Friday, 11 September 2020

चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी...माझी सुकन्या...

चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी . माझी सुकन्या ! जिने मला भरभरून आनंद दिला. लहानपणी तिला दोन नावे होती. शाळेत संपदा आणि घरी कीर्ती ! मला " नाट्यसंपदा " या नाट्य संस्थेची नाटके खूप आवडायची , म्हणून  " संपदा " आणि  कीर्ती शिलेदार यांचा आवाज खूप आवडायचा, म्हणून  " कीर्ती " ! शाळेतल्या तिच्या मैत्रिणी तिला " संपदा " म्हणत आम्ही घरी तिला  " कीर्ती " म्हणत असू .
                कीर्तीचा जन्म मिरजेचा. मी त्या वेळी नाशिकला नोकरीत होतो. त्या वेळी फोन्स नव्हते. त्या मुळे मला पोस्टाने आलेल्या पत्राने ,तीन दिवसांनी ती जन्मल्याचे समजले . मी लगेच मिरजेला गेलो. तिचे पहिले  " दर्शन " मला आज ही स्मरते आहे. गोरापान रंग , तरतरीत नाक , दोन्ही हात दोन्ही कानांच्या बाजूला वर ठेवलेले , मऊशार दुपट्यात झोपलेली माझी " गोड मुलगी " , मला आज ही स्पष्ट दिसते आहे.
                कीर्ती लहान असताना  ,खूप बडबड करायची .मी तिला संस्कृत श्लोक म्हणायला शिकवत असे. ती तीन वर्षांची असताना, तिने भरपूर श्लोक पाठ म्हणून दाखवून ,खूप जणांची वाहवा मिळविली आहे.
                  लहान असताना तिने ,त्रिकालाबाधित सत्याचा शोध लावला होता. ती म्हणायची " माझं मला कळलं , आपलं आपण शाहणं व्हावं ". याचा अर्थ समोरचे दुसरे किंवा परिस्थिती, बदलण्याची वाट पाहू नये. आपणच आपल्यात बदल करून ,प्राप्त परिस्थितीशी जुळवून घ्यावं. लहानपणीची तिची ही विचारांची प्रगल्भता ,कधी कधी आम्हाला ही आश्चर्य चकीत करीत असे. तिच्या लहानपणी तिच्या मावस बहीणी, लिनू आणि तेजू ,यांच्या बरोबर ती खेळायची. तिघींचे त्या काळातले " गमतीचे खेळ " आज ही आठवले, तरी हसू येते. त्या तिघींची गट्टी आज ही तितकीच घट्ट आहे.
                 कीर्तीची बाराव्वी होई पर्यंत, आम्ही नाशिकला होतो. तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण, नाशिकच्या   " सीडीओ मेरी शाळेत " झाले. त्या नंतर तिने होम सायन्सला प्रवेश घेतला. ती बाराव्वी झाली आणि माझी, नाशिकहून सातारा येथे बदली झाली. त्या मुळे आम्ही सर्वजण, मिरजला आमच्या घरी शिफ्ट झालो. मिरज सांगलीत होम सायन्स शिकण्याची सोय नव्हती. त्या मुळे तिला आर्टसला जावे लागले. मिरजेच्या " कन्या महाविद्यालयात " ,तिचे पहिले आणि दुसरे वर्ष झाले . तिसर्‍या व शेवटच्या वर्षासाठी " संस्कृत " हा अवघड विषय, तिने निवडला. त्या विषयाची शिक्षणाची सोय सांगली मिरजेत नव्हती. तिने स्वतः घरी अभ्यास करून , " संस्कृत " या विषयात पदवी प्राप्त केली . ही बाब अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच आहे.
                    काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच, तिचे लग्न ठरले. तिला पहिल्यांदाच दाखविले आणि तिथेच लग्न ठरून, झाले ही ! अशा तर्‍हेने माझी लाडकी मुलगी कीर्ती, चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी , कारदगेकर , झाली.
                     सासरी गेल्या नंतर, ती तिथे इतकी छान रमली की ,ती " दीक्षितांची , कुलकर्णी " कधी झाली, ते समजलेच नाही. माहेरी आल्या नंतर तिच्या तोंडी ,तिच्या सासरच्या माणसांच्या बद्दलचा जिव्हाळा, सतत दिसून येत असे . आम्ही सर्वजण त्या मुळे सुखावून जात होतो. ही अतिशय आनंदाची व समाधानाची बाब आहे.
                    तिचे लग्न झाल्या पासून आज तागायत , ती अत्यंत समाधानात आहे. तिला एक मुलगा आहे. आमचे जावई श्री. अजयराव ,अत्यंत सज्जन आणि कोल्हापुरातले एक निष्णात फौजदारी वकील आहेत . तिच्या सासरची माणसे, अतिशय स्नेहपूर्ण असल्याने, ती आनंदात आहे. कोल्हापुरात त्यांचा मोठा व मोक्याच्या जागी फ्लॅट आहे. कीर्तीने मोजक्याच पण जवळच्या मैत्रिणी मिळविल्या आहेत . थोडक्यात आपली मुलगी सुखा समाधानात असल्याचे ,आम्हाला संपूर्ण समाधान आहे. हे दुर्मिळ आहे.
                     अशा या आमच्या लाडक्या,  देखण्या आणि वागायला अतिशय सौदार्हपूर्ण असलेल्या मुलीवर, म्हणजेच कीर्ती उर्फ चि. सौ. संपदावर , तिच्या कुटुंबावर परमेश्वराने सर्व सुखांचा वर्षाव करावा, तिला उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे, ही प्रार्थना करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment