Sunday, 16 August 2020

डाॅ. सौ. विनीता करमरकर ... एक अनुकरणीय व्यक्तीमत्व

डाॅ. सौ. विनीता करमरकर . मिरजेच्या सुप्रसिध्द डाॅ. वसंत करमरकर यांच्या पत्नी !  तसेच एके काळचे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त " नटसम्राट ", कै.  चित्तरंजन कोल्हटकर यांच्या त्या कन्या होत. आज मी  तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे.
                सौ. विनीता वहिनींचे माहेर पुणे. वडील  चित्तरंजन कोल्हटकर अभिनेता असल्याने ,घरातले वातावरण मोकळे ढाकळे असेल ,असे वाटण्याची शक्यता आहे. पण नाही.  चित्तरंजन कोल्हटकरांना, घरात  नाटक व सिनेमा या संबंधात  बोलणे व चर्चा करणे,  मुळीच अावडायचे नाही.  घर हे घरा सारखेच असले पाहिजे, त्याचे थिएटर व्हायला नको , या बाबीवर वर त्यांचे बारकाईने लक्ष असे. मुलींनी संध्याकाळी सातच्या आत घरात आलेच पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. वेळेचे ते पक्के बांधील होते.
               सौ. वहिनींचे शालेय शिक्षण, त्या वेळच्या  मुलींच्या भावे स्कूल मध्ये व काॅलेजचे शिक्षण, पुण्याच्या एस. पी. काॅलेज मध्ये झाले. शाळेत शिकत असताना , मराठी आणि संस्कृत भाषेतल्या "  नाट्यवाचन " स्पर्धेत , सौ. वहिनींनी पारितोषके मिळविली आहेत. तसेच  माजी विद्यार्थीनींच्या, " सुवर्णतूला " या नाटकात सत्यभामा  आणि " रायगडला जेंव्हा जाग येते " या नाटकात सोयराबाईची भूमिका साकारून, त्यांनी  प्रेक्षकांची वाहवा मिळविलेली आहे.
                 सन १९७५ साली,  मिरजेच्या डाॅ. वसंत करमरकर यांच्याशी विवाह झाल्या नंतर, त्या मिरजेत वास्तव्याला आल्या. चि. उन्मेष आणि चि. मुग्धा अशी दोन गोड मुले ,त्यांच्या संसार वेलीवर फुलली . संसार चालू होता. पण मनात, आपण वेगळे कांही तरी केले पाहिजे, असा सतत विचार येत होता. याची परिणती म्हणून ,त्यांनी पीएच. डी. करून " डाॅक्टरेट " मिळवावी  असे ठरविले.
                सौ. वहिनींचे अाजोबा कै. चिंतामणराव कोल्हटकर , हे गानसम्राज्ञी श्रीमति लता मंगेशकर यांच्या वडीलांचे म्हणजेच कै. दीनानाथ मंगेशकर  यांचे, रंगभूमी वरील समकालीन नट होते. कै. चिंतामणराव कोल्हटकरांचे , मराठी रंगभूमी वरील  कर्तृत्व खूपच मोठे आहे.  त्या काळी त्यांनी कै. दीनानाथ मंगेशकरांचे साथीने , स्वतःची नाटक कंपनी चालविली होती. तसेच  त्यांनी  मराठी नटसंचात, हिंदी रंगभूमीवर  हिंदी नाटके सादर करण्याचा ,आगळा वेगळा प्रयोग केला होता. आपल्या आजोबांच्या रंगभूमी वरील कार्याचा, साकल्याने विचार करून त्यांनी, " कै. चिंतामणराव कोल्हटकर , कार्य व कर्तृत्व " या विषयावर,  पीएच. डी. चा प्रबंध लिहायचे ठरविले.
               भरपूर कष्ट घेउन ,त्यांनी त्यांच्या मुंबईच्या काकांच्याकडे असलेली जुनी कागदपत्रे , तसेच अाजोबांच्या डायर्‍या मिळविल्या. अाजोबांना ओळखणार्‍या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात पु. ल. देशपांडे , विष्णूपंत जोग , परशुराम सामंत , गणपतराव मोहिते उर्फ मास्टर अविनाश , विश्राम बेडेकर , चंद्रकांत गोखले इत्यादी नामवंतांचा समावेश होता.  त्या साठी मिरज ते पुणे , मुंबई अशा सारख्या खेपा घालाव्या लागत होत्या. संसार सांभाळायचा , मुलांचं हवं नको पहायचं , सासुबाईंच्या कडे लक्ष द्यायचं, अशी  सर्व तारेवरची कसरत करत त्यांनी जिद्दीने,  आपल्या गाईड  डाॅ. तारा भवाळकर यांच्या मार्गदर्शना खाली, आपली डाॅक्टरेट पूर्ण केली. त्या साठी त्यांना सात वर्षे, अथक परिश्रम घ्यावे लागले. अशा प्रकारे  जिद्दीने अभ्यास व प्रबंध लेखन पूर्ण  करून, त्यांनी  सन १९९६ मध्ये " डाॅक्टरेट " मिळविली आणि डाॅ. वसंत करमरकर यांच्या बरोबरीने , त्या डाॅ. सौ. विनीता करमरकर झाल्या.
                 मिरजे सारख्या शहरात, त्यांनी " संस्कार भारती " चे संस्थापक अध्यक्ष या नात्याने, कार्याची मूहूर्तमेढ रोवली. नाट्य परिषद , शाखा मिरजच्या त्या कार्यरत सदस्या  आहेत. या शिवाय मिरजेच्या नावाजलेल्या , " आदर्श शिक्षण मंडळ " या शैक्षणिक संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत.
                   त्यांची दोन्ही मुले , चि. उन्मेष आणि चि. सौ. मुग्धा , हे दोघे ही डाॅक्टर आहेत. चि. उन्मेष पुण्यात आणि चि. सौ. मुग्धा पुरंदरे मुंबईत ,आपापल्या व्यवसायात व्यस्त आहेत. पतिराज डाॅ. वसंत करमरकर यांची मेडिकल प्रॅक्टीस, मिरजेत आज ही जोरात चालू आहे.
                    सर्व कौटूंबिक जबाबदार्‍या उत्तम रीतीने  सांभाळून, जिद्दीने आपला व्यक्तीगत विकास करून घेणार्‍या ,डाॅ. सौ. विनीता करमरकर वहिनींना आणि डाॅ. वसंत करमरकर यांना, पुढील उदंड आणि निरामय आयुष्यासाठी  या लेखाचे माध्यमातून, भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment