Saturday, 26 September 2020

कै. रूक्मिणीबाई कृृष्णाजी अथणीकर , माझ्या सासूबाई.....

कै. रूक्मिणीबाई कृष्णराव अथणीकर ! माझ्या सासूबाई ! त्या अत्यंत सकारात्मक जीवन जगल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात ,परमेश्वराने कांही त्रुटी ठेवलेल्या असतात. पण त्या त्रुटींचा विचार न करता, परमेश्वराने जे चांगले दिलेले आहे त्यांचा आनंद मानून , आनंदी व सकारात्मक जीवन कसे जगावे ,याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी आमच्या समोर ठेवला.
                  त्यांचा जन्म सन १९१८ सालचा. माहेर बेळगाव जवळचे काकती . माहेरचे आडनाव काकतीकर कुलकर्णी. वडील शिक्षणाधिकारी. मुलींनी शाळेत जाण्याची पध्दत नसल्याने, त्यांना शिकवायला घरी शिक्षक येत असे. घरी एकूणच कर्मठ वातावरण.  त्या काळच्या  पध्दती प्रमाणे त्यांचे लग्न ,१४ व्या वर्षी झाले आणि त्या  " कु. कृष्णाबाई गंगाधर कुलकर्णी " च्या  " सौ. रूक्मिणीबाई  कृष्णराव अथणीकर " झाल्या. सासर मिरज. सासरच्या घरी वातावरण, त्या मानाने सुधारकी विचारांचे. त्यांच्या सासूबाईंनी त्यांना ,आपल्या मुली प्रमाणे वागविले.
                माझ्या सासूबाईंना बरेच नातेवाईक, मामी म्हणायचे व माझ्या सासर्‍यांना नाना म्हणायचे. मी या लेखात त्यांचा तसाच उल्लेख, येथून पुढे करीत आहे.
                नाना, माझे सासरे त्या काळी, शासकीय नोकरीत अभियंता होते. त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या होत. नाना सुधारकी विचाराचे असल्याने ,बॅंकेत जाताना किंवा बाजारात जाताना ते आपल्या पत्नीला ,म्हणजे मामींना  आपल्या बरोबर नेत. त्या मुळे बाह्य जगातील सार्वजनिक व्यवहारांची, मामींना चांगली जाणीव आणि कल्पना होती.
                   मामींचा स्वभाव जरा खर्चिक होता. नवीन साड्या वेळोवेळी खरेदी करणे , घरात सर्वांच्यासाठी कांही ना कांही नवीन खरेदी करणे, त्यांना आवडायचे. नाना अभियंता असल्याने ,आर्थिक चणचणीचा प्रश्नच नव्हता. आपल्याकडे कोणी आल्यास ,त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ लक्षात ठेउन आवर्जून करून घालणे, मामींना मना पासून आवडायचे. कोणता ही पदार्थ तयार करताना, तो उत्तमच झाला पाहिजे ,अशी त्यांची खासीयत होती. आलेल्या पाहूण्यांना भेटी दाखल कांही वस्तू किंवा कापडचोपड देउन,  सन्मान करणे हे त्यांना आवडायचे. 
                    १९६२ सालच्या भारत चीन युध्दाचे वेळी,  स्वतः विविध पदार्थ तयार करून ते विकून, त्यातून आलेला पैसा,  " भारतीय संरक्षण निधी "ला त्यांनी दिला होता. १९६७ साली झालेल्या कोयना भूकंपाचे वेळी, त्या नानांचे बरोबर कोयनानगरला होत्या. त्या वेळी अंगावर घराचे दगड पडल्याने, त्यांना फ्रॅक्चर ही झाले होते. पण त्या काटक असल्याने, या शारीरिक त्रासातून लवकरच बाहेर पडल्या.
                   नानांचे म्हणजे माझ्या सासर्‍यांचे निधन झाले ,त्या वेळी त्या ५३ वर्षांच्या होत्या. त्यानंतर कांही वर्षे, त्या मिरजेत एकट्या रहात होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी, त्या चालताना पडल्या.  नंतर वर्षभर त्या अंथरूणावर झोपून होत्या. पण सकारात्मक विचारांच्या जोरावर त्यांनी तो ही कालावधी, आपल्या तीन मुलींच्या सहकार्यांने पार केला. या कालावधीत त्यांनी कधी ही " मला हे काय झाले ? आता माझं कांही खरं नाही , मला जीवनाचा कंटाळा आलाय  ! " असे निराशाजनक उद्गार, कधी ही काढले नाहीत. जे वास्तव समोर येईल ते तात्काळ आणी आनंदाने स्वीकारणे ,हा त्यांचा स्वभाव विशेष होता. हे खूपच अवघड आहे. फार कमी लोकांना हे जमते.
                 त्यांना तीन मुली . थोरली मुलगी  आशा ही कोल्हापूरला , मधली शालीनी कर्नाटकात शिरगूर ( तालूका उगार ) , धाकटी माझी पत्नी रजनी मिरजेत, यांच्याकडे त्या आलटून पालटून रहात असत.  त्यांना  शिरगूर मध्ये राहणे आवडायचे. त्या मुळे जास्तीत जास्त काळ त्या तिथेच असत. तिन्ही मुलींच्या घरचे वातावरण वेगवेगळे होते. पण त्यांनी कुठल्या ही वातावरणांची एकमेकाशी  तूलना न करता , जिथे रहात असत तिथे त्या आनंदात व समाधानात रहात. आपल्यामुळे दुसर्‍याला त्रास होउ नये ,याची त्या अटोकाट काळजी घेत. हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. हे  सर्व गूण  दुर्मिळ आणि घेण्या सारखेच आहेत.
                   त्यांना कै. नानांच्या नंतर  शासकीय " फॅमिली पेन्शन " असल्याने, त्या शेवट पर्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत्या.
                 अशा या मामींचे म्हणजे माझ्या सासूबाईंचे सन २००९ साली, वयाच्या ९२ व्या वर्षी वृध्दापकाळामुळे निधन झाले. एका सकारात्मक, आनंदी , प्रेमळ व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड लुप्त झाले. आज त्या हयात असत्या तर १०२ वर्षांच्या असत्या.
          त्यांच्या पवित्र स्मृतिस हा लेख अर्पण करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment