Saturday, 26 October 2019

सौ. सुहास यशवंत जोशी....एक चिंतनशील चित्रकार !

           आज मी तुम्हाला, माझ्या  नाशिकमधील सकाळच्या  फिरायच्या ग्रुप मधील, श्री. रामभाऊ  ( यशवंत ) जोशी यांच्या पत्नी, सौ. सुहास जोशी यांची ओळख करून देणार आहे.                 त्यांचे वैशिष्ठ्य म्हणजे, त्या  अत्युत्कृष्ठ चित्रकार आहेत. घर संसार सांभाळून, त्यांनी चित्रकलेत केलेली प्रगती, ही कोणाला ही आश्चर्य वाटावे, अशीच आहे. संसार सांभाळून ,रात्री जागून अभ्यास करून, दिवसाकाठी फक्त दोन तीन तासच विश्रांती घेउन , त्यांनी चित्रकलेची परिक्षा दिली आणि त्यात ,त्या महाराष्ट्र राज्यात, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या  .तिथून त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. चित्रकलेत त्यांनी ,मुंबई विद्यापिठाची  Master's Degree  , सर्वोत्तम श्रेणी मिळवून ,प्राप्त केली आहे. या विषयात Ph. D. करण्याचे त्यांचे स्वप्न  ,सध्यातरी अपूर्ण आहे. ते स्वप्न त्या नक्कीच सत्यात उतरवतील, अशी आशा आहे. चित्रकलेत
 Ph. D. करण्याचा विचार करणे , ही सामान्य गोष्ट नक्कीच नाही.
              सर्व सामान्य माणसाला , चित्रकलेतील दोनच प्रकार माहिती असतात. एक म्हणजे निसर्गचित्रे आणि व्यक्तीचित्रे ! पण चित्रकलेत, जवळ जवळ तीस ते पस्तीस प्रकार आहेत ,हे सौ. सुहास वहिनींशी बोलताना समजले. मधुबनी , वारली , राजस्थानी , तंजावर , माडिया गोंड , श्रीलंकन मास्क , केनेडियन फिगरेटिव्ह तसेच आॅस्ट्रेलियन इत्यादी इत्यादी !  जगातील चित्रकलेच्या संदर्भातील, सर्व  प्रकारांचा, त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांनी  काढलेल्या प्रत्येक चित्रातील प्रत्येक रेषे मागे ,वापरलेल्या रंग संगतीमागे, एक सुप्त  विचार असतो , हे त्यांच्याशी बोलताना जाणवते. त्यांच्याशी  त्या बाबत चर्चा करताना ,त्यांचा सखोल अभ्यास पाहून,  मी तर अक्षरशः अवाक् झालो. चित्रकला हा विषय सखोल , चिंतनशील आणि विचारगर्भ असतो हे मला प्रथम त्या दिवशी समजले आणि मी थक्क झालो.
               " व्हिनस आर्ट अॅकॅडमी " ही चित्रशाला ,त्या चालवितात. त्यांच्या या चित्रशालेत ,लहान मुलांच्या पासून ते वयोवृध्दांच्या पर्यंतचे सर्व विद्यार्थी, शिक्षण घेउ शकतात. आपल्या चित्रशालेत खूप जणांनी यावं , या पेक्षा , येणार्‍या प्रत्येकाला खूप खूप यावं , असा त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्या चित्रशालेत ,चित्र रेखाटन चालू असताना ,मंद संगीत चालू असते . ज्याचा सकारात्मक परिणाम, चित्रे काढताना त्या मागच्या वैचारिक भूमिकेवर निश्चितच होतो , असा त्यांचा अनुभव आहे.
           सौ. सुहास वहिनींचे हस्ताक्षर, " मोत्याच्या दाण्या " प्रमाणे आहे. त्यांना पत्र लेखनाची खूप आवड आहे. त्यांनी त्यांच्या सासर्‍यांना, एकेकाळी रोज लिहीलेली पत्रे ,मुलींना लिहीलेली काव्यात्मक अशी पत्रे , ही त्या त्या नात्यांना जोडणारा, भावोत्कट असा पूलच आहे,  असे म्हणणे संयुक्तिक होईल.
              सौ. सुहास वहिनींनी आपल्या मातोश्रींच्यावर ,ओवीबध्द अशी एक छान " पोथी " तयार केलेली आहे. आई विषयी वाटणारे प्रेम, त्यात ओतप्रोत भरलेले दिसते. संसारात त्यांना त्यांच्या पतिची, म्हणजे श्री. रामभाउंची समर्थ साथ आहे.
            अशा या  अत्युत्कृष्ठ चित्रकार , प्रेमळ शिक्षक , कुटूंबवत्सल  गृहिणी असलेल्या, कवि मनाच्या  सौ. सुहास वहिनींना, परमेश्वराने निरामय आणि उदंड आयुष्य द्यावे ही प्रार्थना करतो आणि थांबतो.
      खाली फोटोत दिसत आहेत, त्या सौ. सुहास वहिनी . त्यांच्या हातात आहे  " कलाशिक्षक गौरव पुरस्कार " ! शेजारी आहे ते ,त्यांनी काढलेले एक चिंतनशील चित्र ! या चित्रातील प्रत्येक रेषेमागे , प्रत्येक बिंदू मागे , प्रत्येक रंगछटे मागे एक चिंतनशील विचार आहे.

Tuesday, 15 October 2019

श्री. अजय खरे , एक वेगळा मुलगा !

           आज काल असे दिसते की , आई आणि वडील भारतात आहेत आणि मुले नोकरीच्या निमित्ताने परदेशात !यात गैर कांहीच नाही. मुले आपल्या प्रगतीसाठी पंख पसरतात , आई वडील मुलांच्या प्रगतीच्या आड न येता ,आनंदाने त्यांना निरोप देतात. पुढे जसजसे दिवस , महिने आणि वर्षे जातात , तसतसे वय झाल्याने ,भारतात असलेल्या आई वडीलांना, एकटेपणा जाणवतो. मुलांचा आणि विशेषतः नातवंडांचा ,सहवास हवा हवासा वाटतो. पण ते अनेक दृष्टींनी शक्य नसते. वयोपरत्वे, हे दोघे तिकडे जाउ शकत नाहीत आणि मुले तिकडेच नोकरी व्यवसायात आणि आपल्या संसारात रमल्याने, इकडे येउ शकत नाहीत. अशी मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण होते  की , ज्यातून मार्ग काढणे ,दोघांना ही अशक्य होउन बसते .
                 पण माझ्या माहितीतला एक मुलगा ,असा आहे की , त्याने परदेशातील आपली नोकरी सोडून , तिकडचे सर्व  आवरून , तो केवळ आपल्या आई वडीलांच्यासाठी, भारतात परत आला आहे. परदेशात तो त्याच्या कंपनीत अत्युच्च पदावर होता. पगार ही आपल्या कल्पनेच्या पलीकडचा होता , मानमरातब होता , मोठाच्या मोठा कंपनीने दिलेला बंगला होता , पण ते सर्व सोडून ,आपली पत्नी आणि मुलासह  तो भारतात परत आलेला आहे.
               या मुलाचे नाव आहे चि. अजय मधूसुदन खरे.  आपले आई वडील ,आता वृध्द झालेले आहेत व त्यांना आपली गरज आहे, या जाणीवे पोटी , परदेशातील नोकरी सोडून येणारा, माझ्या माहितीतला हा पहिलाच मुलगा !
              अशा प्रकारे तिकडची नोकरी सोडून येणे , मानसिक आणि आर्थिक  दृष्ट्या,  किती कठीण असेल ,त्याची आपल्याला कल्पना येणार नाही. पण केवळ आई वडीलांच्या प्रेमापोटी ,तो आला आहे. त्याच्या पत्नीची आणि मुलाची त्याला संपूर्ण साथ आहे , हे पण फार महत्वाचे आहे. समजा , मुलगा म्हणून त्याला इकडे यावेसे वाटले असते , पण त्याच्या पत्नीने व मुलाने, ह्या प्रस्तावास नकार दिला असता , तर तो एकटा, एवढा मोठा निर्णय घेउच शकला नसता. पण सर्वांनी एकमताने निर्णय घेउन, ते इकडे भारतात परत आले , ही फार फार दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे , असे माझे स्पष्ट मत आहे.
                   धन्य तो मुलगा ,त्याचे कुटूंब आणि धन्य ते आई वडील , की ज्यांच्या साठी मुलगा प्रेमाने , परदेशातील सर्व ऐहिक सुखे सोडून ,भारतात परत आला.
      खाली फोटोत  दिसत आहे तो हाच, चि. अजय खरे !
        परमेश्वराने या  खरे कुटूंबियांच्या वर,  सर्व प्रकारच्या सुखाचा आणि आनंदाचा वर्षाव  सतत करावा , हीच सदिच्छा देतो आणि थांबतो.