Monday, 3 August 2020

केके...एक उत्साही व्यक्तीमत्व....

एखाद्या माणसाचं आयुष्य मोठ्या कष्टात जातं, परमेश्वर कृपेने केलेल्या कष्टाचं चीज होतं आणि " फिटे अंधाराचे जाळे , झाले मोकळे आकाश " अशी वेळ येते . पण त्याच वेळी, " जो आवडतो सर्वांना , तोचि आवडे देवाला " म्हणत, देव त्याला " आपल्या घरी " घेउन जातो.अशा अवघड  परिस्थितीतून गेलेल्या  माणसाची ,मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे अॅडव्होकेट ( कै. ) दत्तात्रय कुलकर्णी !
              अॅडव्होकेट श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना त्यांचे मित्र, " केके " या टोपण नावाने ओळखायचे. मी ही त्यांना त्याच नावाने ,ओळखत असे.
            केकेंचे मूळ गाव सावळज , ता. तासगाव , जि. सांगली. तिथे त्यांची वडीलोपार्जित शेती होती. पण कौटूंबिक वादात होती. त्यातून फारसे उत्पन्न मिळायचे नाही. घरात गरीबी पाचवीलाच पुजलेली असायची . केके केवळ अडीच वर्षांचे असताना, त्यांना व त्यांच्या भावंडांना ,सांगलीत एका अनाथालयात रहायला जावं लागलं. तेरा वर्षाचे होई पर्यंत  ते त्या अनाथालयात होते. शिक्षण ही चालू होतं . ते दहावीची बोर्डाची परिक्षा ,उत्तम मार्कांनी पास झाले. नंतर मिरजमध्ये त्यांच्या मावशीने, त्यांना आपल्या घरी आधार दिला. त्याच वेळी मिरजेतल्या एका मंगल कार्यालयात,  केके पडेल ते काम करून आपला उदर निर्वाह चालवायचे.
                 घरच्या जमिनीच्या तंट्यासाठी त्यांच्या वडीलांना सारखे वकीलांच्याकडे जावे लागायचे. वकील फी देण्यासाठी पैसे नसायचे. वडीलांनी केकेंना " तू वकील हो " असा सल्ला दिला. केकेंनी तो शिरोधार्ह मानला. सांगलीच्या लाॅ काॅलेज मध्ये अॅडमिशन घेतली. कार्यालयात दिवसभर काम करायचं ,त्यातूनच वेळ काढून लाॅ काॅलेज अटेंड करायचं , रहायला मावशीच्या घरी जायचं . थोडक्यात कसे ही करून वकील व्हायचेच ,या जिद्दीवर मिळेल तेव्हा  झटून अभ्यास करून, केके वकील झाले. एखादा माणूस एखाद्या ध्येयाने झपाटलेला असल्यास, अडचणींच्यावर मात करून, काय काय करू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे " केके " !
                वकील झाल्यावर केकेंनी, आपले जमिनीचे कौटूंबिक आणि इतर सर्व वाद ,कायद्याच्या मार्गाने आणि सामोपचाराने सोडविले. आपल्या हक्काची वडीलोपार्जित जमीन ,स्वतःच्या कब्जात मिळवली. त्या नंतर वकीली आणि शेती दोन्ही करायला सुरवात केली.
                आर्थिक दृष्ट्या ,थोडे बरे दिवस दिसायला लागल्यावर, त्यांनी मिरजेत एका अपार्टमेंटमध्ये ,स्वतःचा फ्लॅट खरेदी केला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे लग्न ठरविले. त्यांना डाॅक्टर पत्नी मिळाली. डाॅ. दीप्ती सांभारे ,डाॅ. सौ. दीप्ती कुलकर्णी झाली. छान संसार चालू होता. संसारवेलीवर चि. मनवा नावाचे गोड कन्यारत्न फुलले.
                    साधारण २०१५ सालची गोष्ट. दोघे नवरा बायको लेह लडाखच्या ट्रिपला गेले. तिथले हवामान केकेंना सहन झाले नाही. डोकं प्रचंड दुखायला लागलं , उलट्या सुरू झाल्या आणि केके बेशुध्द झाले. बरोबरच्या लोकांच्या मदतीने, त्यांना तिथेच लेहच्या  हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलं गेलं. तिथे उपचारांची फारशी सोय नसल्यानं, त्यांना दिल्लीला विमानाने आणण्यात आलं. तिथे डाॅक्टरांनी,  केके " कोमात "  गेल्यानं, केस हाता बाहेरची असल्याचं सांगीतलं. मग केकेंच्या भाचीचे मिस्टर श्री. अभय आठवले ( मिरजेच्या गजानन मंगल कार्यालयाचे मालक ) हे दिल्लीला गेले . त्यांना अॅम्ब्युलन्स मधून मिरजेला घेऊन येऊ लागले. मिरजेच्या जवळ आले असतानाच ,केकेंची प्राणज्योत मालवली. 
                 स्वकष्टातून वर आलेले , चांगले आनंदाचे दिवस पाहण्याची स्वप्ने रंगविणारे केके,  वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी,  पत्नी आणि सात वर्षाच्या मुलीला मागे ठेऊन, अनंताच्या प्रवासाला निघून गेले .
                केकेंचे आयुष्य कष्टप्रद गेले. " एक एक रूपयाची किंमत मला माहिती आहे " , असे ते म्हणत .   स्वतःची कामे ते स्वतः करीत. अवलंबून राहण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता.  स्वतःच्या अडचणी बाजूला सारून ,दुसर्‍याला मदत करण्यात केके सर्वात पुढे असत.
                  आज रक्षा बंधनाचा आदला दिवस आहे. तिथीने केकेंचा " महानिर्वाण दिन " आज आहे.  अशा सर्वांशी प्रेमाने वागणार्‍या  व स्वतःच्या कष्टाने स्वतःचे " अढळ स्थान " निर्माण करणार्‍या , केकेंच्या पवित्र स्मृतिस वंदन करून, आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment