Sunday, 21 June 2020

श्री. गिरीश वडनेरकर ...एक बहुरंगी व्यक्तीमत्व.


मी एकदाच अमरनाथला आणि चारधाम यात्रेला जाउन आलो,  याचा मला खूप अभिमान आहे. पण माझ्या माहितीतील एक व्यक्ती अशी आहे की, ज्यांनी समुद्र सपाटी पासून १३,८०० फूट उंची वरील ,अमरनाथ सारखी कठीणतम यात्रा ,२४ वेळा आणि चारधाम यात्रा १७  वेळा, सातत्याने दर वर्षी केली आहे.  या अनोख्या व्यक्तीचे नाव आहे , श्री. गिरीश वडनेरकर !
                 श्री. वडनेरकरांनी १९९६ साली ,प्रथम आपल्या कुटूंबियांच्या सोबत, अमरनाथ यात्रा केली. पण कांही वातावरणीय अडचणी मुळे, अमरनाथ गुहे पासून, केवळ ३ किमी अंतरा वरून, त्यांना दर्शन न घेताच परतावे लागले. पुढच्या वर्षी नातेवाईकांच्या सोबत आणि त्या नंतर प्रत्येक वर्षी, तीस ते चाळीस लोकांचा ग्रुप घेउन, त्यांनी अमरनाथ यात्रा केली आहे. या वर्षी त्यांची २५ वी यात्रा झाली असती. पण " करोना " या विषाणूमुळे ती अडचणीत आलेली आहे.  अमरनाथच्या यात्रेत  जम्मू काश्मिर , पटणी टाॅप , गुलमर्ग , सोनमर्ग आणि वैष्णोदेवी हे स्थलदर्शन सुध्दा होते.  या प्रवासा दरम्यान ,काश्मिर आणि अमरनाथच्या अाजूबाजूचा हिमालय अनुभवणे, अत्यंत मनोहारी आहे. अतिरेकी हल्ल्यांचा धोका या प्रवासात असतो, असे म्हणतात . परंतू त्यांना या यात्रे दरम्यान, एकदा ही अतिरेकी हल्ल्यांचा, सरळ सरळ सामना करावा लागला नाही. तरी पण न भिता न घाबरता ,आपण भारतीयांनी हा प्रवास अवश्य करावाच ,अशी त्यांची आग्रही धारणा आहे.
             तसेच चारधाम यात्रा ,त्यांनी तीस चाळीस लोकांचा ग्रुप घेउन, सतरा वर्षा पासून आयोजित केली आहे. यात हरिद्वार , त्र५षिकेश , यमनोत्री , गंगोत्री , केदारनाथ व बदरीनाथ यांचा समावेश असतो. हिमालयाचे मन मोहविणारे दर्शन या यात्रेत होते. या यात्रेत कोणता ही धोका , सहसा नसतो.
               २००९ साली , त्यांनी कैलास मानसरोवरची पहिली यात्रा ,आयोजित केली होती. त्यात त्यांच्या बरोबर आलेल्या एका सहप्रवाशाचा ,अंगात ताप असताना  मानसरोवरात अंघोळ केल्या नंतर ,मृत्यू झाला. मानसरोवर चीन मध्ये आहे. बहुतेक वेळी असा मृत्यू झाल्यास ,त्याच पवित्र  ठिकाणी ,अंत्यसंस्कार केले जातात. पण मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी, त्यांचे शव नाशिकला आणून ,अंत्यसंस्कार करण्याची इच्छा प्रकट केली. श्री. वडनेरकरांनी मोठ्या धाडसाने व अनंत खटपटी लटपटी करून, त्या गृहस्थांचे शव नाशिकमध्ये आणून पोहोचविले. ही आठवण त्यांच्या कडून ऐकताना अंगावर काटाच आला. त्या नंतर त्यांनी कांही अंतराने , हीच यात्रा, तीनदा आयोजित केली होती . त्या सर्व यात्रा सुरक्षित व उत्तम प्रकारे, पार पाडल्या आहेत.
               या यात्रा ते एकहाती आयोजित करतात , हे त्यांचे अतुलनीय असे वैशिष्ठ्य आहे.
                 श्री. वडनेरकरांचे आजचे वय ,५६ वर्षांचे आहे. ते  शासकीय नोकरीत अभियंता आहेत. शासकीय नोकरीत  त्यांना उत्तम कामासाठी , कांही पुरस्कार मिळालेले आहेत.
 " डकबिल टाईप स्पिल वे " चा त्यांचा माॅडेल स्टडीवर आधारित ,संशोधन प्रबंध ," अमेरिकन सोसायटी आॅफ सिव्हील इंजिनियर्स " या संस्थेने गौरविला आहे. तसेच
 " कोयना धरणाच्या विशिष्ठ माॅडेल स्टडी "साठी, महाराष्ट्र शासनाचा गौरव ,त्यांना प्राप्त झाला आहे.
             श्री. वडनेरकर शाळेत शिकत असताना, श्रीमति रोहिणी जोशी रोडे ,या त्यांच्या शिक्षिकेने, त्यांना अत्यंत जिव्हाळ्याने, मोफत शिकविले . त्यांच्या शिकविण्याचा परिमाण म्हणा किंवा त्या त्र५णातून उतराई होण्यासाठी  म्हणा ,श्री. वडनेरकरांनी जवळ जवळ २०० विद्यार्थ्यांना इंग्रजी , गणित , विज्ञान हे विषय मोफत शिकविले. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ही, त्यांनी कांही विद्यार्थ्यांना, मोफत केले आहे.त्यांच्या सुरवातीच्या बॅचच्या मुलांची मुले सुध्दा, त्यांच्याकडे शिकायला येत होती , हा  आगळा वेगळा योगायोग आहे.
              श्री. वडनेरकर हे उत्कृष्ठ क्रिकेटपटू , कबड्डीपटू आहेत. नाशिकच्या  सुप्रसिध्द गुलालवाडी व्यायाम शाळेचे , ते  सक्रीय खेळाडू मार्गदर्शक आहेत.
               श्री. वडनेरकरांनी ७५ पेक्षा, जास्त वेळा रक्तदान करून ,अनेकांना " जीवनदान " दिलेले आहे.
              त्यांना दोन मुले आहेत. दोघेही उच्च शिक्षित असून ,आपल्या आपल्या जागी, सुव्यवस्थित आहेत. सौ. सुजाता वहिनींची त्यांना सुयोग्य आणि समर्थ साथ आहेच !
               अशा या बहुरंगी व्यक्तीमत्व असलेल्या, श्री. गिरीश वडनेरकर व सौ. सुजाता वहिनींना, " बदरीनाथाने " उदंड व निरामय आयुष्य द्यावे ,ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment