Tuesday, 14 January 2020

सहजीवनाची ७२ वर्षे....सौ. वेणूताई व श्री. अनंतराव जोशी..

*  सहजीवनाची ७२ वर्षे.....  *
********************
               आज मी तुम्हाला, अशा जोडप्याची ओळख करून देणार आहे की, ज्यांच्या लग्नाला ७२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी तीन वर्षांनी त्यांच्या लग्नाला ७५ वर्षे पूर्ण होतील. लग्नाला २५ वर्षे झाली की " रौप्य महोत्सव " होतो. ५० वर्षे झाली की " सुवर्ण महोत्सव" होतो . ६० वर्षे झाली की " हिरक महोत्सव " होतो आणि ७५ वर्षे झाली की " अमृत महोत्सव " होतो. थोडक्यात आणखी तीन वर्षांनी ,त्यांच्या लग्नाचा " अमृत महोत्सव " होणार आहे. हा एक दुर्मिळातला दुर्मिळ योग आहे , असे मला वाटते. लग्ना नंतर ७२ वर्षे एकमेकाची साथ संगत मिळायला, परमेश्वराची कृपाच पाहिजे. अशी कृपा ज्यांच्यावर झालेली आहे, असे जोडपे म्हणजे, श्री. अनंतराव जोशी , वय वर्षे ९२ आणि सौ. वेणूताई जोशी , वय वर्षे ८९.
                श्री. अनंतराव जोशी ९२ वर्षांचे असले तरी, आज ही ,आपली कामे आपण स्वतः करतात. स्वतःचे कपडे स्वतः धुतात. रोजच्या कामांच्यासाठी ,त्यांना कोणाची ही मदत लागत नाही. सौ. वेणूताई जोशी , या ही ८९ वर्षांच्या असल्या तरी ,आपली रोजची कामे स्वतः करू शकतात. थोडक्यात या वयात, अशी स्वयंपूर्णता असणे ,हे  भाग्याचेच लक्षण नाही
 का ?
                 वयोपरत्वे ,दोघे घराच्या बाहेर सहसा पडत नाहीत. घरातल्या घरात हिंडून फिरून, व्यवस्थित असतात. त्यांच्या वयाचा विचार करता ,थोडेफार औषधपाणी घ्यावे लागते .  ते दोघे औषधे बिनचूकपणे घेतात व आपला बोजा कुणावर ही पडू नये, या दृष्टीने आपला दिनक्रम आखतात.
ते सध्या सांगलीला , विश्रामबाग , येथे मुला जवळ राहतात. घरातील सर्वजण ,त्यांची योग्य ती काळजी निश्चितच घेतात.
                 ७२ वर्षा पूर्वीचा त्यांचा प्रेमविवाह आहे , ही पण , त्या काळचा विचार करता , आगळी वेगळी गोष्ट आहे. श्री. अनंतराव हे कोकणस्थ ब्राह्मण आणि वेणूताई या देशस्थ ब्राह्मण ! त्या काळी प्रेमविवाह, शिवाय त्यात देशस्थ कोकणस्थ विवाह ,म्हणजे अब्रम्हण्यम् ! त्या दोघांना त्या साठी , आपण कल्पना ही करू शकणार नाही  असा , भरपूर त्रास सहन करावा लागला. दोघांनी एक दिलाने, मोठ्या कष्टाने, धाडसाने ,अक्षरशः शून्यातून आपले विश्व उभे केले आणि संसार यशस्वी करून दाखविला. त्या बद्दल त्या दोघांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.
                  आज मागे वळून पाहताना ,त्या दोघांना आपले प्रेम आणि वैवाहिक जीवन ,कृतकृत्य झाल्याचे समाधान नक्कीच असेल , यात मला तरी शंका वाटत नाही. पण त्या साठी त्या दोघांनी दिलेली " झुंज " ,आपणा कोणाला ही दिसणार नाही किंवा जाणवणार नाही. ती त्या दोघांनाच माहिती आहे.
               श्री. अनंतराव व सौ. वेणूताई या दोघांना दोन मुले. ते दोघे मुला सोबतच राहतात . मुलगी इचलकरंजीला असते. दोन्ही मुले आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत.
                श्री. अनंतराव व सौ. वेणूताई यांना उत्तम आणि निरामय दीर्घायुष्यासाठी ,भरभरून शुभेच्छा ! तसेच त्यांच्या लग्नाचा " शतक महोत्सव " साजरा  व्हावा  , ही सदिच्छा देतो आणि थांबतो.
                खाली फोटोत  माझ्या शेजारी खुर्चीत बसलेले दोघे दिसत आहेत ते श्री. अनंतराव जोशी आणि सौ. वेणूताई जोशी.

No comments:

Post a Comment