Saturday, 26 September 2020

कै. कृृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर....माझे सासरे.

कै. कृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर , माझे सासरे ! गोरापान रंग , बर्‍या पैकी उंची , शरीर थोडेसे राजस , चेहर्‍यावर अत्यंत सात्विक भाव , स्वभावानं तसे शांत , समाधानी वृत्ती  , विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी सदैव तत्पर , असे त्यांचे थोडक्यात वर्णन करता येईल.
                   त्यांना सर्वजण " किशानाना किंवा किशामामा " म्हणत. मी त्यांचा उल्लेख ,या लेखात " नाना " असा करीत आहे.
                   अथणीकर नानांचे घराणे म्हणजे वेदविद्यापारंगत ! त्यांचे अजोबा, कर्नाटकातल्या संकेश्वर पीठाचे शंकराचार्य होते. त्यांचे काका श्री. वामनराव अथणीकर , वेदशास्त्रसंपन्न  वेदमूर्ति होते. त्यांचे वडील श्री. शंकर अथणीकर , त्या काळचे " ताईत " मंत्रून देणारे व मोठे श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्याकडे दोन सोनार नोकरीला होते. एक " सोन्याचा  ताईत " व दुसरा " चांदीचा ताईत " बनवत असत. अशा या संपन्न घराण्यातला ,अथणीकर नानांचा जन्म होता. पूर्वीच्या म्हणी प्रमाणे, " कित्येक पिढ्या बसून खातील ", इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती !
                   अशा वेदशास्त्र संपन्न आणि आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न घराण्यात जन्म होउनही, त्यांनी स्वकर्तृत्वावर पुढे येण्यासाठी ,अभियांत्रिकी शिक्षणाची वाट चोखाळली. ते उत्तम अभियंता झाले. त्यांनी शासकीय नोकरी करण्यास सुरवात केली.
                   दुसर्‍या जागतीक महायुध्दाचे काळात, म्हणजे सन १९४१ - ४२ साली ,ते पाकिस्तान व अफगाणीस्तानच्या बाॅर्डरवर असलेल्या क्वेट्टा येथे ,रोड कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी शासकीय बदलीवर गेले. क्वेट्ट्याला त्या काळी ,भूकंप प्रवण क्षेत्र मानले जायचे.  नोकरीच्या निमित्ताने बदलीवर इतक्या लांब व धोक्याचे जागी जाण्याचे त्यांचे धाडस, वाखाणण्या सारखेच होते. दुसरा एखादा ,मी बदलीवर एवढ्या लांब जाणार नाही , मी नोकरी सोडतो असे म्हणून ,घरी बसला असता. पण नानांनी आपले कर्तव्य श्रेष्ठ मानून ,आपली पत्नी प्रेग्नंट असताना तिकडे जाण्याचे जे धाडस केले ,ते नक्कीच वाखाणण्या सारखेच आहे.
                नानांचे लग्न त्या काळच्या पध्दती प्रमाणे, वयाच्या १७ व्या वर्षी झाले. ते त्या वेळी शिकत होते. त्या काळी त्यांनी ,आपल्या पत्नीला बरोबरीच्या नात्याने वागविले. बॅंकेत जाताना , कांही महत्वाच्या घरगुती कामासाठी बाहेर जाताना, ते आपल्या पत्नीला सर्व व्यवहार समजावून सांगून , विश्वासात घेत. आपल्या बरोबरीने बाहेर ही नेत. ते सुधारक मतांचे होते.
                   नानांना तीन मुली . आपल्याला मुलीच आहेत म्हणून ,त्यांनी कधी ही मुलींना कमी लेखले नाही. मुलींनी आरामात पण व्यवस्थित शिकावं. आपले संसार  आनंदाने व समाधानाने करावेत ,अशी त्यांची माफक अपेक्षा असे .
                   एखादा विद्यार्थी आर्थिक अडचणीत असेल तर ,ते त्याला मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देत. इतर वेळी त्यांचा स्वभाव काटकसरीचा होता . पण अशा अडल्या नडलेल्यांना  मदत करण्यासाठी , ते कधी ही मागे हटले नाहीत.
                     नोकरीच्या निमित्ताने, ते बाहेरगावी असत . पण मेच्या सुट्टीत ते आपल्या गावी म्हणजे, मिरजला आवर्जून येत. ते मिरजेला आले की, त्यांची भावंडेही आवर्जून जमत. त्यांनाचार बहिणी व एक भाउ होता. नाना , मे च्या सुट्टीत नातेवाईक व शाळेतले जुने मित्र या सर्वांना एकत्र बोलावून, आमरसपुरीचे जेवण करून , सर्वांना आपल्या सहवासाचा आनंद  देत.  तसेच नातेवाईक व मित्र यांच्या सहवासाचा मनसोक्त आनंद,  ते त्या सर्वांना आपल्या बदलीच्या गावी ,आवर्जून बोलावून घेत. अशी त्यांची आनंदी व समाधानी वृत्ती होती.
                 सन १९६२ साली म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी, त्यांना ब्लड प्रेशरचा व त्या अनुषंगाने ह्रदय विकाराचा ,त्रास जाणवू लागला. त्या काळी जे वैद्यकीय उपचार उपलब्ध होते, ते त्यांनी जरूर केले. मुख्य म्हणजे आपल्या आहार विहारावर नियंत्रण ठेवले.
                 शेवटची अंदाजे दहा वर्षे ते कोयना प्रकल्पावर डेप्युटी इंजिनीयर होते. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करण्यावर ,त्यांचा कटाक्ष होता. दि. ४ जानेवारी १९७१ या दिवशी, त्यांचे एक्झीक्युटिव्ह इंजिनीयर या पदावर, प्रमोशन झाल्याची आॅर्डर आली .  त्याच दिवशी संध्याकाळी अंदाजे ५ वाजता, आॅफिसात काम करीत असताना खुर्चीत बसलेल्या अवस्थेत, वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे ह्रदय विकाराने प्राणोत्क्रमण झाले. एक सत्शील, आनंदी व समाधानी  आत्मा अनंतात विलीन झाला.
                     कै. कृष्णाजी शंकर उर्फ के. एस. अथणीकर ,या माझ्या सासर्‍यांच्या स्मृतीस, मनोभावे  त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.

कै. रूक्मिणीबाई कृृष्णाजी अथणीकर , माझ्या सासूबाई.....

कै. रूक्मिणीबाई कृष्णराव अथणीकर ! माझ्या सासूबाई ! त्या अत्यंत सकारात्मक जीवन जगल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात ,परमेश्वराने कांही त्रुटी ठेवलेल्या असतात. पण त्या त्रुटींचा विचार न करता, परमेश्वराने जे चांगले दिलेले आहे त्यांचा आनंद मानून , आनंदी व सकारात्मक जीवन कसे जगावे ,याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी आमच्या समोर ठेवला.
                  त्यांचा जन्म सन १९१८ सालचा. माहेर बेळगाव जवळचे काकती . माहेरचे आडनाव काकतीकर कुलकर्णी. वडील शिक्षणाधिकारी. मुलींनी शाळेत जाण्याची पध्दत नसल्याने, त्यांना शिकवायला घरी शिक्षक येत असे. घरी एकूणच कर्मठ वातावरण.  त्या काळच्या  पध्दती प्रमाणे त्यांचे लग्न ,१४ व्या वर्षी झाले आणि त्या  " कु. कृष्णाबाई गंगाधर कुलकर्णी " च्या  " सौ. रूक्मिणीबाई  कृष्णराव अथणीकर " झाल्या. सासर मिरज. सासरच्या घरी वातावरण, त्या मानाने सुधारकी विचारांचे. त्यांच्या सासूबाईंनी त्यांना ,आपल्या मुली प्रमाणे वागविले.
                माझ्या सासूबाईंना बरेच नातेवाईक, मामी म्हणायचे व माझ्या सासर्‍यांना नाना म्हणायचे. मी या लेखात त्यांचा तसाच उल्लेख, येथून पुढे करीत आहे.
                नाना, माझे सासरे त्या काळी, शासकीय नोकरीत अभियंता होते. त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या होत. नाना सुधारकी विचाराचे असल्याने ,बॅंकेत जाताना किंवा बाजारात जाताना ते आपल्या पत्नीला ,म्हणजे मामींना  आपल्या बरोबर नेत. त्या मुळे बाह्य जगातील सार्वजनिक व्यवहारांची, मामींना चांगली जाणीव आणि कल्पना होती.
                   मामींचा स्वभाव जरा खर्चिक होता. नवीन साड्या वेळोवेळी खरेदी करणे , घरात सर्वांच्यासाठी कांही ना कांही नवीन खरेदी करणे, त्यांना आवडायचे. नाना अभियंता असल्याने ,आर्थिक चणचणीचा प्रश्नच नव्हता. आपल्याकडे कोणी आल्यास ,त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ लक्षात ठेउन आवर्जून करून घालणे, मामींना मना पासून आवडायचे. कोणता ही पदार्थ तयार करताना, तो उत्तमच झाला पाहिजे ,अशी त्यांची खासीयत होती. आलेल्या पाहूण्यांना भेटी दाखल कांही वस्तू किंवा कापडचोपड देउन,  सन्मान करणे हे त्यांना आवडायचे. 
                    १९६२ सालच्या भारत चीन युध्दाचे वेळी,  स्वतः विविध पदार्थ तयार करून ते विकून, त्यातून आलेला पैसा,  " भारतीय संरक्षण निधी "ला त्यांनी दिला होता. १९६७ साली झालेल्या कोयना भूकंपाचे वेळी, त्या नानांचे बरोबर कोयनानगरला होत्या. त्या वेळी अंगावर घराचे दगड पडल्याने, त्यांना फ्रॅक्चर ही झाले होते. पण त्या काटक असल्याने, या शारीरिक त्रासातून लवकरच बाहेर पडल्या.
                   नानांचे म्हणजे माझ्या सासर्‍यांचे निधन झाले ,त्या वेळी त्या ५३ वर्षांच्या होत्या. त्यानंतर कांही वर्षे, त्या मिरजेत एकट्या रहात होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी, त्या चालताना पडल्या.  नंतर वर्षभर त्या अंथरूणावर झोपून होत्या. पण सकारात्मक विचारांच्या जोरावर त्यांनी तो ही कालावधी, आपल्या तीन मुलींच्या सहकार्यांने पार केला. या कालावधीत त्यांनी कधी ही " मला हे काय झाले ? आता माझं कांही खरं नाही , मला जीवनाचा कंटाळा आलाय  ! " असे निराशाजनक उद्गार, कधी ही काढले नाहीत. जे वास्तव समोर येईल ते तात्काळ आणी आनंदाने स्वीकारणे ,हा त्यांचा स्वभाव विशेष होता. हे खूपच अवघड आहे. फार कमी लोकांना हे जमते.
                 त्यांना तीन मुली . थोरली मुलगी  आशा ही कोल्हापूरला , मधली शालीनी कर्नाटकात शिरगूर ( तालूका उगार ) , धाकटी माझी पत्नी रजनी मिरजेत, यांच्याकडे त्या आलटून पालटून रहात असत.  त्यांना  शिरगूर मध्ये राहणे आवडायचे. त्या मुळे जास्तीत जास्त काळ त्या तिथेच असत. तिन्ही मुलींच्या घरचे वातावरण वेगवेगळे होते. पण त्यांनी कुठल्या ही वातावरणांची एकमेकाशी  तूलना न करता , जिथे रहात असत तिथे त्या आनंदात व समाधानात रहात. आपल्यामुळे दुसर्‍याला त्रास होउ नये ,याची त्या अटोकाट काळजी घेत. हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. हे  सर्व गूण  दुर्मिळ आणि घेण्या सारखेच आहेत.
                   त्यांना कै. नानांच्या नंतर  शासकीय " फॅमिली पेन्शन " असल्याने, त्या शेवट पर्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत्या.
                 अशा या मामींचे म्हणजे माझ्या सासूबाईंचे सन २००९ साली, वयाच्या ९२ व्या वर्षी वृध्दापकाळामुळे निधन झाले. एका सकारात्मक, आनंदी , प्रेमळ व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड लुप्त झाले. आज त्या हयात असत्या तर १०२ वर्षांच्या असत्या.
          त्यांच्या पवित्र स्मृतिस हा लेख अर्पण करतो आणि थांबतो.

Sunday, 20 September 2020

चि. आदित्य..." पुत्र व्हावा ऐसा गुंडा....."

चि. आदित्य दीक्षित , चार्टर्ड अकाऊंटंट , डेप्युटी जनरल मॅनेजर , महिंद्रा आणि महिंद्रा , नाशिक प्लान्ट ! माझा मुलगा ! समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे " पुत्र व्हावा ऐसा गुंडा , ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ". येथे गुंडा म्हणजे कर्तृत्ववान ,असा अर्थ अपेक्षित आहे. चि. आदित्यला तो नक्कीच लागू पडतो आहे.
               चि. आदित्य हा एक शांत मुलगा आहे. तो समोरच्याचे म्हणणे, अतिशय शांतपणे ऐकून घेतो. कामाचा किंवा कोणत्या ही गोष्टीचा ताण न घेता, तो आपले काम, अतिशय शांतपणे करीत असतो. हे त्याचे खास असे स्वभाव वैशिष्ठ्य आहे. त्याला पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा घरात असणे ,खूप खूप आवडते. त्याच्या लहानपणी आम्ही घरी, पामेरियन कुत्रा पाळला होता. सध्या आम्ही फ्लॅट मध्ये राहतो. फ्लॅटमध्ये राहून आपल्यामुळे इतरांना त्रास नको , म्हणून त्याने आपली प्राणी प्रेमाची आवड, बाजूला ठेवली आहे.
               चि. आदित्य मिरजला " विद्यामंदिर प्रशालेत " शिकत असताना, त्याने वक्तृत्व स्पर्धेत भरपूर बक्षिसे मिळवली होती. तो ज्या ज्या स्पर्धेत भाग घेत असे, तिथे त्याचा हमखास नंबर यायचाच.  त्याने " महाराष्ट्र टाईम्स " तर्फे होणार्‍या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेउन ,तिथे ही पारिपोषिक मिळविले होते , ही एक फार मोठी आनंदाची बाब आहे.
               चि. आदित्य बी. काॅम. करत असतानाच ,सी. ए. करीन असे म्हणत होता. सी.ए. हा कोर्स अवघड आहे. त्या पूर्वी तू बी. काॅम. झालास तर, तुझ्या हातात एक डिग्री असेल. बी. काॅम. नंतर तू सी.ए. कर, असा सल्ला मी वडीलकीच्या नात्याने, त्याला दिला. त्याने ही तो ऐकला. तो सांगलीच्या चिंतामणराव काॅलेज आॅफ काॅमर्स मधून ,प्रथम श्रेणीत बी. काॅम . झाला . नंतर सी. ए. करण्यासाठी तो पुण्याला गेला.
                सी. ए. झाल्यावर त्याने खासगी प्रॅक्टीस करण्या ऐवजी ,नोकरीचा पर्याय निवडला. तो मुंबईला कॅम्पस इंटरव्ह्यु मधून, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीत  सिलेक्ट झाला. तो किस्सा ही ऐकण्या सारखा आहे. दीडशे फ्रेश सी. ए.ना महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने, इंटरव्ह्यूला बोलावले होते. सुरवातील पंधरा पंधरा सी. एं . चा एक ग्रुप, असे दहा ग्रुप करून, ग्रुप डिस्कशन झाले. त्यात प्रत्येक ग्रुप मधील, एकच कॅन्डिडेट निवडण्यात आला. याचा अर्थ पहिल्या फेरीत, संख्या दीडशे वरून एकदम दहावर आली. या दहा कॅन्डिडेट्सचा पर्सनल इंटरव्ह्यू झाला. त्यातून फक्त तीनच सी.ए. महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने, निवडून घेतले. त्यात चि. आदित्यचा समावेश होता. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
                    आपल्या ज्ञानाच्या आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाच्या जोरावर ,तो आज त्याच कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.
                  तीन वर्षापूर्वी, एका अखिल भारतीय कंपनी तर्फे , भारतातील उत्तम काम करण्यार्‍या, शंभर सी. एं.चा  राजधानी दिल्ली येथे, केंद्रिय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार  झाला .त्यात चि. आदित्यचा समावेश होता , ही अभिमानास्पद बाब आहे.
                   त्याचा प्रेमविवाह आहे. त्याची पत्नी सौ. रमा, सी. एस. ( कंपनी सेक्रेटरी ) आहे. ती स्वतःचा व्यवसाय करते. त्या दोघांना चि. निषाद हा मुलगा आहे. तो नाशिकमध्ये " विस्डम हाय " या आय.सी. एस. सी. बोर्डाच्या शाळेत ,सातवीत शिकत आहे.
                ते तिघे व आम्ही दोघे म्हणजे मी व माझी पत्नी सौ. रजनी, आम्ही नाशिकमध्ये एकत्र राहतो. आजकाल हे दुर्मिळ आहे. पण आम्ही त्या बाबतीत नशिबवान आहोत. 
                अशा या आमच्या गुणवान , कीर्तिमान , सतशील ,प्रेमळ  सुपुत्राला , चि. आदित्यला ,परमेश्वराने उदंड , निरामय आयुष्य द्यावे व त्याच्यावर सर्व सुख समाधानांचा वर्षाव करावा , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Friday, 11 September 2020

चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी...माझी सुकन्या...

चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी . माझी सुकन्या ! जिने मला भरभरून आनंद दिला. लहानपणी तिला दोन नावे होती. शाळेत संपदा आणि घरी कीर्ती ! मला " नाट्यसंपदा " या नाट्य संस्थेची नाटके खूप आवडायची , म्हणून  " संपदा " आणि  कीर्ती शिलेदार यांचा आवाज खूप आवडायचा, म्हणून  " कीर्ती " ! शाळेतल्या तिच्या मैत्रिणी तिला " संपदा " म्हणत आम्ही घरी तिला  " कीर्ती " म्हणत असू .
                कीर्तीचा जन्म मिरजेचा. मी त्या वेळी नाशिकला नोकरीत होतो. त्या वेळी फोन्स नव्हते. त्या मुळे मला पोस्टाने आलेल्या पत्राने ,तीन दिवसांनी ती जन्मल्याचे समजले . मी लगेच मिरजेला गेलो. तिचे पहिले  " दर्शन " मला आज ही स्मरते आहे. गोरापान रंग , तरतरीत नाक , दोन्ही हात दोन्ही कानांच्या बाजूला वर ठेवलेले , मऊशार दुपट्यात झोपलेली माझी " गोड मुलगी " , मला आज ही स्पष्ट दिसते आहे.
                कीर्ती लहान असताना  ,खूप बडबड करायची .मी तिला संस्कृत श्लोक म्हणायला शिकवत असे. ती तीन वर्षांची असताना, तिने भरपूर श्लोक पाठ म्हणून दाखवून ,खूप जणांची वाहवा मिळविली आहे.
                  लहान असताना तिने ,त्रिकालाबाधित सत्याचा शोध लावला होता. ती म्हणायची " माझं मला कळलं , आपलं आपण शाहणं व्हावं ". याचा अर्थ समोरचे दुसरे किंवा परिस्थिती, बदलण्याची वाट पाहू नये. आपणच आपल्यात बदल करून ,प्राप्त परिस्थितीशी जुळवून घ्यावं. लहानपणीची तिची ही विचारांची प्रगल्भता ,कधी कधी आम्हाला ही आश्चर्य चकीत करीत असे. तिच्या लहानपणी तिच्या मावस बहीणी, लिनू आणि तेजू ,यांच्या बरोबर ती खेळायची. तिघींचे त्या काळातले " गमतीचे खेळ " आज ही आठवले, तरी हसू येते. त्या तिघींची गट्टी आज ही तितकीच घट्ट आहे.
                 कीर्तीची बाराव्वी होई पर्यंत, आम्ही नाशिकला होतो. तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण, नाशिकच्या   " सीडीओ मेरी शाळेत " झाले. त्या नंतर तिने होम सायन्सला प्रवेश घेतला. ती बाराव्वी झाली आणि माझी, नाशिकहून सातारा येथे बदली झाली. त्या मुळे आम्ही सर्वजण, मिरजला आमच्या घरी शिफ्ट झालो. मिरज सांगलीत होम सायन्स शिकण्याची सोय नव्हती. त्या मुळे तिला आर्टसला जावे लागले. मिरजेच्या " कन्या महाविद्यालयात " ,तिचे पहिले आणि दुसरे वर्ष झाले . तिसर्‍या व शेवटच्या वर्षासाठी " संस्कृत " हा अवघड विषय, तिने निवडला. त्या विषयाची शिक्षणाची सोय सांगली मिरजेत नव्हती. तिने स्वतः घरी अभ्यास करून , " संस्कृत " या विषयात पदवी प्राप्त केली . ही बाब अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच आहे.
                    काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच, तिचे लग्न ठरले. तिला पहिल्यांदाच दाखविले आणि तिथेच लग्न ठरून, झाले ही ! अशा तर्‍हेने माझी लाडकी मुलगी कीर्ती, चि. सौ. संपदा अजय कुलकर्णी , कारदगेकर , झाली.
                     सासरी गेल्या नंतर, ती तिथे इतकी छान रमली की ,ती " दीक्षितांची , कुलकर्णी " कधी झाली, ते समजलेच नाही. माहेरी आल्या नंतर तिच्या तोंडी ,तिच्या सासरच्या माणसांच्या बद्दलचा जिव्हाळा, सतत दिसून येत असे . आम्ही सर्वजण त्या मुळे सुखावून जात होतो. ही अतिशय आनंदाची व समाधानाची बाब आहे.
                    तिचे लग्न झाल्या पासून आज तागायत , ती अत्यंत समाधानात आहे. तिला एक मुलगा आहे. आमचे जावई श्री. अजयराव ,अत्यंत सज्जन आणि कोल्हापुरातले एक निष्णात फौजदारी वकील आहेत . तिच्या सासरची माणसे, अतिशय स्नेहपूर्ण असल्याने, ती आनंदात आहे. कोल्हापुरात त्यांचा मोठा व मोक्याच्या जागी फ्लॅट आहे. कीर्तीने मोजक्याच पण जवळच्या मैत्रिणी मिळविल्या आहेत . थोडक्यात आपली मुलगी सुखा समाधानात असल्याचे ,आम्हाला संपूर्ण समाधान आहे. हे दुर्मिळ आहे.
                     अशा या आमच्या लाडक्या,  देखण्या आणि वागायला अतिशय सौदार्हपूर्ण असलेल्या मुलीवर, म्हणजेच कीर्ती उर्फ चि. सौ. संपदावर , तिच्या कुटुंबावर परमेश्वराने सर्व सुखांचा वर्षाव करावा, तिला उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे, ही प्रार्थना करतो आणि थांबतो.

Saturday, 5 September 2020

सौ. रमा आदित्य दीक्षित....माझी सून !

चि. सौ. रमा आदित्य दीक्षित . माझी सून. ती " कंपनी सेक्रेटरी ( सी. एस.) " झालेली आहे. स्वतःचा व्यवसाय करते. एक जिद्दी आणि अत्यंत हुषार मुलगी , उत्तम गृहिणी आणि यशस्वी व्यावसायिक असे तिचे थोडक्यात वर्णन करता येईल.
             माहेरचे तिचे नाव कु. प्राजक्ता विश्वनाथ दांडेकर. माहेर मिरज. ती बी. काॅम. झाली आणि नंतर एम. काॅम. करण्यासाठी ती पुण्याला गेली. तिने एम. काॅम. केलेच , पण त्याच बरोबर " जी.डी. सी. ए. आणि डी. सी. एस."  ही केले. प्रत्येक परिक्षेत तिने उज्वल यश संपादन केलेले आहे. ती जात्याच हुषार आहे, अभ्यासू आहे.
              माझा मुलगा चि. आदित्य आणि तिचा प्रेमविवाह आहे. दोन्ही घरचा या विवाहाला पाठींबा असल्याने ,२००६ साली त्यांचा विवाह थाटामाटात मिरज येथे झाला.
               चि. आदित्यची नोकरी नाशिकला असल्याने ते दोघे, विवाहा नंतर नाशिकला रहायला आले. लग्नानंतर  तिने कांही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. आमचा नातू चि. निषादचा जन्म २००७ साली झाला.
                 तो थोडा मोठा झाल्या नंतर, तिने " कंपनी सेक्रेटरी " चा कोर्स करण्याचे ठरविले. सी. ए. सारखा हा कोर्स ही, अतिशय कठीण आहे. या कोर्सच्या एकूण चार परिक्षा असतात. ती पहिल्या परिक्षेला बसली त्या वेळी, तिच्या आईचे अचानक निधन झाले होते. दिवस कार्य चालू असतानाच तिची परिक्षा होती. मनावर झालेल्या या आघातातून सावरून, तिने त्या परिक्षेत उत्तम सुयश मिळविले. तिने फायनलची शेवटची परिक्षा २०१५ साली दिली . त्यात ही तिने उत्तम सुयश मिळविले. ती पास झाली त्या वेळेस, नाशिक केंद्राचा सी. एस. परिक्षेचा निकाल, ०.८ % इतका कमी होता. पण तिने संसार  सांभाळून अभ्यास करून ,उत्तम सुशय मिळविले हे फार महत्वाचे आहे.
                   आता ती स्वतःचा व्यवसाय करते आहे. नुकतेच तिने व तिच्या सहकार्‍यांनी, जुन्या जागेतून नवीन जागेत  स्थलांतर करून, तिथे आपला व्यवसाय सुरू केला आहे. ही फार मोठी अभिमानाची बाब आहे.
                    ती  गृहिणी या नात्याने आपल्या सर्व जबाबदार्‍या ,अत्यंत काटेकोरपणे पार पाडते. चि. निषादचा अभ्यास घेणे , तसेच वेळोवेळी येणारे सणवार , ती निगुतीने पार पाडते. घरातल्या कामाचा तिचा उरक, वाखाणण्या सारखा आहे. पुरणा वरणाचा स्वैपाक करणे , गणपतीत उकडीचे मोदक करणे किंवा नवीन नवीन पदार्थ  शिकून तयार करणे , तिला उत्तम आणि पटापट जमते . दहा बारा लोकांचा गोडधोडाचा स्वैपाक ती कधी बनविते ,ते कुणाला समजणार ही नाही.
                 तिची आणखीन दोन वैशिष्ठ्ये म्हणजे ,ती माहेरच्या आणि सासरच्या नातेवाईकांशी आणि मित्रमंडळींशी ,आवर्जून उत्तम संपर्क ठेवते. तसेच तिचे कार ड्रायव्हिंगवर ही प्रभुत्व आहे.
                 आपला फिटनेस व्यवस्थित रहावा या साठी, जिमला जाउन एक्सरसाईझ करणे व त्याला सुसंगत डाएट सांभाळणे , ती काटेकोरपणे सांभाळते. मध्यंतरी नाशिकमध्ये झालेल्या १० किमीच्या दोन तीन मॅरेथाॅन मध्ये, तिने भाग घेउन यशस्विता मिळवली आहे.
                  ती स्वतःचा व्यवसाय करते म्हटल्यावर , आम्हा वृध्द मंडळींच्याकडे तिचे दुर्लक्ष होत असणार, असे वाटण्याची शक्यता आहे. पण तसे अजिबात नाही. चि. सौ. रमा घरातील प्रत्येकाकडे व्यवस्थित लक्ष देते . मी व माझी पत्नी सौ. रजनी ,आम्ही दोघे त्यांच्या सोबतच राहतो. आम्ही वयोवृध्द आहोत. आम्हाला कोणताही त्रास पडू नये ,उलट आम्ही आनंदात  व सुखात रहावे या दृष्टीने ,ती अत्यंतिक काळजी घेते. ही आमच्या दृष्टीने भाग्याची व समाधानाची गोष्ट आहे. अशी सून आम्हाला लाभली ,ही परमेश्वराची मोठी कृपाच आहे.
                    शैक्षणिक दृष्ट्या हुषार ,यशस्वी व्यावसायिक , गृहकृत्यदक्ष , प्रेमळ , सुस्वभावी अशा आमच्या सुनेला, म्हणजेच चि. सौ. रमाला, परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य देउन ,सुखासमाधानात ठेवावे , तिच्यावर सर्व प्रकारच्या आनंदाचा वर्षाव व्हावा , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Tuesday, 1 September 2020

अॅडव्होकेट अजय रामचंद्र कुलकर्णी , कारदगेकर , माझे जावई...

अॅडव्होकेट श्री. अजय रामचंद्र कुलकर्णी , कारदगेकर , हे माझे जावई आहेत . ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आज मी तुम्हाला त्यांची ओळख करून देणार आहे. मी त्यांना अजयराव असे म्हणतो. त्या मुळे या लेखात मी त्यांचा ,तसाच उल्लेख करीत आहे.
                 अजयराव म्हणजे देखणा माणूस ! गोरापान रंग , मध्यम उंची , राहणी एकदम टिपटाॅप ! त्यांनी एके काळी भरपूर व्यायाम करून, आपले शरीर कमावलेले आहे. ते अतिशय धार्मिक आहेत,पण कर्मकांड त्यांना विशेष आवडत नाही . त्यांना आपल्या वयोवृध्द आई ,वडीलांच्या बद्दल अत्यंतिक प्रेम आणि जिव्हाळा आहे.  त्यांच्या काळजीपोटी, ते रोज फोन करून, त्यांची ख्यालीखुशाली न चुकता विचारतात . त्यांची स्वतःची वडीलोपार्जित शेती आहे. त्यांना शेतीची आवड आणि शेतीतल्या सर्व प्रकारच्या बारकाव्यांची  जाण आहे . हे त्यांचे लक्षात घेण्या सारखे वैशिष्ठ्य आहे.
                   माझ्या मुलीला प्रथमच त्यांच्याकडे दाखवलं आणि तिथेच लग्न ठरलं. हा एक वेगळा आणि आनंदाचा योगायोग आहे.
                  श्री. अजयराव कोल्हापुरात आपला वकीली व्यवसाय करतात. ते सर्व प्रकारचे खटले चालवितात.   त्यातल्या त्यात फौजदारी खटले चालविण्यात, त्यांचा हातखंडा आहे.  त्यांच्या वकीली अनुभवाचे व विशेषतः फौजदारी खटल्यांचे  किस्से , ऐकण्या सारखेच असतात. अजयराव खूप कमी बोलतात. पण त्यातल्या त्यात तुमची चांगली ओळख असेल, वकीली आणि कोर्ट हा विषय निघाला  असेल, तर ते  मोठ्या उत्साहाने  बोलतात . अशा वेळी त्यांचे सुगम बोलणे, ऐकतच बसावे असे वाटते.
                   त्यांचे मूळ गाव कारदगा , ता. चिक्कोडी , जि. बेळगाव , कर्नाटक राज्य. कारदगा कोल्हापूर पासून अंदाजे ,तीस किमी अंतरावर आहे. तिथे त्यांचा मोठ्ठा वाडा आहे व शेतीवाडी आहे. त्यांचे आई वडील सहसा तिथेच असतात. कंटाळा आला तर कोल्हापुरला ही येतात. अजयराव मात्र सुट्टी मिळाली की आपल्या गावी जाउन ,शेतीवाडीच्या कामात लक्ष घालतात.
                     आपले घर  स्वच्छ आणि नीटनेटके असावे या दृष्टीने, गरज असेल तेंव्हा ,ते आपला आब बाजूला ठेउन, आवश्यक ती सर्व मदत करतात. त्यांचे एकत्र कुटूंब आहे. अजयरावांचे कुटूंब  व त्यांचा थोरला भाऊ, वहिनी , पुतण्या , पुतणी  असे सर्व कुटूंबिय एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. हे आजच्या काळात दुर्मिळ आहे.
                   अजयराव आपल्या आई वडीलांची जशी काळजी घेतात ,तशी आमची दोघांची ही घेतात. ते मनाने तसे खूप हळवे आहेत. त्यांना मित्र परिवार आहे, पण तो मोजकाच आहे. व्यावसायीक पार्ट्या करणे त्यांना फारसे आवडत नाही. कुणी पार्टीसाठी बोलावले तर ,ते मन मोडायचे नाही म्हणून हजर राहतात .तिथे ते सर्वांच्यात मिळून मिसळून असतात असे जाणवते ,पण प्रत्यक्षात ते  तेथील वातावरणा पासून मनोमन अलिप्त असतात. ते संपूर्ण शाकाहारी आहेत.
                 असे दुर्मिळ व्यक्तीमत्वाचे जावई मिळणे ,हे भाग्याचे लक्षण आहे , असे आम्हा दोघांचे स्पष्ट मत आहे.
                   जावई  असून  मुला  प्रमाणे  वागणार्‍या ,
श्री. अजयरावांना भरभरून शुभाशिर्वाद देतो . तसेच त्यांचे सर्व मनोरथ लवकरात लवकर पूर्ण होवोत, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.