Saturday, 12 June 2021

संघ कार्यकर्ता...मदतीला आलेला देवदूत !


माझ्या कानावर आलेला माझ्या स्नेह्यांचा एक वेगळा अनुभव,  नक्कीच ह्रदयस्पर्शी आहे. तो त्यांच्याच शब्दात कथन करीत आहे.

         मी विविध समाज माध्यमावर कार्यरत असतो. विविध प्रकारचे लेखन करीत असतो. त्यातून माझी बर्‍याच लोकांशी आभासी ओळख होत असते. ती कायम टिकते असे नाही. कांही लोकांशी मात्र या आभासी जगतातून जिव्हाळा निर्माण होतो. त्या संदर्भातील ही गोष्ट !

          सकाळी चहा आणि ब्रेकफास्ट संपवून, मी आळसात पेपर वाचत पडलो होतो आणि माझा फोन वाजला. नंबर वरून फोन कुणाचा ते समजत नव्हते. मी फोन घेतला. पलीकडून एक बाई बोलत होत्या. 

           त्या म्हणाल्या " माझी व तुमची ओळख नाही. मी सेवानिवृत्त शिक्षिका आहे. मला नात्याचे येथे कोणीही नाही. मी एकटीच असते. माझे वय ७५ वर्षांचे आहे. माझा भाऊ ७० वर्षांचा आहे. तो पुण्यात असतो. त्याला एक मुलगी आहे. ती परदेशात असते. माझ्या भावाची बायको व माझा भाऊ यांच्यात , नवरा बायको या नात्याने प्रेम व जिव्हाळा अजिबात नाही. दोघे ही महिनोन महिने एकमेकाशी बोलत ही नाहीत. माझ्या भावाची तब्बेत बरी नाही. त्याला पुण्यात एका हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले आहे. त्याची काळजी त्याची बायको घेत नसल्याने तो अनाथ झाला आहे. मी अशी वयोवृद्ध ! पण मी भावाची सेवा करू इच्छीते ! मला भावाला आपल्या या गावी आणावे अशी इच्छा आहे. त्याला पुण्यातून इकडे आणणे मला वैयक्तीक रीत्या आणि वयोपरत्वे शक्य होणार नाही. तरी तुम्ही मला मदत करा अशी मी तुम्हाला विनंती करते. तुम्ही समाज माध्यमावर विविध विषयावर लेखन करता. मी ते वाचते. त्या वरून तुम्ही मला मदत कराल अशी आशा वाटल्याने मी तुम्हाला ही विनंती करीत आहे. "

              प्रत्यक्ष ओळख ना पाळख ! समाज माध्यमावरची आभासी ओळख ! काय करावे असा मला प्रश्नच पडला. मदत करायची इच्छा तर होती. पण मनात शंकांचे काहूर माजले होते. मदत करायला जाउन आपल्याला पश्चात्ताप तर करावा लागणार नाही ना ! मी माझ्या स्नेही मंडळींशी या विषयावर बोललो. सर्वांचे एकमत होते. ओळख ना पाळख , कोण कुठल्या बाई , त्यांचा आजारी भाऊ ! मदत करायला जाल आणि नाही त्या लफड्यात अडकाल ! पण माझे मन हा सल्ला मानायला तयार नव्हते. 

                  माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले एक स्नेही आहेत. त्यांच्याशी या विषयावर बोललो. त्यांनी सर्व परिस्थिती समजावून घेतली त्या आजारी माणसाच्या बहीणीचा नंबर माझ्या कडून घेतला व पाहू काय करता येते , असे बोलून ते निघून गेले. एखादा दिवस मी अस्वस्थ होतो. पण नंतर मी तो विषय विसरून गेलो. 

                  आठ दिवसांनी मला त्या संघ कार्यकर्त्याचा फोन आला. आम्ही त्या आजारी माणसाला पुण्याहून येथे आणले आहे. एका चांगल्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे व त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मी हाॅस्पिटलचा पत्ता घेतला व प्रत्यक्ष तिथे गेलो. तिथे त्या आजारी गृहस्थांच्या जवळ त्यांची मला फोन केलेली बहीण हजर होती. मी त्या बहीणीला आज प्रथमच पहात होतो व भेटत होतो. 

               त्यांनी मधल्या काळात काय काय घडले ते मला सांगीतले. मी त्या संघ कार्यकर्त्याला बहीणीचा फोन नंबर दिला होता. त्याने त्या बहीणीला फोन केला. सर्व परिस्थिती समजावून घेतली. मग त्याने पुण्यातील संघ कार्यकर्त्याला फोन केला व हाॅस्पिटलमध्ये जाउन प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यास सांगीतले. तो कार्यकर्ता पुण्याच्या त्या हाॅस्पिटलमध्ये गेला. तो आजारी भाऊ आपल्या बहिणीकडे येण्यास तयार होता. तिथे त्याची आबाळ होत होतीच ! मग त्या संघ कार्यकर्त्याने त्या आजारी माणसाच्या पत्नीची भेट घेतली. आपल्या नवर्‍याने त्याच्या बहीणीकडे जाण्यास तिची कोणतीच अडकाठी नव्हती. डाॅक्टरांनी ही पेशंटला परगावी नेण्यास परवानगी दिली. हाॅस्पिटलचे बिल भागविण्यात आले. एक संघ कार्यकर्ता पेशंट बरोबर परगावी येण्यास तयार झाला. अशा प्रकारे सर्व जुळणी करून अम्ब्युलन्स मधून त्या आजारी भावाला आपल्या बहीणीच्या गावी आणण्यात आले. 

                 पंधरा वीस दिवसांच्या ट्रिटमेंट नंतर तो भाउ आपल्या बहीणीच्या घरी गेला आहे. तो चालू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याची बहीण त्याची सेवा करीत आहे व तो भाऊ ही समाधानात आपल्या बहीणी बरोबर रहात आहे. 

               अडचणीच्या वेळी परमेश्वरच तुमचा पाठीराखा असतो असे म्हणतात. परमेश्वर कोणाच्या रूपाने येउन मदत करेल ते सांगता येत नाही. या सत्यकथेत संघ कार्यकर्त्यांची साखळी त्या बहीण भावाच्या पाठीशी उभी राहिली. 

               ही सर्व गोष्ट ऐकीव आहे. मी माझ्या मगदुरा प्रमाणे मी ती विदित केली आहे. तुम्हा वाचकांच्या ह्रदयाला ती नक्कीच स्पर्श करेल अशी खात्री आहे.

No comments:

Post a Comment