Wednesday, 29 July 2020

श्री. रामोळे ( भोई ) साहेब....आदर्श व्यक्तीमत्व...

प्रतिकूल परिस्थितीशी झुंजून स्वकर्तृत्वावर, अत्युच्य पदा पर्यंत पोहोचलेल्या एका व्यक्तीमत्वाची, मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. गंभीर रामोळे ( भोई ). ते मला नोकरीच्या काळात साहेब होते. त्या मुळे मी त्यांचा या लेखात, श्री. रामोळे साहेब असा आदराने  उल्लेख  करीत आहे.
             श्री. रामोळे साहेब यांच्या घरात ,पूर्वी कोणी विशेष शिकलेले नव्हते. आईच्या प्रेरणेने त्यांनी शिक्षणाचा पाया रचला. इंटर सायन्स म्हणजे आजची बारावी होई पर्यंत ,त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बरी होती. त्या नंतर कांही कौटूंबिक कलहा मुळे, घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. तरी पण इंटर सायन्सला उत्तम मार्क मिळाल्याने, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर ,पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ,  मेरीटवर अॅडमिशन तर घेतली. पण आर्थिक टंचाई मुळे, कधी कुणा कडून तर कधी कुणा कडून, पैसे उसनवारीने घेत त्यांनी अभियांत्रिकीची पहिली दोन वर्षे, पूर्ण केली. वेळेला अभ्यासाची पुस्तके घेण्यासाठी, पैसेच नसायचे. त्यावर त्यांनी एक तोडगा काढला. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालया शेजारीच, इन्स्टिट्युशन आॅफ इंजिनीयर्सचे आॅफिस आहे. तिथल्या लायब्ररीयनशी ओळख करून घेउन ,त्यांच्या कडून गोड बोलून  , अभियांत्रिकीची पुस्तके आणून, त्यांनी अभ्यास केला. पण शेवटी सर्व उपाय थकले आणि त्यांना अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला पैसे नसल्याने, प्रवेश घेता आला नाही. महाविद्यालय सोडावे लागले.
                नंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी या गावी, एक वर्षभर शाळेत शिक्षकाची नोकरी केली. तिथे त्यांना प्रत्येक महिन्याला  १२६ रू. पगार मिळायचा. काटकसर करून त्यांनी पैसे साठवले आणि मग पुढच्या वर्षी ,अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला अॅडमिशन घेतली. तिसरे आणि चौथे वर्ष त्या पुंजीवर कसे बसे ढकलले. चौथ्या म्हणजे शेवटच्या वर्षी, त्यांनी उत्तम अभ्यास करून ,यशस्विता संपादन केली. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत, ते स्थापत्य अभियंता झाले. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.
                  अभियंता झाल्यावर त्यांच्या उत्तम यशस्विते  मुळे ,त्यांना सात ठिकाणी नोकरीसाठी बोलावणे आले. सर्व ठिकाणी चौकशी करून ते शेवटी, पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता पदावर हजर झाले. त्या नंतर मात्र श्री. रामोळे साहेबांनी,  मागे वळून पाहिले नाही. जिथे जिथे त्यांचे पोस्टिंग झाले ,त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे आणि जिद्दीने काम करून, वरिष्ठांची नेहमीच वाहवा मिळविली.
               आपल्या कामाच्या व कार्यक्षमतेच्या जोरावर, त्यांना  प्रमोशन  मिळत मिळत शेवटी ते मुख्य अभियंता पदावरून ,सेवा निवृत्त झाले. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांच्या उत्तम कामा मुळे, उगीचच बदल्या झाल्या नाहीत.  उलट कांही बदल्यांचे वेळी, स्थानिक नेते तुम्ही जाऊ नका, अशा विनंत्या करीत. नोकरीत असताना त्यांनी " अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट " ,या विषयाचे ट्रेनिंग घेतले होते. त्याचा त्यांनी सर्व ठिकाणी सदुपयोग करून, उत्तम काम केले व हाता खालच्या लोकांचे कडून, करवून ही घेतले. केलेल्या उत्तम कामा बद्दल आणि निष्कलंक सेवे बद्दल , महाराष्ट्र शासनाने श्री. रामोळे साहेबांना, वेळो वेळी  सन्मानित केले आहे. हा दुर्मिळ योग आहे.
                श्री. रामोळे साहेबांचा मुलगा ,चि. अभिजित , डाॅक्टर व्हावा ,अशी त्यांची इच्छा होती. ती त्याने आपल्या कर्तृत्वावर पूर्ण केली. ही आनंदाची आणि  अभिमानाची बाब आहे.
                  श्री. रामोळे साहेब व त्याच्या पत्नी सौ.शशिकला वहिनी,  नाशिकमध्ये आपला मुलगा , सून आणि नातवंडे यांच्यासह ,त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात, आनंदाने कालक्रमणा करीत आहेत. आज काल आई वडील आणि मुले, एकत्र असण्याचे योग फार कमी दिसतात. श्री. रामोळे साहेब त्या ही दृष्टीने भाग्यवान आहेत. श्री. रामोळे साहेबांना आणखी दोन मुली आहेत. त्या ही उच्च शिक्षीत असून ,विवाहा नंतर आपापल्या घरी सुस्थितीत आहेत.
                प्रतिकूल परिस्थितीवर  जिद्दीने मात करून, स्वकर्तृत्वावर अत्युच्च पदा पर्यंत गेलेल्या, श्री. रामोळे साहेबांना आणि सौ. वहिनींना , या लेखाचे माध्यमातून भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment