Monday, 29 March 2021

श्री. सुनिल सानप ...एक प्रामाणिक यशस्वी व्यावसायीक.


 श्री. सुनिल सानप . "  एक यशस्वी व्यावसायिक

*************************************             नाशिक शहराचा " हार्ट आॅफ द सिटी " भाग कोणता असे विचारल्यास " रविवार कारंजा " असे कोणी ही नाशिककर चटकन् सांगेल. अशा रविवार कारंजा भागात गेल्या सत्तर ते पंचाहत्तर वर्षा पासून एक व्यवसाय तीन पिढ्या चालवीत आहेत. त्या व्यावसायिक दुकानाचे नाव आहे " सानप बंधू चिवडा आणि भेळ भत्ता " . सर्व सानप बंधू एक दिलाने हा व्यवसाय चालवतात. त्या सानप बंधूंच्या पैकी श्री. सुनिल सानप हे नाशिकमध्ये आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये राहतात. आज मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे. 

      श्री. सुनिलजी हे अतिशय साधे आणि सरळ स्वभावाचे गृहस्थ आहेत. ते माझ्या पेक्षा वयाने बरेच लहान आहेत. पण त्यांचे व्यक्तीमत्व पाहता क्षणी आदर वाटावा , जिव्हाळा वाटावा असेच आहे. आपल्याकडे माणसे अागत्याने व प्रेमाने यावीत , असा त्यांचा दिलदार, प्रेमळ स्वभाव आहे. ते वागायला अगदी टाईमशीर आहेत. दुकानात जाण्याची वेळ ते कधी ही चुकवत नाहीत. येण्याच्या वेळेत कामा प्रमाणे थोडाफार बदल होउ शकतो. 

         आपल्या दुकानात मिळणारा " चिवडा व भेळ भत्ता " एक नंबरचाच असला पाहिजे , त्याच्या गुणवत्तेत फरक पडू नये याची ते सर्वजण अत्यंतिक काळजी घेतात.  या साठी शक्य ते सर्व पदार्थ स्वतःच्या जागेत , ते व त्यांचे बंधू , वैयक्तीक लक्ष घालून तयार करतात. पूर्वीच्या काळी माणसांच्या मदतीने हे सर्व पदार्थ बनविले जायचे , आता काळा प्रमाणे बदलून त्यांनी यांत्रिकी करण केले आहे. 

           पूर्वी फक्त रविवार कारंज्यावर एकच दुकान होते पण आता " सानप बंधू चिवडा व भेळ भत्ता " अशी पाच दुकाने नाशिकच्या विविध भागात कार्यरत आहेत. श्री. सुनिल सानप व त्यांचे बंधू मिळून हा  दिवसे दिवस वाढणारा व्याप अतिशय कुशलतेने सांभाळतात. 

            श्री. सुनिलजी हे स्वतः काॅमर्स ग्रॅज्युएट आहेत. त्यांना या वडीलोपार्जित व्यवसाया पेक्षा आपण कांही तरी वेगळे करावे अशी इच्छा होती. पण वडीलांच्या अवेळी झालेल्या निधनाने व व्यवसायात काकांना मदतीची आवश्यकता असल्याने , त्यांनी स्वतःची महत्वाकांक्षा बाजूला ठेउन ते व्यवसायात आले व इथेच रमले ही ! वयाच्या १२ व्या वर्षा पासून ते आज तागायत या व्यवसायाची धुरा ते आपल्या बंधुंच्या सह , समर्थपणे सांभाळत आहेत. 

         व्यवसाय म्हटले की अनेक प्रकारच्या लोकांशी संबंध येतो. सर्वसाधारणपणे लोक व्यवस्थित असतात. पण कांही लोक मुद्दाम त्रास देतात. त्यांना एरवी शांत असणारे सुनिलजी अशा वेळी , त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्या शिवाय रहात नाहीत.

           श्री. सुनिलजींना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सर्वजण उत्तम शिकलेले व आपापल्या जागी व्यवस्थित आहेत. सौ. विद्या वहिनींची त्यांना समर्थ साथ आहेच !

          अशा या माझ्या जवळच्या स्नेह्यांना व सौ. विद्या वहिनींना उत्तम , निरामय दीर्घायुष्य लाभो , सुस्वभावी सून मिळो व त्यांच्यावर सुख , समाधान आणि आनंदाचा वर्षाव होवो , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment