लेखकाचे मनोगत....
मी सुरेश दीक्षित कांही लेखक नव्हे. शाळेत माझे निबंध नावाजले जायचे असे ही नव्हते. नोकरीत मात्र भरपूर तांत्रिक अहवाल मी लिहीले. पण असे अहवाल लिहीणे म्हणजे जबाबदारीचा तो एक भाग असायचा.
नोकरीत असताना मी नाशिकला आणि माझे आई वडील मिरजेला अशी परिस्थिती कांही वर्षे होती. त्या वेळी मात्र मी माझ्या आई वडीलांना दर आठवड्याला दोन फुल स्केप भरतील एवढे सविस्तर पत्र पाठवत असे.
माझ्या आई मध्ये लेखनाचा गुण होता. ती कारणपरत्वे मिळेल त्या कागदावर किंवा वहीत प्रासंगिक लेख लिहीत असे. तिचा हा गुण माझ्यात आला असावा. त्या मुळे सेवानिवृत्ती नंतर जसे आम्ही मुलगा व सुने सोबत ' निवांतपणे ' रहायला लागलो तसे आपण कांही तरी लिहावे अशी प्रेरणा मला व्हायला लागली.
नाशिक मधील आमच्या सकाळच्या फिरायच्या ' निरामय जाॅगर्स ' या ग्रुप मधील कै. प्राचार्य एस. डी. कुलकर्णी सरांचे ' आत्मवृत्त ' प्रसिध्द झाले . त्या नंतर आपण ही आपले पुस्तक प्रसिध्द करावे असे मनात येउ लागले. मी प्रथम आमच्या फिरायच्या ग्रुपमधील श्री. सुधाकर केसकर सरांच्यावर पहिला लेख लिहीला. तो फेसबुकवर पोस्ट केला. त्याला मिळालेल्या प्रतिसादाने माझा उत्साह दुणावला. मग मी नियमितपणे व्यक्तीचित्रे आणि कांही प्रासंगिक लेख फेसबुकवर लिहु लागलो.
कै. प्राचार्य एस. डी. कुलकर्णी सर मला प्रोत्साहित करीत असत. " तुमचे पुस्तक जेंव्हा केंव्हा तुम्ही प्रकाशित कराल तेव्हा त्या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहीणार " असे ते मला म्हणत असत. पण दैवयोग कांही वेगळाच आहे. आता माझे पुस्तक प्रकाशित होत आहे , पण ते पहायला व त्याची प्रस्तावना लिहायला ' सर ' हयात नाहीत. त्यांच्या ' स्मृती ' प्रीत्यर्थ मी या पुस्तकाला प्रस्तावना न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
माझे हे पुस्तक म्हणजे घरगुती मामला आहे. ज्यांनी माझी जीवनयात्रा ' आनंदी ' बनविली अशा कांही लोकांची मी माझ्या मनातली ' लोभस प्रतिमा ' यातील लेखा द्वारे चितारण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हा वाचकांना हा प्रयत्न माझ्या विषयी वाटणार्या जिव्हाळ्या मुळे ' आवडेल ' अशी आशा आहे.
माझे हे पुस्तक प्रकाशित होण्या मागे अनेकांचे सहकार्य मला लाभले आहे. सर्व प्रथम मी कै. एस. डी. कुलकर्णी सरांचे आभार मानतो. कारण त्यांनी मला हे पुस्तक निर्माण करण्यासाठी ते हयात असताना वेळोवेळी प्रोत्साहित केले .
माझा मुलगा चि. आदित्य व त्याचे महिंद्रा आणि महिंद्रा मधील वरिष्ठ श्री. संदीप कुलकर्णी यांनी मला या पुस्तका विषयी वेळोवेळी अगत्याने चौकशी करून उत्तेजना दिल्या बद्दल त्यांचा मी ऋणी आहे.
माझ्या फेसबुक वरील लेखांचे ज्यांनी प्रेम पूर्वक स्वागत केले त्यात मेरीतील माझा जवळचा मित्र श्री. राजा वर्हाडे , मेरीतीलच माझा स्नेही श्री. प्रकाश क्षीरसागर याच्या पत्नी सौ. रेखा वहिनी , मिरजेच्या आमच्या सुह्रुद सौ. माया गोडबोले , तसेच माझ्या फेसबुक फ्रेंड , ज्यांना मी कधी ही भेटलो नाही अशा ,पुण्याच्या सौ. वैजू दातार , माझे आदरणीय व ज्ञानी स्नेही श्री. सुधाकर केसकर सर , माझी मुलगी चि. सौ. संपदा कुलकर्णी यांचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे.
तसेच हे पुस्तक उत्तम व देखणे व्हावे कामी मला ज्यांनी मना पासून सहाय्य केले त्यात श्री. मंदार गोकर्ण ,श्री. रमेश बापट , श्री. रामभाऊ जोशी , त्यांच्या पत्नी सौ. सुहास वहिनी व त्यांची कन्या आर्किटेक्ट चि. स्नेहल यांनी दिलेल्या सहकार्याचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील चित्रे चि. श्रुती कुलकर्णी हिने तिच्या चित्रकलेच्या गुरू सौ. सुहास वहिनी जोशी आणि आर्किटेक्ट चि. स्नेहल जोशी यांच्या मार्गदर्शना खाली तयार केलेली आहेत. चि. श्रुतीचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.
हे पुस्तक छापून प्रसिध्द करण्याचे कामी ज्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन व सहाय्य केले त्या श्री. सलील दातार व त्यांचे सहकारी श्री. तुषार यांचा मी मना पासून आभारी आहे.
सर्वात शेवटी, जिने वेळोवेळी दिलेल्या संपूर्ण सहकार्य व प्रोत्साहना शिवाय हे पुस्तक झालेच नसते , अशी माझी पत्नी सौ. रजनी, हिला मी शतशः धन्यवाद देतो आणि थांबतो.
दि. २९ जून २०२१
नाशिक.