Saturday, 26 September 2020

कै. कृृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर....माझे सासरे.

कै. कृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर , माझे सासरे ! गोरापान रंग , बर्‍या पैकी उंची , शरीर थोडेसे राजस , चेहर्‍यावर अत्यंत सात्विक भाव , स्वभावानं तसे शांत , समाधानी वृत्ती  , विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी सदैव तत्पर , असे त्यांचे थोडक्यात वर्णन करता येईल.
                   त्यांना सर्वजण " किशानाना किंवा किशामामा " म्हणत. मी त्यांचा उल्लेख ,या लेखात " नाना " असा करीत आहे.
                   अथणीकर नानांचे घराणे म्हणजे वेदविद्यापारंगत ! त्यांचे अजोबा, कर्नाटकातल्या संकेश्वर पीठाचे शंकराचार्य होते. त्यांचे काका श्री. वामनराव अथणीकर , वेदशास्त्रसंपन्न  वेदमूर्ति होते. त्यांचे वडील श्री. शंकर अथणीकर , त्या काळचे " ताईत " मंत्रून देणारे व मोठे श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्याकडे दोन सोनार नोकरीला होते. एक " सोन्याचा  ताईत " व दुसरा " चांदीचा ताईत " बनवत असत. अशा या संपन्न घराण्यातला ,अथणीकर नानांचा जन्म होता. पूर्वीच्या म्हणी प्रमाणे, " कित्येक पिढ्या बसून खातील ", इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती !
                   अशा वेदशास्त्र संपन्न आणि आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न घराण्यात जन्म होउनही, त्यांनी स्वकर्तृत्वावर पुढे येण्यासाठी ,अभियांत्रिकी शिक्षणाची वाट चोखाळली. ते उत्तम अभियंता झाले. त्यांनी शासकीय नोकरी करण्यास सुरवात केली.
                   दुसर्‍या जागतीक महायुध्दाचे काळात, म्हणजे सन १९४१ - ४२ साली ,ते पाकिस्तान व अफगाणीस्तानच्या बाॅर्डरवर असलेल्या क्वेट्टा येथे ,रोड कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी शासकीय बदलीवर गेले. क्वेट्ट्याला त्या काळी ,भूकंप प्रवण क्षेत्र मानले जायचे.  नोकरीच्या निमित्ताने बदलीवर इतक्या लांब व धोक्याचे जागी जाण्याचे त्यांचे धाडस, वाखाणण्या सारखेच होते. दुसरा एखादा ,मी बदलीवर एवढ्या लांब जाणार नाही , मी नोकरी सोडतो असे म्हणून ,घरी बसला असता. पण नानांनी आपले कर्तव्य श्रेष्ठ मानून ,आपली पत्नी प्रेग्नंट असताना तिकडे जाण्याचे जे धाडस केले ,ते नक्कीच वाखाणण्या सारखेच आहे.
                नानांचे लग्न त्या काळच्या पध्दती प्रमाणे, वयाच्या १७ व्या वर्षी झाले. ते त्या वेळी शिकत होते. त्या काळी त्यांनी ,आपल्या पत्नीला बरोबरीच्या नात्याने वागविले. बॅंकेत जाताना , कांही महत्वाच्या घरगुती कामासाठी बाहेर जाताना, ते आपल्या पत्नीला सर्व व्यवहार समजावून सांगून , विश्वासात घेत. आपल्या बरोबरीने बाहेर ही नेत. ते सुधारक मतांचे होते.
                   नानांना तीन मुली . आपल्याला मुलीच आहेत म्हणून ,त्यांनी कधी ही मुलींना कमी लेखले नाही. मुलींनी आरामात पण व्यवस्थित शिकावं. आपले संसार  आनंदाने व समाधानाने करावेत ,अशी त्यांची माफक अपेक्षा असे .
                   एखादा विद्यार्थी आर्थिक अडचणीत असेल तर ,ते त्याला मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देत. इतर वेळी त्यांचा स्वभाव काटकसरीचा होता . पण अशा अडल्या नडलेल्यांना  मदत करण्यासाठी , ते कधी ही मागे हटले नाहीत.
                     नोकरीच्या निमित्ताने, ते बाहेरगावी असत . पण मेच्या सुट्टीत ते आपल्या गावी म्हणजे, मिरजला आवर्जून येत. ते मिरजेला आले की, त्यांची भावंडेही आवर्जून जमत. त्यांनाचार बहिणी व एक भाउ होता. नाना , मे च्या सुट्टीत नातेवाईक व शाळेतले जुने मित्र या सर्वांना एकत्र बोलावून, आमरसपुरीचे जेवण करून , सर्वांना आपल्या सहवासाचा आनंद  देत.  तसेच नातेवाईक व मित्र यांच्या सहवासाचा मनसोक्त आनंद,  ते त्या सर्वांना आपल्या बदलीच्या गावी ,आवर्जून बोलावून घेत. अशी त्यांची आनंदी व समाधानी वृत्ती होती.
                 सन १९६२ साली म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी, त्यांना ब्लड प्रेशरचा व त्या अनुषंगाने ह्रदय विकाराचा ,त्रास जाणवू लागला. त्या काळी जे वैद्यकीय उपचार उपलब्ध होते, ते त्यांनी जरूर केले. मुख्य म्हणजे आपल्या आहार विहारावर नियंत्रण ठेवले.
                 शेवटची अंदाजे दहा वर्षे ते कोयना प्रकल्पावर डेप्युटी इंजिनीयर होते. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करण्यावर ,त्यांचा कटाक्ष होता. दि. ४ जानेवारी १९७१ या दिवशी, त्यांचे एक्झीक्युटिव्ह इंजिनीयर या पदावर, प्रमोशन झाल्याची आॅर्डर आली .  त्याच दिवशी संध्याकाळी अंदाजे ५ वाजता, आॅफिसात काम करीत असताना खुर्चीत बसलेल्या अवस्थेत, वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे ह्रदय विकाराने प्राणोत्क्रमण झाले. एक सत्शील, आनंदी व समाधानी  आत्मा अनंतात विलीन झाला.
                     कै. कृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर ,या माझ्या सासर्‍यांच्या स्मृतीस, मनोभावे  त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment