Thursday, 25 June 2020

श्री. बाळासाहेब राजोपाध्ये....आदर्श सिनीयर सिटीझन....

हिंदी भाषेत एक म्हण आहे, " पानी तेरा रंग कैसा ? जिसमे मिलावे लगे उस जैसा "...थोडक्यात जी प्राप्त परिस्थिती असेल ,त्यात तुम्ही सामावून गेलात तर , तुम्हाला आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना ते आनंददायी ठरते.
               वरील म्हणीशी सुसंगत वागणार्‍या  एका व्यक्तीची ,मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. लक्ष्मण उर्फ बाळासाहेब राजोपाध्ये ! वय वर्षे ८७ फक्त ! या वयात ही तब्बेत उत्तम ! शरीराची कोणतीही तक्रार नाही. रोज योगासने, प्राणायाम  व ध्यान धारणा आणि मनःशांतीसाठी आवश्यक असे, अध्यात्मिक वाचन  करतात . जमेल तेवढे रोज न चुकता फिरतात . मुख्य म्हणजे जिभेवर नियंत्रण आहे. डायबेटिस नाही. बिपी नियंत्रणात . आनंदी स्वभाव. जिथे असतील तिथे, कोणतीही अढ्यता ,अहंकार न बाळगता असेल त्या वातावरणाशी व परिस्थितीशी जुळवून घेउन ,आपल्या  उपस्थिती मुळे आनंद निर्माण व्हावा ,असा प्रयत्न करतात. अशा दुर्मिळ सदगुणांचे मिश्रण असलेल्या, श्री. बाळासाहेब राजोपाध्ये ,यांचा आज आपण परिचय करून घेऊ.
                   श्री. बाळासाहेबांचे वडील कै. वासुदेवराव, हे विसापूर ( ता. तासगाव , जि. सांगली ) या गावचे इनामदार. आपण या इनामदारी थाटातून बाहेर पडायचे आणि स्वतःचे विश्व स्वतः निर्माण करायचे, या इराद्याने श्री. बाळासाहेब १९५२ साली, SSC झाल्यावर, महसूल खात्यात सर्व्हेअर या पदावर हजर झाले. कोणते ही काम करताना ,ते प्रामाणिकपणे व झोकून देउन करायचे हा त्यांचा स्वभाव ! सुरवातीला रत्नागिरी जिल्ह्यात सर्व्हेचे काम करताना ,कधी कधी  धड रस्ते नाहीत ,अशा ठिकाणी १० ते १५ किमी डोंगर चढून ,सर्व्हे करण्यासाठी चालत जावे लागायचे. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा, त्यांनी प्रामाणिकपणे व अतिशय जलद गतीने काम करून ,वरिष्ठांची वाहवा मिळविली होती. नंतर त्यांची नाशिकला बदली झाली. तिथे त्यांचे मामा, कै. के. एस. अथणीकर ,पाटबंधारे खात्यात अधिकारी होते. त्यांच्या सल्ल्या नुसार ,त्यांनी पाटबंधारे खात्यात टेक्निकल असिस्टंट या पदासाठी ,अर्ज केला. त्या पदा साठी जेवढी अर्हता अपेक्षित होती, त्या पेक्षा श्री. बाळासाहेबांची अर्हता ,बरीच वरच्या दर्जाची होती. त्या मुळे, त्यांची निवड व्हायला कांहीच अडचण पडली नाही. तिथून मात्र श्री. बाळासाहेबांनी ,मागे वळून पाहिलेच नाही. डिपार्टमेंटल परिक्षा देत देत ,स्वतःची योग्यता सिध्द करत करत ,ते शेवटी डेप्युटी इंजिनीयर या पदावर शेवटची ९ वर्षे कार्यरत होते.  या नोकरीच्या काळात त्यांनी वीर मेसनरी डॅम , आर्च कल्व्हर्ट्स , कॅनाॅल आणि त्या वरील ब्रिजेस , मातीची धरणे व तेथील गुण नियंत्रण, अशा विविध महत्वाच्या कामावर ,उत्तम प्रकारे काम करून आपला ठसा उमटविला.  श्री. बाळासाहेबांच्या नेटक्या काम करण्याच्या पध्दतीमुळे, त्यांच्या उगीचच बदल्या झाल्या नाहीत. अशा प्रकारे सर्व ठिकाणी उत्तम व प्रामाणिकपणे काम करून,  ते सन १९९१ मध्ये शासकीय नोकरीतून सेवा निवृत्त झाले.
                 श्री. बाळासाहेब ,  नोकरीत जिद्दीने आणि झोकून देउन काम करीत असत.  ते वरिष्ठांच्या बद्दल आदराने , समपदस्थांच्या बरोबर सन्मानाने आणि हाता खालच्या लोकांच्या बरोबर माणूसकीने ,वागत असत. या त्यांच्या गुणांमुळे ,आजच्या घडीला २९ वर्षा पूर्वी सेवा निवृत्त होउन ही ,त्या वेळचे त्यांचे सहकारी आज सुध्दा, मोठ्या आपुलकीने जिव्हाळ्याने ,त्यांना आवर्जून भेटतात व प्रेमाने  चौकशी करतात. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे असे मला वाटते.
               सेवा निवृत्ती नंतर त्यांनी मिरजेत,ज्येष्ठ नागरिक संघाचे काम अत्यंत तळमळीने केले. घरो घरी जाउन सभासद करणे , संघाची स्वतःची इमारत होण्यासाठी प्रयत्न करणे , इत्यादी सामाजिक कामे त्यांनी आवर्जून केली. तसेच  त्यांच्या जुन्या वाड्याचे इतर दोन भावांच्या संमतीने आणि सहकार्याने ,नूतनीकरण करून छान अपार्टमेंट बांधले. त्यात त्यांचा स्वतःचा उत्तम फ्लॅट आहे.
                 त्यांच्या पत्नी  सौ. उमा , शिक्षीका होत्या. संसाराला त्यांची सर्वंकष मदत होती. संसारात पैसा शिल्लक टाकलाच पाहिजे, या त्यांच्या मामांनी ( कै. के . एस . अथणीकर यांनी ) दिलेल्या मार्गदर्शक सल्यामुळे, त्या दोघांनी आपला संसार निगुतीने केला.  त्यांच्या पत्नी  २००७ साली दीर्घ आजाराने मिरजेत " गेल्या ".
                त्या नंतर श्री. बाळासाहेबांना, त्यांच्या मुलांनी आणि मुलींनी ,काळजी पोटी एकटे मिरजेत राहू दिले नाही. त्या मुळे ते आपल्या मुलांच्या, सुनांच्या आणि मुलींच्या , जावयांच्या  सोबतीने राहू लागले. वर अगदी सुरवातीला लिहील्या नुसार , जी परिस्थिती असेल त्यात सामावून जाण्याच्या व  " मी आणि माझं "  हा वृथा अहंकार सोडून देण्याच्या स्वभावामुळे, ते जिथे जातील तिथे आनंदात राहतात !
                श्री. बाळासाहेबांना चार मुले. दोन  मुले व दोन मुली ! मुले अभियंता आहेत. मुली उत्तम शिकलेल्या असून , सर्वजण आपापल्या जागी सुव्यस्थित आहेत.
               ज्यांच्या वागण्याचा आदर्श, सर्व सिनीयर सिटीझन्सनी घ्यावा, अशा श्री. बाळासाहेब राजोपाध्ये यांना परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment