Sunday, 19 July 2020

श्रीमति कालिंदी देशमुख...आमच्या " बाई "...

आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, त्यांचे नाव आहे ,श्रीमति कालिंदी मधुकर देशमुख , वय ९१ वर्षे फक्त !  श्रीमति कालिंदी यांना ओळखणारे , सर्वजण त्यांना " बाई " म्हणतात ! आपण ही त्यांना" बाई " असेच म्हणू !
              बाईंचे वडील कै. प्रद्युम्नाचार्य वरखेडकर,  हे पंढरपुरच्या उत्तराधी या वैष्णव पंथीय मठाचे मठपति ! घरात कडक सोवळे ओवळे ! घरात अग्निहोत्र असायचे !भोजनात कांदा लसूण वर्ज्य ! घरात पाण्याचा वापर फक्त नदी किंवा आडाच्या पाण्याचाच असे  ! नळाचे पाणी वर्ज्य ! घरात संभाषणाची भाषा संस्कृत ! अगदी कारण परत्वे, कानडी किंवा मराठी भाषेचा वापर व्हायचा ! अशा  कर्मठ वातावरणात बाईंचे लहानपण गेले.
                  बाईंच्या वडीलांचे म्हणजे प्रद्युम्नाचार्यांचे एक शिष्य ,जामखेडला ( जिल्हा अहमदनगर ) येथे वास्तव्याला होते. त्यांचे आडनाव देशमुख . देशमुख घराणे मुळचे शैव पंथीय . पण उत्तराधी मठाचे शिष्यत्व पत्करल्याने ,घरात वैष्णवी वातावरण .आपल्या गुरूंची म्हणजे प्रद्युम्नाचार्यांची मुलगी ,आपल्या घरात लग्न होउन आली तर ,आपले घराणे पवित्र होईल अशी त्यांची भक्तीपूर्ण समजूत ! अशा प्रकारे ,बाईंचे देशमुख घराण्यात पदार्पण करण्याचा योग आला.
                    लग्नाचे वेळी बाईंचे म्हणजे नव वधूचे वय होते १२ किंवा १३ वर्षे ! वर मधुकर देशमुख  यांचे वय होते १५ वर्षे !  थोडक्यात हा " बालविवाह " होता. बालविवाहाला त्या भागात मान्यता नसल्याने ,हा विवाह कर्नाटकात पार पाडण्यात आला. अशा तर्‍हेने बाईंचा प्रवेश वरखेडकरांच्या घरातून ,देशमुखांचे घरात १९४२ साली झाला.
             देशमुखांच्या घरात बाईंना त्रास अजिबात झाला नाही. उलट आपल्या गुरूंची मुलगी आपल्या घराण्यात आल्याने ,त्यांचे कौतूकच झाले. बाईंचे वय लहान असल्याने लग्ना नंतर, त्या बरेच दिवस माहेरीच होत्या. त्यांचे मिस्टर श्री. मधुकरराव देशमुख ( त्यांना सर्वजण भाऊ म्हणत ),लग्नाचे वेळी शिकतच होते.  लग्ना नंतर सुध्दा ते पुण्याला व कांही दिवस अहमदनगरला, शिकायला होते. जामखेडला भरपूर शेतीवाडी , देशमुखांच्या गढी वरचा प्रशस्त वाडा होता. आपला एकूलता एक मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे , घरच्या ऐश्वर्यावर त्याने  लक्ष ठेवले पाहिजे, असे भाऊंच्या वडीलांना वाटले.  १९४५ साली आपल्या  वडीलांच्या आदेशा वरून शिक्षण सोडून ,भाऊ  जामखेडला परतले. बाई ही त्याच सुमारास जामखेडला आल्या. 
                  भाऊ  शिक्षणाच्या निमित्ताने जामखेड बाहेर असताना, कम्युनिस्ट विचार सरणीच्या लोकांशी त्यांचा  संबंध आला होता. ती विचार सरणी त्यांना भावली. ते नास्तिक विचारांचे बनले. पण आपली विचार सरणी ,त्यांनी आस्तिक विचारांच्या आपल्या पत्नीवर म्हणजे बाईंच्यावर ,कधी ही लादली नाही. जामखेडला आल्यावर भाऊंनी, आपल्या शेतीवाडीवर लक्ष ठेवण्या बरोबरच, सामाजिक कार्याला सुरवात केली. गावात शिक्षण संस्था उभारली , वाचनालयाची सोय केली. त्या काळी जोमात असलेल्या,  हैदराबाद मुक्ती चळवळीला मदत केली. या सर्व कामात बाईंनी, भाऊंना सर्वार्थाने साथ दिली. दोघांचा संसार छान एकोप्याने झाला.
           दोघांच्या संसारवेलीवर पाच फुले फुलली. चार मुले व एक मुलगी. त्यांचा दोन नंबरचा मुलगा श्री. उध्दव, जामखेडलाच त्यांचे सोबत रहात असे. त्याचे लग्न १९७६ साली झाले. नवीन सून घरात आली. आता आपली घरात लुडबूड नको .नवीन दांपत्याला मोकळीक असावी. या विचाराने मुले नको नको म्हणत असताना, भाऊ आणि बाई आपल्या जामखेड मधील शेतावर ,आनंदाने रहायला गेले. एक प्रकारचा स्वानंदासाठी स्विकारलेला वानप्रस्थाश्रमच म्हणा ना ! तिथे ते दोघे १९९५ पर्यंत आनंदात राहिले. १९९५ साली भाऊंचे निधन झाले.
 तो धक्का बाईंनी आपल्या मुलांच्या सहकार्याने सोसला. 
                बाईंची मुले उच्च शिक्षीत आहेत. सर्वात मोठा मुलगा श्री. अनंत,  कार्यकारी अभियंता पदावरून  सेवानिवृत्त झालेला आहे. दोन नंबरचा मुलगा श्री. उध्दव जामखेडला आपली वडीलोपार्जित शेती पाहतो. तीन नंबरचा  मुलगा श्री. अरूण आणि पाच नंबरचा मुलगा मुलगा श्री. लक्ष्मीकांत , हे दोघे महाराष्ट्र बॅंकेतून उच्च अधिकारी पदा वरून, सेवा निवृत्त झालेले आहेत. मुलगी सौ. वैजयंती , श्री. मोहनराव बुवा या अभियंता उद्योजकाची पत्नी आहे. सर्वजण आपापल्या जागी सुस्थितीत आहेत. बाईंना परतवंडे ही झालेली आहेत.                                 सर्वजण बाईंची मना पासून काळजी घेतात.
                वयोपरत्वे बाईंना कांही कांही शारीरिक व्याधी त्रास देतात. पण मुले  , सुना आणि मुलगी , जावई यांच्या सहकार्याने त्या जास्तीत जास्त समाधानात राहण्याचा ,प्रयत्न करतात. कांही वेळा जमतं कांही वेळा नाही. दोष त्यांचा नाही. वयाचा आहे.
                  अशा या जिथे जातील तिथे अॅडजस्ट होण्याचा प्रयत्न करणार्‍या ,९१ वर्षाच्या बाईंना उदंड , उत्तम आणि निरामय आयुष्य लाभो ,ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment