वी आणि कमी देखणी असते. 

             सर्व साधारण कल्पनेपेक्षा हे पक्ष्यांचे वेगळे जग व वेगळी माहिती नक्कीच विस्मयकारक आहे.

               आम्ही नांदूर मधमेश्वर अभयारण्यात गेलो , त्या वेळी आकाश अभ्राच्छादित असल्याने , सूर्य प्रकाश नव्हता , त्या मुळे उत्तम प्रकारची दुर्बिण आमच्या गाईडकडे असून ही आम्हाला मनाला समाधान देणारे पक्षी दर्शन झाले नाही. 

            

श्री. सुनिल सानप ...एक प्रामाणिक यशस्वी व्यावसायीक.


 श्री. सुनिल सानप . "  एक यशस्वी व्यावसायिक

*************************************             नाशिक शहराचा " हार्ट आॅफ द सिटी " भाग कोणता असे विचारल्यास " रविवार कारंजा " असे कोणी ही नाशिककर चटकन् सांगेल. अशा रविवार कारंजा भागात गेल्या सत्तर ते पंचाहत्तर वर्षा पासून एक व्यवसाय तीन पिढ्या चालवीत आहेत. त्या व्यावसायिक दुकानाचे नाव आहे " सानप बंधू चिवडा आणि भेळ भत्ता " . सर्व सानप बंधू एक दिलाने हा व्यवसाय चालवतात. त्या सानप बंधूंच्या पैकी श्री. सुनिल सानप हे नाशिकमध्ये आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये राहतात. आज मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे. 

      श्री. सुनिलजी हे अतिशय साधे आणि सरळ स्वभावाचे गृहस्थ आहेत. ते माझ्या पेक्षा वयाने बरेच लहान आहेत. पण त्यांचे व्यक्तीमत्व पाहता क्षणी आदर वाटावा , जिव्हाळा वाटावा असेच आहे. आपल्याकडे माणसे अागत्याने व प्रेमाने यावीत , असा त्यांचा दिलदार, प्रेमळ स्वभाव आहे. ते वागायला अगदी टाईमशीर आहेत. दुकानात जाण्याची वेळ ते कधी ही चुकवत नाहीत. येण्याच्या वेळेत कामा प्रमाणे थोडाफार बदल होउ शकतो. 

         आपल्या दुकानात मिळणारा " चिवडा व भेळ भत्ता " एक नंबरचाच असला पाहिजे , त्याच्या गुणवत्तेत फरक पडू नये याची ते सर्वजण अत्यंतिक काळजी घेतात.  या साठी शक्य ते सर्व पदार्थ स्वतःच्या जागेत , ते व त्यांचे बंधू , वैयक्तीक लक्ष घालून तयार करतात. पूर्वीच्या काळी माणसांच्या मदतीने हे सर्व पदार्थ बनविले जायचे , आता काळा प्रमाणे बदलून त्यांनी यांत्रिकी करण केले आहे. 

           पूर्वी फक्त रविवार कारंज्यावर एकच दुकान होते पण आता " सानप बंधू चिवडा व भेळ भत्ता " अशी पाच दुकाने नाशिकच्या विविध भागात कार्यरत आहेत. श्री. सुनिल सानप व त्यांचे बंधू मिळून हा  दिवसे दिवस वाढणारा व्याप अतिशय कुशलतेने सांभाळतात. 

            श्री. सुनिलजी हे स्वतः काॅमर्स ग्रॅज्युएट आहेत. त्यांना या वडीलोपार्जित व्यवसाया पेक्षा आपण कांही तरी वेगळे करावे अशी इच्छा होती. पण वडीलांच्या अवेळी झालेल्या निधनाने व व्यवसायात काकांना मदतीची आवश्यकता असल्याने , त्यांनी स्वतःची महत्वाकांक्षा बाजूला ठेउन ते व्यवसायात आले व इथेच रमले ही ! वयाच्या १२ व्या वर्षा पासून ते आज तागायत या व्यवसायाची धुरा ते आपल्या बंधुंच्या सह , समर्थपणे सांभाळत आहेत. 

         व्यवसाय म्हटले की अनेक प्रकारच्या लोकांशी संबंध येतो. सर्वसाधारणपणे लोक व्यवस्थित असतात. पण कांही लोक मुद्दाम त्रास देतात. त्यांना एरवी शांत असणारे सुनिलजी अशा वेळी , त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्या शिवाय रहात नाहीत.

           श्री. सुनिलजींना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सर्वजण उत्तम शिकलेले व आपापल्या जागी व्यवस्थित आहेत. सौ. विद्या वहिनींची त्यांना समर्थ साथ आहेच !

          अशा या माझ्या जवळच्या स्नेह्यांना व सौ. विद्या वहिनींना उत्तम , निरामय दीर्घायुष्य लाभो , सुस्वभावी सून मिळो व त्यांच्यावर सुख , समाधान आणि आनंदाचा वर्षाव होवो , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Thursday, 8 October 2020

कै. लक्ष्मण रामचंद्र उर्फ नाना दीक्षित ...माझे परमपूज्य वडील.

 कै. लक्ष्मण रामचंद्र दीक्षित , माझे परमपूज्य वडील ! एक पुण्यात्मा ! अत्यंत धार्मिक , वेळेचे पक्के बांधील , व्यायामाची आवड असणारे , मित्रत्वाला जपणारे , मदतीला सदैव तयार , एखाद्याला आपलं मानलं की मना पासून प्रेम करणारे , असे अत्यंत आदरणीय व्यक्तीमत्व !

               आम्ही सर्वजण त्यांना, घरात " नाना " म्हणत असू. त्या मुळे या लेखात मी त्यांचा, तसाच उल्लेख करीत आहे. 

                  नानांचे लहानपण, कर्नाटकातल्या हुबळी धारवाड जवळील " लक्ष्मेश्वर " या गावी गेले. त्यांना उत्तम कानडी बोलायला येत असे. नंतरच्या आयुष्यात कानडी बोलणारा माणूस भेटला की ते ,अतिशय खूष होत असत.                                                                                           

               नानांना लहानपणा पासून ,व्यायामाची आवड होती. त्यांनी आपले शरीर व्यवस्थित कमावलेले होते. त्यांचा रोजचा व्यायाम कधी ही चुकला नाही. ते स्वर्गवासी होण्याचे अगोदर आठ दिवस आजारी होते. ते आठ दिवस सोडले तर ,त्यांनी आयुष्यभर  रोज न चुकता व्यायाम केला.

                     त्यांनी सांगली मिरज महापालिकेच्या " वाॅटर वर्क्स " मध्ये नोकरी केली. त्यांना शिफ्ट ड्युटी असायची. त्यांनी ड्युटीवर हजर राहण्याची वेळ कधी ही चुकविली नाही. नोकरीच्या २९ वर्षाच्या आयुष्यात, त्यांनी एक ही दिवस " लेट मार्क " घेतला नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे. 

                      नानांना मिलिटरीत जाण्याची फार इच्छा होती. पण त्यांना त्यांच्या वडीलांनी सोडले नाही. त्यांनी कांही दिवस होमगार्डमध्ये आपली सेवा दिली व आपली मिलिट्रित जाण्याची इच्छा अशा प्रकारे पूर्ण करून घेतली. त्या मुळे नाना वाॅटर वर्क्सला नोकरीला जाताना, संपूर्ण खाकी ड्रेस घालून जात असत. सेवानिवृत्ती नंतर फिरायला जाताना, कायम त्यांच्या हातात  " वाॅकिंग स्टिक " असे. घरी त्यांनी विविध प्रकारच्या " वाॅकिंग स्टिक्स ", जमा करून ठेवल्या होत्या. त्यांना अंगठ्यांची खूप आवड होती. उजव्या हाताच्या चार बोटात, ते निरनिराळ्या खड्यांच्या अंगठ्या घालत असत. या अंगठ्या सोन्याच्या अजिबात नसत. विविध धातूंच्या व विविध प्रकारच्या अंगठ्या, जमा करण्याचा त्यांना छंद होता. तसेच  " जप " करण्याच्या निरनिराळ्या प्रकारच्या माळा, त्यांनी आवर्जून जपून ठेवल्या होत्या.

                 नानांनी एखाद्याला आपलं मानलं तर, ते त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकत असत. त्यांचे सर्व थरात व सर्व धर्मिय मित्र होते. सांगलीचे लोकप्रीय नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कै. वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्या नियमितपणाच्या वागण्याने ,सांगलीचे त्या  वेळचे एक डि. एस. पी. ,श्री. वेंकटाचलम यांच्याशी त्यांचा स्नेह होता. पोलिसात त्यांच्या भरपूर ओळखी होत्या. ते नोकरी साठी रेल्वेने सांगली मिरज जात येत असत.  त्या वेळी रेल्वेतले सर्व गार्ड , इंजिन ड्रायव्हर्स , टिसी यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. मी लहान असताना एकदा सांगली स्टेशन मधून सुटलेली रेल्वे , त्यांनी हात आडवा घालून थांबवली होती व आम्ही त्यात चढलो होतो, हे मला  आजही चांगलं आठवतय. नानांचे श्री. शंकरराव ताम्हणकर या नावाचे, एक मित्र होते. शंकररावांच्या शेवटच्या आजारपणाच्या दिवसात ,मित्राची सेवा करण्याचे मिषाने गप्पा मारायला , कांही धार्मिक वाचून दाखवायला , नाना  त्यांच्या घरी रोज न चुकता जात असत. ओळखीतलं कोणी आजारी असल्यास ,त्याच्या मदतीसाठी नाना आवर्जून धावून जात.

                   नाना धार्मिक वृत्तीचे होते. नोकरीत असताना व सेवानिवृत्ती नंतर ,त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन करून , त्या त्या ग्रथांची स्वतःच्या हस्ताक्षरातील हस्तलिखीत  प्रत, तयार केलेली आहे. हा हस्तलिखित प्रत तयार करण्याचा, त्यांचा उपक्रम जवळ जवळ ५० वर्षे अव्याहत चालू होता. एखाद्या उपक्रमात इतके वर्ष सातत्य ठेवणे ,ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यांनी हस्तलिखित प्रत तयार केलेल्या धार्मिक ग्रंथात, फक्त आपले हिंदूंचे ग्रंथच होते असे नाही .त्यांनी कुराण व बायबलचा ही अभ्यास करून त्यांची हस्तलिखित प्रत तयार केलेली होती. लिहीलेला हस्तलिखित ग्रंथ ते आपल्या जवळ ठेवत नसत. उदाहरणार्थ..ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत आळंदीला , तुकारामांची गाथा देहुला जाउन तिथे अर्पण करायची . त्या नंतर मागे न पाहता ते निघून यायचे. आपण इतके ग्रंथ लिहीले, याचा अहंकार युक्त अभिमान  होउ नये म्हणून, ते असे करीत. ५० वर्षात त्यांनी किती ग्रंथ लिहीले ,त्याची यादी त्यांनी जवळ ठेवलेली नव्हती, कारण अहंकार होउ नये म्हणून !

                     नाना घरातल्या कोणत्या ही बाबतीत, कधीच लक्ष घालत नसत. नोकरीत असताना ते पगार व नंतर पेन्शन ,माझ्या आईकडे देत. ती सर्व घरखर्च पहात असे. नाना त्यांच्या ठरविलेल्या दिनक्रमात व्यस्त असत. नानांचा स्वतःच्या जिभेवर कंट्रोल ठेवण्याचा, एक वेगळाच मार्ग होता. ते एक वर्ष तंबाखू युक्त पान खात व एक वर्ष अजिबात खात नसत. हा त्यांचा वाखाणण्या सारखा उपक्रम होता. 

                  नानांना दोनदा  थोडा थोडा अर्धांगवायूचा त्रास झाला. पण त्यांचे व्यायामाचे शरीर असल्याने ,ते त्या दोन्ही वेळी संपूर्ण बरे झाले होते. नानांना शेवटी शेवटी अल्झायमरचा त्रास होत होता. शेवटचे आठदिवस ते अजारी होते. त्यांनी त्या काळात अन्नपाण्याचा त्याग केला होता. असे पुण्यात्मा असलेले माझे वडील " नाना " ,दि. १९ एप्रील  २००२ साली ,वयाच्या ८४ व्या वर्षी नाशिक या पवित्र क्षेत्री , शांतपणे स्वर्गवासी झाले. 

                 कै. नानांच्या पवित्र स्मृतिस त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.


सौ. रजनी दीक्षित... माझी पत्नी.

 सौ. रजनी दीक्षित. माझी पत्नी. जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहणारी , मनाने खंबीर , शंभर टक्के माझ्या पाठीशी उभीराहणारी , काटकसरी , उत्तम स्मरणशक्ती , अत्यंत सहनशील , परिस्थितीशी सतत जुळवून घेणारी , अशा शब्दात तिचे वर्णन करता येईल. 

               आमचे लग्न १९७३ साली झाले. आमचा प्रेमविवाह आहे. त्या बद्दल आता कांहीही बोलत नाही. तो एक वेगळाच " ग्रंथ " तयार होईल.

                  सौ. रजनीचे माहेर श्रीमंत ! लग्नानंतर तिला काटकसरीने रहावे लागले. पण मुळात तिचा काटकसरी स्वभाव असल्याने, तिने येईल त्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेतले. जीवनामध्ये आमच्या दोघांच्यावर, कांही कठीण प्रसंग आले . ती त्या सर्व प्रसंगी खंबीरपणे उभी राहिली. आमच्या  संसाराचे तारू तिच्या मुळे तरून गेले. आमचे लग्न झाले त्या वेळी सौ. रजनी पदवीधर नव्हती. लग्ना नंतर संसार सांभाळून, जोमाने अभ्यास करून,  तिने पदवी मिळविली. तिला नोकरी करण्याची इच्छा होती, पण केवळ माझ्या आग्रहानुसार, तिने तो विचार बाजूला सारला.

                   मला नाटकात काम करायची आवड होती , ज्योतिष शिकायची आवड होती,  अध्यात्माची आवड असल्याने मी, श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाच्या व शिवथर घळीच्या परिक्षा दिल्या. या सर्व बाबीत ती संपूर्ण तन मनाने ,माझ्या सोबत राहीली. तिने नाटकात कामे केली , ज्योतिष शिकली , अध्यात्माच्या परिक्षा माझ्या बरोबरीने अभ्यास करून दिल्या. जे समोर येईल त्याचा आनंदाने स्वीकार करून, आनंद मिळविण्याच्या आणि दुसर्‍याला आनंद मिळवून देण्याच्या, तिच्या स्वभावा मुळेच हे शक्य झाले. माझी पत्नी सौ. रजनी तन मनाने सतत माझ्या बरोबर असल्याने, मी जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेउ शकलो.

                 जीवनात सतत मना प्रमाणे दान पडते असे कधी ही नसते . तिथेच तुमच्या सहनशक्तीची  व सकारात्मकपणे जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची, परिक्षा असते. त्या प्रत्येक परिक्षेत, ती शंभर टक्के मार्क मिळवून पहिल्या नंबराने उत्तीर्ण झालेली आहे , असे मी अभिमानाने सांगू शकतो . 

                   मध्यंतरी तिला " संधीवाताचा खूप त्रास " झाला. परिस्थिती अवघड होती. पण तिने कधी ही मनात आलेला निराशेचा सूर ,तोंडातून बाहेर येउ दिला नाही. तिची अवस्था पाहून मीच निराशाग्रस्त होत असे . सतत जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याच्या आणि येईल त्या परिस्थितीशी खंबीरपणे झुंजण्याच्या तिच्या वृत्तीमुळे, ती त्या ही आजारातून संपूर्ण बरी झालेली आहे. तिची जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याची इच्छा आणि सहनशक्ती जबरदस्त आहे. 

                   तिने माझ्या आई वडीलांची गरजे प्रमाणे पडलेली जबाबदारी ,अतिशय उत्तमपणे , प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडलेली आहे. तिचा आणखीन एक दुर्मिळ गूण म्हणजे ,आपण केलीली कोणती ही चांगली गोष्ट ,ती पुन्हा पुन्हा बोलून घोकण्याचा तिचा स्वभाव नाही. सर्वसाधारणपणे आपण एखादी चांगली गोष्ट केली तर ती परत परत बोलून ,दुसर्‍याच्या मनात ठसविण्याचा स्वभाव असू शकतो. त्यात चूक आहे असे मी मानत नाही. पण सौ. रजनीने असे कधी ही केले नाही . " कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन " ही तिची जीवन शैली  आहे. 

                     घरात संघर्ष टाळण्याची तिची वृत्ती आहे. समोरच्याची मते पटली नाहीत तर ,अशा वेळी ती गप्प बसते. आपली मते ठासून मांडण्याचा तिचा स्वभाव नसल्याने, आमच्या  कुटूंबात वाद कधी ही होत नाहीत. मतभिन्नता असू शकते पण वादावादी कधी ही होत नाही. हा दुर्मिळ गूण घरात शांतता राखतो.

                     तिची स्मरणशक्ती जबरदस्त आहे. आमच्या नातेवाईकांचे , मित्रांचे , घरातील सर्वांचे जीवनातील सर्व मुख्य दिवस ,तारीख  व वार या सह तिच्या बिनचूक लक्षात असतात. तसेच सर्व प्रकारचे मराठी " साहित्य " वाचणे, तिला मना पासून आवडते.

                    सकाळी फिरणे , घरी आल्यावर श्वसनाचे व कांही मोजके शारीरिक व्यायाम करणे , या गोष्टी  तिला मना पासून आवडतात . एखादी गोष्ट सातत्याने करायची तिने ठरविली की ,ते सातत्य टिकवण्यात तिला आनंद मिळतो. मॅगी , पिझ्झा , वडा , दाबेली असे पदार्थ खायला तिला आवडतात. जे खायचे ते " लिमीटेड पण चवीने खायचे " , हा तिचा स्वभाव आहे.

                     अशी गुणी पत्नी मला लाभली, हे माझे परमभाग्य होय. दुर्गा सप्तशती मध्ये, अर्गलास्तोत्र आहे. त्यात एक श्लोक आहे. तो श्लोक असा....

                   पत्नी मनोरमां देही

                   मनोवृत्तानुसारिणीम् ।

                    तारिणीं दुर्ग संसार

                   सागरस्य कुलोद्भवाम् ।।

अर्थ..कठीण संसार सागरातून तारून नेणारी , कुलीन , सुंदर व मना प्रमाणे वागणारी पत्नी ( हे अर्गला देवी ) मला दे. 

                   हा श्लोक सौ. रजनीला तंतोतंत लागू पडतो. तिची मला पत्नी या नात्याने जी साथ लाभली , त्या साठी मी जन्मोजन्म तिचा ऋणी आहे व राहीन.

                    इति लेखन सीमा ।


कै. सोनूताई दीक्षित..माझी आई.

 कै. सोनुताई दीक्षित ! माझी आई ! अत्यंत हुषार , ब्रीज चॅम्पियन  ,अधुनिक विचारांना , नाविन्याला जवळ करणारी , मैत्रिणींच्या गराड्यात रमणारी , कोणत्या ही बाबीचे उत्तम मॅनेजमेंट करू शकणारी , ज्याला जे आवडते ते आठवणीत ठेउन करणारी , उत्तम ज्योतिषी ,अशा अनेक गुणांनी युक्त असे तिचे विविधांगी व्यक्तीमत्व होते. 

                तिचे माहेर करोली. ता. कवठे महांकाळ , जि. सांगली.खेडे गाव. शिक्षणाची फारशी सोय नाही. त्या मुळे शिक्षणासाठी, तिला आजोळी जतेला मामांच्याकडे किंवा शासकीय नोकरीत असलेल्या ,काकांच्या घरी नाशिक जिल्ह्यातील  सटाणा , नाशिक इथे रहावे लागले. कांही ना कांही कारणाने ,शाळा सतत बदलावी लागायची. पण ती कुठल्या ही शाळेत गेली तरी तिने, पहिला नंबर कधी ही सोडला नाही. त्या काळी मुलींना शिकविण्याची फारशी प्रथा नव्हती. ती केवळ १५ वर्षांचीच असताना, १९४२ साली तिचे लग्न झाले व ती कु. सोनूताई राजाराम कुलकर्णीची, सौ. सोनूताई लक्ष्मण दीक्षित झाली. 

                       मिरजेत माझे अजोबा होते तो पर्यंत घरात त्यांचाच " कायदा " चालायचा. त्यांच्या निधना नंतर सर्व कारभार ,माझ्या आईच्या हातात आला. वडीलांना पगार फारसा चांगला नसल्याने , पैसे फारसे नसायचे . पण त्या ही परिस्थितीत, तिने कधी कशाची कमतरता भासू दिली नाही. कोंड्याचा मांडा करून तिने आपला संसार ,आनंदाने केला. जे आहे त्यात समाधान मानण्याची आईची व वडीलांची वृत्ती असल्याने, आमच्या घरात कायम समाधान असायचे.

                  आईला शिक्षणाची भरपूर आवड होती. लग्ना नंतर तिने मिरजला परिक्षेचे केंद्र नसल्याने कोल्हापूर केंद्र घेउन ,व्हर्नाक्युलर फायनल ( व्ह. फा. ) ही परिक्षा दिली. ती त्या केंद्रात पहिली आली. पण सासरच्या जबाबदारीत ,तिला पुढे शिकता आले नाही. तरी ही तिने ,हिंदी भाषेच्या प्रविण पर्यंतच्या परिक्षा दिल्या व प्रत्येक परिक्षेत ,उत्तम सुयश मिळवले. 

                     तिने हस्तसामुद्रिकाचा अभ्यास केला होता. हात पाहून ती बरोबर ज्योतिष सांगायची. त्या मुळे ती कुठे ही गेली की, तिला हात दाखवून आपले भविष्य जाणून घेणार्‍यांची, तिच्या भोवती गर्दी लगेच जमायची. पत्रिके वरून ही ती भविष्य सांगत असे. थोडक्यात आपल्या भोवती माणसे जमविण्यात ,ती वाकबगार होती.

                     तिला खेळांची आवड होती. पण सासरच्या चाकोरीबध्द वातावरणा मुळे तिला ,ती आवड विकसित करता आली नाही. पण बैठ्या खेळा पैकी, तिने " ब्रिज " सारख्या बुध्दीला आव्हानात्मक असलेल्या, खेळात प्राविण्य मिळविले. अनेक स्पर्धात भाग घेउन सतत प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवले. ब्रिजच्या तिच्या पार्टनर्स श्रीमति उषाताई आगाशे , श्रीमति शकाताई कोल्हटकर , श्रीमति मंदाताई गाडगीळ , कर्नल पोंक्षेंच्या मिसेस , कै.सुमनताई लेले , कै. उषाताई देवल , आशाताई देवल ,श्रीमति अलका कोल्हटकर , कै. प्रभाताई कातगडे ,कै . इंदूताई दीक्षित , श्रीमति स्वाती सिध्दये , कै. माई चंदूरकर , कै. प्रभावती शिराळकर यांची या निमित्ताने मला आठवण होते आहे.

                  मिरजेला आमच्या घरा जवळ सात आठ कार्यालये असल्याने, पाहुण्यांची आवक जावक भरपूर असायची. आलेल्या पाहुण्याचे मना पासून स्वागत करून, ज्याला त्याला आवडणारा पदार्थ खायला घालून, त्यांच्या चेहर्‍या वरचा आनंद पाहण्यात, तिला धन्यता वाटत असे. असा साध्या साध्या गोष्टीतून सतत दुर्मिळ असा आनंद ती मिळवीत असे . 

                   घरी कोणी ओळखीचे आल्यास, त्याच्या कडून आपले एखादे काम गोड बोलून कसे करून घ्यायचे , यात तिचा हात धरणारा, दुसरा कोणी असूच शकत नाही. तिला एकवेळ रागावणे जमत नसे . पण गोड बोलण्याची तिची कला, असामान्य अशीच होती. 

                 ती सर्वाच्यात मिळून मिसळून रहात असे. समोरचा वयाने लहान असू दे किंवा  मोठा असू दे , त्याच्याशी सुसंवाद साधण्यात तिचा हातखंडा असे. ती सर्व वयाच्या लोकात ,चटकन सामील होउ शकत असे. तिला हुषार  व्यक्तींचे विशेष आकर्षण होते. अशा स्त्रियांशी तिची विशेष मैत्री जमायची. एकूणच बुध्दीने हुषार मैत्रिणींच्यात ती विशेष रमायची.

                   तिला बागेची खूपच आवड होती. आमच्या जुन्या वाड्याच्या परसदारी, तिने  फळांची व फुलांची झाडे मोठ्या हौसेने लावली होती. बागेची स्वच्छता व झाडांची निगा, ती स्वतः लक्ष घालून करायची. अशा कामात व एकूणच घर स्वच्छ  राखण्यासाठी जे कष्ट पडायचे, ते ती स्वतः आनंदाने करीत असे. 

                 तिला नाविन्या विषयी खूप आकर्षण होते. माझ्या मुलाने चि. आदित्यने , नवीन लॅपटाॅप घेतल्यावर मला लॅपटाॅप वापरायला शिकव ,असा लकडा तिने त्याला लावला होता. नवीन गोष्ट आपण शिकली पाहिजे व त्यात आपल्याला प्राविण्य मिळालेच पाहिजे, असे तिला नेहमी वाटायचे. 

                  राजकारण , आरोग्य , साहित्य ,क्रिडा क्षेत्र , अर्थकारण  , परराष्ट्र नीती , अध्यात्म अशा कोणत्या ही विषयांचे तिला वावडे नव्हते. सर्व विषयांचे वाचन करून, अपडेटेड राहणे तिला आवडायचे. मुख्य म्हणजे ,कोणत्या ही विषयाचा " गाभा " तिला चटकन समजत असे. तिची कोणता ही विषय  " ग्रहण करण्याची क्षमता" ,असाधारण होती. तिचे विचार सुटसुटित असत. अवघड विषय सुटसुटितपणे कसा मांडावा , याचे तिचे कसब अवर्णनीय असेच होते. 

                    तिला शिकायला मिळाले नाही , अन्यथा ती त्या काळची आय. सी. एस. परिक्षा सहज पास होउन " जिल्हाधिकारी  " नक्की झाली असती , असे आमच्या घरातील सर्वांचे प्रामाणिक मत आहे. 

                     अशी आई मला मिळाली, हे माझे परमभाग्य होय. दि. २६ आॅगस्ट २०१३ रोजी तिचे अल्पशा आजाराने ,वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले अणि मी " पोरका " झालो. 

                      कै. सोनुताई दीक्षित उर्फ माझ्या आईला मी या लेखाचे माध्यमातून ,श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.


Saturday, 26 September 2020

कै. कृृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर....माझे सासरे.

कै. कृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर , माझे सासरे ! गोरापान रंग , बर्‍या पैकी उंची , शरीर थोडेसे राजस , चेहर्‍यावर अत्यंत सात्विक भाव , स्वभावानं तसे शांत , समाधानी वृत्ती  , विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी सदैव तत्पर , असे त्यांचे थोडक्यात वर्णन करता येईल.
                   त्यांना सर्वजण " किशानाना किंवा किशामामा " म्हणत. मी त्यांचा उल्लेख ,या लेखात " नाना " असा करीत आहे.
                   अथणीकर नानांचे घराणे म्हणजे वेदविद्यापारंगत ! त्यांचे अजोबा, कर्नाटकातल्या संकेश्वर पीठाचे शंकराचार्य होते. त्यांचे काका श्री. वामनराव अथणीकर , वेदशास्त्रसंपन्न  वेदमूर्ति होते. त्यांचे वडील श्री. शंकर अथणीकर , त्या काळचे " ताईत " मंत्रून देणारे व मोठे श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्याकडे दोन सोनार नोकरीला होते. एक " सोन्याचा  ताईत " व दुसरा " चांदीचा ताईत " बनवत असत. अशा या संपन्न घराण्यातला ,अथणीकर नानांचा जन्म होता. पूर्वीच्या म्हणी प्रमाणे, " कित्येक पिढ्या बसून खातील ", इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती !
                   अशा वेदशास्त्र संपन्न आणि आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न घराण्यात जन्म होउनही, त्यांनी स्वकर्तृत्वावर पुढे येण्यासाठी ,अभियांत्रिकी शिक्षणाची वाट चोखाळली. ते उत्तम अभियंता झाले. त्यांनी शासकीय नोकरी करण्यास सुरवात केली.
                   दुसर्‍या जागतीक महायुध्दाचे काळात, म्हणजे सन १९४१ - ४२ साली ,ते पाकिस्तान व अफगाणीस्तानच्या बाॅर्डरवर असलेल्या क्वेट्टा येथे ,रोड कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी शासकीय बदलीवर गेले. क्वेट्ट्याला त्या काळी ,भूकंप प्रवण क्षेत्र मानले जायचे.  नोकरीच्या निमित्ताने बदलीवर इतक्या लांब व धोक्याचे जागी जाण्याचे त्यांचे धाडस, वाखाणण्या सारखेच होते. दुसरा एखादा ,मी बदलीवर एवढ्या लांब जाणार नाही , मी नोकरी सोडतो असे म्हणून ,घरी बसला असता. पण नानांनी आपले कर्तव्य श्रेष्ठ मानून ,आपली पत्नी प्रेग्नंट असताना तिकडे जाण्याचे जे धाडस केले ,ते नक्कीच वाखाणण्या सारखेच आहे.
                नानांचे लग्न त्या काळच्या पध्दती प्रमाणे, वयाच्या १७ व्या वर्षी झाले. ते त्या वेळी शिकत होते. त्या काळी त्यांनी ,आपल्या पत्नीला बरोबरीच्या नात्याने वागविले. बॅंकेत जाताना , कांही महत्वाच्या घरगुती कामासाठी बाहेर जाताना, ते आपल्या पत्नीला सर्व व्यवहार समजावून सांगून , विश्वासात घेत. आपल्या बरोबरीने बाहेर ही नेत. ते सुधारक मतांचे होते.
                   नानांना तीन मुली . आपल्याला मुलीच आहेत म्हणून ,त्यांनी कधी ही मुलींना कमी लेखले नाही. मुलींनी आरामात पण व्यवस्थित शिकावं. आपले संसार  आनंदाने व समाधानाने करावेत ,अशी त्यांची माफक अपेक्षा असे .
                   एखादा विद्यार्थी आर्थिक अडचणीत असेल तर ,ते त्याला मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देत. इतर वेळी त्यांचा स्वभाव काटकसरीचा होता . पण अशा अडल्या नडलेल्यांना  मदत करण्यासाठी , ते कधी ही मागे हटले नाहीत.
                     नोकरीच्या निमित्ताने, ते बाहेरगावी असत . पण मेच्या सुट्टीत ते आपल्या गावी म्हणजे, मिरजला आवर्जून येत. ते मिरजेला आले की, त्यांची भावंडेही आवर्जून जमत. त्यांनाचार बहिणी व एक भाउ होता. नाना , मे च्या सुट्टीत नातेवाईक व शाळेतले जुने मित्र या सर्वांना एकत्र बोलावून, आमरसपुरीचे जेवण करून , सर्वांना आपल्या सहवासाचा आनंद  देत.  तसेच नातेवाईक व मित्र यांच्या सहवासाचा मनसोक्त आनंद,  ते त्या सर्वांना आपल्या बदलीच्या गावी ,आवर्जून बोलावून घेत. अशी त्यांची आनंदी व समाधानी वृत्ती होती.
                 सन १९६२ साली म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी, त्यांना ब्लड प्रेशरचा व त्या अनुषंगाने ह्रदय विकाराचा ,त्रास जाणवू लागला. त्या काळी जे वैद्यकीय उपचार उपलब्ध होते, ते त्यांनी जरूर केले. मुख्य म्हणजे आपल्या आहार विहारावर नियंत्रण ठेवले.
                 शेवटची अंदाजे दहा वर्षे ते कोयना प्रकल्पावर डेप्युटी इंजिनीयर होते. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करण्यावर ,त्यांचा कटाक्ष होता. दि. ४ जानेवारी १९७१ या दिवशी, त्यांचे एक्झीक्युटिव्ह इंजिनीयर या पदावर, प्रमोशन झाल्याची आॅर्डर आली .  त्याच दिवशी संध्याकाळी अंदाजे ५ वाजता, आॅफिसात काम करीत असताना खुर्चीत बसलेल्या अवस्थेत, वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे ह्रदय विकाराने प्राणोत्क्रमण झाले. एक सत्शील, आनंदी व समाधानी  आत्मा अनंतात विलीन झाला.
                     कै. कृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर ,या माझ्या सासर्‍यांच्या स्मृतीस, मनोभावे  त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.

कै. रूक्मिणीबाई कृृष्णाजी अथणीकर , माझ्या सासूबाई.....

कै. रूक्मिणीबाई कृष्णराव अथणीकर ! माझ्या सासूबाई ! त्या अत्यंत सकारात्मक जीवन जगल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात ,परमेश्वराने कांही त्रुटी ठेवलेल्या असतात. पण त्या त्रुटींचा विचार न करता, परमेश्वराने जे चांगले दिलेले आहे त्यांचा आनंद मानून , आनंदी व सकारात्मक जीवन कसे जगावे ,याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी आमच्या समोर ठेवला.
                  त्यांचा जन्म सन १९१८ सालचा. माहेर बेळगाव जवळचे काकती . माहेरचे आडनाव काकतीकर कुलकर्णी. वडील शिक्षणाधिकारी. मुलींनी शाळेत जाण्याची पध्दत नसल्याने, त्यांना शिकवायला घरी शिक्षक येत असे. घरी एकूणच कर्मठ वातावरण.  त्या काळच्या  पध्दती प्रमाणे त्यांचे लग्न ,१४ व्या वर्षी झाले आणि त्या  " कु. कृष्णाबाई गंगाधर कुलकर्णी " च्या  " सौ. रूक्मिणीबाई  कृष्णराव अथणीकर " झाल्या. सासर मिरज. सासरच्या घरी वातावरण, त्या मानाने सुधारकी विचारांचे. त्यांच्या सासूबाईंनी त्यांना ,आपल्या मुली प्रमाणे वागविले.
                माझ्या सासूबाईंना बरेच नातेवाईक, मामी म्हणायचे व माझ्या सासर्‍यांना नाना म्हणायचे. मी या लेखात त्यांचा तसाच उल्लेख, येथून पुढे करीत आहे.
                नाना, माझे सासरे त्या काळी, शासकीय नोकरीत अभियंता होते. त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या होत. नाना सुधारकी विचाराचे असल्याने ,बॅंकेत जाताना किंवा बाजारात जाताना ते आपल्या पत्नीला ,म्हणजे मामींना  आपल्या बरोबर नेत. त्या मुळे बाह्य जगातील सार्वजनिक व्यवहारांची, मामींना चांगली जाणीव आणि कल्पना होती.
                   मामींचा स्वभाव जरा खर्चिक होता. नवीन साड्या वेळोवेळी खरेदी करणे , घरात सर्वांच्यासाठी कांही ना कांही नवीन खरेदी करणे, त्यांना आवडायचे. नाना अभियंता असल्याने ,आर्थिक चणचणीचा प्रश्नच नव्हता. आपल्याकडे कोणी आल्यास ,त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ लक्षात ठेउन आवर्जून करून घालणे, मामींना मना पासून आवडायचे. कोणता ही पदार्थ तयार करताना, तो उत्तमच झाला पाहिजे ,अशी त्यांची खासीयत होती. आलेल्या पाहूण्यांना भेटी दाखल कांही वस्तू किंवा कापडचोपड देउन,  सन्मान करणे हे त्यांना आवडायचे. 
                    १९६२ सालच्या भारत चीन युध्दाचे वेळी,  स्वतः विविध पदार्थ तयार करून ते विकून, त्यातून आलेला पैसा,  " भारतीय संरक्षण निधी "ला त्यांनी दिला होता. १९६७ साली झालेल्या कोयना भूकंपाचे वेळी, त्या नानांचे बरोबर कोयनानगरला होत्या. त्या वेळी अंगावर घराचे दगड पडल्याने, त्यांना फ्रॅक्चर ही झाले होते. पण त्या काटक असल्याने, या शारीरिक त्रासातून लवकरच बाहेर पडल्या.
                   नानांचे म्हणजे माझ्या सासर्‍यांचे निधन झाले ,त्या वेळी त्या ५३ वर्षांच्या होत्या. त्यानंतर कांही वर्षे, त्या मिरजेत एकट्या रहात होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी, त्या चालताना पडल्या.  नंतर वर्षभर त्या अंथरूणावर झोपून होत्या. पण सकारात्मक विचारांच्या जोरावर त्यांनी तो ही कालावधी, आपल्या तीन मुलींच्या सहकार्यांने पार केला. या कालावधीत त्यांनी कधी ही " मला हे काय झाले ? आता माझं कांही खरं नाही , मला जीवनाचा कंटाळा आलाय  ! " असे निराशाजनक उद्गार, कधी ही काढले नाहीत. जे वास्तव समोर येईल ते तात्काळ आणी आनंदाने स्वीकारणे ,हा त्यांचा स्वभाव विशेष होता. हे खूपच अवघड आहे. फार कमी लोकांना हे जमते.
                 त्यांना तीन मुली . थोरली मुलगी  आशा ही कोल्हापूरला , मधली शालीनी कर्नाटकात शिरगूर ( तालूका उगार ) , धाकटी माझी पत्नी रजनी मिरजेत, यांच्याकडे त्या आलटून पालटून रहात असत.  त्यांना  शिरगूर मध्ये राहणे आवडायचे. त्या मुळे जास्तीत जास्त काळ त्या तिथेच असत. तिन्ही मुलींच्या घरचे वातावरण वेगवेगळे होते. पण त्यांनी कुठल्या ही वातावरणांची एकमेकाशी  तूलना न करता , जिथे रहात असत तिथे त्या आनंदात व समाधानात रहात. आपल्यामुळे दुसर्‍याला त्रास होउ नये ,याची त्या अटोकाट काळजी घेत. हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. हे  सर्व गूण  दुर्मिळ आणि घेण्या सारखेच आहेत.
                   त्यांना कै. नानांच्या नंतर  शासकीय " फॅमिली पेन्शन " असल्याने, त्या शेवट पर्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत्या.
                 अशा या मामींचे म्हणजे माझ्या सासूबाईंचे सन २००९ साली, वयाच्या ९२ व्या वर्षी वृध्दापकाळामुळे निधन झाले. एका सकारात्मक, आनंदी , प्रेमळ व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड लुप्त झाले. आज त्या हयात असत्या तर १०२ वर्षांच्या असत्या.
          त्यांच्या पवित्र स्मृतिस हा लेख अर्पण करतो आणि थांबतो.

Sunday, 20 September 2020

चि. आदित्य..." पुत्र व्हावा ऐसा गुंडा....."

चि. आदित्य दीक्षित , चार्टर्ड अकाऊंटंट , डेप्युटी जनरल मॅनेजर , महिंद्रा आणि महिंद्रा , नाशिक प्लान्ट ! माझा मुलगा ! समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे " पुत्र व्हावा ऐसा गुंडा , ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ". येथे गुंडा म्हणजे कर्तृत्ववान ,असा अर्थ अपेक्षित आहे. चि. आदित्यला तो नक्कीच लागू पडतो आहे.
               चि. आदित्य हा एक शांत मुलगा आहे. तो समोरच्याचे म्हणणे, अतिशय शांतपणे ऐकून घेतो. कामाचा किंवा कोणत्या ही गोष्टीचा ताण न घेता, तो आपले काम, अतिशय शांतपणे करीत असतो. हे त्याचे खास असे स्वभाव वैशिष्ठ्य आहे. त्याला पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा घरात असणे ,खूप खूप आवडते. त्याच्या लहानपणी आम्ही घरी, पामेरियन कुत्रा पाळला होता. सध्या आम्ही फ्लॅट मध्ये राहतो. फ्लॅटमध्ये राहून आपल्यामुळे इतरांना त्रास नको , म्हणून त्याने आपली प्राणी प्रेमाची आवड, बाजूला ठेवली आहे.
               चि. आदित्य मिरजला " विद्यामंदिर प्रशालेत " शिकत असताना, त्याने वक्तृत्व स्पर्धेत भरपूर बक्षिसे मिळवली होती. तो ज्या ज्या स्पर्धेत भाग घेत असे, तिथे त्याचा हमखास नंबर यायचाच.  त्याने " महाराष्ट्र टाईम्स " तर्फे होणार्‍या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेउन ,तिथे ही पारिपोषिक मिळविले होते , ही एक फार मोठी आनंदाची बाब आहे.
               चि. आदित्य बी. काॅम. करत असतानाच ,सी. ए. करीन असे म्हणत होता. सी.ए. हा कोर्स अवघड आहे. त्या पूर्वी तू बी. काॅम. झालास तर, तुझ्या हातात एक डिग्री असेल. बी. काॅम. नंतर तू सी.ए. कर, असा सल्ला मी वडीलकीच्या नात्याने, त्याला दिला. त्याने ही तो ऐकला. तो सांगलीच्या चिंतामणराव काॅलेज आॅफ काॅमर्स मधून ,प्रथम श्रेणीत बी. काॅम . झाला . नंतर सी. ए. करण्यासाठी तो पुण्याला गेला.
                सी. ए. झाल्यावर त्याने खासगी प्रॅक्टीस करण्या ऐवजी ,नोकरीचा पर्याय निवडला. तो मुंबईला कॅम्पस इंटरव्ह्यु मधून, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीत  सिलेक्ट झाला. तो किस्सा ही ऐकण्या सारखा आहे. दीडशे फ्रेश सी. ए.ना महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने, इंटरव्ह्यूला बोलावले होते. सुरवातील पंधरा पंधरा सी. एं . चा एक ग्रुप, असे दहा ग्रुप करून, ग्रुप डिस्कशन झाले. त्यात प्रत्येक ग्रुप मधील, एकच कॅन्डिडेट निवडण्यात आला. याचा अर्थ पहिल्या फेरीत, संख्या दीडशे वरून एकदम दहावर आली. या दहा कॅन्डिडेट्सचा पर्सनल इंटरव्ह्यू झाला. त्यातून फक्त तीनच सी.ए. महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने, निवडून घेतले. त्यात चि. आदित्यचा समावेश होता. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
                    आपल्या ज्ञानाच्या आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाच्या जोरावर ,तो आज त्याच कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.
                  तीन वर्षापूर्वी, एका अखिल भारतीय कंपनी तर्फे , भारतातील उत्तम काम करण्यार्‍या, शंभर सी. एं.चा  राजधानी दिल्ली येथे, केंद्रिय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार  झाला .त्यात चि. आदित्यचा समावेश होता , ही अभिमानास्पद बाब आहे.
                   त्याचा प्रेमविवाह आहे. त्याची पत्नी सौ. रमा, सी. एस. ( कंपनी सेक्रेटरी ) आहे. ती स्वतःचा व्यवसाय करते. त्या दोघांना चि. निषाद हा मुलगा आहे. तो नाशिकमध्ये " विस्डम हाय " या आय.सी. एस. सी. बोर्डाच्या शाळेत ,सातवीत शिकत आहे.
                ते तिघे व आम्ही दोघे म्हणजे मी व माझी पत्नी सौ. रजनी, आम्ही नाशिकमध्ये एकत्र राहतो. आजकाल हे दुर्मिळ आहे. पण आम्ही त्या बाबतीत नशिबवान आहोत. 
                अशा या आमच्या गुणवान , कीर्तिमान , सतशील ,प्रेमळ  सुपुत्राला , चि. आदित्यला ,परमेश्वराने उदंड , निरामय आयुष्य द्यावे व त्याच्यावर सर्व सुख समाधानांचा वर्षाव करावा , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Friday, 11 September 2020

चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी...माझी सुकन्या...

चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी . माझी सुकन्या ! जिने मला भरभरून आनंद दिला. लहानपणी तिला दोन नावे होती. शाळेत संपदा आणि घरी कीर्ती ! मला " नाट्यसंपदा " या नाट्य संस्थेची नाटके खूप आवडायची , म्हणून  " संपदा " आणि  कीर्ती शिलेदार यांचा आवाज खूप आवडायचा, म्हणून  " कीर्ती " ! शाळेतल्या तिच्या मैत्रिणी तिला " संपदा " म्हणत आम्ही घरी तिला  " कीर्ती " म्हणत असू .
                कीर्तीचा जन्म मिरजेचा. मी त्या वेळी नाशिकला नोकरीत होतो. त्या वेळी फोन्स नव्हते. त्या मुळे मला पोस्टाने आलेल्या पत्राने ,तीन दिवसांनी ती जन्मल्याचे समजले . मी लगेच मिरजेला गेलो. तिचे पहिले  " दर्शन " मला आज ही स्मरते आहे. गोरापान रंग , तरतरीत नाक , दोन्ही हात दोन्ही कानांच्या बाजूला वर ठेवलेले , मऊशार दुपट्यात झोपलेली माझी " गोड मुलगी " , मला आज ही स्पष्ट दिसते आहे.
                कीर्ती लहान असताना  ,खूप बडबड करायची .मी तिला संस्कृत श्लोक म्हणायला शिकवत असे. ती तीन वर्षांची असताना, तिने भरपूर श्लोक पाठ म्हणून दाखवून ,खूप जणांची वाहवा मिळविली आहे.
                  लहान असताना तिने ,त्रिकालाबाधित सत्याचा शोध लावला होता. ती म्हणायची " माझं मला कळलं , आपलं आपण शाहणं व्हावं ". याचा अर्थ समोरचे दुसरे किंवा परिस्थिती, बदलण्याची वाट पाहू नये. आपणच आपल्यात बदल करून ,प्राप्त परिस्थितीशी जुळवून घ्यावं. लहानपणीची तिची ही विचारांची प्रगल्भता ,कधी कधी आम्हाला ही आश्चर्य चकीत करीत असे. तिच्या लहानपणी तिच्या मावस बहीणी, लिनू आणि तेजू ,यांच्या बरोबर ती खेळायची. तिघींचे त्या काळातले " गमतीचे खेळ " आज ही आठवले, तरी हसू येते. त्या तिघींची गट्टी आज ही तितकीच घट्ट आहे.
                 कीर्तीची बाराव्वी होई पर्यंत, आम्ही नाशिकला होतो. तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण, नाशिकच्या   " सीडीओ मेरी शाळेत " झाले. त्या नंतर तिने होम सायन्सला प्रवेश घेतला. ती बाराव्वी झाली आणि माझी, नाशिकहून सातारा येथे बदली झाली. त्या मुळे आम्ही सर्वजण, मिरजला आमच्या घरी शिफ्ट झालो. मिरज सांगलीत होम सायन्स शिकण्याची सोय नव्हती. त्या मुळे तिला आर्टसला जावे लागले. मिरजेच्या " कन्या महाविद्यालयात " ,तिचे पहिले आणि दुसरे वर्ष झाले . तिसर्‍या व शेवटच्या वर्षासाठी " संस्कृत " हा अवघड विषय, तिने निवडला. त्या विषयाची शिक्षणाची सोय सांगली मिरजेत नव्हती. तिने स्वतः घरी अभ्यास करून , " संस्कृत " या विषयात पदवी प्राप्त केली . ही बाब अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच आहे.
                    काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच, तिचे लग्न ठरले. तिला पहिल्यांदाच दाखविले आणि तिथेच लग्न ठरून, झाले ही ! अशा तर्‍हेने माझी लाडकी मुलगी कीर्ती, चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी , कारदगेकर , झाली.
                     सासरी गेल्या नंतर, ती तिथे इतकी छान रमली की ,ती " दीक्षितांची , कुलकर्णी " कधी झाली, ते समजलेच नाही. माहेरी आल्या नंतर तिच्या तोंडी ,तिच्या सासरच्या माणसांच्या बद्दलचा जिव्हाळा, सतत दिसून येत असे . आम्ही सर्वजण त्या मुळे सुखावून जात होतो. ही अतिशय आनंदाची व समाधानाची बाब आहे.
                    तिचे लग्न झाल्या पासून आज तागायत , ती अत्यंत समाधानात आहे. तिला एक मुलगा आहे. आमचे जावई श्री. अजयराव ,अत्यंत सज्जन आणि कोल्हापुरातले एक निष्णात फौजदारी वकील आहेत . तिच्या सासरची माणसे, अतिशय स्नेहपूर्ण असल्याने, ती आनंदात आहे. कोल्हापुरात त्यांचा मोठा व मोक्याच्या जागी फ्लॅट आहे. कीर्तीने मोजक्याच पण जवळच्या मैत्रिणी मिळविल्या आहेत . थोडक्यात आपली मुलगी सुखा समाधानात असल्याचे ,आम्हाला संपूर्ण समाधान आहे. हे दुर्मिळ आहे.
                     अशा या आमच्या लाडक्या,  देखण्या आणि वागायला अतिशय सौदार्हपूर्ण असलेल्या मुलीवर, म्हणजेच कीर्ती उर्फ चि. सौ. संपदावर , तिच्या कुटुंबावर परमेश्वराने सर्व सुखांचा वर्षाव करावा, तिला उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे, ही प्रार्थना करतो आणि थांबतो.

Saturday, 5 September 2020

सौ. रमा आदित्य दीक्षित....माझी सून !

चि. सौ. रमा आदित्य दीक्षित . माझी सून. ती " कंपनी सेक्रेटरी ( सी. एस.) " झालेली आहे. स्वतःचा व्यवसाय करते. एक जिद्दी आणि अत्यंत हुषार मुलगी , उत्तम गृहिणी आणि यशस्वी व्यावसायिक असे तिचे थोडक्यात वर्णन करता येईल.
             माहेरचे तिचे नाव कु. प्राजक्ता विश्वनाथ दांडेकर. माहेर मिरज. ती बी. काॅम. झाली आणि नंतर एम. काॅम. करण्यासाठी ती पुण्याला गेली. तिने एम. काॅम. केलेच , पण त्याच बरोबर " जी.डी. सी. ए. आणि डी. सी. एस."  ही केले. प्रत्येक परिक्षेत तिने उज्वल यश संपादन केलेले आहे. ती जात्याच हुषार आहे, अभ्यासू आहे.
              माझा मुलगा चि. आदित्य आणि तिचा प्रेमविवाह आहे. दोन्ही घरचा या विवाहाला पाठींबा असल्याने ,२००६ साली त्यांचा विवाह थाटामाटात मिरज येथे झाला.
               चि. आदित्यची नोकरी नाशिकला असल्याने ते दोघे, विवाहा नंतर नाशिकला रहायला आले. लग्नानंतर  तिने कांही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. आमचा नातू चि. निषादचा जन्म २००७ साली झाला.
                 तो थोडा मोठा झाल्या नंतर, तिने " कंपनी सेक्रेटरी " चा कोर्स करण्याचे ठरविले. सी. ए. सारखा हा कोर्स ही, अतिशय कठीण आहे. या कोर्सच्या एकूण चार परिक्षा असतात. ती पहिल्या परिक्षेला बसली त्या वेळी, तिच्या आईचे अचानक निधन झाले होते. दिवस कार्य चालू असतानाच तिची परिक्षा होती. मनावर झालेल्या या आघातातून सावरून, तिने त्या परिक्षेत उत्तम सुयश मिळविले. तिने फायनलची शेवटची परिक्षा २०१५ साली दिली . त्यात ही तिने उत्तम सुयश मिळविले. ती पास झाली त्या वेळेस, नाशिक केंद्राचा सी. एस. परिक्षेचा निकाल, ०.८ % इतका कमी होता. पण तिने संसार  सांभाळून अभ्यास करून ,उत्तम सुशय मिळविले हे फार महत्वाचे आहे.
                   आता ती स्वतःचा व्यवसाय करते आहे. नुकतेच तिने व तिच्या सहकार्‍यांनी, जुन्या जागेतून नवीन जागेत  स्थलांतर करून, तिथे आपला व्यवसाय सुरू केला आहे. ही फार मोठी अभिमानाची बाब आहे.
                    ती  गृहिणी या नात्याने आपल्या सर्व जबाबदार्‍या ,अत्यंत काटेकोरपणे पार पाडते. चि. निषादचा अभ्यास घेणे , तसेच वेळोवेळी येणारे सणवार , ती निगुतीने पार पाडते. घरातल्या कामाचा तिचा उरक, वाखाणण्या सारखा आहे. पुरणा वरणाचा स्वैपाक करणे , गणपतीत उकडीचे मोदक करणे किंवा नवीन नवीन पदार्थ  शिकून तयार करणे , तिला उत्तम आणि पटापट जमते . दहा बारा लोकांचा गोडधोडाचा स्वैपाक ती कधी बनविते ,ते कुणाला समजणार ही नाही.
                 तिची आणखीन दोन वैशिष्ठ्ये म्हणजे ,ती माहेरच्या आणि सासरच्या नातेवाईकांशी आणि मित्रमंडळींशी ,आवर्जून उत्तम संपर्क ठेवते. तसेच तिचे कार ड्रायव्हिंगवर ही प्रभुत्व आहे.
                 आपला फिटनेस व्यवस्थित रहावा या साठी, जिमला जाउन एक्सरसाईझ करणे व त्याला सुसंगत डाएट सांभाळणे , ती काटेकोरपणे सांभाळते. मध्यंतरी नाशिकमध्ये झालेल्या १० किमीच्या दोन तीन मॅरेथाॅन मध्ये, तिने भाग घेउन यशस्विता मिळवली आहे.
                  ती स्वतःचा व्यवसाय करते म्हटल्यावर , आम्हा वृध्द मंडळींच्याकडे तिचे दुर्लक्ष होत असणार, असे वाटण्याची शक्यता आहे. पण तसे अजिबात नाही. चि. सौ. रमा घरातील प्रत्येकाकडे व्यवस्थित लक्ष देते . मी व माझी पत्नी सौ. रजनी ,आम्ही दोघे त्यांच्या सोबतच राहतो. आम्ही वयोवृध्द आहोत. आम्हाला कोणताही त्रास पडू नये ,उलट आम्ही आनंदात  व सुखात रहावे या दृष्टीने ,ती अत्यंतिक काळजी घेते. ही आमच्या दृष्टीने भाग्याची व समाधानाची गोष्ट आहे. अशी सून आम्हाला लाभली ,ही परमेश्वराची मोठी कृपाच आहे.
                    शैक्षणिक दृष्ट्या हुषार ,यशस्वी व्यावसायिक , गृहकृत्यदक्ष , प्रेमळ , सुस्वभावी अशा आमच्या सुनेला, म्हणजेच चि. सौ. रमाला, परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य देउन ,सुखासमाधानात ठेवावे , तिच्यावर सर्व प्रकारच्या आनंदाचा वर्षाव व्हावा , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Tuesday, 1 September 2020

अॅडव्होकेट अजय रामचंद्र कुलकर्णी , कारदगेकर , माझे जावई...

अॅडव्होकेट श्री. अजय रामचंद्र कुलकर्णी , कारदगेकर , हे माझे जावई आहेत . ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आज मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे. मी त्यांना अजयराव असे म्हणतो. त्या मुळे या लेखात मी त्यांचा ,तसाच उल्लेख करीत आहे.
                 अजयराव म्हणजे देखणा माणूस ! गोरापान रंग , मध्यम उंची , राहणी एकदम टिपटाॅप ! त्यांनी एके काळी भरपूर व्यायाम करून, आपले शरीर कमावलेले आहे. ते अतिशय धार्मिक आहेत,पण कर्मकांड त्यांना विशेष आवडत नाही . त्यांना आपल्या वयोवृध्द आई ,वडीलांच्या बद्दल अत्यंतिक प्रेम आणि जिव्हाळा आहे.  त्यांच्या काळजीपोटी, ते रोज फोन करून, त्यांची ख्यालीखुशाली न चुकता विचारतात . त्यांची स्वतःची वडीलोपार्जित शेती आहे. त्यांना शेतीची आवड आणि शेतीतल्या सर्व प्रकारच्या बारकाव्यांची  जाण आहे . हे त्यांचे लक्षात घेण्या सारखे वैशिष्ठ्य आहे.
                   माझ्या मुलीला प्रथमच त्यांच्याकडे दाखवलं आणि तिथेच लग्न ठरलं. हा एक वेगळा आणि आनंदाचा योगायोग आहे.
                  श्री. अजयराव कोल्हापुरात आपला वकीली व्यवसाय करतात. ते सर्व प्रकारचे खटले चालवितात.   त्यातल्या त्यात फौजदारी खटले चालविण्यात, त्यांचा हातखंडा आहे.  त्यांच्या वकीली अनुभवाचे व विशेषतः फौजदारी खटल्यांचे  किस्से , ऐकण्या सारखेच असतात. अजयराव खूप कमी बोलतात. पण त्यातल्या त्यात तुमची चांगली ओळख असेल, वकीली आणि कोर्ट हा विषय निघाला  असेल, तर ते  मोठ्या उत्साहाने  बोलतात . अशा वेळी त्यांचे सुगम बोलणे, ऐकतच बसावे असे वाटते.
                   त्यांचे मूळ गाव कारदगा , ता. चिक्कोडी , जि. बेळगाव , कर्नाटक राज्य. कारदगा कोल्हापूर पासून अंदाजे ,तीस किमी अंतरावर आहे. तिथे त्यांचा मोठ्ठा वाडा आहे व शेतीवाडी आहे. त्यांचे आई वडील सहसा तिथेच असतात. कंटाळा आला तर कोल्हापुरला ही येतात. अजयराव मात्र सुट्टी मिळाली की आपल्या गावी जाउन ,शेतीवाडीच्या कामात लक्ष घालतात.
                     आपले घर  स्वच्छ आणि नीटनेटके असावे या दृष्टीने, गरज असेल तेंव्हा ,ते आपला आब बाजूला ठेउन, आवश्यक ती सर्व मदत करतात. त्यांचे एकत्र कुटूंब आहे. अजयरावांचे कुटूंब  व त्यांचा थोरला भाऊ, वहिनी , पुतण्या , पुतणी  असे सर्व कुटूंबिय एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. हे आजच्या काळात दुर्मिळ आहे.
                   अजयराव आपल्या आई वडीलांची जशी काळजी घेतात ,तशी आमची दोघांची ही घेतात. ते मनाने तसे खूप हळवे आहेत. त्यांना मित्र परिवार आहे, पण तो मोजकाच आहे. व्यावसायीक पार्ट्या करणे त्यांना फारसे आवडत नाही. कुणी पार्टीसाठी बोलावले तर ,ते मन मोडायचे नाही म्हणून हजर राहतात .तिथे ते सर्वांच्यात मिळून मिसळून असतात असे जाणवते ,पण प्रत्यक्षात ते  तेथील वातावरणा पासून मनोमन अलिप्त असतात. ते संपूर्ण शाकाहारी आहेत.
                 असे दुर्मिळ व्यक्तीमत्वाचे जावई मिळणे ,हे भाग्याचे लक्षण आहे , असे आम्हा दोघांचे स्पष्ट मत आहे.
                   जावई  असून  मुला  प्रमाणे  वागणार्‍या ,
श्री. अजयरावांना भरभरून शुभाशिर्वाद देतो . तसेच त्यांचे सर्व मनोरथ लवकरात लवकर पूर्ण होवोत, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Friday, 28 August 2020

माझे दोन नातू....

माझे नातू....
मला दोन नातू आहेत. फोटोत डाव्या बाजूला दिसत आहे तो चि. निषाद ,  मुलाचा मुलगा आणि उजव्या बाजूला दिसत आहे तो, चि. मानस , मुलीचा मुलगा !
               चि. मानस बाराव्वीला आहे व चि. निषाद सातवीला आहे. दोघेही मनाने अतिशय प्रेमळ आहेत. दोघांना ही आपले नातेवाईक सारखे यावेत , भेटावेत असे वाटत असते. पण ते नेहमीच शक्य असते असे नाही. " गुगल मीट " वर सगळ्यांना बोलावून ते दोघे आपली नातेवाईकांना भेटायची हौस भागवत असतात.
                   चि. मानसच्या जन्माचे वेळी २००४ साली मी नाशिकला नोकरीत होतो. चि. मानसचा जन्म मिरजचा ! त्याच्या जन्मा नंतर  दुसर्‍या दिवशी, त्याला पहायला मी मिरजला गेलो. चि. मानस म्हणजे उत्साहाचा झराच होता. इतक्या जोरात हातपाय हलवत असायचा की हा दमत कसा नाही , याचं आश्चर्य वाटावं ! रडायला लागला की असला जोरात किंचाळायचा, की ऐकवत नसे. त्याच्या लांबच्या आज्जी त्याला पहायला मिरजला  आल्या असताना त्याचा रडण्याचा आवाज ऐकून " हा आमच्या चिक्कोडीचा आवाज आहे " असं म्हणून खूष झाल्या होत्या. लहानपणीचा मानस अल्लड आणि चांगलाच दंगेखोर होता. घरभर त्याचं बारीक लक्ष असायचं.  आता चि. मानस मोठा झालाय. मिसरूड फुटलय. तो आता खूपच जबाबदारीने वागतोय. चि. मानसनं त्याच्या वडीलांच्या प्रमाणेच वकील व्हावं असं मला वाटतय. अर्थात तो जे करेल ते योग्यच करेल अशी मला खात्री आहे.
             चि. निषाद हा माझा दुसरा नातू. तो अजूनी अल्लडच आहे. चि. निषादच्या जन्माचे वेळी २००७ साली  मी सेवानिवृत्त झालो होतो. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरला मुलीकडे गेलो होतो. सुनेला दवाखान्यात नेल्याचा व्याह्यांचा फोन आला. आम्ही तातडीने कोल्हापूरहून मिरजेला आलो. चि. निषादच्या जन्मानंतर त्याला एका ट्रे मध्ये ठेवले होते. तिथे त्याला पहायला  प्रथमच  आम्ही गेलो. छान टकमक पहात होता. आम्ही मुला बरोबरच रहात असल्याने ,चि. निषादचा भरपूर सहवास मिळाला आहे. त्याची आणि माझी दोस्तीच आहे म्हणाना ! त्याला दंगा करायची लहर आली की तो आजही माझ्याकडे धाव घेतो.
                 नातवंडे म्हणजे " दुधावरची साय " असे म्हणतात. माझी दोन्ही नातवंडे अतिशय लाघवी आणि प्रेमळ आहेत.
                 नातवंडे मोठी झाली की त्यांच्या संसारात त्यांच्या बरोबर रहायची माझी इच्छा आहे. पण ती पूर्ण होणं कठीणच आहे. चि. मानस आज सोळा वर्षाचा आहे व चि. निषाद बारा वर्षाचा ! त्यांचे संसार सुरू होई पर्यंत मी " असण्याची " शक्यता कमीच आहे.
            मी कुठे ही असलो तरी त्या दोघांना माझे सदैव भरभरून शुभाशिर्वाद आहेतच !
            चि. मानस आणि चि . निषाद , खूप मोठे व्हा आणि आपल्या आई वडीलांना भरभरून सुख व समाधान द्या आणि तुम्ही ही ,सुखासमाधानात रहा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.



Wednesday, 26 August 2020

कै. नगरकर काकू ...एक रसिकाग्रणी व्यक्तीमत्व...

कै. सौ. राजेश्वरी पांडुरंग नगरकर. " मेरी " या संशोधन संस्थेच्या एके काळच्या, मुख्य अभियंता आणि संचालक श्री. पांडुरंग कृष्णाजी नगरकर साहेबांच्या पत्नी ! माहेरच्या नलिनी कान्हेरे ! यांची मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे.
               मुख्य अभियंता आणि संचालक ,या सारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या पत्नी , म्हटल्यावर त्या अहंमन्य असाव्यात अशी समजूत होणे ,स्वाभाविकच आहे. पण कै. सौ. नगरकर तशा नव्हत्या.
               आम्ही संशोधन संस्थेतील त्यांचे परिचित, त्यांना " नगरकर काकू " असे म्हणत असू. या लेखात मी त्यांचा तसाच उल्लेख करीत आहे.
                एकदा तुमचा आणि नगरकर काकूंचा परिचय झाला आणि तुमचे वागणे मर्यादेत असले व त्यांना योग्य वाटले ,तर त्या तुमच्याशी परकेपणाने वागत नसत. अशा प्रकारे शिस्तबद्ध वागणारा ,संस्थेतील शासकीय अधिकारी असो किंवा त्यांच्या शासकीय बंगल्यावर काम करणार्‍या चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो, त्या आपल्या कुटूंबातल्या व्यक्ती प्रमाणे त्यांची काळजी घेत.  त्यांच्या पैकी कुणाला कांही मदत हवी असेल तर ,आपुलकीने आणि जिव्हाळ्याने त्या जरूर करायच्या.
                   मेरीच्या संस्कृतिक जीवनात, त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. विविध धाटणीची नाटके , आनंदमेळा व इतर मनोरंजनात्मक तसेच सांस्कृतिक  कार्यक्रमांना, त्यांचा नेहमीच सक्रीय पाठींबा असायचा.
                  काकूंचे माहेर जरी सातारा असले तरी, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले . महाविद्यालयीन शिक्षणाचे वेळी त्यांनी शैक्षणिक उन्नत्ती बरोबरच ,गायन व अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. सन १९५५ साली त्यांचा श्री. नगरकर साहेबांच्या बरोबर विवाह झाला. सन १९५६ मध्ये त्यांनी गो. नी. दांडेकर लिखित, " राधामाई " या नाटकात राधेची भूमिका केली होती.  त्या नाटकातील गायक अभिनेत्रीचे पहिले बक्षिस  ,त्यांना नटसम्राट बालगंधर्व यांचे हस्ते प्राप्त झाले होते. त्यांनी  १९६५ - ६६ साली  पुणे विद्यापीठातून एम. ए. केले. त्या वेळी त्या कार ड्राईव्ह करत विद्यापीठात जात असत. त्या काळात घरात कार असणं दुर्मिळ आणि बायकांनी कार चालवणं म्हणजे जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट ! पण काकूंनी तो ही आनंद मनसोक्त घेतला.  श्री. नगरकर साहेबांची बदली कोयना प्रकल्पावर झाल्यावर त्या तिकडे गेल्या. कोयनेला असताना, त्यांनी तिथल्या महिला मंडळात , अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या रसिक व्यक्तीमत्वाचा  ठसा उमटविला.
               काकूंचा स्वभाव बोलका होता. त्यांना ब्रीज खेळणं , क्रिकेट पाहणं , बाग फुलवणं  मना पासून आवडायचं. त्या  धार्मिक वृत्तीच्या होत्या. आपुलकीच्या , जिव्हाळ्याच्या माणसांचे  दुःख त्यांना आपलच वाटायचं. अशा प्रसंगी त्या निरपेक्षवृत्तीने ,आवश्यक ती सर्व मदत करीत. साहेबांच्या सेवानिवृत्ती नंतर, ते दोघे वेदान्त शिकण्यासाठी, पुरूषोत्तमशास्त्री फडके यांच्याकडे जात असत. नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात असे त्यांना वाटायचे.  त्या नाविन्याचा आस्वाद ,त्या मोठ्या आनंदाने घेत असत. काकूंचा स्वभाव रसिकाग्रणी होता. वैताग हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नव्हताच ! त्या सतत प्रसन्न असत व आपल्या अस्तित्वाने ,सभोवतालचे वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीत.
                 श्री. नगरकर साहेब आणि  नगरकर काकूंना तीन मुले. चि. श्री , चि. सौ. प्रिया भिडे व चि. अभिराम !  तिघे ही आपापल्या जागी सुस्थितीत आहेत.
                  अशा या कलासक्त , सदैव प्रसन्न असणार्‍या व रसिक मनाच्या काकूंचे, सन २००८ साली वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
                      आज दि. २६ आॅगस्ट आहे आज त्यांचा वाढदिवस आहे.  काकू हयात असत्या तर ८६ वर्षाच्या असत्या. पण तो योग नव्हता. काकू प्रत्यक्ष हयात नसल्या तरी ,आमच्या सर्वांच्या मनात त्यांचे अबाधित असे स्थान नक्कीच आहे. नगरकर काकूंना विसरणे सर्वथैव अशक्यच !
                        कै. नगरकर काकूंच्या जन्मदिनी त्यांना साश्रुपूर्ण श्रध्दांजली वाहतो आणि थांबतो !
             । । ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।