Tuesday, 1 September 2020

अॅडव्होकेट अजय रामचंद्र कुलकर्णी , कारदगेकर , माझे जावई...

अॅडव्होकेट श्री. अजय रामचंद्र कुलकर्णी , कारदगेकर , हे माझे जावई आहेत . ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आज मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे. मी त्यांना अजयराव असे म्हणतो. त्या मुळे या लेखात मी त्यांचा ,तसाच उल्लेख करीत आहे.
                 अजयराव म्हणजे देखणा माणूस ! गोरापान रंग , मध्यम उंची , राहणी एकदम टिपटाॅप ! त्यांनी एके काळी भरपूर व्यायाम करून, आपले शरीर कमावलेले आहे. ते अतिशय धार्मिक आहेत,पण कर्मकांड त्यांना विशेष आवडत नाही . त्यांना आपल्या वयोवृध्द आई ,वडीलांच्या बद्दल अत्यंतिक प्रेम आणि जिव्हाळा आहे.  त्यांच्या काळजीपोटी, ते रोज फोन करून, त्यांची ख्यालीखुशाली न चुकता विचारतात . त्यांची स्वतःची वडीलोपार्जित शेती आहे. त्यांना शेतीची आवड आणि शेतीतल्या सर्व प्रकारच्या बारकाव्यांची  जाण आहे . हे त्यांचे लक्षात घेण्या सारखे वैशिष्ठ्य आहे.
                   माझ्या मुलीला प्रथमच त्यांच्याकडे दाखवलं आणि तिथेच लग्न ठरलं. हा एक वेगळा आणि आनंदाचा योगायोग आहे.
                  श्री. अजयराव कोल्हापुरात आपला वकीली व्यवसाय करतात. ते सर्व प्रकारचे खटले चालवितात.   त्यातल्या त्यात फौजदारी खटले चालविण्यात, त्यांचा हातखंडा आहे.  त्यांच्या वकीली अनुभवाचे व विशेषतः फौजदारी खटल्यांचे  किस्से , ऐकण्या सारखेच असतात. अजयराव खूप कमी बोलतात. पण त्यातल्या त्यात तुमची चांगली ओळख असेल, वकीली आणि कोर्ट हा विषय निघाला  असेल, तर ते  मोठ्या उत्साहाने  बोलतात . अशा वेळी त्यांचे सुगम बोलणे, ऐकतच बसावे असे वाटते.
                   त्यांचे मूळ गाव कारदगा , ता. चिक्कोडी , जि. बेळगाव , कर्नाटक राज्य. कारदगा कोल्हापूर पासून अंदाजे ,तीस किमी अंतरावर आहे. तिथे त्यांचा मोठ्ठा वाडा आहे व शेतीवाडी आहे. त्यांचे आई वडील सहसा तिथेच असतात. कंटाळा आला तर कोल्हापुरला ही येतात. अजयराव मात्र सुट्टी मिळाली की आपल्या गावी जाउन ,शेतीवाडीच्या कामात लक्ष घालतात.
                     आपले घर  स्वच्छ आणि नीटनेटके असावे या दृष्टीने, गरज असेल तेंव्हा ,ते आपला आब बाजूला ठेउन, आवश्यक ती सर्व मदत करतात. त्यांचे एकत्र कुटूंब आहे. अजयरावांचे कुटूंब  व त्यांचा थोरला भाऊ, वहिनी , पुतण्या , पुतणी  असे सर्व कुटूंबिय एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. हे आजच्या काळात दुर्मिळ आहे.
                   अजयराव आपल्या आई वडीलांची जशी काळजी घेतात ,तशी आमची दोघांची ही घेतात. ते मनाने तसे खूप हळवे आहेत. त्यांना मित्र परिवार आहे, पण तो मोजकाच आहे. व्यावसायीक पार्ट्या करणे त्यांना फारसे आवडत नाही. कुणी पार्टीसाठी बोलावले तर ,ते मन मोडायचे नाही म्हणून हजर राहतात .तिथे ते सर्वांच्यात मिळून मिसळून असतात असे जाणवते ,पण प्रत्यक्षात ते  तेथील वातावरणा पासून मनोमन अलिप्त असतात. ते संपूर्ण शाकाहारी आहेत.
                 असे दुर्मिळ व्यक्तीमत्वाचे जावई मिळणे ,हे भाग्याचे लक्षण आहे , असे आम्हा दोघांचे स्पष्ट मत आहे.
                   जावई  असून  मुला  प्रमाणे  वागणार्‍या ,
श्री. अजयरावांना भरभरून शुभाशिर्वाद देतो . तसेच त्यांचे सर्व मनोरथ लवकरात लवकर पूर्ण होवोत, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment