Thursday, 8 October 2020

सौ. रजनी दीक्षित... माझी पत्नी.

 सौ. रजनी दीक्षित. माझी पत्नी. जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहणारी , मनाने खंबीर , शंभर टक्के माझ्या पाठीशी उभीराहणारी , काटकसरी , उत्तम स्मरणशक्ती , अत्यंत सहनशील , परिस्थितीशी सतत जुळवून घेणारी , अशा शब्दात तिचे वर्णन करता येईल. 

               आमचे लग्न १९७३ साली झाले. आमचा प्रेमविवाह आहे. त्या बद्दल आता कांहीही बोलत नाही. तो एक वेगळाच " ग्रंथ " तयार होईल.

                  सौ. रजनीचे माहेर श्रीमंत ! लग्नानंतर तिला काटकसरीने रहावे लागले. पण मुळात तिचा काटकसरी स्वभाव असल्याने, तिने येईल त्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेतले. जीवनामध्ये आमच्या दोघांच्यावर, कांही कठीण प्रसंग आले . ती त्या सर्व प्रसंगी खंबीरपणे उभी राहिली. आमच्या  संसाराचे तारू तिच्या मुळे तरून गेले. आमचे लग्न झाले त्या वेळी सौ. रजनी पदवीधर नव्हती. लग्ना नंतर संसार सांभाळून, जोमाने अभ्यास करून,  तिने पदवी मिळविली. तिला नोकरी करण्याची इच्छा होती, पण केवळ माझ्या आग्रहानुसार, तिने तो विचार बाजूला सारला.

                   मला नाटकात काम करायची आवड होती , ज्योतिष शिकायची आवड होती,  अध्यात्माची आवड असल्याने मी, श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाच्या व शिवथर घळीच्या परिक्षा दिल्या. या सर्व बाबीत ती संपूर्ण तन मनाने ,माझ्या सोबत राहीली. तिने नाटकात कामे केली , ज्योतिष शिकली , अध्यात्माच्या परिक्षा माझ्या बरोबरीने अभ्यास करून दिल्या. जे समोर येईल त्याचा आनंदाने स्वीकार करून, आनंद मिळविण्याच्या आणि दुसर्‍याला आनंद मिळवून देण्याच्या, तिच्या स्वभावा मुळेच हे शक्य झाले. माझी पत्नी सौ. रजनी तन मनाने सतत माझ्या बरोबर असल्याने, मी जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेउ शकलो.

                 जीवनात सतत मना प्रमाणे दान पडते असे कधी ही नसते . तिथेच तुमच्या सहनशक्तीची  व सकारात्मकपणे जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची, परिक्षा असते. त्या प्रत्येक परिक्षेत, ती शंभर टक्के मार्क मिळवून पहिल्या नंबराने उत्तीर्ण झालेली आहे , असे मी अभिमानाने सांगू शकतो . 

                   मध्यंतरी तिला " संधीवाताचा खूप त्रास " झाला. परिस्थिती अवघड होती. पण तिने कधी ही मनात आलेला निराशेचा सूर ,तोंडातून बाहेर येउ दिला नाही. तिची अवस्था पाहून मीच निराशाग्रस्त होत असे . सतत जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याच्या आणि येईल त्या परिस्थितीशी खंबीरपणे झुंजण्याच्या तिच्या वृत्तीमुळे, ती त्या ही आजारातून संपूर्ण बरी झालेली आहे. तिची जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याची इच्छा आणि सहनशक्ती जबरदस्त आहे. 

                   तिने माझ्या आई वडीलांची गरजे प्रमाणे पडलेली जबाबदारी ,अतिशय उत्तमपणे , प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडलेली आहे. तिचा आणखीन एक दुर्मिळ गूण म्हणजे ,आपण केलीली कोणती ही चांगली गोष्ट ,ती पुन्हा पुन्हा बोलून घोकण्याचा तिचा स्वभाव नाही. सर्वसाधारणपणे आपण एखादी चांगली गोष्ट केली तर ती परत परत बोलून ,दुसर्‍याच्या मनात ठसविण्याचा स्वभाव असू शकतो. त्यात चूक आहे असे मी मानत नाही. पण सौ. रजनीने असे कधी ही केले नाही . " कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन " ही तिची जीवन शैली  आहे. 

                     घरात संघर्ष टाळण्याची तिची वृत्ती आहे. समोरच्याची मते पटली नाहीत तर ,अशा वेळी ती गप्प बसते. आपली मते ठासून मांडण्याचा तिचा स्वभाव नसल्याने, आमच्या  कुटूंबात वाद कधी ही होत नाहीत. मतभिन्नता असू शकते पण वादावादी कधी ही होत नाही. हा दुर्मिळ गूण घरात शांतता राखतो.

                     तिची स्मरणशक्ती जबरदस्त आहे. आमच्या नातेवाईकांचे , मित्रांचे , घरातील सर्वांचे जीवनातील सर्व मुख्य दिवस ,तारीख  व वार या सह तिच्या बिनचूक लक्षात असतात. तसेच सर्व प्रकारचे मराठी " साहित्य " वाचणे, तिला मना पासून आवडते.

                    सकाळी फिरणे , घरी आल्यावर श्वसनाचे व कांही मोजके शारीरिक व्यायाम करणे , या गोष्टी  तिला मना पासून आवडतात . एखादी गोष्ट सातत्याने करायची तिने ठरविली की ,ते सातत्य टिकवण्यात तिला आनंद मिळतो. मॅगी , पिझ्झा , वडा , दाबेली असे पदार्थ खायला तिला आवडतात. जे खायचे ते " लिमीटेड पण चवीने खायचे " , हा तिचा स्वभाव आहे.

                     अशी गुणी पत्नी मला लाभली, हे माझे परमभाग्य होय. दुर्गा सप्तशती मध्ये, अर्गलास्तोत्र आहे. त्यात एक श्लोक आहे. तो श्लोक असा....

                   पत्नी मनोरमां देही

                   मनोवृत्तानुसारिणीम् ।

                    तारिणीं दुर्ग संसार

                   सागरस्य कुलोद्भवाम् ।।

अर्थ..कठीण संसार सागरातून तारून नेणारी , कुलीन , सुंदर व मना प्रमाणे वागणारी पत्नी ( हे अर्गला देवी ) मला दे. 

                   हा श्लोक सौ. रजनीला तंतोतंत लागू पडतो. तिची मला पत्नी या नात्याने जी साथ लाभली , त्या साठी मी जन्मोजन्म तिचा ऋणी आहे व राहीन.

                    इति लेखन सीमा ।


No comments:

Post a Comment