Wednesday, 14 August 2019

कै. बी. एन. पाटील....मेरीकर संशोधक...

                    फोटोत दिसत आहेत , ते म्हणजे (कै.) बी. एन. पाटील. चारच दिवसा पूर्वी, त्यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ,नाशिक मध्ये निधन झाले. त्यांच्या नावा मागे (कै.) हा शब्द लिहीताना मनाला अनंत वेदना होत आहेत.
                  (कै.) बी. एन. पाटील हे ,मेरी ,या पाटबंधारे खात्याच्या अभियांत्रिकी  संशोधन संस्थेत, वैज्ञानिक होते. सायन्सचे पदवीधर ( B.Sc.) ! पण त्यांचे ज्ञान , हुषारी आणि कामाची निष्ठा पाहून, त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी पगारी रजा देउन, पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवले. त्या पदव्युत्तर  परिक्षेत, ( M.Sc .) त्यांनी उत्तम यश संपादन केले.
                  तिथून परतल्यावर ,त्यांनी अभियांत्रिकी संशोधन कार्याला ,पुनश्च  वाहून घेतले . आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून त्यांनी, एक विशिष्ठ प्रचारचे Grout material तयार केले. त्याचा उपयोग, कोयना धरणातील गळती बंद करण्यासाठी झाला. त्यांनी  संशोधनाने तयार केलेले ते Grout material ,काळाच्या कसोटीवर सिध्द झाले. या त्यांच्या संशोधनाला मान्यता देउन, त्यांचा गौरव करण्यासाठी , त्या वेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील, खास मेरी आॅफिसमध्ये आले आणि त्यांनी (कै.) बी. एन. पाटील यांचा यथोचित गौरव केला. हा दुर्मिळ मान ,मेरी मधील वैज्ञानिकाला, प्रथमच मिळाला. पुढे मेरीच्या इतिहासात असा दुर्मिळ मान मिळाल्याचे, आमच्या कुणाच्याच ऐकीवात नाही. (कै.) बी. एन. पाटीलांनी तयार केलेले Grout material ,पुढे "MERI GROUT " या नावाने ओळखले गेले. त्याचे "पेटंट"  मेरी या संस्थेस प्राप्त झाले. एखाद्या गोष्टीचे पेटंट मिळविणे , ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची बरीच पूर्तता करावी लागते. हे पेटंट मिळविण्यासाठी, (कै.) बी. एन. पाटील यांनी घेतलेले परिश्रम, अतुलनीय असेच आहेत. ही घटना आहे सन् १९७५ सालची. माझ्या माहिती नुसार मेरीला मिळालेले हे पहिले आणि शेवटचेच पेटंट ! मेरीच्या आजपर्यंतच्या ६० वर्षांच्या इतिहासात ,सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी अशी ही अद्वितीय घटना आणि त्या घटनेचे शिल्पकार होते ( कै.)  बी. एन. पाटील.
                  (कै.) बी. एन. पाटील हे शांत आणि सरळ स्वभावाचे गृहस्थ होते. आपण बरे आणि आपले काम बरे , असा त्यांचा स्वभाव होता. समोरचा किती ही वाकड्यात शिरला ,तरी ते स्वतः  सरळच वागायचे . शासकीय नोकरीतले छक्केपंजे ,त्यांना कधी समजले ही नाहीत आणि त्यांनी ते समजावून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही , इतक्या सरळ मनाचे ते होते.
                     नोकरीच्या कालावधीत ,त्यांच्या कांही अनपेक्षित ठिकाणी बदल्या झाल्या. पण आपली बदली रद्द करण्यासाठी ,त्यांनी कधी कुणापुढे पदर पसरला नाही. जिथे बदली झाली तिथे ते गेले आणि स्वाभिमानाने व प्रामाणिकपणे,  त्यांनी आपली सेवा दिली.
                       त्यांचे मूळ गाव, परभणी जिल्ह्यातले सेलू हे आहे. तिथे त्यांची शेतीवाडी आहे. पण मुलांचे शिक्षण उत्तम व्हावे या साठी , त्यांनी नाशिक हीच आपली कर्मभूमी मानली व ते शेवट पर्यंत नाशिक मध्येच राहिले.
                   चार दिवसापूर्वी त्यांचे निधन झाल्याची वार्ता ,मनाला खूपच धक्का दायक होती.
                त्यांच्या मागे वहिनी आणि तीन मुले आहेत. तीन ही मुले आपल्या आपल्या जागी उच्च पदावर आहेत.
(कै.)  बी. एन. पाटील यांच्या आत्म्यास ,शांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
                      ।। ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

Thursday, 1 August 2019

गुरूवर्य श्री. नंदकुमार अभ्यंकर.

                 सन् २०००. जानेवारी महिना. मी त्या वेळी सांगलीत, पाटबंधारे खात्याच्या, गुण नियंत्रण ( Quality Control ) शाखेत ,कार्यरत होतो. अनपेक्षित पणे  माझे वैज्ञानिक अधिकारी या पदावर ,प्रमोशन झाले .माझी  मेरीत ( M.E.R.I. , पाटबंधारे खात्याची संशोधन संस्था  ) नाशिकला बदलीची आॅर्डर आली .  प्रमोशनचा आनंद होण्या ऐवजी, मी मनाने दुःखी झालो. मिरजेत आम्ही सगळे, म्हणजे मी , पत्नी सौ. रजनी , मुलगा चि. आदित्य , माझी आई , वडील असे सगळे एकत्र होतो.आईचे  वय ७३, वडीलांचे वय ८३ होते.  मी  मिरजहून नाशिकला गेलो ,तर त्यांचे कसे होईल ?
                   या विचारातच , मी माझे स्नेही श्री. नंदकुमार अभ्यंकर यांचे घरी, सहज गेलो. माझ्या मनातील काहुर, मी त्यांना सांगीतले. त्यांनी शांतपणे माझी व्यथा समजून घेतली. क्षणभर विचार केला. नंतर ते मला म्हणाले " दीक्षित , तुमच्या मिरजेत असण्यामुळे ,तुमचे कुटूंब सुरक्षित आहे . तुमचे आई, वडील वृद्ध आहेत. तुम्ही मिरजेत त्यांच्या सोबत असल्या मुळे ,त्यांच्या तब्बेती  व्यवस्थित आहेत , असा तुमचा समज आहे. हा तुमचा गैरसमज आहे. तुम्ही नाशिकला गेलात की, लगेच त्यांच्या तब्बेती बिघडतील , असा तुमचा समज असेल , तर तो चुकीचा आहे. जो तो आपल्या नशिबाने जगत असतो . त्याचे पितृत्व अहंकाराने स्वतःकडे घेणे सर्वथैव गैर आहे , चुकीचे आहे. "
                     हे सर्व ऐकून माझ्या मनात लख्ख प्रकाश पडला . मनातील सर्व जळमटे निघून गेली व मी अतिशय आनंदाने, एकटा प्रमोशनवर, नाशिकला निघून गेलो.
                    श्री. नंदकुमार अभ्यंकरांच्या या समजावण्याचा, माझ्या मनावर खूपच परिणाम झाला . त्या दिवसा पासून ,मी त्यांना, मनोमन " गुरू " मानू लागलो. आज तागायत ते मला ,गुरूस्थानीच आहेत व पुढे ही राहतील.श्री. अभ्यंकरांचा अध्यात्माचा अभ्यास ,जबरदस्त आहे.  भगवद् गीता , ज्ञानेश्वरी , दासबोध , तुकारामाची गाथा , संत कबीर यांचे विचार वाङ्गमय आणि इतर बर्‍याच संत वाङ्गमयाचा ,साहित्याचा त्यांचा अभ्यास , त्या वरचे त्यांचे मनन आणि चिंतन , प्रचंड आहे.
                 ते सांगलीच्या गणपतराव अरवाडे हायस्कूलच्या ,ज्युनियर काॅलेजच्या तांत्रिक विभागाचे  प्रमुख होते. आता नुकतेच ,ते सेवानिवृत्त झालेले आहेत. शिक्षण क्षेत्राशी त्यांचा संबंध असल्याने , मुलांच्या मानसशास्त्राचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे. त्या मुळे ओळखीची ,तसेच ओळख नसलेली ,  मुले आणि पालक मुलांच्या शैशणिक , मानसिक अडचणी सोडविण्यासाठी ,त्यांच्याकडे आवर्जून येत असतात . त्यांचा सल्ला घेत असतात.
                 ते स्वतः अटोमोबाईल इंजिनीयर आहेत.मिरजेत त्यांचे स्वतःचे ,अटोमोबाईल वर्कशाॅप होते. खूप चांगले चालायचे. त्या व्यवसायात त्यांनी नाव कमावले होते. एक दिवस त्यांनी ते वर्कशाॅप, त्यांच्या हाताखाली बरेच वर्षे काम करणार्‍या कर्मचार्‍याला ,देउन टाकले. मी या व्यवसायात भरपूर पैसा कमवला. आता मला पैसा नको, हा त्यांचा विचार होता. माझ्या किंवा तुमच्या ही माहितीत " मला आता पैसा नको " ,असे म्हणणारा हा पहिलाच माणूस असेल. पैशाचा मोह प्रत्येकाला असतो. म्हातारपणी ही पैशाच्या मागे पळणारी माणसे ,आपण पाहिली असतील. पण तरूणपणी मला पैसा नको , असे म्हणणारे श्री. अभ्यंकर , एकमेवाव्दितीय असेच आहेत.
                      त्यांना एक मुलगा आहे. एक नातू ही नुकताच झालेला आहे. मिरजेत किल्ला भागात , त्यांचा स्वतःचा बंगला आहे. पण  आपण  नातवंडा सोबत ,आनंदात रहावे , या उद्देशाने ,श्री. आणि सौ, अभ्यंकर दोघेही सध्या पुण्यात, मुला सोबत राहतात. सौ. वहिनींची ही त्यांना समर्थ साथ आहेच !
                       तर अशा या मला आदराने ,गुरूस्थानी असलेल्या  श्री. नंदकुमार अभ्यंकर आणि सौ. वहिनी, यांना परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य द्यावे आणि त्यांचा कृपालाभ मला सतत मिळावा , हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
णे

Monday, 15 July 2019

श्री. श्रीराम वैजापूरकर...यशस्वी अभियंता स्नेही.

               " जय श्रीराम "
                  तुम्ही म्हणाल , लेखाच्या सुरवातीलाच हे काय ? मी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला ,पाहिलेले नाही. पण श्रीराम वैजापूरकर ,हे माझ्या चांगल्या परिचयाचे असल्याने ,मी त्यांच्यातच श्रीरामाला पाहतो. मला त्यांच्यात ,श्रीरामाचे सर्व गूण सामावलेले दिसतात.
                    श्रीराम वैजापूरकर हे मेरीत ,  बदलीवर आले.  स्वेच्छेने मेरीत आलेले व तिथल्या संशोधनाच्या कामात रममाण झालेल्या , कांही दुर्मिळ अभियंत्यांच्या पैकी ते एक आहेत. मेरीत " इतर आवक " कांहीही नसते. त्यामुळे बर्‍याच जणांना ,मेरी मधील नोकरीचा कालावधी,   शिक्षेचा वाटतो , मेरी म्हणजे बंदिशाळा वाटते. पण श्री. श्रीराम वैजापूरकरांचे  ,इतर गोष्टींच्या पेक्षा ,कामावर प्रेम होते .त्या मुळे "जगाच्या पाठीवर " या मराठी सिनेमातील  , " जग हे बंदीशाळा " या गाण्यात म्हटल्या नुसार , " जो आला तो रमला " या उक्ती प्रमाणे , श्रीराम वैजापूरकर मेरीत आले आणि रमले ही !
                        मध्यम उंची , गोरा पान रंग , डोक्या वरचे केस ,पांढरटपणाकडे जास्तच झुकलेले . कपडे अतिशय व्यवस्थित , चेहर्‍यावर एक प्रकारचे सात्विक हास्य  , असे त्यांचे कोणावरही छाप टाकणारे ,व्यक्तीमत्व आहे. जे काम करायचे ते सुव्यवस्थितच ! त्यांचे अक्षर ही अतिशय देखणे आहे.
              श्रीराम वैजापूरकरांनी, शासकीय सेवेतून  सेवानिवृत्त झाल्यावर ,आपले छंद फार छान जोपासलेले आहेत. त्या त्या परिस्थितीशी अनुरूप असे, तांत्रिक आणि ललित लेखन ,त्यांनी  विविध वृत्तपत्रांसाठी भरपूर केले आहे.या शिवाय पक्षी निरीक्षण, हा एक आगळा वेगळा छंद त्यांनी जोपासला आहे. त्या साठी ते सुयोग्य जागा  आणि सुयोग्य वेळ शोधून ,पक्षी अभयारण्यांना आवर्जून भेटी देत असतात.
                      महाराष्ट्र राज्यात बाल भारतीचे, पाठ्यपुस्तक निर्मिती  मंडळ आहे. तिथे पाठ्य पुस्तकांची नव्याने निर्मिती करण्यासाठी, एक तज्ज्ञ समिती नेमली जाते. हे तज्ज्ञ त्या त्या विषयाची ,वेगवेगळ्या इयत्तांची पुस्तके पाहून ,त्या तील कालबाह्य झालेला मजकूर काढून , नवीन व काल सुसंगत मजकूर ,पुस्तकात समाविष्ट करण्याचे काम करतात. अशा भूगोल विषयाच्या तज्ज्ञ समितीवर, श्रीराम वैजापूरकर काम करीत आहेत. नुकतेच आठवी आणि दहावीचे भूगोलाचे नवीन  पुस्तक ,प्रकाशित करण्यात आले. या कामात, श्रीराम वैजापूरकरांचा अघाडीचा वाटा आहे.
                   श्रीराम वैजापूरकरांना दोन मुले आहेत. दोघे ही उच्च विद्याविभूषित असून, अमेरिकेत स्थायिक आहेत. सौ. वहिनींची ही त्यांना समर्थ साथ आहेच ! मुले अमेरिकेत असल्याने ,त्यांचे तिकडे ही मधून मधून वास्तव्य असते.
                   श्रीराम वैजापूरकरांनी, मला " श्रीराम पंचायतनाची " एक छानशी मूर्ती, मोठ्या प्रेमाने भेट दिलेली आहे. ती माझ्या रोजच्या पूजेत आहे. त्या मुळे त्यांची आठवण झाली नाही ,असा दिवस जात नाही.
                     अशा या श्रीराम वैजापूरकरांना आणि सौ. वहिनींना , तसेच त्यांच्या कुटूंबियांना  सुख  समाधानाचे , उदंड  आणि समृध्द , निरामय आयुष्य  " श्रीरामाने " द्यावे , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो  !

Monday, 1 July 2019

सुधीर सराफ... संगीतकार , कवि आणि संशोधक.

                 शासकीय नोकरी म्हणजे तशी निरसच ! त्यात  संशोधनात्मक काम करावे लागणारी माणसे ,म्हणजे जास्तीत जास्त निरस असणार , असा समज होणे स्वाभावीकच आहे. पण शासकीय नोकरीत असून ,  किचकट संशोधनाचे काम करीत असताना , आपल्यातला  कलाकार जपणे ,ही गोष्ट अशक्यच वाटते ना ? पण नाही !  माझा एक जवळचा स्नेही असा आहे की , ज्याने अभियांत्रिकी संशोधन करता करता , आपला संगीताचा छंद ही जोपासला आहे. आता तुम्हाला वाटू शकते की , हा माझा स्नेही गायक असणार ! पण तुमचा अंदाज चुकला . माझा हा स्नेही ,एका वाद्यवृंदाचा जनक आहे.माझ्या या  कलाचार स्नेह्याचे नाव आहे श्री. सुधीर सराफ.
                    सुधीरचे व्यक्तीमत्व म्हणजे गोरापान रंग , उत्तम उंची , डोक्या वरचे केस थोडे विरळ झालेले , बांधा राजस , कोणी ही पाहता क्षणी त्याच्या व्यक्तीमत्वाने भारून जावे , असेच एकूण व्यक्तीमत्व !
               सुधीर , मेरीच्या महामार्ग संशोधन विभागात कार्यरत होता. त्याला कामासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा होती. त्या प्रयोगशाळेचा तो सर्वेसर्वा होता. वेगवेगळ्या  महामार्गांच्या  कामात , विमानतळांच्या धावपट्टीसाठी उत्तम डांबरी करण केलेला रस्ता किंवा धावपट्टी बांधताना, त्यात डांबराचे प्रमाण किती असावे ,तसेच त्या डांबराची गुणवत्ता कशी असावी , या विषयी तो संशोधन करीत असे. त्याचे काम तो एकाग्रतेने करीत असे. आपल्या कामात इतर कुणी ,ढवळाढवळ केलेली, त्याला चालत नसे.
                      तर अशा या रुक्ष कामात व्यग्र असलेला माझा स्नेही सुधीर , आॅफीस संपल्या नंतर मात्र ,एकदम  रसिकाच्या भूमिकेत दिसायचा. त्याने स्वतःचा वाद्यवृन्द निर्माण केला होता. स्वतः एखादे वाद्य वाजविणे आणि वाद्यमेळ तयार करणे ,यात खूपच अंतर आहे. वाद्य वाजविणार्‍याला ,आपल्या वाद्यात उत्तम गती असते. पण वाद्यवृन्द निर्माण करणार्‍याला ,सर्वच वाद्यात, तसेच गाण्यात ही गती असावी लागते. कोणते वाद्य ,कोणत्या जागी कसे वाजविले गेले पाहिजे , याची जाण असल्या शिवाय " वाद्यवृन्द " निर्मिती कठीणच !
              सुधीरच्या वाद्यवृन्दाचे नाव होते " साउंड अॅन्ड सिंफनी " . त्यात तो स्वतः पियानो अॅकाॅर्डियन वाजवायचा. सर्व वाद्यवृन्दाच्या मध्यभागी ,सुधीर उभा राहून सर्व वाद्यवृन्द नियंत्रणात ठेउन, पियाॅनो अॅकाॅर्डियन वाजवताना पाहणे ,म्हणजे स्वर्गीय आनंद असायचा ! एखाद्या " राजा " प्रमाणे ,तो त्यात शोभून दिसायचा !प्रेक्षकांची व श्रोत्यांची नस ओळखून, तो त्या प्रमाणे गाणी सादर करायचा. जेणे करून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच जायचा !
                     सुधीरने वाद्यवृन्दा बरोबरच ,वेगवेगळ्या गाण्यांचा , गाण्यात वापरल्या गेलेल्या विशिष्ठ शब्दांचा ,  वापरल्या गेलेल्या वाद्यांचा व त्यांच्या परिणामांचा, सखोल अभ्यास केलेला आहे. नाशिक आकाशवाणी साठी त्याने ,अशा प्रकारच्या सुंदर कार्यक्रमाची मालिका , स्वतः लिहून  सादर केली होती.
              या शिवाय सुधीर कवि मनाचा ही आहे. त्याच्या स्वरचित हिंदी काव्यांचे संग्रह , मन आकाश , लैला मजनूॅं , मानस मीरा , इ. प्रसिध्द झालेले आहेत. या शिवाय वंशवृृृृृध्दी ,हा मार्गदर्शक शास्त्रीय ग्रंथ ही , प्रकाशित झालेला आहे.
                     मी आणि सुधीर शासकीय नोकरीतून ,कधीचेच सेवानिवृत्त झालोय ! आता आमची भेट ही क्वचितच होते. सुधीरचा वाद्यवृन्द ,चालू आहे की नाही मला कल्पना नाही. पण अशा या कवि मनाच्या , संगीत रसिक मित्राची ओळख करून देताना, मला अतिशय आनंद होत आहे.
                       फोटोत दिसतोय तो , प्रसन्न हसणारा ,माझा स्नेही श्री. सुधीर सराफ ! त्याला भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.


Friday, 14 June 2019

श्री. देगांवकर काका......मेरीचे कॅप्टन.

                आज मी ज्यांच्या बद्दल लिहीणार आहे , त्यांनी एके काळी म्हणजे ,साधारण १९७० ते १९७६ या कालावधीत , नाशिक मधील " मेरी " या संशोधन संस्थेत कार्यरत असलेल्या , प्रत्येकाचे आयुष्य नक्कीच व्यापून टाकले होते. असे उत्साही आणि प्रसन्न व्यक्तीमत्व म्हणजे, " कॅप्टन देगांवकर " !
                 आम्ही नुकतेच नोकरीला लागलेले सर्वजण त्यांना, देगांवकर काका असे म्हणत असू. देगांवकर काका म्हणजे, एक प्रसन्न उत्साहाचा झराच होते. १९७० ते १९७६ या कालावधीत, मेरीत किंवा मेरी काॅलनीत , कोणताही कोणताही शासकीय , निमशासकीय किंवा अशासकीय कार्यक्रम असो ,त्यात देगांवकर काकांचा सक्रिय सहभाग ,हमखास असायचाच ! जिथे जातील तिथे " संपूर्ण कॅनव्हास "  व्यापून टाकणारे असे ,त्यांचे व्यक्तीमत्व होते.
                  भव्य कपाळ , चेहर्‍यावर कायम प्रसन्नतेचे स्मित हास्य , मध्यम उंची , शर्ट कायम इन केलेला , त्यावर पट्टा ,कपडे कायम टिपटाॅप , पायात बूट , वागण्यात एक प्रकारची कमांडिंग पोझीशन , असे त्यांचे लक्षात राहण्या सारखे व्यक्तीमत्व होते.
                   त्यांना  " कॅप्टन देगांवकर " असे सर्व अधिकारी संबोधायचे ! कारण देगांवकर काकांनी ,आर्मी मध्ये शाॅर्ट सर्व्हिस कमिशन घेउन ,कॅप्टन या पदावर काम केलेले होते. आर्मीची शिस्त ,त्यांच्या वागण्या बोलण्यात जाणवत असे.
                    मेरीच्या प्रत्येक गणेशोत्सवात आणि रंगपंचमीत ,काकांचा उत्साही सहभाग असायचा ! गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकी नंतर ,जेवढे लोक मिरवणूकीत सहभागी असायचे ,त्या सर्वांना आवर्जून घरी बोलावून, ते चहापानाचा कार्यक्रम करीत असत. रंगपंचमीच्या दिवशी ही त्यांच्याकडे ,सर्वांना चहापान असायचे.अधिकारी असून ही , सर्वांना बरोबर नेणारे ,  सर्वांच्यात मिळून मिसळून राहून आनंद लुटणारे ,असे काकांचे व्यक्तीमत्व होते.
                    माझ्या लग्नात ,काकांचा फार मोठा सहभाग होता. त्यांच्या त्या सहभागासाठी ,मी त्यांचा कायमचा त्र५णी आहे. काका मेरीतून ,१९७६ साली बाहेर बदलीवर गेले. ते १९९३ साली  ,अधीक्षक अभियंता या पदावरून ,सेवानिवृत्त झाले.
                  सेवानिवृत्ती पूर्वी ,त्याच्या तीन ही मुलींची  (चि. सुनिता , चि. संगीता आणि चि. सुजाता ) लग्ने झालेली होती. मुलगा चि. संजय ,याचे लग्न व्हायचे होते.
                 सेवानिवृत्ती नंतर ,काका आवर्जून आपल्या सर्व मित्रमंडळींना , सुह्रुदांना, त्यांच्या त्यांच्या गावी जाउन ,आवर्जून भेटले. त्या नंतर थोड्याच  दिवसात ,त्यांना असाध्य अशा कर्करोगाने गाठले. बरेच उपचार झाले ,पण फारसा उपयोग होत नव्हता. मधल्या काळात , मुलगा चि. संजयचे लग्न ठरले होते. पण काका आजारी असल्याने , ते कसे करायचे असा प्रश्न होता. काका औरंगाबाद मधील एका हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट होते. कशाचा कांही भरोसा नव्हता .त्या कठीण अवस्थेत , काकांनी चि. संजयचे लग्न, आपल्या समक्ष करायचा निर्णय घेतला. हे लग्न ते ज्या हाॅस्पिटल मध्ये ,ज्या खोलीत अॅडमिट  होते , त्याच खोलीत डाॅक्टरांच्या परवानगीने झाले....आणि त्याच रात्री काका "गेले"....आपली सर्व कर्तव्ये पार पाडून गेले.....ती तारीख होती २३ जानेवारी १९९५ ! काकांची जन्म तारीख २६ जून १९३५ !
             आज काका हयात असते तर, या येणार्‍या २६ जून २०२० ला त्यांना, ८५ वर्षे पूर्ण होउन त्यांनी ८६ व्या वर्षात ,पदार्पण केले असते. पण तो योग नाही.....
             " जो आवडतो सर्वांना , तोची आवडे देवाला "  ही उक्ती, काकांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते....माझ्या मते काका गेलेले नाहीतच , ते आमच्या सर्वांच्या ह्रदयात ,कायम आहेतच आणि सदैव राहतीलच !
                    फोटोत दिसत आहेत ते देगावकर काका आणि काकू ! काकू औरंगाबादला ,आपल्या मुलाकडे असतात . काका वर लिहील्या प्रमाणे आमच्या सर्वांच्या ह्रदयात कायम आहेतच !............


Friday, 31 May 2019

श्री. शामकुमार दीक्षित .....शामभैय्या

पंच्याहत्तराव्या वर्षी माणसाचे मन लहान मुला सारखे निर्मळ आहे , असे सांगीतल्यास कदाचित तुमचा विश्वास ही बसणार नाही. पण हे सत्य आहे. एक व्यक्ती अशी नक्की आहे व ती व्यक्ती माझी स्नेही आहे याचा मला अभिमान आहे.
             त्या व्यक्तीचे नाव आहे श्री. शामकुमार नरहर दीक्षित उर्फ एस्. एन्. दीक्षित म्हणजेच आमचा मेरीतील मित्रांचा " शामभैय्या " !अतिशय प्रेमळ , मनात कोणता ही आप पर भाव नाही , प्रत्येक गोष्ट चांगलीच आहे , असे सरळपणे मना पासून मानून चालणारा असा  हा आमचा शामभैय्या आहे. इतकं नितळ मन आजच्या काळात पहायला फारच क्वचित सापडेल !
              शामभैय्या जसा आहे तसाच दिसतो. मध्यम पेक्षा जरा जास्त उंची , सात्विक सावळा रंग , शरीर यष्टी राजस , हसरा व प्रसन्न चेहरा !
               शामभय्या क्रिकेट छान खेळतो. तो आॅल राउंडर आहे. मेरीत असताना मेरीच्या टीमचा तो एक आधारस्तंभ होता. काॅलेज मध्ये असताना तसेच काॅलेज संपल्यावर ही तो रोज संध्याकाळी ग्राउंडर जायचा म्हणजे जायचाच !शामभैय्याने आमच्या बरोबर नाशिकच्या मेरी आॅफिसच्या एकांकिकेत ही छान व विनोदी भूमिका केल्या होत्या आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.
                शामभैय्याच्या लग्नाच्या वेळची १९७२ सालची एक हसवणारी आठवण आत्ता झाली. त्याचे लग्न पुण्यात सारस बागे जवळच्या बहुतेक मित्रमंडळ कार्यालयात झाले. लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही आॅफिस संपल्यावर नाशिक पुणे प्रवास करून मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयात पोचलो. शामभैय्याने आमचे मना पासून स्वागत केले आणि आमची झोपण्याची व्यवस्था केली. शेजारी असलेल्या एका ग्राउंडवर नेमकी एक सर्कस उतरली होती. त्यांचा ही रात्रीचा खेळ संपला असावा. वाघ सिंहांची भुकेची वेळ झाली असावी. ते जोरजोरात सामुदायिक डरकाळ्या फोडत होते. आम्ही झोपायचा प्रयत्न करत होतो , पण त्या डरकाळ्यांच्या जुगलबंदीने  झोप येण्याच्या ऐवजी आम्ही मनसोक्त हसत होतो. आता वाघसिंहांच्या डरकाळ्या सिनेमात जरी ऐकल्या , तरी शामभैय्याच्या लग्नाची आठवण आम्हा सर्वांना येउन हसू फुटते.
                   आमचा शामभैय्या देवभोळा आहे. रोज मना पासून देवाचे ध्यान आणि साग्रसंगीत मंत्रोच्चार करून पुजा करणे त्याला मना पासून आवडते. सेवानिवृत्ती नंतर त्याने स्वरयुक्त रूद्र शिकून घेतले आहे. काशीविश्वनाथाला रूद्राभिषेक करण्यासाठी कांही ब्रह्मवृदांच्या सोबत तो आता वाराणसीला जाणार आहे.
शामभैय्या हा Instrumentation Engineer आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्या अंतर्गत असलेल्या मेरी आॅफिस मार्फत मातीच्या धरणात जे Instrumentation करण्यात येते त्याचा तो अगदी सुरवातीचा  जनक अभियंता आहे , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
                   मेरीची नोकरी सोडून नंतर तो खासगी नोकरीत गेला. मूलतः हुषार आणि प्रामाणिक असल्याने तिथे ही तो चमकला. त्या नंतर कांही वर्षे तो कुवैतला होता. आता तो सेवानिवृत्त होउन नव्या मुंबईत राहतो.
                 त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघे ही परदेशात स्थायिक झालेले आहेत. मुंबईत तो आणि सौ, वहिनी राहतात.मध्यंतरी तो खास आम्हा सर्वांना भेटण्यासाठी आवर्जून येउन गेला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप आनंद झाला.
                अशा या आमच्या शामभैय्याला आणि सौ. वहीनींना परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , ही प्रार्थना करतो आणि थांबतो !
              खाली फोटोत आहे तो आमचा " शामभैय्या "......

Tuesday, 14 May 2019

कै. टि. डब्ल्यू. शूरपाल.....अविस्मरणीय व्यक्तीमत्व..

            मेरीच्या नोकरीच्या कालावधीत, असे कांही लोक भेटले की , त्यांना विसरणे सर्वथैव अशक्यच ! त्यातील एक आहेत, कै. त्रिंबक वामन शूरपाल उर्फ टी. डब्लु. शूरपाल ! त्यांच्या बद्दल मनात आदर वसत असल्याने ,मी त्यांना कायम " शूरपाल साहेब " असेच म्हणायचो.
                  शूरपाल साहेब म्हणजे शांत व विचारी व्यक्तीमत्व ! मध्यम उंची , शांत चेहरा , अप टू डेट पोशाख ,एक प्रकारे आदर वाटावा ,असे गंभीर व्यक्तीमत्व ! शूरपाल साहेब कोणती ही गोष्ट ,घाई गडबडीत किंवा धसमुसळेपणाने, कधीच करीत नसत. जे काम करायचे ,ते शांत चित्ताने आणि व्यवस्थित नियोजन करून , १०० % प्रामाणिकपणे करीत असत.
                मी त्यांच्या हाता खाली, काम केलेले आहे. शूरपाल साहेब ,कधी ही कुणालाही रागावून किंवा दटावून बोलल्याचे, मला स्मरत नाही.
             शूरपाल साहेबांना क्रिकेटचे प्रचंड वेड होते. ते शिकत असताना ,काॅलेजच्या व युनिव्हर्सिटीच्या टीमचा एक प्रमुख भाग होते. मेरी आॅफिसची ही क्रिकेटची टीम होती. त्या टीमचे ते कॅप्टन होते.
            टीव्हीवर क्रिकेटची मॅच चालू असेल तर ते, टीव्ही पासून हाताच्या अंतरावर बसून ती पहायचे. जणू एखादा कॅच त्यांच्या दिशेने आला, तर अजिबात सुटू नये.
             शूरपाल साहेब १९९४ साली सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर ,तब्बेतीच्या कांही कांही तक्रारी सुरू झाल्या. त्यातच भरीस भर म्हणून, हार्टट्रबल ही होता. दि. २५ आॅक्टोबर २०१४ रोजी, भाउबीजेच्या दिवशी ते अचानक  " गेले ".
           त्यांच्या मागे वहीनी आणि चार मुली आहेत. सर्वजण आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत.
            शूरपाल साहेबांच्यावर,  लेख लिहीण्याची फार इच्छा असल्याने ,त्यांची खूप आठवण येत होती. त्या निमित्ताने वहीनींची भेट व्हावी, अशी तीव्र इच्छा होती. एके दिवशी रात्री आठच्या सुमारास मी आणि सौ. रजनी, आम्ही दोघे नाशिकच्या इंदिरा नगर भागात, शूरपाल साहेबांचा बंगला शोधण्यासाठी जिद्दीने झटलो. अर्धा ते पाउण तासाच्या परिश्रमा नंतर ,त्यांचा बंगला सापडला. बंगल्याच्या बाहेरील पाटीवर ," शुभंकरोती " ही अक्षरे पाहून ,मला अतिशय आनंद झाला. वहीनींची आणि त्यांची कन्या  चि. अदिती ,यांची भेट झाली. जवळ जवळ तास भर मनसोक्त गप्पा झाल्या . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
                  त्यांच्या घरात शूरपाल साहेबांना ," हार घातलेल्या फोटोत " पाहून ,मन गलबलून गेले. मी क्षणभर ,त्या फोटो समोर हात जोडून ,शांत उभा राहिलो . त्यांच्या फोटोचा फोटो घेतला आणि जड अंतःकरणाने बाहेर निघालो.
         आदरणीय शूरपाल साहेबांच्या स्मृतीला त्रिवार प्रणाम !