Wednesday, 26 August 2020

कै. नगरकर काकू ...एक रसिकाग्रणी व्यक्तीमत्व...

कै. सौ. राजेश्वरी पांडुरंग नगरकर. " मेरी " या संशोधन संस्थेच्या एके काळच्या, मुख्य अभियंता आणि संचालक श्री. पांडुरंग कृष्णाजी नगरकर साहेबांच्या पत्नी ! माहेरच्या नलिनी कान्हेरे ! यांची मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे.
               मुख्य अभियंता आणि संचालक ,या सारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या पत्नी , म्हटल्यावर त्या अहंमन्य असाव्यात अशी समजूत होणे ,स्वाभाविकच आहे. पण कै. सौ. नगरकर तशा नव्हत्या.
               आम्ही संशोधन संस्थेतील त्यांचे परिचित, त्यांना " नगरकर काकू " असे म्हणत असू. या लेखात मी त्यांचा तसाच उल्लेख करीत आहे.
                एकदा तुमचा आणि नगरकर काकूंचा परिचय झाला आणि तुमचे वागणे मर्यादेत असले व त्यांना योग्य वाटले ,तर त्या तुमच्याशी परकेपणाने वागत नसत. अशा प्रकारे शिस्तबद्ध वागणारा ,संस्थेतील शासकीय अधिकारी असो किंवा त्यांच्या शासकीय बंगल्यावर काम करणार्‍या चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो, त्या आपल्या कुटूंबातल्या व्यक्ती प्रमाणे त्यांची काळजी घेत.  त्यांच्या पैकी कुणाला कांही मदत हवी असेल तर ,आपुलकीने आणि जिव्हाळ्याने त्या जरूर करायच्या.
                   मेरीच्या संस्कृतिक जीवनात, त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. विविध धाटणीची नाटके , आनंदमेळा व इतर मनोरंजनात्मक तसेच सांस्कृतिक  कार्यक्रमांना, त्यांचा नेहमीच सक्रीय पाठींबा असायचा.
                  काकूंचे माहेर जरी सातारा असले तरी, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले . महाविद्यालयीन शिक्षणाचे वेळी त्यांनी शैक्षणिक उन्नत्ती बरोबरच ,गायन व अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. सन १९५५ साली त्यांचा श्री. नगरकर साहेबांच्या बरोबर विवाह झाला. सन १९५६ मध्ये त्यांनी गो. नी. दांडेकर लिखित, " राधामाई " या नाटकात राधेची भूमिका केली होती.  त्या नाटकातील गायक अभिनेत्रीचे पहिले बक्षिस  ,त्यांना नटसम्राट बालगंधर्व यांचे हस्ते प्राप्त झाले होते. त्यांनी  १९६५ - ६६ साली  पुणे विद्यापीठातून एम. ए. केले. त्या वेळी त्या कार ड्राईव्ह करत विद्यापीठात जात असत. त्या काळात घरात कार असणं दुर्मिळ आणि बायकांनी कार चालवणं म्हणजे जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट ! पण काकूंनी तो ही आनंद मनसोक्त घेतला.  श्री. नगरकर साहेबांची बदली कोयना प्रकल्पावर झाल्यावर त्या तिकडे गेल्या. कोयनेला असताना, त्यांनी तिथल्या महिला मंडळात , अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या रसिक व्यक्तीमत्वाचा  ठसा उमटविला.
               काकूंचा स्वभाव बोलका होता. त्यांना ब्रीज खेळणं , क्रिकेट पाहणं , बाग फुलवणं  मना पासून आवडायचं. त्या  धार्मिक वृत्तीच्या होत्या. आपुलकीच्या , जिव्हाळ्याच्या माणसांचे  दुःख त्यांना आपलच वाटायचं. अशा प्रसंगी त्या निरपेक्षवृत्तीने ,आवश्यक ती सर्व मदत करीत. साहेबांच्या सेवानिवृत्ती नंतर, ते दोघे वेदान्त शिकण्यासाठी, पुरूषोत्तमशास्त्री फडके यांच्याकडे जात असत. नवीन नवीन गोष्टी शिकाव्यात असे त्यांना वाटायचे.  त्या नाविन्याचा आस्वाद ,त्या मोठ्या आनंदाने घेत असत. काकूंचा स्वभाव रसिकाग्रणी होता. वैताग हा शब्द त्यांच्या शब्दकोषात नव्हताच ! त्या सतत प्रसन्न असत व आपल्या अस्तित्वाने ,सभोवतालचे वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीत.
                 श्री. नगरकर साहेब आणि  नगरकर काकूंना तीन मुले. चि. श्री , चि. सौ. प्रिया भिडे व चि. अभिराम !  तिघे ही आपापल्या जागी सुस्थितीत आहेत.
                  अशा या कलासक्त , सदैव प्रसन्न असणार्‍या व रसिक मनाच्या काकूंचे, सन २००८ साली वयाच्या ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
                      आज दि. २६ आॅगस्ट आहे आज त्यांचा वाढदिवस आहे.  काकू हयात असत्या तर ८६ वर्षाच्या असत्या. पण तो योग नव्हता. काकू प्रत्यक्ष हयात नसल्या तरी ,आमच्या सर्वांच्या मनात त्यांचे अबाधित असे स्थान नक्कीच आहे. नगरकर काकूंना विसरणे सर्वथैव अशक्यच !
                        कै. नगरकर काकूंच्या जन्मदिनी त्यांना साश्रुपूर्ण श्रध्दांजली वाहतो आणि थांबतो !
             । । ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

No comments:

Post a Comment