Saturday, 30 May 2020

श्री. बाळासाहेब जोगळेकर....वज्रादपि कठोराणि.....

संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे....
        वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि
       लोकोत्तराणां चेतांसि को हि विज्ञातुमर्हसि ।।
अर्थ-  समाजातील लोकोत्तर महनीय  लोक  ,                       त्यांचा स्वभाव, परिस्थिती नुसार बदलू शकतात. आवश्यक असेल तेंव्हा,  स्वतःचे मन वज्रा पेक्षा कठोर करतात व गरज असेल तेंव्हा आपले मन, फुलाहून ही कोमल  करू शकतात. हाच त्यांच्या मोठेपणाचा ,विशेष आहे.
           या व्याख्येत बसणारे माझे एक स्नेही, मिरजेत  आहेत. त्यांचे नाव आहे श्री. बळवंत उर्फ बाळासाहेब जोगळेकर !  तुम्ही सरळ वागा , ते तुमच्याशी सरळ वागतील , पण तुम्ही वाकड्यात शिरलात की, बाळासाहेबांचा वाकडेपणा ,तुम्ही सहन सुध्दा करू शकणार नाही.
             बाळासाहेबांचे व्यक्तीमत्व, वेगळेच आहे. मध्यम उंची , गव्हाळ रंग , डोक्यावरील केसांचे जंजाळ गायब ,  डोळ्यात एक प्रकारची जरब , आवाजात ही दटावणीचा भाव ... एकूण सहजा सहजी कोणी ही, मित्रत्वाच्या भावनेने लगट  करायला येण्याचा विचार ही करणार नाही , असे हे व्यक्तीमत्व आहे.
              असे हे  कठोर वाटणारे बाळासाहेब , मनाने अतिशय हळवे ही आहेत. त्यांचे वडील त्यांच्या शेवटच्या दिवसात ,खूप आजारी होते. बाळासाहेबांनी आपल्या वडीलांची सहसा कोणी करणार नाही, इतकी सेवा, २४ तास खपून केली. अतिशय प्रेमाने केली. वडील गेल्या नंतर ते खूप दिवस अस्वस्थ होते. कारण एकच , वडीलांच्या वरचं नितांत प्रेम !  त्यांचा मुलगा शिकायला चेन्नईला गेला. मुलगा एकटा इतक्या लांब गेल्याने, त्याच्या काळजीने ते अस्वस्थ होते. कारण नितांत प्रेम ! वेळेला, " मी नातवंडांना सांभाळणार नाही , ते माझे काम नाही " ,असे म्हणणारे बाळासाहेब , नातवंडाला जरा जरी खरचटलं , तरी अस्वस्थ होतात , त्यांच्या डोळ्यात पाणी येते ,कारण नितांत प्रेम ! आपल्या मित्रमंडळींच्यावर ही ते नितांत प्रेम करतात , पण त्याच वेळी कोणी चुकला, तर  रागाने बोलून ,त्याला ठिकाणावर ही आणतात.  गोड बोलताना ,त्यांना शब्दांची वानवा असते , पण रागावून बोलताना, त्यांचे शब्द भांडार ओसंडून वाहते असते. माणसे त्यांचा राग लक्षात ठेवतात , पण त्या मागचे त्यांचे प्रेम, लक्षात घेत नाहीत.
              बाळासाहेब अत्यंत धार्मिक आहेत. दत्त महाराजांच्यावर त्यांची नितांत श्रध्दा आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या आणि कुरवपूरला दत्त महाराजांच्या दर्शनाला ,ते कितीदा गेलेत याची गणती करणेच अवघड आहे. गुरूचरित्राची त्यांनी असंख्य पारायणे , त्यात सांगीतलेले नीतिनियम कठोरपणे पाळून, केली आहेत.
                  बाळासाहेबांच्या घरात कोणता ही छोटा किंवा मोठा समारंभ असो , बाळासाहेबांच्या मित्रांचीच यादी , साधारण शंभर ते दीडशे जणांची असते. त्या वेळी ते आवर्जून सर्वांना बोलावतात.  त्यांनी ज्याला एकदा आपला मानले, त्याला ते सहसा दूर करत नाहीत. पण कांही वेळा जवळच्या माणसांचा खोटारडेपणा , बनवाबनवी,  या कारणांनी परिस्थिती, त्यांना तसं करायला भाग पाडते व लोक दुरावतात , ही वस्तुस्थिती आहे.त्या बद्दल  बाळासाहेबांना ,दोष देता येणार नाही.
         श्री. बाळासाहेबांना दोन मुले. मुलगा चि. प्रसाद , मर्चंट नेव्हीत अधिकारी आहे. मुलगी चि. सौ. भक्ती, नवर्‍या सोबत गुजराथ मध्ये ,जामनेरला असते. दोघे ही आपल्या आपल्या जागी उत्तम परिस्थितीत आहेत. सौ. वहिनींची बाळासाहेबांना समर्थ साथ आहे.
            अशा या " वज्रादपि कठोराणि व मृदूनि कुसुमादपि " असलेल्या श्री. बाळासाहेबांना आणि सौ. वहिनींना उदंड व निरामय आयुष्य मिळो , सर्व सुखांचा त्यांच्यावर प्रचंड वर्षाव होवो , ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.

No comments:

Post a Comment