" नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य "
****************************
काल दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी मी , नाशिक मधल्या आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुपसह " नांदूर मधमेश्वर " येथील पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी गेलेलो होतो. हे पक्षी अभयारण्य नाशिक पासून अंदाजे ४० किमी अंतरावर आहे. पक्षी दर्शनासाठी सर्वसाधारणपणे १५ जानेवारी ते फेब्रुवारी अखेर , हा उत्तम कालावधी असतो .आम्ही गेलो त्या वेळी आमच्या बरोबर पक्षी तज्ज्ञ श्री. आगाशे आणि श्री. शशिकांत गुडसूरकर सर असल्याने खूपच नवीन माहिती समजली.
महाराष्ट्रात भरपूर धरणे आहेत पण मग नांदूर मधमेश्वर धरणा जवळच पक्षी अभयारण्य का व कसे झाले ? इतर धरणांच्या जवळ कसे झाले नाही ? असा एक सहज सुलभ प्रश्न होता. त्याला श्री. आगाशे यांनी समर्पक उत्तर दिले. नाशिकच्या गंगापूर धरणातले पाणी नांदूर मधमेश्वर धरणात येते व इथून ते शेतीवाडीला दिले जाते. थोडक्यात गंगापूर धरणाचे पाणी वाटप येथून होते. त्या मुळे येथे पाणी कमी झाले की गंगापूर धरणातून सोडले जाते. पाण्याची पातळी वर्षभर कमी जास्ती , कमी जास्ती होत असल्याने नांदूर मधमेश्वर येथे दलदलीचा प्रदेश तयार झालेला आहे. या दलदलीत पक्ष्यांचे भक्ष्य असलेले किडे , कीटक इत्यादींची वाढ होते व त्या खाद्य आकर्षणाने पक्षी येथे येतात. इतर धरणात पावसाळ्यात पाणी भरते व वर्षभर हळू हळू ते कमी होते , त्या मुळे दलदलीचा प्रदेश निर्माण होत नाही , सबब तेथे पक्षी खाद्य नसल्याने पक्षी अभयारण्य निर्माण होत नाही.
पक्षी राजस्थान , तिबेट , हिमालयीन प्रदेश इतकेच कशाला युरोप , रशिया येथून नांदूर मधमेश्वर येथे येतात. हजारो किलोमीटरचा प्रवास ते करतात. गरजे नुसार पक्षी दिवसाला तीन हजार किलोमीटर अंतर सलग न थांबता ही प्रवास करतात. हे कसे शक्य होते ? या प्रश्नाचे उत्तर श्री. आगाशे यांनी खूप छान सांगीतले. ते म्हणाले... पक्षी इंग्रजी व्ही ( V ) या आकारात प्रवास करतात. त्या मुळे एनर्जी कमी लागते. ( आपण लढाउ विमाने ही V आकारात जाताना पाहिली आहेत )तसेच पक्ष्यांना वार्याच्या प्रवाहांचा अंदाज लग्गेच येतो . वार्याचा स्पीड , वार्याची दिशा यांच्या सुसंगत पंखांची फडफड न करता केवळ पंख पसरून , पंखांना ठराविक कोन देउन , कमित कमी एनर्जी खर्च करून ते जास्तीत जास्त अंतर कापू शकतात.
पक्षी विश्रांती घेण्यासाठी झोपतात कसे ? या प्रश्नाला श्री.आगाशे म्हणाले....माणसे अंग टाकून झोपतात तसे पक्ष्यांचे कधीच नसते. जमिनीवर वावरणारे कोंबडी सारखे , कांही पक्षी बसून विश्रांती घेतात पण पाणस्थळी वावरणारे पक्षी उभ्या उभ्या विश्रांती घेतात. या विश्रांतीचे वेळी एक पाय ताठ तर दुसरा किंचित दुमडलेला असतो. नंतर दुसरा पाय ताठ व पहिला किंचित दुमडलेला ,अशा प्रकारे पाया वरील ताण कमी जास्त करून , पक्षी विश्रांती घेतात.
कांही वेळेस असं घडतं की एखाद्या वर्षी अपेक्षे एवढे पक्षी इकडे येतच नाहीत , असं का होतं ? या प्रश्नाचे उत्तर श्री. गुडसूरकर सरांनी फार छान सांगीतलं. ते म्हणाले....सगळा पक्ष्यांचा थवा आला व इकडची परिस्थिती बरी नाही म्हणून परत गेला असे होत नाही. पक्षी थव्याने येण्या पूर्वी त्यांचे एक दोन दूत प्रथम इकडे येतात , परिस्थितीची , हवामानाची अनुकूलता पाहणी करतात. परिस्थिती अनुकूल असेल , तर परत जाउन सांगतात व मगच पक्ष्यांचा थवा तिकडून इकडे यायला निघतो.
पक्षी हवामानाच्या सोयी नुसार इकडून तिकडे , तिकडून आणखी दुसरीकडे , फिरत असतात. मग त्यांचे मूळ स्थान कोणते हे कसे ठरविले जाते ? या प्रश्नाचे उत्तर श्री. आगाशे यांनी छान सांगीतले. ते म्हणाले , पक्षी जिथे अंडी घालतात , तो प्रदेश त्यांचा मूळ प्रदेश मानला जातो.
मानव जातीत , पुरूषांच्या मानाने , स्त्रिया सुंदर व आकर्षक असतात. या बाबतीत पक्ष्यांचे वेगळेपण म्हणजे , नर पक्षी हा मादी पेक्षा तेजस्वी आणि देखणा असतो. मादी नराच्या मानाने कमी तेजस्वी आणि कमी देखणी असते.
सर्व साधारण कल्पनेपेक्षा हे पक्ष्यांचे वेगळे जग व वेगळी माहिती नक्कीच विस्मयकारक आहे.
आम्ही नांदूर मधमेश्वर अभयारण्यात गेलो , त्या वेळी आकाश अभ्राच्छादित असल्याने , सूर्य प्रकाश नव्हता , त्या मुळे उत्तम प्रकारची दुर्बिण आमच्या गाईडकडे असून ही आम्हाला मनाला समाधान देणारे पक्षी दर्शन झाले नाही.