Sunday, 20 September 2020

चि. आदित्य..." पुत्र व्हावा ऐसा गुंडा....."

चि. आदित्य दीक्षित , चार्टर्ड अकाऊंटंट , डेप्युटी जनरल मॅनेजर , महिंद्रा आणि महिंद्रा , नाशिक प्लान्ट ! माझा मुलगा ! समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे " पुत्र व्हावा ऐसा गुंडा , ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ". येथे गुंडा म्हणजे कर्तृत्ववान ,असा अर्थ अपेक्षित आहे. चि. आदित्यला तो नक्कीच लागू पडतो आहे.
               चि. आदित्य हा एक शांत मुलगा आहे. तो समोरच्याचे म्हणणे, अतिशय शांतपणे ऐकून घेतो. कामाचा किंवा कोणत्या ही गोष्टीचा ताण न घेता, तो आपले काम, अतिशय शांतपणे करीत असतो. हे त्याचे खास असे स्वभाव वैशिष्ठ्य आहे. त्याला पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा घरात असणे ,खूप खूप आवडते. त्याच्या लहानपणी आम्ही घरी, पामेरियन कुत्रा पाळला होता. सध्या आम्ही फ्लॅट मध्ये राहतो. फ्लॅटमध्ये राहून आपल्यामुळे इतरांना त्रास नको , म्हणून त्याने आपली प्राणी प्रेमाची आवड, बाजूला ठेवली आहे.
               चि. आदित्य मिरजला " विद्यामंदिर प्रशालेत " शिकत असताना, त्याने वक्तृत्व स्पर्धेत भरपूर बक्षिसे मिळवली होती. तो ज्या ज्या स्पर्धेत भाग घेत असे, तिथे त्याचा हमखास नंबर यायचाच.  त्याने " महाराष्ट्र टाईम्स " तर्फे होणार्‍या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेउन ,तिथे ही पारिपोषिक मिळविले होते , ही एक फार मोठी आनंदाची बाब आहे.
               चि. आदित्य बी. काॅम. करत असतानाच ,सी. ए. करीन असे म्हणत होता. सी.ए. हा कोर्स अवघड आहे. त्या पूर्वी तू बी. काॅम. झालास तर, तुझ्या हातात एक डिग्री असेल. बी. काॅम. नंतर तू सी.ए. कर, असा सल्ला मी वडीलकीच्या नात्याने, त्याला दिला. त्याने ही तो ऐकला. तो सांगलीच्या चिंतामणराव काॅलेज आॅफ काॅमर्स मधून ,प्रथम श्रेणीत बी. काॅम . झाला . नंतर सी. ए. करण्यासाठी तो पुण्याला गेला.
                सी. ए. झाल्यावर त्याने खासगी प्रॅक्टीस करण्या ऐवजी ,नोकरीचा पर्याय निवडला. तो मुंबईला कॅम्पस इंटरव्ह्यु मधून, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीत  सिलेक्ट झाला. तो किस्सा ही ऐकण्या सारखा आहे. दीडशे फ्रेश सी. ए.ना महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने, इंटरव्ह्यूला बोलावले होते. सुरवातील पंधरा पंधरा सी. एं . चा एक ग्रुप, असे दहा ग्रुप करून, ग्रुप डिस्कशन झाले. त्यात प्रत्येक ग्रुप मधील, एकच कॅन्डिडेट निवडण्यात आला. याचा अर्थ पहिल्या फेरीत, संख्या दीडशे वरून एकदम दहावर आली. या दहा कॅन्डिडेट्सचा पर्सनल इंटरव्ह्यू झाला. त्यातून फक्त तीनच सी.ए. महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने, निवडून घेतले. त्यात चि. आदित्यचा समावेश होता. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
                    आपल्या ज्ञानाच्या आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाच्या जोरावर ,तो आज त्याच कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.
                  तीन वर्षापूर्वी, एका अखिल भारतीय कंपनी तर्फे , भारतातील उत्तम काम करण्यार्‍या, शंभर सी. एं.चा  राजधानी दिल्ली येथे, केंद्रिय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार  झाला .त्यात चि. आदित्यचा समावेश होता , ही अभिमानास्पद बाब आहे.
                   त्याचा प्रेमविवाह आहे. त्याची पत्नी सौ. रमा, सी. एस. ( कंपनी सेक्रेटरी ) आहे. ती स्वतःचा व्यवसाय करते. त्या दोघांना चि. निषाद हा मुलगा आहे. तो नाशिकमध्ये " विस्डम हाय " या आय.सी. एस. सी. बोर्डाच्या शाळेत ,सातवीत शिकत आहे.
                ते तिघे व आम्ही दोघे म्हणजे मी व माझी पत्नी सौ. रजनी, आम्ही नाशिकमध्ये एकत्र राहतो. आजकाल हे दुर्मिळ आहे. पण आम्ही त्या बाबतीत नशिबवान आहोत. 
                अशा या आमच्या गुणवान , कीर्तिमान , सतशील ,प्रेमळ  सुपुत्राला , चि. आदित्यला ,परमेश्वराने उदंड , निरामय आयुष्य द्यावे व त्याच्यावर सर्व सुख समाधानांचा वर्षाव करावा , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment